Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[३९६]                                                                       श्री.                                                            ३ जुलै १७५२.

पूज्यरूप वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी नरसिंगराव शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल आषाढ शुध्द तृतीया जाणोन आपलें कुशल वर्तमान सदैव लिहीत असलें पाहिजे. विशेष. कृपा करून पत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान विदित जालें. राजश्री मल्हारराव होळकर व गंगोबा दिवाण यांचें नांवें पत्रें पाठविलीं तीं पावलीं. तीं जवळ ठेविलीं आहेत. पुढें भेटीस जाऊं तेव्हां समक्ष देऊं. परंतु श्रीमंत पंत प्रधान स्वामीचें पत्र माझेविषयीं मल्हारजी बाबाचे नांवें न पावलें. त्या पत्रासाठीं आपण पंतप्रधानांस लिहिलें आहे कीं नाहीं हें कांहींच न लिहिलें. बहुधा तर आपण लिहिलेंच असेल, कृपा करून तें पत्र अगत्य आणविलें पाहिजे. तें बहुत कार्याचें आहे. याविषयीं आपण श्रम करून पत्र आणवितील. उत्तरेचें वर्तमान विशेष कीं:- फेरोजजंग सीरोजेस पावले. तेथून खंडेराव होळकर हाडियाचे घाटास नावाजमा करण्यास पाठविले. सत्वरच नर्मदा उतरतील. मल्हारजी त्वरा करून घेऊन येतात. आपण मल्हारजी बाबास व गंगोबास पत्र खाजगी लिहितील,त्यांतही माझेविषयीं दोन अक्षरें लिहिली पाहिजेत. याविषयीं स्मरणपूर्वक अगत्यरूप लिहितील. वरकड सर्व कुशल असे. हे विनंति. सेवेसी विद्यार्थी माधवराव शिरसाष्टांग नमस्कार. विनंति उपरि कृपानिरंतर असो दीजे. हे विनंति.

[३९४]                                                                       श्री.                                                            २४ जून १७५२.

पौ आषाढ शुध्द ४
शके १६७४

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल स्वामीचे आशीर्वादें यथास्थित असे. विशेष. जासुदाचें प्रयोजन आहे. तरी जासूद मोंगलाई कारभारास वाकीफ आणि मर्द माणोस चालणार चांगले असें पाहून पन्नास असामी करार करून पाठवून द्यावे. गाजुदीखानाचे वर्तमानावर जागा जागा काय तर्तूद होते तें लिहिलें पाहिजे. छ २२ साबान. हे विनंति.

 

 

[३९५]                                                                       श्री.                                                            २७ जून १७५२.

पौ आषाढ शुध्द ११ शनवार
शके १६७४

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी विसाजी दादाजी कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विनंति. येथील कुशल त॥ अधिक आषाढ वद्य द्वादशी जाणून स्वकीय लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. विशेष. आपण गेल्यापासून वर्तमान कांहीं कळत नाहीं. तरी साकल्य लिहिलें पाहिजे. इकडील वर्तमान राजश्री दमाजी गायकवाड येथें आले आहेत. आजी चार दिवस जाले. सप्तऋषीकडील वर्तमान पूर्ववत् प्रे॥ आहे. यकारनामक किन्हईहून सातारा गेले आहेत. त्यांचे बंधु सुटोन साताऱ्यास आले, कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. हे विनंति.

[३९३]                                                                       श्री.                                                            २७ मार्च १७५२.

पौ चैत्र वद्य १२ मंगळवार
शके १६७४ अंगिरानाम संवत्सरे.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील वर्तमान चैत्र वद्य अष्टमी जाणून स्वयें कुशल लिहिलें पाहिजे. विशेष बहुत दिवस येऊन तिकडील वर्तमान कळत नाहींत. असें नसावें. खानाचा भाव काय, दिल्लीकडील वर्तमान तेथें काय आहे, राजाजीचें कर्तव्य काय, तें जरूर ल्याहावें. इकडील वर्तमान :- चिरंजीव राजश्री दादाचे हवाली डबाई, पारनेरा दमाजी गायकवाडांनीं केला. मुलखाची वांटणी होत आहे. सर्व स्वामीचे आशीर्वादाचा प्रताप. सामोपचारें कार्य विल्हें लागलें. येणेंकरून सरकार काम होऊन गायकवाडाचें बरें जाहालें. मुलखाचें रक्षण, आपले सेनेचें रक्षण जाहालें. चिरंजीवास यश आपले कृपेनें प्राप्त जाहालें. आपणांस संतोषासाठीं वर्तमान लिहिलें असे. येथील वर्तमान तरी:- कलहप्रसंगें देश उद्ध्वस्त जाहाला. रुपया नाहीं. याजमुळें मोठी वोढ पडली. कर्ज अती जाहालें. सर्व संकटें मागें परिहार जाहालीं. पुढेंही देव-ब्राह्मण-कृपेनें कुशलच होईल. विस्तर काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.



