Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
असे असून ब्रह्मेंद्र नीतिमत्तेचा केवळ पुतळा होता म्हणून रा. पारसनीस वर्णन करतात! तेव्हां असा वस्तुविपर्यास करण्यात त्यांचा हेतू काय असावा बरें? आपले पूर्वज मोठे होते, शूर होते, कर्तृत्ववान् होते, नीतिमान होते, अशी अभिमानाची प्रौढी मिरविण्यांत मौज आहे खरी; परंतु ते सर्वगुणसंपन्न होते, त्यांच्यांत दोष बिलकुल नव्हते, तें नीतीचे केवळ पुतळे होते, वगैरे देवांना साजणा-या गुणांचा आरोप त्यांजवर करणें म्हणजे मनुष्यस्वभावाची अट्टाहासानें थट्टा करणेंच आहे. वर्तमान व भावी पिढ्यांना आपल्या पूर्वजांचे गुणदोष कळावे, कोणत्या गुणांच्या जोरावर ज्यांनी राष्ट्राची उन्नति केली, व कोणत्या दोषांच्यामुळें तें राष्ट्राच्या अवनतीला कारण झाले, हें ज्ञान त्यांस व्हावें, हा तर इतिहास लिहिण्याचा प्रधानहेतु आहे. तो एकीकडे सारून काल्पनिक वर्णनें लिहिण्यांत तात्पर्य काय? ब्रह्मेंद्रस्वामी नीतिमान् होता, गोविंदपंत बुंदेले स्वामिनिष्ठ होता, महादजी शिंदे महाराष्ट्रसाम्राज्याभिमानी होता, वगैरे वर्णनें वाचलीं म्हणजे वाचकांच्या मनांत कारणांचा विपर्यास उत्पन्न होतो व तो भलत्याच विचारसरणीचा अवलंब करतो. तो म्हणतो, एवढें नीतिमान्, स्वामिनिष्ठ व अभिमानी पुरुष राष्ट्रांत असतांना, ज्याअर्थी पानिपतासारखें संकट आलें व १८१८ तल्यासारखी क्रांति झाली, त्याअर्थी आपल्या ह्या देशाची भवितव्यताच बलीयसी, दुसरें काहीं नाही! ही दैववादाची विचारसरणी मोठी घातुक आहे. ह्या सरणीचा मनावरती एकदां पगडा बसला म्हणजे प्रयत्नाची दिशा-जी राष्ट्रांच्या उन्नतीचा केवळ प्राण आहे-तिची वाढच खंटते. क्लाईव्ह, हेस्टिंग्स, वगैरे लोकांची काल्पनिक चरित्रें लिहिण्यांत इंग्रज लेखकांना काय फायदा वाटत असेल तो असो, आपल्या इकडे असल्या चरित्रांना अजिबांत फांटा देणें अत्यंत जरूर आहे. शनिमाहात्म्य, बुधबावन्नी, शिवलिलामृत वगैरे काल्पनिक व दैववादी पुस्तकांचा आपल्या इकडे भरणा कमी आहे असें नाहीं. त्यांतच ऐतिहासिक काल्पनिक चरित्रांची भर घालण्यांत फायदा कोणता?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना खंड ३ रा
३०. असो. मराठ्यांच्या राजकारणांत स्वामीचें महत्त्व कितपत होतें, ह्या गोष्टीची शहानिशा येथपर्यंत झाली. तीवरून इतकें कळून आले कीं:-सूत्रधार ह्या नात्यानें मराठ्यांच्या राजकारणांत ब्रह्मेंद्राचा बिलकुल संबंध नव्हता; मराठ्यांच्या राजकारणाचीं अंतर्व्यवस्था किंवा बहिर्व्यवस्था म्हणजे सरंजामी सरदारीची पद्धति किंवा संयुक्त साम्राज्याची पद्धति ह्यांच्या उत्पत्तीशीं स्वामींचा दुरूनहि परिचय नव्हता; मराठ्यांच्या कोंकणांतील राजकारणाशीं स्वामीचा जो कांही संबंध झाला तो प्रधान स्वरूपाचा नसून सर्वस्वी गौण प्रकारचा होता; हा संबंध यद्यपि गौण प्रकारचा होता तत्रापि त्याचे परिणाम अत्यंत हानिकारक झाले; ती हानि भौतिक नव्हती, नैतिक होती; शाहू व बाजीराव ह्यांचें गुरुत्व स्वामीला प्राप्त झाल्यामुळें ह्या हानींचें स्वरूप फारच भयंकर झाले; ‘यश्चदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः’ या न्यायानें स्वामीच्या दुर्गुणाचे अनुकरण इतर सरदार करूं लागले; त्यावेळच्या ह्या सरदारांचे अनुकरण पुढील दोन तीन पिढ्यांनीं केलें; व भूमितिश्रेढीनें चाललेले हें अनुकरण मराठ्यांच्या राष्ट्राच्या नाशास कारणीभूत झालें.
