Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

शिवाजीचा उदय झाल्यावर त्याचा संबंध मेवाडच्या घराण्याशीं लावण्याकरितां चिटणिसांच्या घराण्यांतील एक पुरुष राजपुतान्यांत गेला होता (शिवदिग्विजय पृष्ठ ४११). वर्ष सहा महिने खटपट करूनहि शिवाजीचा मेवाडच्या घराण्याचीं संबंध लागेना व गागाभट्टादि मंडळी शूद्राला छत्रसिंहासनाचा अधिकार नाहीं, हें म्हणणें सोडीतना, तेव्हां बाळाजी आवजी चिटणीसानें दक्षिणेंतून रामचंद्र बाबाजीस उत्तरेस पत्र पाठविलें कीं, "उदेपूरचा व यांचा संबंध आहे". बाळाजी आवजीच्या ह्या सूचनेवरून शिवाजीचा व मेवाडच्या घराण्याचा संबंध शिवराजाच्या कीर्तीच्या व दरा-याच्या जोरावर युक्तीनें बसविण्यांत आला व राजपुतान्यांतील भाटांच्या वंशावळींत शिवाजीची वंशावळ नव्यानेंच दिसूं लागली. खुद्द शिवाजी महाराजांना ह्या आगंतुक संबंधाचें फारसें महत्त्व वाटत नव्हतें. "ज्याचे आंगीं सामर्थ्य तो राजा; कित्येक नीच होत्साता राज्यवैभव भोगतात कों नाहीं? हे क्षत्रियान्वय कोठें आहेत?" असे महाराजांचे स्वतःचे या वेळचे उद्गार आहेत. (शिवदिग्विजय ४१२). शिवाजीचा मेवाडच्या घराण्याशीं संबंध जोडण्यांत आला तो केवळ बाळाजीच्या स्वामीभक्तीचा प्रताप होय. गागाभट्टादि कर्मठ ब्राह्मणांचा किंतु घालविण्याकरितांच चिटणिसांनीं ही मेहनत केलेली आहे. धन्याचें न्यून असें भासवून द्यावयाचें नाहीं ह्या सदिच्छेनें बाळाजी आवजीनें हे गौडबंगाल केलें तेव्हां तें एका दृष्टीनें यद्यपि श्लाघ्य आहे तत्रापि आधुनिक इतिहासकाराला तें खरें धरून चालणें श्रेयस्कर होणार नाहीं. नेपोलियनाच्या राज्यरोहणाच्या वेळींहि असेंच एक गौडबंगाल रचण्यांत आलें. नेपोलियन कोशिकांतील एका सामान्य गृहस्थाचा मुलगा असून त्याच्या घराण्याचा संबंध कांहीं खटपटी लोकांनीं युरोपांतील एका अत्यंत पुरातन राजांच्या वंशावळीशीं जोडून दिला. त्या वेळीं नेपोलियनानें शिवाजीसारखेच उद्गार काढिले आहेत. (Alisons History chap XX, प्रारंभ). सारांश माझ्या मतें शिवाजीचा म्हणजे भोसल्यांचा मेवाडच्या शिसोद्यांच्या घराण्याशीं कांहीं एक संबंध नाहीं. ह्याला पुरावा भरभक्कम देतां येतो. (१) भोसल्यांचे व सिसोद्यांचे धर्माचार व कुळदैवत एक नाहींत. (२) शहाण्णव कुळींतील चाळके, माने, कदम, कचरे, जाधव, शाळुंके, मोरे, रठ्ठे, शिरके, मालुसरे, गुजर, पवार, वगैरे घराण्यांचा रजपुतांशीं जसा बिलकुल संबंध नाहीं, तसाच भोसल्यांचाहि नाहीं. चालुक्य, मानव्य, कदंब, कलचुरी, यादव, सोलंकी, मौर्य, रठ्ठे, श्रीक, मल्लसूर, गुर्जर, ह्या महाराष्ट्रांतील पुरातन लहानमोठ्या घराण्यांच्या नांवांचे वर दिलेल्या आधुनिक मराठ्यांचीं नांवे केवळ अपभ्रंश आहेत. त्याप्रमाणेंच भोज, भोजक ह्या पुरातन मराठी नांवाचा भोसले हा शब्द अपभ्रंश आहे. भोजें हें आडनांव मराठे लोकांत अद्यापहि ऐकूं येतें. भोज, भोजे, भोसके, भोसले, अशा परंपरेनें भोसलें हें आडनांव आलें असावें. (३) मराठ्यांचे रजपुतांशीं शरीरसंबंध होत नाहींत. परंतु भोंसल्यांचे मोरे, शिरके, पवार, जाधव ह्यांच्याशीं संबंध झाले आहेत. मोरे, जाधव हीं अस्सल मराठा कुळें होत. हीं कुळें महाराष्ट्रांत आज हजारों वर्षें आहेत. ह्यांचा संबंध रजपुतांशीं कोणत्याही प्रकारें लावतां येत नाही. शिवाजीचा शिसोद्यांच्या कुळाशीं संबंध लाविल्यापासून मात्र महाराष्ट्रांतील ह्या शुद्ध घराण्यांतील लोकांनींहि आपल्या कुळांचा संबंध रजपुतांशीं लावण्याचा प्रयत्न केला आहे. (४) मराठ्यांच्या व रजपुतांच्या शरीरांच्या ठेवणींत जो ढळढळीत भेद दिसून येतो त्यावरून ह्या मराठ्यांचा रजपुतांशीं कांहीं एक वांशिक संबंध नाहीं असेंच म्हणणें भाग पडतें. महाराष्ट्रांतील ब्राह्मण, प्रभु, मराठे, शेणवई, कुणबी, वगैरे अठरा पगड जातींतील लोकांच्या शरीराची ठेवण एका विशिष्ट प्रकारची आहे. त्या ठेवणीवरून हिंदुस्थानांतील इतर लोकांतून मराठ्यांना ओळखून काढतां येते.

पिठोर राजाचा दोन दोन तीन तीन वेळां उल्लेख करून, भोसल्यांचे मूळ पुरुष राजपुतान्यांत प्रथम कोठं होते व व नंतर ते दक्षिणेंत केव्हां आले वगैरे मूळपीठिका बखरनविसांनीं दिली आहे. ती देतांना मल्हाररामरावानें दोन कथा, गोविंद-खंडेरावानें तीन कथा व शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें दोन कथा नमूद केल्या आहेत. मल्हाररामरावाच्या दोन कथांपैकीं चितोडच्या एकलिंगजीची कथा बप्प रावळाच्या संबंधाची आहे. चितोडचे राणे एकलिंगजीचे दिवाण ह्या नांवानें प्रसिद्ध आहेत. बप्प रावळ इसवी सनाच्या आठव्या शतकांत उदयास आला. (Tod's Rajasthan, chap, II and Ind. Ant. for December 1887). बप्पानें एकलिंगजीची आराधना केल्याची गोष्ट पिठोर राजांच्या पूर्वी घडून आली म्हणून मल्हाररामराव म्हणतो तें खरें आहे. परंतु पिठोराचा रकनुद्दिनानें पराभव केला म्हणून जें तो म्हणतो तें मात्र अविश्वसनीय दिसतें. अमीर रुकनुद्दीन याचें नांव टॉडच्या ग्रंथात पहिल्या खंडाच्या चवथ्या परिशिष्टांत दिलेल्या लेखांत आलें आहे. तो लेख ६६२ हिजरींत म्हणजे शके ११८७ त लिहिलेला असल्यामुळें रुकनुद्दिनाचा पिठोराशीं सामना होणें अशक्य भासतें. मल्हाररामरावानें दिलेली दुसरी कथा पद्मिणीसंबंधाची आहे. चितोडचा लक्ष्मणसिंह शके १०१२ त राज्यारूढ झाला म्हणून टॉड म्हणतो (Tod's Rajasthan chap. VI). ह्या वेळीं भीमसिंग चितोडाच्या गादीवर बसला म्हणून रा. सरदेसाई लिहितात तें बराबर नाहीं. (हिं. अ. इतिहास पृष्ठ ९९). लक्ष्मणसिंह अज्ञान असल्यामुळें त्यांचें पालकत्व भीमसिंगाकडे आलें होतें. चितोडच्या नौबतीची कथा तिन्ही बखरनविसांनीं दिली आहे. शिवदिग्विजयाचा कर्ता काकाजीची कथा देतो ती सजणसिंहासंबंधाची आहे. शिवप्रतापांत ही काकाजीची कथा, नौबतीची कथा वगैरे कथा आहेत. हा काकाजी किंवा सजणसिंह भोसल्यांचा मूळपुरुष असावा असा सार्वत्रिक ग्रह आहे. तो कितपत खरा आहे तें पाहिलें पाहिजे.