[३९२]                                                                       श्री.                                                            १४ जानेवारी १७५२.

पौ माघ शुध्द ९ मंगळवार
शके १६७३ प्रजापतिनाम संवत्सरे.

वेदमूर्ति वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति. मागें जरूर कामाचें पत्र पाठविलें तें आपण रवाना केलें. आतां पाठविलें हें पंधरा दिवसां प्रविष्ट होऊन उत्तर पंधरा विसा दिवशीं येईल तें अगत्य करावें. जो अजुरा पडेल तो द्यावा. बराणपूर वगैरे जागा चौकीस न सांपडतां संभाळून चुकाऊन जावें असें काशिदास सांगावें. अगत्य कार्य जाणून लिहिलें असे. हे विनंति.

[३९१]                                                                    अलीफ.                                                             ८ सप्टंबर १७५१.

पौ छ २८ माहे शवाल
सन ११६१.

दीक्षितसाहेब मुशफिक मेहेरबान सलामत आजीं ज्यानब महमद मुरादखा बाद बंदगी सलाम आं कीं :- साहेबांस नवाब नसीदजंग बहादर यांनीं चोपदरा बोलावूं पाठविला. साहेबीं सांगून पाठविलें कीं, सकाळ चार घडी दिवसास येतों. ऐशियास, साहेब नवाबसाहेबाच्या दिवाणखानियांतून उठून गेलियावर आह्मीं नवाबसाहेबांस अर्ज केला कीं, आह्मीं दीक्षित साहेबांस आबाजीच्या कामासाठी बोलाविलें होतें, आजी साहेबीं त्यांजला आबाजीचें काम न फर्माविलें. मग नवाब साहेबीं फर्माविलें कीं, अगोदर मुफसल तुह्मीं जाहीर कां न केलें, आतां सकाळ बोलावून सांगतों. साहेबीं चोपदाराबरोबर सांगून पाठविलें कीं, सकाळ येतों. ऐशियास, आज अमावास आहे. साहेबीं आज अमावास्येस न येणें. सकाळ पाडवियास सकाळचे चार घटका दिवस चढतां खामखा येणें. अमावस्येस जाबसाल कामाचा नाहीं. सकाळ पाडवियास खामखा येणें. यश साहेबांस आहे. हे किताबत.

[३९०]                                                                    श्री.                                                              २० आगस्ट १७५१.

पौ भाद्रपद शु॥ ११ मंगळवार. बा
जोडी जासूद. संमत १६७३, प्रजा-
पति नाम. छ ९ सवाल. शुध्द १२
गुरुवारीं जबाब दिल्हा.

पु॥ वेदमूर्ती राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि. आपण तेथील आशय लिहिला कीं, मुखेंकरून नम्र बोलतात, परंतु बऱ्हाणपुरांत फौज ठेवितात, येथेंही बहुत सावधतेनें तरतूद करतात, हें जाणून आपण सावध होऊन सेना सिध्द करावी ह्मणून लिहिलें, येणेंकरून बहुत उत्तम जाहालें. श्रीकृपेनें येथेंही सेनासिध्दता सत्वरच होईल. आह्मीं त्यांशीं पूर्वीं स्नेहच केला. आतांही स्नेह वर्धमान व्हावा हेंच इच्छित असतों. त्यास त्यांनीं सेना सिध्द केलिया ईश्वर आह्मासच नफा करील. आह्मीं आपलेतर्फेनें अंतर पडूं देणार नाहीं. जुनीं फौज दूर किती केली, नवी कशी ठेविली, किती ठेविली चंद्रसेनाचा लेक, सुलतानजी निंबाळकराची समजाविशीं जाहाली कोणे प्रकारें, सैद लष्करखानाशीं कसें आहे, हें सर्व लहान मोठें जरूर ठिकाणीं लावून आपण लिहिलें पाहिजे. रामदासपंतांनीं आह्मास पत्र लिहिलें होतें. त्यांत लिहिलें होतें कीं, जानबास आपलें पत्र गेलें आहे व आह्मींही लिहिलें आहे, येतील. जानबांनीं तों लिहिलें आहे कीं, त्यांचें पत्र येईल तेव्हां येऊं. आपण त्यासी आठा चहूं दिवसांनीं भेटतच असतात, त्यासमयीं बोलावें कीं, जानबास जावयाविशीं पत्र ल्याहावें. जनांत उगीच संशय वर्धमान होतो हें कामाचें नाहीं. तेही स्नेह इच्छितात, परंतु दिल्लीकडील, आणखी कोणीकडील कजिया नसतां, खजाना खर्च करून फौज ठेवणें होतें याजमुळें संशय वाढविणार बहुत आहेत. याप्रकारें बोलावें. आमचा निश्चय हाच सांगत जावा कीं, तुह्मीं सर्व प्रकारें एकनिष्ठता धरीत असतां आह्मांस कलह इच्छा नाहीं, किंबहुना आमचें कार्य आपण करावें, आपलें कार्य करूर आह्मां योग्य असेल तें आमचे हातून करून घ्यावें, गायकवाडावर जातां आपण फौज कुमकेस पाठविली तेणेंकरून बहुत भरंवसा धरितों. ऐसें प्रकारें गोड बोलून संशय दूर होत तें करीत जावें. खानाचीही भेट होतच असेल. सारांश आह्मीं कलह करीत नाहीं. त्यांनींहून आरंभ केलिया श्रीकृपेनें सिध्द आहों. शंभराशीं राजकारणें केलीं तरी ते घरींच राहतील. गांठ पडतां त्यांशीं आह्माशीं मात्र पडेल. छ १ सवाल. हे विनंति. जानबास त्यांनीं पाठवावें, त्यांनीं यावें, ऐसें जाहालें असतां [ ठीक पडेल.] विलंबावर घातल्यास विशेष संशयवृध्दि व्यर्थ होणार. यास्तव सत्वर ते येत ऐशीं पत्रें त्यांस रवाना करणें. कदाचित् नच पा ++++++ असला तर तोही लिहिणें. हे विनंति.