३१. बह्मेंद्रस्वामीच्या हालचालीचें खरें स्वरूप हें असें आहे. ब्रह्मेंद्रस्वामीचा पत्रव्यवहार आज मिळाला आहे तितका जर मिळाला नसता तर ह्या स्वरूपाचें खरें चित्र जसें रेखडतां यावें तसें खचित आलें नसतें. आजपर्यंत लोकांचा असा समज होता कीं, ब्रह्मेंद्रस्वामी राष्ट्रांचा उद्धार करणारे जे थोडे महापुरुष ह्या महाराष्ट्रांत झाले त्यांपैकींच एक होता. ह्या गैरसमजानें कित्येकांनीं ब्रह्मेंद्रस्वामीचीं श्रीसमर्थ रामदासस्वामींशीं तुलना केली आहे. परंतु हे तुलना करणारे लोक असा विचार मनांत आणीत नाहींत की ह्या आपल्या राष्ट्रांत रामदास स्वामींसारखे महात्मे जर पिढ्यान पिढ्यां उत्पन्न झाले असते, तर आपली नैतिक व अर्थात् राजकीय अवनति झाली नसती. शिवाय हे तुलना करणारे लोक हेंहि विसरतात कीं कोणत्याहि ऐतिहासिक पुरुषाच्या गुणदोषांचे जें चित्र काढावयाचें असतें. तें दस्तऐवजी पुराव्यावरून काढावयाचें असतें. रा. पारसनिसांनीं ब्रह्मेंद्रस्वामीचें जे चरित्र स्वामींच्या पत्रव्यवहाराला जोडले आहे, त्यांत ह्या दोन्ही गोष्टींचा त्यांनी विचार केलेला दिसत नाहीं. रा. पारसनिसांनी छापिलेले दस्तऐवज पहावे तर त्यांत स्वामीचें जें चरित्र दृश्यमान होत आहे, तें सदर गृहस्थांनीं लिहिलेल्या चरित्राशीं बिलकुल जमत नाहीं. एखाद्या बगल्या वकिलानें एखाद्या कुळाचा कब्जा घ्यावा, न्यायाधीशापुढें आपल्या कुळाच्या नालस्तीचे तेवढे दस्तऐवज रुजूं करावे आणि तोडानें मात्र कुळाच्या साळसूतपणाचे पोवाडे गावे, तशांतलाच प्रकार प्रस्तुत इतिहासपटूचा झाला आहे! बाजीराव चिमाजी अप्पा, शाहूमहाराज वगैरे मोठे मोठे लोक, आपण ईश्वरांश आहांत, आपण कर्तेकरविते आहांत, आपले आम्ही चरणरज आहों वगैरे बहुमानार्थी मायने स्वामीला उद्देशून लिहितात, त्याअर्थी स्वामी खरोखरच महापुरुष असावा, मराठ्यांच्या राजकारणाचा सूत्रधार असावा, अशी रा. पारसनीस यांची समजूत झालेली दिसते; परंतु ज्या पुरुषाला गुरु केला, त्याला परम दैवत समजण्याची जी आपल्या देशांत बरी किंवा वाईट चाल आहे, तिच्या अनुरोधानें ह्या लोकांनी हे मायने लिहिले आहेत, ही गोष्ट जर त्यांनी आपल्या डोळयांपुढें ठेविली असती, तर ह्या दस्तऐवजांतील मजकुराचा खरा अर्थ समजण्याच्या मार्गाला लागण्याची त्यांना एक उत्तम सोय झाली असती. शिवाय ज्या नायकाचें किंवा नायिकेचें चरित्र लिहावयाला घ्यावयाचें तो नायक किंवा ती नायिका रणपटु, विद्यापटु, दानपटु शौर्यपटू अथवा सर्वगुणपटु दाखविणे आपलें कर्तव्य आहे असें ह्या इतिहासप्टुला वाटत असल्यामुळें, त्याच्या हातून हे असले बगल्या वकिलाचें अर्धवट मासले लोकांच्या पुढे मांडले जातात. रा. पारसनिसानीं अस्सल लेख छापिले नसते आणि स्वामीचें चरित्र लिहिले असतें, व त्यांत स्वामी सर्वगुणसंपन्न होता असें विधान केलें असते, तरीदेखील मनुष्यमात्राच्या ठायीं सर्वगुणसपन्नत्वाचा आरोप केलेला पाहून सदर विधान अवास्तव आहे, असें म्हटल्यावांचून रहावतेंना. रा. पारसनिसांनी तर अस्सल लेख छापून सर्वगुणसंपन्नतेचा समारोप स्वामींवर केलेला आहे. त्यामुळे क्लाईव्ह, वारन हेस्टिंग्स वगैरे आंग्लराजकार्यधुरंधरांच्या मेकाले वगैरेंनीं काढिलेल्या मलिन चरित्रपटांवर सफेतीचा हात फिरविणा-या कित्येक आधुनिक इंग्लिश इतिहासपटूंचे स्मरण होतें. ब्रिटिश संयुक्त साम्राज्याच्या हिंदुस्थानांतील भागाचे जे मूळ संस्थापक होते, ते नैतिकदृष्ट्या फार हलक्या दर्जाचे होते असें बर्क, मेकाले वगैरे राष्ट्रांच्या ख-या हिताचें इंगित जाणणा-या लेखकांचें मत होतें. यद्यपि हें मत खंरे आहे, तत्रापि सध्याच्या ब्रिटिश साम्राज्याच्या इभ्रतीला व नीतिमत्तेला कमीपणा आणणारें हे मत आहे असें कित्येक आधुनिक अँग्लोइंडियनांना वाटून त्यांनी उपरिनिर्दिष्ट सफेती देण्याचा उद्योग केलेला आहे. बर्क व मेकाले ह्यांच्या लेखांपुढें ह्या सफेतीवाल्याचें कितपत तेज पडेल तें पडो; इतकें मात्र म्हटल्यावांचून रहावत नाहीं, कीं ही खोट्याचें खरें करून दाखविण्याची सोफिस्टांची युक्ति साक्रेटिसाच्या वेळीं जितकीं तिरस्करणीय वाटत होती. तितकीच सध्यांहि वाटते. रा. पारसनिसांच्यासंबंधानेंहि हाच न्याय लागू पडतो. ब्रह्मेंद्रस्वामीच्या पत्रांत स्वामीचें वर्तन राष्ट्रीय नीतिमतेच्या दृष्टीनें अत्यंत गर्हणीय होतें, ह्याचे दाखले पदोपदीं सांपडण्यासारखे आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