भोसल्यांच्या वंशावळींची ताळेसूद व्यवस्था लावण्याचा कित्येकांनीं प्रयत्न केला आहे. परंतु त्या प्रयत्नापासून विशेष निष्पत्ति झाल्याचें दिसून येत नाहीं, व पुढेहि केव्हां दिसून येईल किंवा कसें ह्याविषयी संशय वाटतो. कांकीं सातारकर महाराजांच्या दप्तरांतील, चिटणीसांच्या दप्तरांतील किंवा रजपुतान्यांतील दप्तरांतील वंशावळी तपासून हें काम भागण्यासारखें नाहीं. ह्या सर्व वंशावळी एकाच मूळाच्या निरनिराळ्या प्रती आहेत; व खुद्द मूळाच्या विश्वसनीयत्वाबद्दलच संशय आहे. ह्या वंशावळींचें मुख्य मूळ म्हटलें म्हणजे मेवाडच्या वंशावळी व रासाग्रंथ होत. मेवाडच्या भाटांच्या रासाग्रंथांत शिवाजीची वंशावळ दिली आहे, म्हणून टॉड म्हणतो. (Tod's Rajasthan, chap. VI). अजयसिंहाचा पुत्र सजणसिंह दक्षिणेंत शके १२२५ च्या सुमारास आला म्हणून तो म्हणतो. सजण, दिलीपसिंहजी व भोसाजी एकामागून एक सौंधवाड्यास राज्य करीत असतां त्यापैकीं भोसाजी शके १२०० बहुधान्य संवत्सरीं म्हणजे इ. स. १२७८ त दक्षिणेंत आला म्हणून मल्हार रामराव म्हणतो. अल्लाउद्दीनानें चितोड शके १२२५ त घेतलें व त्या वेळीं सजणसिंह हयात होता. त्याच्यापासून चौथा पुरुष जो भोसाजी तो शके १२०० त दक्षिणेंत आला हें जें मल्हार रामराव म्हणतो तें अर्थात् अविश्वसनीय ठरतें. काकाजी ऊर्फ सजणसिंह दक्षिणेंत दौलताबादच्या पातशहाच्या आश्रयास जाऊन राहिला म्हणून शिवदिग्विजयांत व शिवप्रतापांत लिहिलें आहे. परंतु १२२५ त दौलताबादेस पातशाही झाली नव्हती. दौलताबादेस यवनी अम्मल शके १२३४ त सुरू झाला. येणेंप्रमाणें बखरनविसांच्या लिहिण्यांत विश्वसनीयत्वाचा भाग फार थोडा आहे हें उघड दिसतें. आतां खुद्द मेवाडच्या रासाग्रंथांतील वंशावळीसंबंधीं विचार करावयाचा. टॉडनें मेवाडच्या इतिहासाचा बराच भाग पृथुराजरासा व खोमानरासा ह्या दोन ग्रंथांवरून मुख्यतः घेतलेला आहे. पैकीं पृथुराजरासांत शाहबुद्दीनाच्या हस्तें पिठोराचा पराभव होई तोंपर्यंत म्हणजे शके १११५ पर्यंतची कथा आहे. त्यांत शिवाजीची वंशावळ येणें अशक्य आहे. खोमानरासा हा ग्रंथ अलीकडचा आहे म्हणून टॉड आपल्या प्रस्तावनेंत म्हणतो.

फेरोकशर बादशाहा सयदाचे आश्रयानें पदावर बसला. ते उभयता सय्यद आपल्यास डोईजड होतील तरी बळहीन करावे असे मनांत आणून त्यापैकी सय्यद हुसेन यास दक्षणचा अधिकार देऊन पहिला अधिकारीयास गुप्त लिहून पाठविलें की याचे हवाली अंमल करूं नये. त्यावरून दक्षणचा अधिकारी दाऊदखान व सय्यद यांची लढाई होऊन दाऊदखान मयत झाला. तो दाऊदखान गुजराथचा यावेळी अधिकारी होता. सय्यद हुसेन अल्ली यास दक्षणसुभा प्राप्त झाल्यावर खंडेराव दाभाडे गुजराथप्रांती बंड करीत होता. त्याचे पारपत्यास गेला तेथे त्याशी लढाई होऊन सय्यदाचा पराभव झाला. त्याची वस्त्रेंसुध्दा दाभाड्यानें लुटून घेतली. असा जय खंडेराव याणीं मिळवून साता-यास शाहू महाराजास भेटला. तेव्हां शाहू महाराज संतोष पावून त्यास सेनापतिपद देऊन गुजराथचा व काठेवाडचा अंमल त्यांनीं बसविला, त्याचा सुभाहि त्याजकडे सांगून दरमहा व हुजूर खर्चास ऐवज देत जावा व फौज बाळगावी व थोरले महाराज धान्य व नक्त श्रावणमासी धर्मादाय देत असत तो सेनापति यांनी आपल्या तालुक्यापैकी दोन चार लाख रुपये खर्चून कोटिलिंगे ब्राह्मणांकडून करवीत जावीं असें ठरलें. पहिला सेनापति मानसिंग मोरे त्या पदास योग्य नाही ह्मणून दूर केला. स्वारीस निघोन कुटुंब बराबर असता मूळा नदीवर गेले. तेथे मौजे हिंगणगाव ता. पाटस येथे दमाजी थोरात पुंड होता. त्यानें भेटीस ह्मणून बोलावून घेऊन कुटुंबासह अंबाजीपंत पुरंधरे यांस अटक करून बाळाजीपंतावर निकर्ष करूं लागले. तेव्हा अंबाजीपंतांने निकर्ष सोसून खंडाचें बोलणें केले. द्रव्य द्यावयास नाहीं, तेव्हा सौभाग्यवती मातोश्री राधाबाई व पुत्र बाजीराव व चिमाजी अप्पा तेथे ठेवून खासे निघाले. तेथे मोरशेट करंज्या होता. तो लाह्यांचे लाडू करून देत होता. त्याचा पुत्र धनशेट करंज्या याचें सरकारांतून चालविलें. स्वारी २७, साबान.