[३८८]                                                                    श्री.                                                              १५ आगस्ट १७५१.

पौ भाद्रपद शु॥ ८ शुक्रवार,
शके १६७३.

वेदशास्त्रसंपन्न राजमान्यराजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजीबाजीराव प्रधान कृतानेक नमस्कारविनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. रा० राघो गणेश वकीलीचे कामाबद्दल अवरंगाबादेस रवाना केले आहेत. त्यांस येथून कितेक सांगणें तें सांगितलें आहे. यांचे मुखवचनें श्रुत होईल. जाणिजे. रा छ ४ सौवाल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.



[३८९]                                                                    श्री.                                                              १५ आगस्ट १७५१.

पौ भाद्रपद शु॥ ८ शुक्रवार
शके १६७३. बा जासूद जोडी.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-

विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. आपण पत्रें पाठविलीं तीं पावलीं. ऐशियास, सर्व प्रकारें भरंवसा स्नेहाचा रामदासपंताचा आहे. त्यांचे स्नेहानें बहुत किफायती आहेत. जन नानाप्रकारें बोलतात. परंतु त्यांचा आमचे ठिकाणीं निष्ठापूर्वक स्नेह व आमची कृपा त्यांचे ठायीं असतां, वरकडांच्यानें काय होणें ? तिळमात्र संशय न मानितां त्यांनीं आपले दौलतेचा बंदोबस्त करावा. जें त्यांचे हित आमचे कर्तव्यायोग्य असले तें आह्मांस घरोबियाचे रीतीनें ल्याहावें. करावयास अंतर होणार आहीं. त्यांनीहीं आमचें हित तें करावें. गायकवाडाचे प्रसंगी त्यांनी कुमक पाठविली, येणेंकरून वचनप्रामाणिकतेचा पुढें फार भरंवसा धरिला आहे. बहुत काय लिहिणें. हे विनंति.

[३८७]                                                                    श्री.                                                              १४ जुलै १७५१.

पौ श्रावण शुध्द ७ गुरुवार,
शके १६७३ प्रजापति नाम
संवत्सरे

वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी:-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ १ रमजान जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. आपण पत्र विस्तारें पाठविलें त्यावरून सविस्तर अर्थ अवगत जाहला. ऐशियास, मागें पंधराची जागीर दिल्लीकडून गाजुदीखान न आलें, पातशाहाचें कृपापत्र आलें, तर देऊं, ऐसे ते बोलले होते. आह्मी अवश्य ह्मणून ह्मणत होतों. ते समयीं रदबदली करून बोलिले शेवटास नेणें नव्हतें. यास्तव मोघमच मजकूर ठेविला. सांप्रत गाजुदीखान राहिले, यास्तव आमचें प्रयोजन नाहीं, ऐसें मनांत आणून उडवाउडव करीत असतील तर करोत. घरींदारीं पेंच बहुत रामदासपंतास आहेत. आह्मीं उदासीनपण दाखविल्यास कांहीं तरी भारी पडेलच. आह्मांस तो मोठया मोठया नफ्याचा भरंवसा त्यांपासून आहे. राजश्री जानवाचे बोंलण्यांत फारच मजकूर होता. पुढें त्याप्रमाणें असेल असें बहुतच कागदोपत्रीं जालें. थोराथोरांची एकवाक्यता दिसल्यास दूरवर दबाव फार असतो. रामदासपंतांनीं करारच केला आहे कीं, तुमचें कर्ज फिटोन तुमचे हातून मोहरांची दक्षणा वाटवतों, वडिलांचे इतिफाकानें सा सुभ्यांचा यथास्थित बंदोबस्त जो थोरले नबाबांस न जाहला तो करितों. आणखीही कितेक प्रकार बोलले. ते जाणत असतीलहे सर्व आशय तुह्मीं बोलत जाणें. आमचे मनांत त्यांशीं स्नेह करावा, त्यांचें साहित्य सर्व प्रकारें करावें, हेंच आहे. वरकड बनाजीपंताचे पत्रीं वर्तमान लिहिलें तें कळेल. छ मजकूर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.