२९. छत्रपती व त्यांच्या राण्या ह्यांच्याशीं स्वामीचें वर्तन अदबीचें असे. ब्रह्मेंद्रस्वामी भार्गवाचा अवतार आहे ह्या कल्पनेने शाहूच्याहि मनांत ब्रह्मेंद्राविषयीं पूज्यबुद्धि असे. भार्गवरामाचा व क्षत्रियाचा पौराणिक संबंध छत्रपतीला पूर्ण अवगत असल्यामुळें, ब्रह्मेंद्राशीं शाहू आदबशीर प्रेमानें वागे. छत्रपतींपेक्षां छत्रपतींच्या राण्यांशीं ब्रह्मेंद्राचा संबंध विशेष असे. शाहूला पुत्रोत्सवाचें सुख माहीत नसल्यामुळें, त्याला व त्याच्या राण्यांना पुत्रसंतानाचा आशीर्वाद ब्रह्मेंद्र दरवर्षी देत असे. एकदां तर स्वामींनें “पुत्रसंतान व्हावें ऐसें वोशध” सगुणाबाई राणीला भावार्थे प्रातःकाळी घेण्यास दिलें (पा. ब्र. च. ले. २६३) ह्या आशीर्वादाचा व वोशधाचा बिलकुल उपयोग झाला नाहीं हें प्रसिद्धच आहे. तत्रापि शाहूचा राण्यांचा त्याजवरील विश्वास तिळमात्रहि कमी झाला नाहीं. ह्या पुत्रसंतानाच्या आशीर्वादिक देणगीशिवाय राण्यांशी स्वामीचें इतरहि दळणवळण असे. शाहूच्या राण्या सर्व प्रकारच्या राजकारणांत लहानसहान ढवळाढवळ करीत असत. त्या ढवळाढवळींत स्वामीहि लुडबुड करावयाचा प्रयत्न करी. राजकीय प्रसंगासंबंधानें अष्ट प्रधानांशीं किंवा शाहूर्शी राजरोस रीतीनें ब्रह्मेंद्र व्यवहार करण्यास फारसा धजत नसे. अशा सबंधांनें स्वामी शाहूच्या राण्यांचेच द्वार पहात असें. १७३३ त व १७३४ त कोंकणांत हबशाशीं युद्ध चाललें असतांना, मुंबईचा इंग्रज शामळाला मदत करून मराठ्यांना बरीच अडचण करीं. ह्या अडचणीची वार्ता ऐकून इंग्रजाला बंद करण्याचा बूट ब्रह्मेंद्राच्या मनांत आला. हा बूट, खरें पाहिलें तर, स्वामीनें बाजीरावाला किंवा शाहूला कळवावयाचा. परंतु आपल्या सूचनेचा आदर परमार्थाने कोणी करील अशी खात्री नसल्यामुळें, स्वामीनें सखवारबाईकडे ह्या विषयासंबंधीं बोलणें काढिलें. मुंबईकर इंग्रजांची व आपली मैत्री आहे, असें एक दोन इंग्रजांची व स्वामीची गांठ पडल्यावरून स्वामीस वाटत होतें. ह्या औट घटकेच्या मैत्रीवरून इंग्रज आपला हुकूम ऐकेल असेंहि ह्या नवशिक्या मुत्सद्याचें मत होतें. हें मत दोन तीन वेळां स्वामीनें सखवारबाईंपुढें मांडलें (पा. ब्र. च. ले. ९ व १०) व दोन्ही तिन्ही वेळां, इंग्रजांना सांगून पहा, असें उत्तर तिने त्याला दिलें वास्तविक रीत्या काम करू लागण्यास एवढें आश्वासन बस होतें. परंतु नाकर्त्या मनुष्याप्रमाणें स्वामीनें पुन्हां तोच प्रश्न खुळसटपणानें सखवारबाईंपुढे नव्यानें ठेविला (पा. ब्र. च. ले. १०२). ह्या ताज्या दमानें मांडिलेल्या जुन्या प्रश्राला सखवारबाईनें किंचित् झणझणीत उत्तर दिलें तें, स्वामीची राजकारणप्रसंगांत कितपत पत होती ह्याचें उत्तम निदर्शक आहे. सखवारबाईनें लिहिले की, ह्या राज्यकारभाराच्या गोष्टी आहेत; केवळ आमच्यासारख्या पडतपोशीच्या स्त्रियांच्या करवीं छत्रपतींवाचून ह्या गोष्टी होतात असा अर्थ नाही; तेव्हां राजश्री स्वामींच्या (शाहूच्या) आज्ञेनें जें कर्तव्य तें केलें पाहिजे; महालतर्फेने म्हणजे आमच्यासारख्या स्त्रियांशीं बोलून तें काम होत नाहीं. (पा. ब्र. च. ले. १०२). सखवारबाईनें छत्रपतीकडे जाण्यास सांगितल्यावर, इंग्रजांच्या मैत्रीचा उपयोग करून घेण्याचा स्वामीचा प्रयत्न फारसा पुष्ट झाला नाहीं असा संशय येतो. कां कीं १७३९ त कप्तान इंचबर्डाशीं करार होई तोंपर्यंत इंग्रज हबशाला व फिरंग्याला मदत करीत होता हें सुप्रसिद्ध आहे. १७३४ त स्वामीची इंग्रजांशीं मैत्री जर उपयोगाची झाली असती तर १७३५, १७३६ व १७३७ ह्या सालांत इंग्रजानें हबशांना मदत केली नसती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
ज्या स्वामीनें बाजीरावाची इतर प्रसगीं वाटेल ती अंगेजणी करावी, त्याच स्वामीनें बाजीरावाला इतके नमवावें, हें महत्वाकांक्षी व ढोंगी मानवी स्वभावाला अनुरूपच आहे. लाखों रुपये ज्यांचे देणें त्यांचे तगादे उंबरठ्यावर आले असतां नम्रतेचें एक वाक्यहि ज्या पुरुषाच्या तोंडून कल्पांतीहि निघावयाचें नाहीं, त्या बाजीरावाला स्वामीसारख्या मनुष्यापुंढे रडगाणें गाऊन दीनतेच्या गोष्टी बोलण्यास कमीपणा वाटत नसे. परमहंसत्वाचा दर्जाच असा कांही आहे कीं, त्यापुढें वाटेल त्यानें आपलें वाटेल तें गुह्म बिनबोभाट बोलावें. शिवाय बाजीरावाचे व ब्रह्मेंद्राचे नाते गुरूशिष्यत्वाचें असल्यामुळें व परस्परांना परस्परांची जरूर असल्यामुळें, एकमेक एकमेकांचा कमीपणा गोपन करीत व एकमेक एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवीत. एकाच धंद्यांतील माणसें अन्योन्यहितार्थ एकमेकांवर विश्वास कसा ठेवतात हें ह्या दोघांच्या चरित्रावरून शिकण्यासारखें आहे. ब्रह्मेंद्र कितीहि चुकला तरी त्याच्यावरील आपला विश्वास ढळूं द्यावयाचा नाहीं असा बाजीरावाचा कृतसंकल्प होता. ह्याचें एक मासलेवाईक उदाहरण देतों. १७३७, १७३८ व १७३९ हीं तीन सालें वसईवरील मोहीम चालली होती. बाजीरावाचें गुरुत्व स्वामीकडे असल्यामुळें बाजीरावाच्या मोहिमेंना बह्मेंद्र आशीर्वाद देत असे. पेशव्यांनीं शरीरद्वारा मेहनत करावी व ब्रह्मेंद्रानें ईश्वरावर संकट घालून मोहिमेस यश आणावें असा श्रमविभाग असे. उपासना व आशीर्वाद ही मोहिमा फत्ते करण्याचीं स्वामीचीं दोन जबरदस्त आयुधें असत. त्याप्रमाणें १७३७ तील वसईवरील मोहिमेस स्वामीनें