 

बखरनविसांनीं दिलेल्या रमलशास्रातील श्लोकांत "अर्कबाणे" म्हणजे ५१२ हा आकडा शालिवाहन शकांतील व हिजरी सनांतील त्या वेळचें अंतर दाखवितों. श्लोक बखरकारांनीं दिला आहे त्याप्रमाणेंच जर मुळांत असेल तर बखरकारांना अर्कबाणे ह्या पदापासून कोणत्या अर्थाची निष्पत्ती होते व हे पद कोणत्या विधानासंबंधानें कोणीं प्रथम उपयोजिलें ही गोष्ट बिलकुल माहीत नव्हती असें दिसतें. बखरनविसांनीं दिलेला श्लोक बहुत अशुद्ध आहे. तेव्हां मूळ श्लोक कसा असेल ते ठाम सांगतां येत नाहीं. परंतु एवढें मात्र विधान निश्चयानें करितां येतें कीं, हा श्लोक रमलशास्त्राच्या ज्या ग्रंथावरून घेतला तो ग्रंथ शालिवाहन शक व हिजरी सन ह्यांत ५१२ अंतर जेव्हां होतें तेव्हां केव्हां तरी लिहिला गेला असावा. बखरनविसांनीं दिलेल्या श्लोकाची पहिली ओळ-
अर्कबाणविहीने च शालिवाहनके शके ।

अशी असावी असा तर्क आहे. ह्या पहिल्या ओळीच्या व "पैगंबरादि विख्याताः" वगैरे दुस-या ओळीच्या मध्यें दोन ओळी मूळांत आणखी असाव्या असें वाटतें. शकांत ५१२ वजा केले म्हणजे हिजरी सन येतो व त्या हिजरीच्या प्रारंभी पैगंबर वगैरेंचा उदय झाला; अशा अर्थाचा मजकूर त्या दोन ओळींत असावा. ह्यामधील दोन ओळी गहाळ झाल्यामुळें मूळ यादीकारांना व बखरकारांना आडनीड राहिलेल्या बाकीच्या दोन ओळींचा अर्थ बराबर लागत नाहीं. त्यामुळें त्यांच्या हातून वर सांगितलेली चूक झाली व पिठोराचा पराभव शके ५१२ त झाला असें वाटून पुढील बाराशें वर्षांचा हिशोब मुसलमान पादशहांची कशी तरी याद देऊन चुकता करून टाकावा लागला. ह्या ५१२ च्या प्रकरणावरून एक विचार सुचतो. तो हा कीं, बखरी छापणा-यांनीं बखरींचे मूळ, एक कानामात्राहि न सोडून देतां, जशाचें तसेंच छापून काढावें व मुळाशीं ताडून पाहण्यास दुस-या आणीक प्रती मिळाल्यास त्यांतील पाठभेद मोठ्या काळजीनें द्यावे. एकादे वेळीं एकादें पाठान्तर असें असूं शकेल कीं, त्याच्या आधारावर आजपर्यंत ध्यानींमनींहि नसतील अशा शंका उद्भवतील व त्या शंकांच्या निरसनार्थ शोधकांचे प्रयत्न जारीनें सुरू होतील. कीर्तन्यांनीं छापिलेली मल्हाररामरावाची बखर वाचतांना ह्या ५१२ बद्दल मला शंका आली होती, परंतु त्या बखरींत असणा-या इतर चुकांप्रमाणें हीहि संपादकाच्या हलगर्जीपणाची चूक असेल असें त्या वेळीं मला वाटलें. परंतु पुढें शके १८१७ त बडोदें येथें छापिलेल्या शिवदिग्विजयांतहि ५१२ हा आकडा जेव्हां पाहिला व तो मजजवळ असलेल्या यादींतूनहि जेव्हां आढळला, तेव्हां ५१२ हा आंकडा संपादकाच्या नजरचुकीनें आला नसून तो १७ व्या शतकांतील यादीकारांना व त्या यादी वाचणा-यांनाहि खरा वाटत होता असें मला दिसलें व बखरींतून ५१२ आकडा कसा आला ह्याचा वर दाखविल्याप्रमाणें खुलासा करण्याचा प्रयत्न करावा अशी आवश्यकता भासली.

बखरनविसांनीं ज्या यादींवरून ५१२ हा आंकडा उतरून घेतला त्या यादी रमलशास्त्राच्या ग्रंथाच्या समकालीन म्हणजे शके १५९० च्या सुमाराच्या असाव्या. ५१२ चा उल्लेख ज्यांत केला आहे अशा यादींपैकीं मजजवळ एक याद आहे; तींत (१) युगसंख्येची याद, (२) हस्तनापुरच्या राजाची याद, (३) मुसलमान पादशहांची याद, (४) साधुसंतांची याद व (५) हेमाडपंथी बखर अशीं पाच प्रकरणें दिलीं आहेत. ह्या यादींत तालीकोटची लढाई शके १४८६ वैशाख वद्य १० इंदुवारीं म्हणजे ६ मे १५६४ त झाली म्हणून लिहिलें आहे. ह्या यादीवरून असें अनुमान करावें लागतें कीं, शके १५९० च्या सुमारास म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेस महाराष्ट्रांत बखरी लिहिण्याचा व अर्थात् वाचण्याचा प्रघात जारीनें चालू होता. तालिकोटच्या लढाईची तीथ दिली आहे. त्यावरून यादवांच्या पुढें झालेल्या दक्षिणेंतील मुसलमान पातशहांच्या बखरी त्या वेळीं लिहिल्या गेल्या असाव्या. ह्या यादींत विजयनगर येथें राज्य करणा-या किरीटी रामराजाचें नांव दिलें आहे त्यावरून असें वाटतें कीं, विजयानगर अथवा अनागोंदी येथील राजांचाहि इतिहास त्या वेळीं महाराष्ट्रांत महशूर होता. सारांश, दिल्लीच्या पातशहांचा, राजपुतान्यांतील रजपुतांचा, दक्षिणेंतील पातशहांचा व अनागोंदी येथील राजांचा इतिहास शिवाजीच्या वेळीं महाराष्ट्रांत बखरींच्या रूपानें माहीत होता असें यादींतील उल्लेखांवरून निःसंशय ठरतें. शिवाजीच्या वेळच्या ह्या बखरी पुढें मागें सांपडण्याचा किंचित् संभव आहे.

