Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[५२७]                                                                     श्री.                                                                

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ता आषाढ शुध्द चतुर्थीपर्यंत यथास्थित असो. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वृत्त सविस्तर कळलें. दिल्लीकडील वर्तमान लिहिलें तें कळलें. पुढें आणखी वर्तमान आलें असेल अथवा येईल तें वरचेवर लेहून पाठवणें. वजीर धरला गेला; लूट कोण्याप्रकारें जाहाली ? पुढें बंदोबस्त कसा केला? हें वर्तमान जरूर लिहिलें पाहिजे. हे विनंति.



[५२८]                                                                     श्री.                                                                

वेदमूर्ति दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति. येथील वर्तमान विशेष संतोषाचे होईल तेव्हा ल्याहावे हे इच्छा स्वामिचे आशिषप्रतापें आहे. नित्य युध्द थोडे कहिवर होतें. एकदा कांहीसें बरेंच जालें यवन शैन्यांत धान्य तीन सेर आहे. इकडे फौज चालिस हजार जाली. वरकडही जमा होत आहे. स्वामीनीं निरंतर पत्र पाठवावें. स्वामीचे कृपेनें उत्तमच होईल. राजाजीची व सना पुणियाची फार आहे. गेले तरी काय होणें. गनिमास घराचा काय मजकूर हे विनंति पौष शुध्द दशमि *

[५२६]                                                                     श्री.                                                                

पो छ ३० रजब.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोपाळराव गोविंद स्वामी गोसावी यांसी :-
पो बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. ऐशास, गाडदी सत्वर प्रतिपदा जालियावर तुह्मांकडेस रवाना करतों. त्यास, शहर अवरंगाबादेस तसदी न करतां, किल्ले दौलताबादेचाच बंदोबस्त उत्तम प्रकारें होय तें करणें. गाडदी, तोफा, फौज येऊन पोहोचेल. सखतीनें वेढा बसवणें. काम थोर ह्मणून प्रथमपासून नरम होऊन तुह्मी जाबसाल करीत गेले. परंतु तें लहान माणून चढी लागत चाललें. कांही सख्ती पोहोंचल्यावर डोळे उघडतील. रिकामी फौज येथें आहे ते वेढियाचें काम करील. नवी ठेवावी लागत नाहीं. श्रीकृपेनें कार्य लौकरच होईल. शहरकरांशी सलूख राखणें. अप्पाजीपंत व किल्लेदार आपले विचारांत आहेत ह्मणून लिहिता; परंतु हे जर तुमचे लोक एखादे दरवाजियानें आंत घेतील तर खरें. नाहीं तर हेच लबाडी करतात यांत संशय नाहीं. नांव गोलंदाजाचें जमातदाराचें करतात यातं संशय नाहीं. प्रत्यक्ष किल्लेदार कारभारी यांची शेपन्नास माणसें नसतील काय ? यांची शेदोनशें माणसे असलीयावर तुह्मांकडील यांनी माणसें आंत घ्यावी, लबाडी करीत असतील त्याचें पारिपत्य करावें. तर हे आमचे विचारांत खरे. नाहीं तर लटके. गोड बोलून आपला मतलब ठीक राखावा यासाठीं तुह्माशीं गोड बोलतात. माझें मतें तों किल्ला सनदेनें देतात. यांस इतकें देणेंच योग्य नाहीं. तुह्मी वारंवार लिहिलें, यास्तव निकृष्ट पक्ष कबूल केलें होतें. वेढा बसवावयास नवी शिबंदी बसवावयास लागत नाही. उगेच पाऊण लाख रुपये व पन्नासांची जागीर जवळची कां गमवता ? आतां तेंच प्रत्ययास आलें. आतां तरी रगडून करणें. रा छ २९ रजब. हे विनंति.

[५२५]                                                                     श्री.                                                                ८ डिसेंबर १७६१.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. आपणास आज दीड महिना झाला, बोलावूं पाठविलें आहे. न आपलें येणें, न पत्राचें उत्तर ! अपूर्व आहे ! याउपरि राजश्री अबाजी नाईक यासमागमें लौकर यावें. र॥ छ २८ रबिलाखर. हे विनंति.

[५२४]                                                                     श्री.                                                                  १२ आगस्ट १७६१.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
चरणरज बापूजी महादेव सा नमस्कार विनंति येथील क्षेम श्रावण रदि १२ बुधवार जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. यानंतर, पूर्वेचा सुभा सिराजतदौला इंग्रेज मकसुदाबादेस येऊन साता कोसांत युध्द झालें. सिराजतदौला युध्दीं पडला. मग त्यांचा यांचा सलूख झाला. कांही लुटलें नाही. बंदोबस्त तैसाच आहे. जाफर अल्लीखान महाबतजंग नवाब याचा मेहुणा यासी सुभा झाला. तो साठी वर्षाचा शहाणा बक्षी होता. अवघे मिळोन ठिकाणी लाविला. वृध्द होता. कळलें पाहिजे. ग्रामण्य आहे तैसेंच आहे. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विज्ञापना.

[५२३]                                                                     श्री.                                                                  २८ जून १७६१.

पो आषाढ वद्य ११ मंगळवार
शके १६८३.