आपला आशीर्वाद, वसई लवकरच फत्ते होईल, असा दिला परंतु त्या सालीं वसई लवकर फत्ते होईल असा रंग दिसेना. पुढें १७३८ त चिमाजी पुन्हां वसईवर गेला; परंतु त्यावेळीहि वसई फत्ते होण्याचा योग जुळून आला नाहीं. वसईचें काम फत्ते होई तें करणार स्वामी समर्थ आहेत, म्हणून बाजीरावानें स्वामीस १७३८ च्या १० जानेवारीस लिहिलें होतें (पा. ब्र. च. ले. ११६). धारावी, ठाणें वगैरे स्थलींच १७३८ चा मोसम गेल्यामुळें वसई ह्या वर्षीहि सई झाली नाहीं. तेव्हां फिरंग्याशीं तह करून घेण्याचें बाजीरावाला ब्रह्मेंद्रानें सुचविलें; परंतु बाजीरावानें तो उपदेश अमान्य केला (पा. ब्र. च. ले. ३७). ह्यावर १७३९ च्या १२ व १५ जानेवारीस बाजीरावानें वसईच्या आशीर्वादाची स्वामीस दुबार आठवण करून दिली (पा. ब्र. च. ले. ११९ व ३९). ह्या दुबार आठवणीनें चिरडीस जाऊन, वसई न आली तर या राज्यांत राहील त्याचें संन्यासपण लटकें, अशी ईरेची प्रतिज्ञा स्वामीनें केली (पा. ब्र. च. ले. २१९) व शिमगी पौर्णिमे अलीकडे म्हणजे १७३९ च्या १२ मार्चाच्या अगोदर वसई सई होईल म्हणून १७३९ च्या ४ फेब्रुवारीस अभिवचन दिलें (पा. ब्र. च. ले. ५१). त्याप्रमाणें १७३९ च्या ६ फेब्रुवारीस म्हणजे माघ शुद्ध दशमीस वसईस चिमाजीनें मोर्चे लाविले (पा. ब्र. च. ले. ५२). पुढें महिन्याभराने १७३९ ची १२ मार्च म्हणजे शिमगीपौर्णिमा तीं आली; तरीहि वसई सई झाली नाहीं, व स्वामींचें भाकीत खोटें ठरलें. इतकें झालें तरी पेशव्याची स्वामीवरील श्रद्धा रेसभरही कमी झाली नाहीं. शेवटी ५ मे १७३९ त वसई सर झाली, व चिमाजीने ब्रह्मेंद्राच्या भुलोबाला नवसाच्या १२५ पुतळ्या पाठवून दिल्या. ब्रह्मेंद्रस्वामीचा आशीर्वाद तीन वर्षे खितपत पडला असतांहि पेशव्यांची त्याजवरील श्रद्धा कायम राहिली, हीच ब्रह्मेंद्रस्वामीच्या वजनाची खरी गुरूकिली आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
२८. स्वामीच्या चरित्राचें वरील वर्णन वाचून कित्येकांना अशी जिज्ञासा उत्पन्न होण्याचा संभव आहे कीं, बाजीरावाची इतकी मनधरणी करण्यांत स्वामीचा हेतू तरी असा काय होता? ह्या प्रश्नाला उत्तर देतांना एक गोष्ट सांगून ठेवणें जरूर आहे. ती ही कीं, स्वामीमजकूरांनी नांवाला मात्र परमहंसत्वाची दीक्षा घेतली होती. बाकी त्यांच्या आत्म्यावर वासनांच्या गोधडींची जाड पटलें बसलेली होतीं. दिल्ली आग्र्यापर्यंत बाजीरावांचे गुरू म्हणून कीर्ति व्हावी (पा. ब्र.च. ले ३२०). सर्व मराठमंडळात मान मिळावा, सर्वांनीं आपणास भिऊन असावे, ही स्वामीच्या मनांतील पहिली जबरदस्त आकांक्षा होती. ही मानसिक आकांक्षा तृप्त झाल्यावर, स्वामीचा हेतू, पुष्कळ द्रव्य संपादन करून व अनेक गांवें इनाम मिळवून शरीरसुखाचीं साधनें वाढवावीं असा होता. बाजीरावाच्या व छत्रपतीच्या जोरावर, सरदारांना दहशत घालून स्वामी हजारों रुपयाची भिक्षा कमवी, नानाप्रकारचीं वस्त्रें व भूषणें मिळवीं व परोपरीचीं खाद्यपेयें संग्रह करीं. कायमची व हंगामी मिळून स्वामीची वार्षिक प्राप्ति पंचवीस हजारांच्या खाली नव्हती. ह्यापैकीं बराच भाग स्वामी अडल्यावेळी बाजीरावाला कर्जाऊ देत असे. इतर सरदारांना भय घालणें, त्यांचीं गृहछिद्रें शोधून काढणें, प्रतिपक्षांची निंदा करणें बाजीरावाची शिफारस करणें व छत्रपतींचें सूत्र राखणें, ह्या पंचविध सेवेखेरीज ब्रह्मेंद्रस्वामी बाजीरावाची द्रव्यसेवाहि करी. बाजीराव ब्रह्मेंद्रस्वामीचा जर कोणत्याहि एका गोष्टींत मिंधा असला तर तो ह्या द्रव्यसेवेंतच विशेष होय. स्वामीनें कर्जाच्या फेडीविषयीं तगादा केला म्हणजे बाजीराव गोगलगाईप्रमाणें त्याच्यापुढे मऊ होऊन जाई. कर्जानें भंडावून गेल्याविषयी स्वामीला बाजीरावानें जी पत्रें धाडलीं आहेत तीं इतर सावकारांच्या तगाद्याला अनुलक्षून आहेत असा कित्येकांचा व विशेषतः ग्रांटडफचा समज आहे. परंतु हीं पत्रें व ह्या पत्रांतील विनवण्या खुद्द स्वामीच्या तगाद्यानें वेडावून जाऊन स्वामीलाच लिहिलेल्या आहेत, हे सदर पत्रांतील मजकूराकडे बारीक लक्ष दिलें असतां समजून येण्यासारखें आहे. इतर सावकारांचे तगादे सदोदित चालूं असतां, स्वामीचा तगादा येऊन पोहोंचला म्हणजे स्वामीच्या हृदयाला पाझर फुटण्याकरितां बाजीरावानें हीं पत्रें लिहिलेलीं आहेत. रा. पारसनीस यांनीं छापिलेली लेखांक ३०, ३१ आणि ३२ हीं पत्रें बाजीरावाच्या ओढगस्तीसंबंधीं आहेत. “कर्जाचे ऐवजीं पांच हजार रुपये पाठवणें” म्हणून लेखांक ३० त स्वामी बाजीरावास लिहितो. रुपये पुढें पावते करूं, म्हणून बाजीरावानें उत्तर दिलें आहे. लेखांक ३१ व ३२ यांत शिलेदारांच्या देण्यासंबंधानें काय अपेष्टा होतात ह्याचेच वर्णन बाजीराव करतो. शिलेदारांचे पाया पडंता पडतां कपाळ छिनत चाललें असतां, स्वामीनेंहि आपल्या पैक्याचीहि मागणी केली. उंटाला एकादेवेळी काडीचेंहि ओझें फार होतें, त्याप्रमाणें बाजीरावाला स्वामीचीहि मागणी अत्यंत निष्टुरतेची वाटली. अशा महत् विवंचनेंत असतांना स्वामीला बाजीरावानें हें पत्र लिहिलें आहे. बाजीरावाला वंगवण्याची स्वामी अशीच एखादी संधि पहात असे. अन्य वेळीं डौलानें व तो-यानें वागणारा बाजीराव अशा वेळीं अगदी गयावया होऊन जाई. ज्याच्यापुढें सर्व जग चळवळ काप्पे तो बाजीराव नम्रतेच्या गोष्टी बोलूं लागावा, एवढेंच स्वामीला हवें असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