अर्कबाणे च शाके च शालिचाहनकः शकः ।
पैगंबरादि विख्यातो प्रारंभो यवनोदयः ॥

हा अशुद्ध श्लोक मजजवळील यादीकारांनीं, मल्हार रामरावानें व शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें आपापल्या पुस्तकांत दिला आहे व ५१२ शकांत यवनांचा उदय झाला म्हणजे पिठोराचा यवनांनी पराभव केला असा अर्थ ह्या श्लोकांचा ह्या सर्वांनीं केला आहे. अर्क = १२ व बाण = ५, मिळून ५१२ होतात, हें या यादीकारांना ठाम माहीत होतें व अर्कबाणे ह्या एवढ्या एकट्याच पदावर ५१२ त पिठोराचा यवनांनीं पराभव केला व तेव्हांपासून यवनांचा उदय झाला वगैरे इमारत ह्यांनीं उठवून दिली आहे. पिठोराच्या वेळेस पैगंबरादींचा उदय झाला, असेंहिं ह्या यादीकारांचें मत होतें. पैगंबरानें व सुलतान रुकनुद्दिनानें एक विचार करून पिठोराचा पराभव केला, असें मल्हार रामराव म्हणतो. पैगंबर व रुकानुद्दीन ह्याबद्दल फकीर व शहाबुद्दीन अशीं नांवें शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें दिलीं आहेत. सारांश, ५१२ शकांत (१) पिठोर राजाचा पराभव झाला, (२) रुकनुद्दीन किंवा शहाबुद्दीन ह्यांनीं तो पराभव केला व (३) पैगंबराचा म्हणजे महंमदाचा उदय ह्या वर्षी झाला, ह्या तीन गोष्टी ह्या श्लोकाच्या आधारानें ह्या लेखकांनीं काढिल्या आहेत. आतां ह्या तिन्ही गोष्टी ५१२ त झाल्या नाहींत हें सुप्रसिद्ध आहे. (१) पिठोर राजाचा पराभव शके १११५ त झाला, (२) तो १११५ त शहाबुद्दीनानें केला, व (३) शके ५१२ त म्हणजे इ. स. ५९० त हिजरीसनाला प्रारंभहि झाला नव्हता. येणेंप्रमाणें शके ५१२ त ज्या गोष्टी झाल्या म्हणून हे बखरकार किंवा यादीकार सांगतात त्या, त्या शकांत मुळींच झाल्या नाहींत हें सिद्ध आहे. परंतु ५१२ ह्या आंकड्याचा अर्थ काय ह्याचा ह्या सिद्धीनें कांहीं उलगडा झाला नाहीं व तो तर होणें अत्यंत इष्ट आहे. हा उलगडा बखरकारांनीं दिलेल्या रमलशास्त्रांतील श्लोकाचा नीट अर्थ लागल्यास कदाचित् झाला तर होईल. परंतु नीट अर्थ लागण्यास मूळ श्लोक जशाचा तसाच मिळाला पाहिजे. श्लोक कोणत्या रमलशास्त्रांतून घेतला त्याचा उल्लेख बखरनविसांनीं केला नाहीं. आनंदाश्रमांतील रमलशास्त्र्याच्या पंधरा वीस पोथ्या मीं तपासून पाहिल्या; परंतु त्यांत हा श्लोक कोठें सांपडत नाहीं. प्रत्यक्ष हाच श्लोक सांपडत नाहीं तत्रापि ह्याचाच सारखा एक श्लोक आनंदाश्रमांतील ६२४३ नंबरच्या रमलरहस्याच्या पोथीच्या ६३५ पृष्ठावर, मला सांपडला. तो श्लोक असाः-

संवत्सरः पंचगुणेंदुहीनः १३५ शाकोभवेद्विक्रमराज्य या-॥ शाकेविहीने कुकु पंच ५११ शेष मोहर्म्मादौ हिजरीती सन्नः॥१॥

विक्रमशकांत १३५ वजा केले म्हणजे शालिवाहन शक येतो व शालिवाहन शकांत ५११ वजा केले म्हणजे हिजरी सन येतो, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. रमलरहस्य हा ग्रंथ शके १६२३ त लिहिला असें ह्या पोथींत लिहिलें आहे. त्या शकांत हिजरी सन १११२ होता. शके १६२३ त ५११ वजा केले म्हणजे हिजरी १११२ येतात म्हणजे शके १६२३ त शालिवाहन शकांत व हिजरी सनांत अंतर ५११ होतें असें ह्यावरून ठरतें. शके १५९० त हिजरी सन १०७८ होता व त्या दोहोंत अंतर ५१२ होतें. शके १५६० त हिजरी सन १०४७ होता व त्या दोहोंत अंतर ५१३ होतें. येणेंप्रमाणें शकांत व हिजरी सनांत दर ३३ वर्षांनीं एकेक वर्ष अंतर जास्त किंवा कमी पडत जातें. अर्थात् शके १६२३ त लिहिलेल्या रमलशास्त्राच्या ग्रंथांत हिजरी सन काढण्याकरितां वजा करण्यास जो आकडा दिला असेल त्यापेक्षां शके १५९० तल्या ग्रंथांत वजा करण्याची रक्कम एकानें जास्त होईल.

शालिवाहन शकांत झालेल्या राजांची माहिती दोघाहि बखरनविसांनीं मोठी विचित्र दिली आहे. हस्तनापूर किंवा दिल्ली ह्या दोन शहरीं राज्य करणा-या सार्वभौम राजांची मालिकाच तेवढी देण्याचा ह्या लेखकांचा संकल्प असल्यामुळें शालिवाहनांच्या पुढें दक्षिणेंत कोणी राजे झाले तें सांगण्याच्या खटपटींत हे लोक पडलेच नाहींत. बाकी पडले असते तर त्यांत त्यांना फारसें यश आलें असतें असें क्वचितच् झालें अंसतें. हस्तनापूर व दिल्ली येथील हिंदुराजांची मालिका पिठोर राजापर्यंत आणून शके ५१२ त यवनांनीं पिठोराचा पराभव केला म्हणून हे बखरकार सांगतात. ह्या सांगण्याचा अर्थ असा होतो कीं, शके ५१२ म्हणजे इ. स. ५९० पर्यंत दिल्ली येथें हिंदूराजांनीं राज्य केलें व त्या वर्षीं पिठोराचा यवनांनीं पराभव केला. पिठोर राजाचा पराभव यवनांनीं १११५ त केला, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. शालिवाहन शके इ. स. ७८ त सुरू झाला त्याअर्थीं १११५ वर्षांचा हिशोब, खरें पाहिलें तर, ह्या बखरनविसांनीं दिला पाहिजे होता. तसें न करतां ५९० वर्षांचा, व तोहि चुकीचा असा मजकूर ह्या बखरनविसांनीं देऊन बाकीच्या ५२५ वर्षांची माहिती अजीबात गाळून टाकिली आहे. हीं वर्षें त्यांनीं मुद्दाम गाळून टाकिलीं आहेत असें नाहीं. इ. स. ५९० त म्हणजे शके ५१२ त हिंदूंचें राज्य नष्ट झालें अशीं त्यांची बालंबाल खात्रीं झालेली होती असें दिसतें. कां कीं, शके ५१२ पासून शके १६३० पर्यंतच्या म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या कालचा, शहाबुद्दीनापासून औरंगजेबापर्यंतच्या वंशावळी देऊन त्यांनीं, आपल्या मताप्रमाणें, चोख हिशोब देऊन टाकिला आहे. खरें पाहिलें तर, शहाबुद्दिनाच्या काळापासून म्हणजे शके १११५ पासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १६२९ पर्यंत ५१४ वर्षांचा अवधि जातो. ह्या बखरनविसांनीं तर शके ५१२ पासून शके १६३० पर्यंतच्या म्हणजे १११८ वर्षांचा हिशोब दाखवून दिला आहे. तो ६०४ वर्षांनीं खरे अवधीहून जास्त आहे. समकालीन राजे व ह्या अवधींत मुळींच न झालेले राजे, अशांचा वंशावळींत समावेश करून, ही आगंतुक वर्षें बखरनविसांनीं भरून काढिली आहेत. पिठोर राजाचा खरा काळ माहीत नसल्यामुळें, त्याच्या पूर्वींच्या हिंदूराजांच्या यादी उपलब्ध नसल्यामुळें, व त्याच्या नंतरच्या मुसलमान पातशाहांच्या कारकीर्दीचें यथास्थित ज्ञान नसल्यामुळें ह्या बखरनविसांच्या हातून ही गफलत झालेली आहे. युधिष्ठिर शक ३०४४ वर्षें चालल्यानंतर विक्रम शक १३५ वर्षें चालला व त्यानंतर शालिवाहन शक सुरू होऊन ५१२ वर्षांची व्यवस्था ह्या बखरनविसांच्या मतें नीट लागली. शकाच्या ५१२ व्या वर्षी पिठोराचा यवनांनीं पराभव केला व तेव्हांपासून यवनांचा अंमल जो सुरू झाला, तो औरंगझेबाच्या मृत्यूपर्यंत अव्याहत चालला, अशी समाधानकारक खात्री होऊन, आपण चुकत आहोंत अशी ह्या बखरनविसांना शंकाच आली नाहीं व ती येण्याला कांहीं कारणहि नव्हतें. युधिष्ठिरापासून औरंगझेबाच्या मृत्यूपर्यंतच्या कालाची संगतवार व्यवस्था लागलेली दिसत होती, तेव्हां त्यांना शंका आली नाहीं, हें रास्तच झालें. यवनांनीं पिठोर राजाचा पराभव शके १११५ त केला, हें पक्के माहीत असल्यामुळें, आधुनिक इतिहासकाराला मात्र इतके निःशंक राहतां येत नाहीं. बखरनविस चुकले आहेत, हें इतिहासज्ञ पुर्तेपणीं जाणतो व ते कसे चुकले ह्या प्रश्नाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो.