[३८६]                                                                    श्री.                                                              ९ जुलै १७५१.

पौ श्रावण शु॥ ३ रविवार,
शके १६७३, बराबर जासूद.
जाब श्रावण शु ६, बुधवार.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत गेलें पाहिजे. विशेष. नवाब सलाबतजंग यांणीं बराणपूरचे सुभ्याकडून तीन लक्ष रुपये देविले होते. त्यापैकीं दीड लक्ष रुपये राजश्री बनाजी माधवराव यांचे पदरीं शहरीं राजश्री रामदासपंतांनीं घालविले. तो ऐवज अर्काट गंजीकोट पदरीं पडला, ह्मणोन मशारनिलेंनीं लेहून पाठविलें, व त्याच ऐवजापैकीं येथें एक लक्ष पंचेचाळीस हजार रुपयांची हुंडी बनाजीपंतांनीं करून पाठविली. शेंकडा दीड रुपया हुंडणावळ देऊं केली. त्यास सावकार असें ह्मणतात कीं, अर्काट प्रांतीचा ऐवज असेल त्यास शेंकडा हुंडणावळी बट्टा एक रुपया पुण्याचा पडेल, आणि जुने बेश रुपये घ्यावे, याप्रमाणें चाल आहे. त्यास दीड रुपया हुंडणावळी देऊन, फिरोन अर्काट गंजीकोट रुपया कसा घ्यावा ? ये गोष्टींत सरकारची नुकसानी आहे. हुंडीचा रुपयाचा दाम देत असाल तर घेऊं, नाहींतर, खजिन्यांतून रुपया आला आहे, तोच आमचे पदरीं घाला. तेथें आह्मीं घेऊन हुंडणावळीचा दर शेंकडा एक रुपयाप्रमाणें आह्मांस द्यावा, ह्मणजे सरकारची नुकसानी होणार नाहीं; याप्रमाणें सावकार ह्मणतात. याकरितां तुह्मांस पत्र लिहिलें आहे. तर खजिन्यांतून रुपया कोणे प्रतीचा आला आहे, हुंडणावळीचा मजकूर कसा आहे, येथें हुंडीचा रुपया कोणे रीतीनें भरावा, वगैरे वर्तमान मनास आणून लिहिणें. इ० इ० इ० रा छ २६ साबान. कोणास न कळत यथार्थ शोध जरूर लिहिणें. हे विनंति.

[३८५]                                                                    श्री.                                                           २७ जून १७५१.

पौ आषाढ वद्य ६
बुधवार, शके १६७३
प्रजापतनाम संवत्सरे,
छ २० शाबान.

वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामी गोसावी यांसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति. बहुत दिवस पत्र येत नाहीं, ऐसें नसावें. सदैव पत्र पाठवीत असावें. विस्तारें बाळाजीपंतास लिहिलें आहे, त्या पत्रावरून कळेल. येथील वर्तमान तरी:- राजश्री स्वामी आईसाहेबांचे हातून सुटले. यास्तव तेथील फौज काढिली असे. कांहीं दिवशीं सुमुहुर्तें खालींही येणार. गुजराथेंतील ठाणीं मुलुख हवालीं करावा, मग सोडावें, असा करार शफतपूर्वक दमाजी गायकवाडांनीं केला. यास्तव फौज विठ्ठल शिवदेव रवाना केले. बोलल्याप्रमाणें वर्तले तर उत्तम. नाहीं तर स्वामींचें आशीर्वादें जबरदस्तीनें घेतच आहों. मल्हारबानीं तिकडील कार्य उत्तमच केलें. पुढें छावणीं कोठें केली हें कांहीं लिहिलें आलें नाहीं. तेथें आलें असेल, तें ल्याहावें. छ १४ साबान. हे विनंति.