२७. इतर सरदारांशीं स्वामी यद्यपि मानभावीपणानें, उर्मटपणानें व बेपर्वाईनें वागे, तथापि छत्रपति व बाजीराव, ह्यांच्याशीं त्याचे वर्तन फारच निराळ्या प्रकारचें असे. छत्रपतींशी अदबीनें व बाजीरावाशीं मित्रत्वानें वागण्याचा स्वामीचा परिपाठ असे. महाराष्ट्रांतील त्यावेळच्या ह्या सूत्रधारांशी ह्या अशा रीतीनें वागल्याशिवाय इतर सरदारांवर शिरजोरपणा स्वामीला करतांच आला नसता. बाजीराव जें जे करी तें तें स्वामीला उत्तमच वाटे व तसें वाटतें असें दाखविण्याशिवाय दुसरी सोयच नव्हती. बाजीराव ही व्यति इतकी स्वतंत्र आचाराची व स्वतंत्र विचाराची होती कीं, ब्रह्मेंद्रासारख्या जोग्याला त्याच्या सूत्रानेंच चालणें जरूर पडे. बाजीरावाचा ज्यांच्याशीं स्नेह त्यांच्याशीं स्वामी स्नेहानें वागे व बाजीरावाच्या शत्रूंशी स्वामी बाकून राही. उदाहरणार्थ श्रीपतराव प्रतिनिधीशीं स्वामीचीं वागणूक कोणत्या प्रकारची होती तें पहा, रा. पारसनिसांनीं छापिलेल्या लेखांक १, २, २१४, २१६, २१७, २१८, २१९, २२०, ह्या पत्रांत स्वामींची कांहींना कांहीं तरी तक्रार प्रतिनिधीच्या विरुद्ध आहे व प्रतिनिधीनें ती कांही ना कांहीं तरी सबब लढवून फेटाळून टाकिली आहे. उमाबाई दाभाडणीशींहि स्वामींचे वर्तन असेंच मानभावीपणाचें होतें. त्र्यंबकराव दाभाडे व कृष्णाजी दाभाडे ह्या चुलत भावांत भांडण-तंटे उपस्थित करून कृष्णाजीला बाजीरावाच्या पक्षाला ओढणारा स्वामीच होता. त्र्यंबकराव डभईंच्या लढाईत पडल्याची वार्ता स्वामीला प्रथम कृष्णाजी दाभाड्यानें कळविली आहे (पा. ब्र. च. ले. १८८). बाजीरावाचा शत्रू बाबूजी नाईक बारामतीकर ह्याची नालस्ती स्वामीनें पारसनिसांच्या ३०० व्या लेखांकांत केली आहे. सारांश ज्याच्यावर भोंकण्यास स्वामीला बाजीरावानें विनंति करावी, त्याच्यावर तुटून पडण्यास गुरुमहाराज एका पायावर तयार असत. बाजीरावाचें गुरुत्व संपादून स्वामीला जें श्रेष्ठपण मिळालें होतें, त्याची फेड स्वामीं हरहमेष करी. शाहूमहाराजांचें प्रेम बाजीरावावर रहावें ह्या हेतूनें स्वामी वारंवार छत्रपतींच्या दर्शनास जात असे. ‘सातारा दुष्टबुद्धि जे आहेत, त्यांचें राजास कळूं येतें’ (पा. ब्र. च. ले. २६८); ‘येथें तो अवघे पाच सा पातकी आहेत, उमाबाईकडे अवघे झाले आहेत’ (पा. ब्र. च. ले. २८७); ‘राजश्रीजवळ तुमची फारसी शिफारस केली, कित्येक तुमच्या स्वहिताच्या गोष्टी सांगितल्या’ (पा. ब्र. च. ले. २९); वगैरे उता-यांवरून छत्रपतींचें सूत्र राखण्याच्या कामीं बाजीरावाला स्वामीचा किती उपयोग होत असे तें उत्तम व्यक्त होतें. ब्रह्मेंद्र व बाजीराव ह्यांचे गुरुशिष्याचे नातें होते; परंतु ब्रह्मेंद्र बाजीरावाचा किती मिंधा होता हें ह्या उता-यावरून उत्तम लक्ष्यांत येतें. शिव्या, श्राप, स्तुति, निंदा वाटेल तें काम करण्यास बाजीरावाप्रीत्यर्थ ब्रह्मेंद्र तयार असे. अट एवढीच कीं, आपल्याला सर्व लोकांनीं भिऊन असावें, व आपल्याला कर्तुमकर्तु सामर्थ्य आहे अशी सर्वत्र समजूत व्हावी. आपण किती मोठे आहोंत हें समजण्याइतकी नाजूक दृष्टि कोणाला नसलीच,- बहुतेक लोकांना ती नसावीं अशी स्वामीची समजूत असे- तर स्वामी स्वतःच्या गुणांचें वर्णन जोरदार शब्दांनीं त्या मठ्ठ लोकांच्या डोक्यांत आपलें वैभव ठासण्याचा मनोरम प्रयत्न करी. स्वामीचें हे आत्मश्लाघापटुत्व एखाद्या वेळीं अशा कांहीं थरास जाऊन पोहोंचे कीं, आत्मश्लाघेवरून परनिंदेवरही स्वामी वेळ पडल्यास घसरत असे. आत्मश्लाघेचे दाखले स्वामीच्या पत्रांतून इतके पसरले आहेत कीं, सदर पत्रें सहज चाळणा-याला देखील ते थोड्याशा श्रमाने उपलब्ध होण्यासारखे आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