गोविंद खंडेराव चिटणीस, मल्हार रामराव चिटणीस व शिवदिग्विजयाचा कर्ता ह्यांनीं ही चूक युगसंख्येच्या व हस्तनापूरच्या राजांच्या यादींतून जशीच्या तशीच उतरून घेतली आहे. शके ५१२ त साधारणनाम संवत्सर होता, अशी मल्हार रामरावानें जास्त माहिती दिली आहे. शके ५१२ त साधारण संवत्सर नव्हता त्या अर्थीं ही जास्त माहिती चुकीची आहे, हें उघडच आहे. यादीकारांनीं शके ५१२ हा आंकडा कोठून घेतला हें पहाण्यासारखें आहे. यादीकारांनीं हा आंकडा एका रमलशास्त्राच्या पोथीवरून घेतला आहे. रमलशास्त्रांतील वचन येणेंप्रमाणें बखरनविसांनीं दिलें आहेः-

महाराष्ट्रांतील जुन्नर प्रांतावर राज्य करणा-या नहपान क्षत्रपानें खहराट असा किताब धारण केला. शिलालेखांतील नहपान या शब्दाच्या अगोदर येणा-या खहराट ह्या शब्दाचा अर्थ अद्यापपर्यंत कोणीं दिलेला नाहीं. माझ्या मतें षाहराट ह्या शब्दाचा अपभ्रंश षच्या बद्दल ख घेऊन खहराट असा झालेला असावा. षाहराट म्हणजे रट्टांचा राजा, रट्ट म्हणजे मराठे. षाहजहान ह्या शब्दाप्रमाणें षाहराट ह्या शब्दांतील षष्ठीच्या ईचा लोप होऊन षाह व रट्ट ह्या दोन शब्दांचा समास झालेला आहे. पैठण येथील आंध्रांना हिणवावयाकरितां खहराट हा किताब नहपातानें घेतलेला असावा. अथवा आंध्रांच्या शातकर्णी या बिरुदाप्रमाणें नहपानानें खहराट हें आपलें बिरुद केलें असावें. खहरट नहपान हा, शक किंवा पल्हव कुलांतील असावा, असे डॉ. भांडारकर यांचें म्हणणें आहे. नहपान शक असो किंवा पल्हव असो, क्षत्रपांचें राज्य महाराष्ट्रांत आंध्र म्हणजे शातवाहन राज्यांच्या वेळीं कांहीं काळपर्यंत होतें हें स्पष्ट आहे. म्हणजे शुद्ध मराठी राजांच्या अमलाखालीं महाराष्ट्र आतांप्रमाणें त्यावेळींहि म्हणजे अठराशें वर्षांपूर्वीहि नव्हतें असा सिद्धान्त निघतो. आंध्रांच्या व क्षत्रपांच्या दोघांच्याहि पदरीं मोठमोठे ब्राह्मण मुत्सद्दी व मराठे सरदार असावे असें नाणे घाटांतील श्री शातकर्णीच्या लेखांतील मराठा वीरांच्या उल्लेखावरून व जुन्नर येथील नहपानाच्या लेखांतील अय्यमाच्या उल्लेखावरून, दिसतें. आंध्र राजे शूद्र असून द्रविड शाखेंतील असतांहि व क्षत्रप तर बोलून चालून परदेशीय असतांहि, त्यांचीं शासनें ज्या अर्थीं संस्कृतप्राकृतमिश्रित अशा भाषेंत आहेत त्या अर्थीं त्यावेळीं जिंकणारे जिंकलेल्यांचीच भाषा वापरीत असत व जिंकलेल्यांची भाषा संस्कृतप्राकृतमिश्र अशी असे हें उघड आहे. आंध्रांना व क्षत्रपांना दोघांनाहि गोब्राह्मणांचा व श्रमणकभिक्षूंचा समाचार सारखाच घ्यावासा वाटे. गौतमीपुत्र, वाशिष्टिपुत्र, माद्रीपुत्र, हारीतीपुत्र अशीं नांवें आंध्रराजांनीं लाविली असल्यामुळें स्त्रियांचें प्राधान्य आंध्रकुलांत विशेष असे व बापाचें नांव न लावितां आईचें नांव आंध्र लोक लावीत, असें स्पष्ट दिसतें. ह्या सर्व गोष्टी आंध्र व क्षत्रप राजांसंबंधी झाल्या. खुद्द मराठ्यांच्या संबंधीं माहिती म्हटली तर, ह्या शिलालेखांतून अनुमानानेंहि काढण्यासारखीं अशीं फारच स्वल्प आहेत; कदाचित् मुळींच नाहींत. इ. स. पूर्वी एक शतकापासून तों इसवी सनानंतर दोन शतकांपर्यंत शातवाहनकुलांतील राजांनीं महाराष्ट्रांत व तेलंगणांत राज्य केल्याचे दाखले पुराणांतून, शिलालेखांतून व नाण्यांतून सांपडतात. ह्यावरून एवढें सिद्ध आहे कीं, शालिवाहनांच्या नांवानें जो शक सध्यां प्रचारांत आहे, त्याचा प्रारंभ शातवाहन कुलांतील राजे राज्य करूं लागल्यापासून झाला नाही. आपल्याला माहित असलेल्या शातवाहन कुलांतील मधल्या एका राजानें म्हणजे इ. स. ७८ त राज्य करणा-या एकाद्या शातवाहन राजानेंहि हा शक सुरू केला नाहीं. कां कीं, नाशिक येथील गौतमीपुत्र शातकर्णी व पुलुयामी ह्यांच्या शिलालेखांत पुलामायींच्या राज्याभिषेकापासून झालेल्या वर्षांचे आंकडे दिलेले आहेत व शकांचे आंकडे दिलेले नाहींत. म्हणजे शातवाहनांच्या अमदानींत वर्षांची गणना शकानें होत नसे हें उघड आहे. नहपानाचा जांवई जो उषवदात त्याच्या शिलालेखांत वर्षांची गणना शकानें केली आहे, असें पौराणिकांचें मत आहे. त्यावरून असें म्हणणें भाग पडतें कीं, वर्षाची गणना क्षत्रप राजे शकानें करीत व आंध्र राजे मोगल राजांप्रमाणें किंवा शिवाजीप्रमाणें स्वतःच्या राज्यारोहणापासून करीत. शकानें वर्षें मोजण्याचा प्रघात ज्या अर्थी शातवाहन राजांचा नसें त्या अर्थीं शातवाहनानें विक्रमाला जिंकून दक्षिणेंत शातवाहन शक सुरू केला व नर्मदेच्या उत्तरेस विक्रम संवत् चालता राहिला वगैरे दंतकथा शके १२२ पर्यंत म्हणजे इ.स. २०० वर्षेपर्यंत राज्य करणा-या शातवाहनांच्या संबंधानें तरी निराधार आहेत असें म्हणावें लागतें. महाराष्ट्रांतील पुरातन कालचें मोठें शहर जें पैठण, तेथील मराठे राजे जे शातवाहन अथवा शालिवाहन त्यांनीं दक्षिणेंत आपला शक सुरू केला असा जो अभिमान बखरनविसांच्या लिहिण्यांत व कित्येकांच्या बोलण्यांत दिसून येतो, तो केवळ भ्रामक व निराधार आहे, हें वरील विवरणावरून ध्यानांत येईल. क्षिप्रकापासून पुलोमार्चिषापर्यंत आंध्रराजांची वंशावळ विष्णुपुराणांत दिली आहे. शिवदिग्विजयांत क्षिप्रकापासून इवीलकापर्यंत आंध्रकुल राज्य करीत होतें असें सांगून नंतर हलापासून पुलोमार्चिषापर्यंत विक्रमाच्या वंशांतील राजांनीं राज्य केलें म्हणून म्हटलें आहे व नंतर शालिवाहन राजाचा शक सुरू झाला म्हणून स्पष्टीकरण केलें आहे. परंतु इसवी सनापूर्वी एक शतक व नंतर दोन शतकें आंध्रराजे राज्य करीत होते असे डॉ. भांडारकरांच्या दक्षिणच्या इतिहासावरून (१८८४) किंवा पुलमायी वाशिष्टी पुत्रानें शके ५७ पासून शके ८५ पर्यंत व श्रीयज्ञयातकर्णी गौतमीपुत्रानें शके १०० पासून १२२ पर्यंत राज्य केलें असें धरून शेवटल्या पुलमायीनें सुमारें शके २२२ पर्यंत राज्य केलें असें धरल्यास इ. सना नंतर तीन शतकें आंध्रराजे राज्य करीत होते असें मि. व्ही. ए. स्मिथ यांच्या म्हणण्यावरून (In Antiquary for Feb. 1889) बखरकाराचें स्पष्टीकरण चुकलें आहे असें म्हणावें लागतें. शकाच्या प्रारंभापासून शालिवाहनाचें राज्य दक्षिणेंत सुरू झाले हें मत आज कित्येक शतकें ह्या देशांत प्रचलित झालें आहे, ही गोष्ट लक्ष्यांत घेतली तर, बखरनविसानें केलेली चूक मोठी आश्चर्यजनक आहे असें वाटण्याचें कांहींएक कारण नाहीं. हलापासून पुलोमार्चिषांपर्यंतचें राजे विक्रमाच्या वंशांतील होते ही माहिती शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें कोठून आणिली असेल तें कळत नाहीं.