२६. हबशाच्या लढाईशीं किंवा वसईच्या मोहिमेशीं, किंवा इतर कोठीलहि मसलतीशीं ब्रह्मेंद्राचा जर म्हणण्यासारखा संबंध नव्हता, तर तो पुढारी ह्या पदवीला कधींच पोहोंचला नव्हता व त्याच्या अगंच्या दुर्गुणांचा वर वर्णन केला इतका प्रभाव होण्याचा संभव मुळींच नव्हता अशी शंका आणतां येण्याजोगी आहे. आंग्रे, दाभाडे वगैरे एक दोन सरदारांशींच काय तो स्वामीचा निकट संबंध होता व त्यांच्यांशीं केलेल्या दुर्वर्तनाचा इतका दूरवर परिणाम पोहोचेल हें संभवत नाहीं असेंहि कित्येकांचे म्हणणें पडेल. ह्या शंकांवर उत्तर असें आहे कीं, यद्यपि लढाया, मोहिमा वगैरे मसलतींशीं स्वामींचा संबंध नव्हता, व ह्या नात्यांनी यद्यपि त्याला पुढारी ही संज्ञा देतां येणें मुष्कील आहे, तथापि बाजीराव, चिमाजी अप्पा, शाहूमहाराज वगैरे महाराष्ट्रांतील अत्यंत श्रेष्ठ पुरुषांचें गुरुत्व स्वामीस प्राप्त झाल्यामुळें त्याच्या शब्दाला व हालचालींना एका प्रकारचें महत्त्व आलेलें होतें. शाहूमहाराज, बाजीराव व चिमाजी अप्पा ह्यांची कृपादृष्टि करून घेणें ज्यांस इष्ट असे, त्यांना ब्रह्मेंद्रस्वामीचें पाय धरणें उपयोगाचें होईल असें वाटण्याचा संभव असे. बाकी ब्रह्मेंद्रस्वामीची आराधना सदाच सफल होत असे असा मात्र नियम नव्हता. (१) सयाजी कनोजा म्हणून स्वामीच्या प्रीतींतील एक माणूस होता. त्याला सेखोजी आंग्र्यानें १७३० त कामावरून दूर केलें. ह्या मनुष्याला ब्रह्मेंद्रानें संभाजीकडे, बाजीरावाकडे व चिमाजी आप्पाकडे शिफारस करून पाठविले. परंतु ह्या शिफारसीचा कांहीं एक उपयोग झाला नाहीं. पुढे बाळाजी बाजीराव पेशवाईवर आल्यानंतर स्वामीनें कनोजाचें गा-हाणें त्याजकडे नेलें (पा. ब्र. च. ले. २८९ व ७२) व नोकरीचें आश्वासन मिळविलें. (२) सात शेणवयाला गोव्याकडे नेमावें म्हणून स्वामीनें शिफारस केली (पा. ब्र. च. ले. २८) परंतु ती साधक बाधक प्रमाणें दाखवून पेशव्यांनीं अमान्य केली. (३) मानाजी आंग्र्यांवर लोभ करावा म्हणून स्वामीनें चिमाजी अप्पास लिहिलें (पा. ब्र. ता. ले. १३२). सुधें वर्तल्यास त्यावर लोभ करूं म्हणून चिमाजीनें उत्तर दिलें. स्वामीच्या शिफारसीचा फारसा उपयोग झाला नाहीं असे आणीकहि दाखले स्वामीच्या पत्रव्यवहारांत पुष्कळ आहेत. त्यावरून असें दिसतें की, स्वामीची शिफारस योग्य असल्यास तिचा आदर पेशवे करीत असत. रा. पारसनिसांनीं छापिलेल्या १२५ वगैरे लेखांकांत योग्य शिफारसीचा आदर केलेला दृष्टीस पडतो. स्वामीच्या शिफारशींची अशी जरी व्यवस्था असे तत्रापि फलद्रूप होणा-या शिफारशींकडेच तेवढें लक्ष देण्याची गरज मनुष्यांची जी सार्वत्रिक चाल आहे, तिला अनुसरून अनेक सरदार व सरदारांच्या बायका प्रसंगविशेषीं स्वामीच्या मध्यस्थीचा उपयोग करून घेत असत. स्वामीचें मुख्य महत्त्व म्हटलें म्हणजे हेंच होतें. ह्याच महत्त्वाच्या जोरावर स्वामी पुष्कळ लोकांना टाकून बोले व छत्रपतींनीं माझा मान ठेविला, पेशव्यांनी माझा तसा बडेजाव केला, वगैरे गोष्टी सांगून तो चोहोंकडे आपली छाप बसवी. राधाबाई पेशवीण, राधाबाई थोरातीण, उमाबाई दाभाडीण, लक्ष्मीबाई आंग्री वगैरे सरदारस्त्रियांच्या पत्रांत स्वामीची छाप ह्या बायांच्या मनावर केवढी बळकट बसली होती हे उत्तम त-हेनें पहावयास मिळतें. संभाजीला श्रापून भस्म करून टाकिला, तुळाजीच्या पायांत बेडी अडकविली, शिद्दी सातासारखा दैत्य मारिला, कान्होजी आंग्र्याला नरकांत घातला, वीरूबाईची गत काय झाली (पा. ब्र. च. ले. २९१) वगैरे दहशती घालून सरदारांना पत्रें लिहिण्याचा व भिवडविण्याचाहि स्वामीचा परिपाठ असे. त्यामुळें स्वामी कोण्या वेळीं काय करील अशी भीति मनांत बाणून त्याला बहुतेक लोक फार करून नमूनच असत. राजाला किंवा बाजीरावाला सांगून आपल्याविषयीं त्यांचीं मनें कलुषित करील किंवा मंत्रतंत्रानें अथवा तपोबलानें आपलें अनिष्ट चिंतील, ही दुहेरी भीति स्वामीसंबंधानें बहुतेक लोकांच्या मनांत असे. देवभोळेपणानें भारून गेलेलीं हीं माणसें स्वामीचा राग होऊं नये म्हणून त्याला परम निष्ठेचीं पत्रे लिहीत व पेशव्यांच्या व छत्रपतींच्या विरुद्ध जाण्याचे नाना प्रकारचे उघड किंवा लपून डावपेंच करीत. हे डावपे.च सुरू झाले म्हणजे पेशव्यांना व छत्रपतींना त्यांना ताळ्यावर आणणें जरूर पडे व वैमनस्याचें बीज कायमचे रोविलें जाई. ह्या लोकांची ही अशी विपन्न स्थिति झाली म्हणजे स्वामी त्यांना शिव्या श्राप देण्याला तयारच असे मांडलिक सरदारांशीं स्वामीचा कार्यक्रम असा अरेरावीपणाचा असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
२५. ब्रह्मेंद्रस्वामीच्या हयातींत जी ही कारणपरंपरा सुरू झाली, तिचा अर्थ उत्कटत्वेंकरून मनांत भरण्यास दुस-या एका कारणपरंपरेशी तिची तुलना करून दाखविल्यास उत्तम होईल. शिवाजीच्या कारकीर्दीत रामदासस्वामीनें नीतिमत्तेचा, देशाभिमानाचा, परस्पर विश्वासाचा व राजनिष्ठेचा धडा घालून दिला. तो १६४६ पासून १६८० पर्यंत शिवाजीनें, शिवाजीच्या मुत्सद्यांनीं व शिवाजीच्या सरदारांनीं मनोभावाने गिरविला. पुढें संभाजी गादीवर येऊन त्यानें करूं नयेत अशीं अनन्वित कर्म केलीं. त्यांचीं फळेहि तो लवकरच पावला; परंतु त्याच्या गैदी व तामसी वर्तनानें वडिलोपार्जित स्वराज्य अवरंगझेबाच्या हातांत बहुतेक गेल्यासारखेंच झालें. शिवाजीनें, रामदासानें व तत्समकालीन मुत्सद्यांनीं व सरदारांनीं घालून दिलेला नीतिमत्तेचा, देशाभिमानाचा, परस्पर विश्वासाचा व राजनिष्ठेचा धडा पुढील पिढी कितपत गिरविते ह्याची परीक्षा ह्यावेळी झाली. राजारामाने देशत्याग केला. शाहू शत्रूच्या हातांत सांपडला, सर्व स्वराज्य मोंगलानीं पादाक्रांत केलें व अवरंगझेबानें नानाप्रकारचीं आमिषे दाखविली; परंतु ह्या संकटपरंपरेंतील एकाचीहि पर्वा न करतां ह्या पुढील पिढीतील मुत्सद्यांनीं व सरदारांनीं स्वातत्र्यार्थ लढण्याची पराकाष्ठा केली, व स्वातंत्र्य मिळविण्याचा पण शेवटास नेऊन आपलें पुढारपण व श्रेष्ठत्व सार्थ करून दाखविलें. ह्यावरून लक्षांत एवढेच घ्यावयाचें कीं, जाज्वल्य नितिमत्ता आपला गुण सहसा विसरत नाहीं. आतां ह्या नीतिमत्तेच्या धड्याच्या जोडीला दुस-या बाजीरावाच्या वेळची नीतिमत्ता अथवा अनीतिमत्ता घ्या. १७९६ पासून १८१८ पर्यंत बाजीरावाच्या कारकीर्दीत दंगेधोपे, परस्पर मत्सर, देशद्रोह, यादवीं, भ्रष्टाचार वगैरे सर्व कांही प्रकार होऊन, शेवटीं भरतखंडांतील मराठ्यांची सत्ता नष्ट होण्याची वेळ आलीं. दुष्ट, भ्रष्ट, भेकड, अविश्वासी, कर्तृत्वशून्य असा जो बाजीराव त्याचा जर द्वेष सर्व सरदारांना झाला होता तर त्याला काढून किंवा दाबांत ठेवून मराठ्यांची संयुक्त सत्ता राहिली नसती असे नाहीं. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन वगैरे सरदांची इभ्रत सरदारांची इभ्रत संयुक्तसत्ता तोलून धरण्याइतकी नव्हती अशी कांही नव्हती. महाराष्ट्रांतील शिल्लेदार, सुखवस्तू लोक, साधू, संत, भिक्षुक, शास्त्री कोठें पळून गेले होते अशांतलाहि प्रकार नव्हता; परंतु परस्पर विश्वास, देशाभिमान वगैरे जे राष्ट्रीय नीतिमत्तेचे मुख्य घटक त्यांची सर्वत्र वाण पडल्यामुळें ह्या सरदार, शिलेदार व मुत्सद्दी मंडळींनीं बाजीराव ब्रह्मवर्तास गेलेला सुखानें पाहिला. ब्रह्मेंद्रस्वामीनें घालून दिलेला चुगल्या करण्याचा, भांडणें लावण्याचा, विश्वासघात करण्याचा धडा दोन पिढ्या गिरविल्याचा हा परिणाम झाला. अवंरगझेबाच्या वेळीं ज्या राष्ट्रांतील पुढा-यानीं स्वातंत्र्यार्थ जिवापाड मेहनत घेतली, त्याच राष्ट्रांतील मंडळी बाजीरावाच्या वेळीं केवळ स्तब्ध व उदासीन राहिली. रामदासी व भार्गवरामी धड्याचे हे असे निरनिराळे परिणाम झाले. १७९५ त नाना फडणिसाच्या कारकीर्दीत जी टोलेजंग इमारत भक्कम असावी असें वाटलें, ती त्याच्यानंतर दहा पांच वर्षांत अशी एकाएकीं डबघाईस कशी आली ह्यांचें कित्येकांना आश्चर्य वाटतें. परंतु ह्या राष्ट्राची राष्ट्रीय नीतिमत्ता ब्रह्मेंद्रस्वामीपासून दोन तीन पिढ्या बिघडत बिघडत बाजीरावाच्या कारकीर्दीत पूर्णंपणें नासून गेलीं ही गोष्ट जर लक्ष्यांत घेतली तर आश्चर्य वाटण्याचें कांहीं एक कारण राहणार नाहीं. नाना फडणिसाच्या कारकीर्दीत महादजी शिंदे, तुकोजी होळकर, फत्तेसिंग गायकवाड, भोसले, पटवर्धन वगैरे महाराष्ट्र साम्राज्यांतील सरदारांनीं संयुक्त सत्तेला न जुमानतां परराष्ट्रांशीं तह करण्याचा अभ्यास केला व संयुक्त सत्तेची शकलें बहुतेक अर्धा मुर्धी करून ठेविलीं. नाना फडणिसासारख्या नीतिमान मुत्सद्याचें दडपण गेल्यावर ही अनीतिमत्ता पूर्णपणें अनियंत्रित झाली व ब्रह्मेंद्रस्वामीनें लाविलेल्या रोपास, कडू फळे आलीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
ह्या विनविण्यांचा परामर्ष स्वामी कसा काय घेतों हें पहावयास जावें तों निराळाच चमत्कार पहाण्याचा प्रसंग येतो. क्षुल्लक कारणावरून रागास पेटणें, शिव्याश्राप देणें, बंधुविरोध माजविणें, अभद्र शब्दांचा उच्चार करणें, असलें अनन्वित प्रकार परमहंसाचे चाललेले पहाण्यांत येतात. संभाजी व तुळाजी आंग्रे मूंर्खांतले मूर्ख व दुष्टांतले दुष्ट होते हें कबूल आहे. त्यांचें शासन छत्रपति व पेशवे राजरोस रीतीनें करीत होते. असें असतां ब्रह्मेंद्रस्वामी ज्याअर्थी खासगी द्वेषाचें व वैराचें निर्यातन करण्याच्या बुद्धीनें आंग्र्यांचा नाश करण्यास प्रवृत्त झाला, त्याअर्थी मराठ्यांच्या वाढत्या साम्राज्यांतील सरंजामी सरदारांना मुख्य सत्तेचे आधारस्तंभ बनविण्याच्या पुढारपणाच्या कामगिरीस स्वामीची लायकी फार कमी दर्जाची होती असें म्हणणें भाग पडतें. महाराष्ट्र त्यावेळी संयुक्त सत्तेचे स्वरूप धारण करीत होतेंच प्रत्येक सरंजामी सरदार आपापल्या ठिकाणीं साधेल तितके स्वातंत्र्य उपभोगण्याचा प्रयत्न करी. गुजराथेंत दाभाडे, खानदेशांत बांडे, व-हाडांत भोंसले व कोंकणात आंग्रे मुख्य सतेच्या विरुद्ध नाना युक्तीनीं जात. अशा प्रसगीं एकींचें माहात्म्य व दुहींचे दौर्बल्य, ह्या सरदारांच्या मनावर ठसवून मुख्य सत्तेशीं निष्ठापूर्वक वर्तन करण्याचा उपदेश स्वामीसारख्या निरिच्छ पुरुषाने करावयाचा. परंतु तसें कांहींएक न करितां, इतर सामान्य अप्पलपोट्या मनुष्याप्रमाणें स्वामी आंग्र्यांचा खासगी द्वेष करून जास्तच दुही माजवूं लागला, हें राष्ट्रांतील पुढा-यांचें गुरुत्व पावलेल्या पुरुषाला अगदीं शोभण्यासारखें नव्हतें. कामक्रोधादि षड्रिपूंना जिंकून यमनियमादि