शहाबुद्दिनापासूनच्या पुढील वंशावळी यवनांच्या तवारिखांतून घेतलेल्या आहेत. शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें यवनांच्या तवारिखा पाहिल्या होत्या, किंवा खरें म्हटलें असतां, ज्या यादींवरून त्यानें आपला मजकूर तयार केला, त्या यादींच्या कर्त्यांनीं तवारिखा पाहिल्या होत्या असें म्हटलें जास्त असतां शोभेल. यवनी वंशावळींतहि सर्व राजांचीं नांवें एका पाठीमागून एक अशीं बिनचूक दिलेलीं नाहींत.

वंशावळींत दिलेल्या सार्वभौम राजांपैकीं एक दोन वंशांतील राजाखेरीज महाराष्ट्राच्या इतिहासांशीं बाकीच्यांचा साक्षात् संबंध कांहीएक नाहीं. असें असतां, वंशावळी देण्याच्या खटपटींत बखरनवीस कां पडलें, असा प्रश्न साहजिक उद्भवतो. पुराणांतील पद्धतीला अनुसरून ह्या वंशावळी यादीकारांनीं व बखरनविसांनीं दिल्या असाव्या, हें एक उत्तर आहेच. तसेंच ज्या कालीं ह्या यादी लिहिल्या गेल्या, त्याकालीं दिल्लीपतीचें महत्त्व महाराष्ट्रांत फार झालें होतें. दिल्लीपती म्हणजे पृथ्वीपति; तेव्हां ज्यांना राज्य कमाविण्याची महत्त्वाकांक्षा असेल त्यांनीं दिल्लीकडे दृष्टी फिरविली पाहिजे, ह्या मुद्यावर यादीकारांनीं विशेष भिस्त ठेविली असावी, हें दुसरें एक उत्तर आहे. माझ्या मतें मुख्य उत्तर निराळेंच असावें. शिवाजीचा वृत्तांत देतांना शिवाजीच्या वंशाची उत्पत्ति रजपुतांच्या छत्तीस कुळांतील आहे, व ह्या छत्तीसकुळीच्या द्वारें शिवाजीचा संबंध युधिष्ठिरापर्यंत जाऊन पोहोंचतो ही गोष्ट ह्या बखरनविसांना मुख्यतः सांगावयाची आहे. यवनांनीं रजपुतांची कित्येक कुळें धुळीस मिळविलीं, त्यांपैकीं कांहीं रजपूत दक्षिणेकडे आले व त्यांतच भोसल्यांचे पूर्वजहि आले, वगैरे प्रसंगांचें त्यावेळच्या माहितीला धरून, संगतवार व समाधानकारक वर्णन देतांना ह्या पौराणिक व मध्ययुगीन वंशावळींचा प्रवेश बखरींतून स्वाभाविकपणेंच झाला. ह्या वंशावळी देण्यांत एक मुख्य हेतु व दोन गौण हेतु, मिळून एकंदर तीन हेतु बखरनविसांच्या मनांत होते असें दिसतें - (१) युधिष्ठिरापासून शिवाजीपर्यंत एकसारखी परिनालिका दाखवून द्यावयाची हा पहिला हेतु, (२) युधिष्ठिरापासून औरंगझेबादि मोंगलापर्यंत सार्वभौम राजांची मालिका दाखवून द्यावयाची हा दुसरा हेतु, व (३) दिल्ली येथील सावभौम मोंगलांची सत्ता तरवारीच्या जोरावर बसविलेली होती व त्यांना दिल्लीच्या गादीला पिढीजात हक्क कांहींएक नव्हता, हें दृष्टोत्पत्तीस येऊन शिवाजीला सार्वभौम सत्ता प्रस्थापित करण्याचा हक्क पिढीजात प्राप्त झाला होता, हेंहि वाचकांच्या ध्यानांत यावें, हा तिसरा हेतु. अशा त्रिविध हेतूनें प्रोत्साहित होऊन बखरनविसांनीं ह्या वंशावळी दिल्या आहेत. पुराणें, राजावली, तवारिखा वगैरे साधनांच्या सहाय्यानें मूळ यादीकारांनीं ह्या वंशावळी बनविल्या व त्यांवरून बखरनविसानीं त्या उतरून घेतल्या.

एक दोन घराण्यांखेरीज ह्या वंशावळीतील राजांपैकीं बाकींच्या राजांचा महाराष्ट्राच्या इतिहासाशीं साक्षात् संबंध यत्किंचित् हि नाहीं. शालिवाहन, अलाउद्दिन, शहाजहान, व औरंगझेब, वगैरे पांच चार नांवांचा मात्र निर्देश ह्या वंशावळींत केला आहे. परंतु तो दिल्लीचे सार्वभौम ह्या नात्यानें झाला असून, महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधानें बिलकुल झालेला नाहीं. अल्लाउद्दिन, शहाजहान व औरंगझेब ह्यांची माहिती सर्वत्र थोडी बहुत असल्यामुळें, त्यांच्या संबंधानें मला येथें विशेष कांहींच लिहावयाचें नाहीं. शालिवाहन ह्या नांवांसंबंधानें मात्र इतका उदासीपणा दाखवितां येत नाहीं. शालिवाहन अथवा शातवाहन हें नांव आपल्याला माहित असलेल्या महाराष्ट्रांतील राजांच्या वंशावळींतील आद्यतम म्हणून समजलें जातें. पैठणिक, राष्ट्रिक, महाभोज ही महाराष्ट्रांतील निरनिराळ्या प्रांतांतील लोकांचीं नांवें अशोकाच्या वेळींहि प्रसिद्ध होतीं हें जरी खरें आहे, तरी महाराष्ट्रांतील राजकुलांपैकीं अत्यंत पुरातन असें आपल्याला माहीत असलेलें नांव म्हटलें म्हणजे हें शालिवाहनाचेंच होय. शातवाहन हें कुल आंध्र असल्याकारणानें शातवाहनाच्या वेळचे मराठे पैठण येथील आंध्र राजांच्या परकीय अमलांखालीं होते असें म्हणावें लागतें. ह्या आंध्रराजांच्या विरुद्ध त्या वेळच्या कांहीं महारथींनीं म्हणजे मराठ्यांनीं क्षत्रपांच्या दरबारीं खटपट करून आंध्रराजांच्या ताब्यांतील जुन्नर वगैरे कांहीं प्रांत क्षत्रपांच्या हातीं दिले, असें आंध्रांच्या व क्षत्रपांच्या नाशीक व कार्ले येथील शिलालेखांवरून अनुमान होतें.

येणेंप्रमाणें तिस-या वर्गांतील बखरींची परीक्षा चोख होण्याकरितां त्यांच्या भोंवतालची जागा साफसूफ करून घेणें जरूर पडलें. परीक्षेकरितां घेतलेल्या सात बखरींतून सभासदी बखर, चिटणीशी बखर व शिवदिग्विजय ह्या तीन बखरी परीक्षेकरितां प्रथम काढून घेणें जरूर आहे. कां कीं इतर बखरींतून येणा-या बहुतेक सर्व गोष्टी ह्या तीन बखरींतून आलेल्या असून, शिवाय अवांतर जास्त माहितीहि ह्या बखरींतून दिलेली आहे. तशांत सभासदी बखर समकालीन लेखकानें प्रत्यक्ष माहितीवरून लिहिलेली आहे. आणि चिटणीशी बखर व शिवदिग्विजय ह्या दोन बखरी तर त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या म्हणजे सभासदीपूर्वी होऊन गेलेल्या जुन्या कागदपत्रांच्या, बखरींच्या व टिपणांच्या आधारानें रचिलेल्या आहेत. ह्याच कारणाकरितां मल्हार रामराव चिटणीसकृत शिवाजीचें सप्तप्रकरणात्मक चरित्र व शिवदिग्विजय ह्या बखरींच्या परीक्षेला प्रथम प्रारंभ करतों व त्यांच्या अनुषंगानें इतर बखरींचेंहि पृथक्करण करितों.

ह्या दोन्ही बखरींत प्रारंभीं युधिष्ठिरापासून पिठोर राजापर्यंत वंशावळी दिल्या आहेत. युधिष्ठिरापासून पुलोमापर्यंतची वंशावळ बहुतेक विष्णुपुराणांतल्याप्रमाणें दिलेली आहे. कोठें कोठें एखाददुसरें नांव गाळलेलें आढळतें व पुष्कळ ठिकाणीं अशुद्ध नांवेंहि छापलेलीं आहेत. आधीं पुराणांतून जीं नांवे दिलेलीं असतात त्यांच्या शुद्धतेसंबंधीं रास्त संशय आलेला आहेच. तशांत ह्या बखरनविसांनीं व बखरी छापणा-यांनींहि ह्या अशुद्धतेला सहाय्य करण्याचा बराच प्रयत्न केलेला पाहून मनुष्यमात्राच्या हलगर्जीपणाची कींव येते व स्वदेशाच्या इतिहासाची जोपासना करण्याच्या कामीं दाखविलेल्या अनास्थेबद्दल तिरस्कार उत्पन्न होतो. खरें म्हटलें असतां ह्या बखरींत सृष्टीच्या उत्पत्तीपासून राजांचीं नांवें यावयाचीं; परंतु त्या नांवांची मालिका लांबच लांब असल्यामुळें व त्यांच्या संबंधी माहिती पुराणांतही विशेष नसल्यामुळें ती बहुश: दिली नसावी. युधिष्ठिराचा संपूर्ण इतिहास महाभारतांत दिला असल्याकारणानें त्या बखरनविसांनीं आपल्या इतिहासाची सुरवात युधिष्ठिराच्या नांवापासून केली आहे. कलियुगाला प्रारंभ युधिष्ठिरापासून होतो हीहि गोष्ट बखरनविसांच्या ध्यानांत असावी असें दिसतें. शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें "ब्रह्मपुत्रस्य यो योनिः" व "यदेव भगवान् विष्णोः" वगैरे श्लोक, अशुद्ध कां होईनात, परंतु कसेतरी दिले आहेत, ह्यावरून व मल्हाररामराव स्वतःच तसें म्हणतो म्हणून ह्या दोघा बखरनविसांनी साक्षात् विष्णुपुराण पाहिलें होतें, ह्यांत संशय नाहीं. शिवाय "युगसंखेची याद" व "हस्तनापुरच्या राजांची याद" म्हणून ज्या बखरी प्रसिद्ध आहेत व ज्यांचा उलेख चिटणीशी बखरीच्या उपोदघातात कीर्तन्यानी केला आहे, त्याचाहि उपयोग ह्या दोघांनीं केला होता असें माझ्याजवळ ज्या युगसंख्येच्या वगैरे यादी आहेत त्यांच्याशीं ह्या बखरींतील मजकूर ताडून पाहतां, स्पष्ट दिसतें. माझ्याजवळील युगसंख्येच्या व राजांच्या यादींत सृष्टिक्रमापासून तों महमद बहादूरशहापर्यंत शके १७५९ वंशावळी आणून सोडिल्या आहेत. आद्यन्तांची थोडीफार छाटाछाट करून ह्या बखरींतहि तोच मार्ग स्विकारलेला आहे. ज्या चुका व जो घोटाळा माझ्या जवळील यादींत झालेला आहे त्याच चुका व तोच घोटाळा ह्या बखरींतून झालेला आहे. तेव्हां बखरींतील वंशावळी बहुशः ह्या यादींवरून उतरून घेतल्या आहेत हें उघड आहे व ह्या यादी बखरींच्याहून जुन्या आहेत हें त्याहून उघड आहे. ह्या यादी केव्हां लिहिल्या गेल्या त्याचा खुलासा मी पुढें करणार आहें.

युगसंख्येच्या यादींतील, व अर्थात् ह्या बखरींतील युधिष्ठिरापासून पुलोमापर्यंतच्या वंशावळी पुराणांतून घेतल्या म्हणून वर सांगितलेंच आहे. आतां शूरसेनापासून पिठोर राजापर्यंतच्या वंशावळी कोठून घेतल्या तेंहि सांगितलें पाहिजे. ह्या वंशावळी बहुशः कांहीं पुराणांतून व कांहीं रजपुताच्या राजावलींतून घेतलेल्या असाव्या असा अंदाज आहे. युधिष्ठिरापासून पिठोरराज्यापर्यंत दिलेल्या यादींसंबंधानें एक गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे, तीं ही कीं, हस्तनापूर व दिल्ली येथें राज्य करणा-या राजांचींच तेवढीं नावें देण्याचा प्रयत्न ह्या यादींत केलेला आहे. पुढल्या राजाचा मागल्या राजाशीं, पितापुत्र संबंध सदा असतोच असा प्रकार नाहीं. उदाहरणार्थ, राजा पिठोर याच्या पाठीमागच्या राजाचें नांव चनपाळ किंवा चेनपाळ असे दिलेलें आहे. हा चनपाळ अथवा चेनपाळ म्हणजे राजा अनंगपाळ होय. पिठोर चव्हाणवंशी असल्यामुळें व अनंगपाळ तुवरवंशी असल्यामुळें ह्यांचा पितापुत्र संबंध नाहीं. हाच प्रकार वंशावळींतील इतर राजांसंबंधींहि दाखवितां येईल. वंशावळींतील कित्येक राजांनीं हस्तनापूर किंवा दिल्ली येथें राज्य केलेलें आंहेच असेंहि समजतां कामा नये. यादी बनविणाराचा मुख्य हेतु सार्वभौमत्व ज्या राजांनीं केलें त्यांचींच तेवढीं नांवें दाखल करण्याचा होता.