अष्टांगसिद्धि संपादिल्याचा आव ज्या पुरुषानें घालावा तोच जर क्षणोक्षणी कामक्रोधांच्या आधीन होऊं लागला, तर श्रेष्ठ पुरुषाचें अनुकरण करणारे सामान्य जन तमोवृत्तीचे मूर्तिमंत पुतळे बनल्यास आश्चर्य कोणतें? राष्ट्रांतील पुढा-यांची व श्रेष्ठ पुरुषांची दानत धुतल्या तांदळासारखी असली तरच इतर सामान्यजनांची नीतिमत्ता मर्यादेंत रहाते. पुढारी व श्रेष्ठ पुरुष कामक्रोधांनीं विकृत होऊन परस्परांना पाण्यांत पाहूं लागलें व असें तामसी वर्तन ठेवूनहि त्यांचा बडेजाव दिवसेंदिवस वाढतच आहे असें कांहीं कालपर्यंत दिसलें म्हणजे त्यांचें अनुकरण करण्याची इच्छा भोंवतालील मंडळीला व पुढील पिढीला अवश्मेव होते व कालांतरानें सर्वत्र बजबजपुरा माजून राष्ट्राचा विलय होतो. ब्रह्मेंद्रस्वामीनें आंग्र्यांशीं जे लावालावीचें नीच वर्तन केलें व ज्या नीच वर्तनाला भिऊन आंग्रे, दाभाडे वगैरे सरदारांना स्वामीचा दरारा भयंकर वाटला, त्याचेंच अनुकरण पुढील पिढींतील रघुनाथराव, सखारामबापू, सखाराम हरि, मल्हारराव होळकर, दमाजी गायकवाड, तुळाजी आंग्रे, गोविंदपंत बुंदेले, पटवर्धन, वगैरे मंडळींनीं केलें. ह्या दुस-या पिढीचे अनुकरण भोसल्यांचे दिवाण देवाजीराव, महादजी शिंदे, तुकोजी होळकर वगैरे नाना फडणिसाच्या समकालीन तिस-या पिढींतील पुढा-यांनीं केलें व ह्या तिस-या पिढीचें अनुकरण दौलतराव शिंदे, यशवंतराव होळकर, बाळोबा कुंजीर वगैरे सरसकट सर्व मराठा व ब्राह्मण सरदारांनीं केलें. सारांश, भगवीं वस्त्रें पांघरून कृष्णकर्मे करण्याचा, परस्परांत वैमनस्यें माजविण्याचा, ज्यांनीं विश्वास ठेविला त्यांचे गळे कापण्याचा धडा महाराष्ट्रांत ब्रह्मेंद्रस्वामीनें प्रथम घालून दिला व तो धडा पुढील एकेका पिढीनें जास्त जास्त गिरविला. महाराष्ट्राच्या नाशाला जी कारणपरंपरा साधनीभूत झाली, तिची पूर्वपीठिका ही अशी आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
२४. हबशाच्या युद्धाशीं किंवा वसईच्या मोहिमेशीं सूत्रधार या नात्यानें ब्रह्मेंद्राचा कांहीं एक संबंध नव्हतां हें जरी खरें आहे, तथापि आंग्र्यांची सत्ता दुभंग करण्याच्या कामीं स्वामीने आपल्याकडून बरीच मेहनत घेतली होती, हें आतापर्यंत दिलेल्या कोंकणच्या हकीकतीवरून उघड आहे. हत्तीच्या प्रकरणावरून व कर्जावरून कान्होजीचें व स्वामीचे तेढें कसें आलें, सेखोजी, संभाजी, मानाजी व तुळाजी ह्यांचीं मनें स्वामीनें परस्परांविषयी कशीं कलुषित केलीं, त्यांना कोणकोणत्या धास्त्या घातल्या वगैरे प्रकरणांचें वर्णन मागें दिलेंच आहे. ह्या वर्णनावरून स्वामीची सर्वाभूतांच्या ठायीं कितपत समबुद्धि होती, हें वरवर वाचणा-या वाचकांसहि कळून येण्यासारखें आहे. खरें म्हटलें असतां, आंग्र्यांचा नाशच पहाण्याची जर स्वामीची इच्छा होती, तर स्वामीनें कांहीं एक खटपट केली नसती तरी देखील चालण्यासारखें होतें आंग्रे आपल्या कर्मानेंच मरत होते. छत्रपतीच्या व बाजीरावाच्या विरुद्ध जाण्याचा आंग्र्यांचा जन्मस्वभावच होता व त्यांचे पाय लंगडे करावे असा शाहूचा व बाजीरावाचा विचारच झाला होता. संयुक्त साम्राज्यांतील सरंजामीं सरदार छत्रपतींच्या किंवा त्यांच्या मुख्य प्रधानाच्या हेतूंच्या विरुद्ध जेव्हां जात, तेव्हां त्यांस तंबी पोहोचविणें, त्याचीं मनें ताळ्यावर आणणें किंवा तीं ताळ्यावर येत नसल्यास त्यांची सत्ता कमी करणें, हें त्यावेळच्या मराठ्या मुत्सद्यांचे कर्तव्य होऊन बसले होतें. ह्या कर्तव्यकर्मास सादर होऊन बाजीरावानें श्रीपतराव प्रतिनिधि, त्र्यंबकराव दाभाडे, कंटाजी कदम बांडे, पिलाजी जाधवराव, दमाजी थोरात वगैरे मंडळींचें वेळोवेळीं शासन केलें. अशा वेळीं ब्रह्मेंद्रस्वामीसारख्या मनुष्याचें कर्तव्य कांहीं निराळ्याच प्रकारचें असले पाहिजे होतें. महाराष्ट्र साम्राज्यांतील मुख्य सत्तेच्या केंद्रीकरणार्थ बाजीरावानें आरंभिलेल्या कर्तव्यात्मक निष्ठुर कृत्यास ब्रह्मेंद्रानें साहाय्य निराळ्या प्रकारचे केलें पाहिजे होतें. कार्यकर्त्यां पुरुषांच्या निष्ठुर वर्तनाचे जे भयंकर आघात होतात, ते प्रतिपक्षाच्या हृदयांत खोल घरें करतात व त्याचे परिणाम फार दूरवर पसरतात. अशा वेळी आघाताचा भयंकरपणा सौम्य करण्यास भारदस्त मध्यस्थ लागत असतात. ब्रह्मेंद्रासारख्या उदासीन पुरुषाचें हें मध्यस्थीचें काम होतें. तो उदासीन पुरुषच जर भ्रांतचित्त झाला, तर भोंवतालील राजकीय वातावरण क्षुब्ध झाल्यास नवल कसचें? प्रस्तुत खंडांत छापिलेलीं आंग्र्यांचीं पत्रें किंवा रा. पारसनिसांनीं छापिलेलीं पत्रें पहावीं तर त्यांत सेखोजी, संभाजी, तुळाजी, मानाजी, मथुराबाई, लक्ष्मीबाई, आपल्यावर स्वामीनें मेहेरनजर करावी, छत्रपतींचें मन आपल्याविषयीं प्रसन्न करावें, पेशव्यांचें व आपलें सौरस्य करून द्यावें, अशा विनवण्या परम नम्रतेनें करीत आहोत असें दृष्टोत्पत्तीस येतें.