ह्या सात बखरींचें स्वरूपवर्णन स्थूलमानानें वर दिल्याप्रमाणें आहे. ह्या सर्व बखरी आपापल्या परीनें उपयोगाच्या आहेतच. परंतु त्यांतल्या त्यांत सभासदी बखर, मल्हार रामरावकृत चरित्र व शिवदिग्विजय ह्या तीन बखरी फार महत्त्वाच्या आहेत. इतर बखरींप्रमाणें ह्याहि बखरींतून कालविपर्यास, प्रसंगलोप, नायकाच्या महताचें अज्ञान, संगतवार व तपशीलवार माहितीचा अभाव, वगैरे दोष सडकून आहेत. अशी जरी ह्या बखरीची स्थिति आहे, तत्रापि त्यांचा उपयोग जितका होईल तितका करून घेतला पाहिजे. बखरी लिहिणारे गृहस्थ समजूतदार असून शिवाजीच्या पराक्रमांचें वर्णन करावें अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. आपण जें कांहीं लिहींत आहों, तें जाणूनबुजून खोटें लिहीत नाहीं, अशी त्यांची पक्की खात्री होती. असंबद्ध, परस्परविरुद्ध, संदिग्ध किंवा सध्यांच्या कालीं अविश्वसनीय भासणारीं विधानें त्यांच्या बखरींतून सांपडतात, तीं त्यांनीं मुद्दाम लिहून ठेविलीं असा प्रकार नाहीं. तेव्हां असलीं विधानें जेथें जेथें भेटतील तेथें तेथें तत्कालीन समजुतीकडे, लिहिणा-यांच्या शास्त्रीय ज्ञानाच्या अभावाकडे व त्यांच्या प्रामाणिकपणाकडे लक्ष देऊन त्या विधानांतील अर्थाचा स्फोट करण्याकडे लक्ष दिलें पाहिजे. सकृद्दर्शनीं सदोष वाटणा-या प्रत्येक वाक्याची व शब्दाची अर्थपरिस्फुटता केल्याशिवाय पुढें जातां कामा नये. आपले विचार नीट रीतीनें व्यक्त करण्याच्या कठिण कलेचा अभ्यास ह्या बखरनविसांनीं केला नसल्यामुळें, त्यांचें लिहिणें आपल्याला परस्परविरोधी व संदिग्ध वाटण्याचा संभव आहे. हीहि गोष्ट लक्षांत ठेवणें जरूर आहे. ह्या बखरकारांनीं केलेलीं कांहीं कांहीं विधानें तर केवळ असंभाव्यहि वाटण्याचा संभव आहे. तेव्हां ह्या सकृद्दर्शनीं दुष्ट भासणा-या विधानांचा मुळापर्यंत छडा लाविल्यावांचून त्यांची ग्राह्याग्राह्मता ठरविणें, अशास्त्र झाल्याविना राहणार नाहीं. ह्या गोष्टी लक्षांत ठेऊनच ह्या बखरींची परीक्षा मी करणार आहें. परंतु परीक्षेला प्रारंभ करण्यापूर्वी दुस-या एका गोष्टीचा उल्लेख करणें येथें इष्ट आहे. ह्या बखरींमधून आढळणारा संदिग्धपणा व परस्परविरोध सर्वस्वी बखरनाविसांच्या माथ्यावरच मारणें योग्य होणार नाहीं. ह्या दोषांचा वाटा अंशतः ह्या बखरी छापून प्रसिद्ध करणा-या संपादकांच्याहि पदरी पडतो हेंहि लक्षांत घेतलें पाहिजे. जुन्या लेखांतील मजकूर निरनिराळी पाठांतरें देऊन व शास्त्ररीत्या शुद्ध करून छापलेला असा माझ्या पहाण्यांत फारच थोडा आलेला आहे. जुन्या बखरींच्या मूळ प्रती शोधून काढून त्या छापण्याचा प्रयत्न बहुतेक झालाच नाहीं म्हटले तरी चालेल. हातीं येतील तीं तीं बाडें दुस-या तिस-यांदा नक्कल केलेलीं, अर्थात् दुष्ट झालेलीं अशींच, छापिलीं गेलीं आहेत. मिळालीं तींच बाडें महत्प्रयासानें मिळालीं, ही सबब ह्या आक्षेपावर आणितां येईल. परंतु ती काढून टाकितां आली नसतीच असें नाहीं. बखरींच्या ह्या हस्तोहस्तीं झालेल्या नकलांतून असणा-या संदिग्ध व दुर्बोध स्थलांचा छडा लावून अर्थ केलेलाहि फारच थोड्या ठिकाणीं पाहण्यांत येतो. बहुशः अशीं स्थलें टाकून दिलेलींच फार आढळतील. कित्येक ठिकाणीं दुर्बोधपणा केवळ मोडी वाचण्याचा नीट प्रयत्न न केल्यामुळें झालेला आहे. सारांश, संपादकांच्या हयगयीमुळें, अज्ञानामुळें व शिक्षणाभावामुळें जेवढा म्हणून दुर्बोधपणा ह्या बखरींतून आलेला असेल, तेवढा वगळून बाकी राहिलेल्या दोषांची जबाबदारी सर्वस्वीं ह्या बखरनविसांच्या माथीं मारणें न्याय्य होईल. आजपर्यंत मराठींत जुने गद्य व पद्य ग्रंथ जितके म्हणून छापले गेले आहेत, त्यांत सशास्त्र रीतीनें छापलेले असे ग्रंथ फारच विरळा आहेत. रा. शंकर पांडुरंग पंडित ह्यांनीं शके १७९१ त छापलेली तुकारामाची गाथा, त्यांच्या त्यावेळच्या माहितीप्रमाणें, सशास्त्र तयार केलेली आहे. अलीकडे इतकी जाडी विद्वत्ता जुने ग्रंथ प्रकाशित करण्याच्या कामीं उपयोजिलेली माझ्या पाहण्यांत नाहीं. रा. मोडक व रा. ओक ह्यांच्या काव्यसंग्रहाचाहि ह्या बाबतींत पंडितांच्या गाथेच्या खालींच नंबर लागतो. जुन्या गद्य ग्रंथांच्या म्हणजे बखरींच्या प्रकाशनाच्या कामीं जो अव्यवस्थितपणा दृष्टोत्पत्तीस येतो, तो तर सांगतां पुरवत नाहीं. खरें म्हटलें असतां, जुन्या बखरी छापण्यांत वैदिक लोकांचा वेदपठणाच्या कामीं दिसून येणारा निष्ठुर शुद्धपणा अनुकरणें अत्यंत अवश्य आहे. आपल्या राष्ट्राच्या, समाजाच्या व महापुरुषांच्या जीवनचरित्राचीं साधनें प्रकाशित करण्यांत शुद्धपणाकडे जितकें लक्ष द्यावें तितकें थोडेंच होणार आहे.