श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांप्रती वाराणशीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता आषाढ वद्य ११ रविवार जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान तरी आह्मीं धामधुमेमुळें क्षेत्राबाहेर गेलों होतों ते चैत्र शुध्द १२ स महाक्षेत्रीं आलों, हें वर्तमान पूर्वी लिहिले आहे. दिल्लीहून गिलचा पठाण आपले देशास गेला. रोहिला नजीबखान फौजेनसीं दिल्लीत आहे. रा मल्हारजी होळकर माळव्यांत इंदुरी आहेत. रा गंगाधरपंत तात्या कांहीशी फौज घेऊन जाटापाशी आहे. खासा जाटाची फौज, व तात्या व गाजदीखान ऐसे त्रिवर्गांनी मिळून आग्रयाचा किल्ला सोडविला ह्मणून वार्ता आहे. किल्ल्यांत अंमल जाटाचा. आज जाट जबरदस्त आहे. उभयता त्याच्या अनुमतें आहेत. अयुध्येवाला नवाब सुजावतदौला लखनऊहून स्वार होऊन श्रीकाशीस आला. तेथून आठ दहा कोश पूर्वेच्या रोखें गेला होता. पटण्यास पातशाहा होता त्यास आणविला. आपणापाशीं आलियानंतर परस्परें भेट जाहल्या. नवाबास वजिरी दिली. तेथून काशीस आषाढ वद्य अष्टमीस आले. आजी तीन दिवस येथें आहेत. पुढें येथून कुच करून जाणार आहेत. कळले पाहिजे. यंदा येथील अधिकारी फौज घेऊन आलियामुळें जिन्नस महाग जहाला. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.

[५२२]                                                                     श्री.                                                                  २१ मे १७६१.

पे॥ ज्येष्ठ वद्य ५ सोमवार
शके १६८३ वृषानाम संवत्सरे.

श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांप्रती श्रीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर आशीर्वाद उपरि येथील क्षेम ता ज्येष्ठ वद्य ३ गुरुवार जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊ यांचे लढाईचें वर्तमान तो पूर्वीं लिहिलेंच होतें त्यावरून कळलेंच असेल. लढाई जाहलियानंतर अंतर्वेदीतील अम्मल उठिला होता तो फिरून पहिल्याप्रमाणें बसला. बुंधेलखंड व माळवा येथें जमीनदारांनी धामधूम केली होती त्यांसही शह देऊन अम्मल बसविला. सांप्रत जानोजी भोसले रेवामुकुंदपुरावरी फौजेसमेत आहेत. नवाब सुजावतदौला काशीस आले आहेत. येथील राजा पारीं पहाडांत गेला आहें. आजी तीन चार मोकाम आहेत. येथून पटण्यास जावयाची वार्ता आहे. शाहजादाही तेथें आहे. पुढें जो प्रसंग होईल तो लेहून पाठवूं. नवाब येथें आले आहेत, परंतु रयतेवरी बहुत कृपा करितात. शहरांत कोणास काडीइतका उपद्रव नाही. लोकांस ताकीद मोठी आहे. कळलें पाहिजे. विशेष. श्रीमंत रा पंतप्रधान इकडून देशास गेले ते कोठें आहेत ? पुढें मनसबा काय आहे ? तो लिहिणें. व रा मल्हारबा इंदुरी आहेत, देशास जाणार ह्मणून वार्ता आहे. तरी तिकडील सविस्तर वर्तमान लिहिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभ असावा हे आशीर्वाद.

[५२०]                                                                     श्री.                                                                  २ मे १७६१.

श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी गोविंद दीक्षित ++++ चैत्र वद्य १३, ठाणें असखेडे ++++. विशेष. ++++++ श्रीमंत राजश्री भाऊसाहेब व रा शिंदे अला जाटाचे मुलकांत रूपनगरी आहेत ह्मणोन जनचर्चा आहे. तथ्य नाहीं. सावकारियांत तथ्य वर्तमान असेल. सविस्तर लेखन करावें. दरगाकूलीखानाचे बागांत तांबडया केळी आहेत तेथून बेण्यास दोन चार खांब द्यावें. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ कीजे. हे विनंति.



[५२१]                                                                     श्री.                                                                  ५ मे १७६१.

पो वैशाख शुध्द १
शके १६८३.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. राजश्री विठोबा नाईक यांचे तीर्थरूप कुटुंबसहवर्तमान न आपल्याजवळ कायगावांस येतील. तर मशारनिलेस आपल्या वाड्यांत स्थळ उत्तम रहावयास देऊन परामर्ष करीत जाणें. रा छ २९ रमजान. हे विनंति.

                                                                           श्री.                                                                  ६ मे १७६१.

पो वैशाख शुध्द १
शके १६८३, छ ३० रमजान.

पु राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि. नित्य पांच डाल्या पिकले आंबे इरसाल खरीदी करून आह्मांस पाठवीत जाणें. रा छ ५९ रमजान. व अंजीर. हे विनंति.

[५१९]                                                                     श्री.                                                            २० एप्रिल १७६१.

पे॥ ज्येष्ठ वद्य २ शुक्रवार.
शके १६८३.

सहस्त्रायु चिरंजीव गोविंद दीक्षित यांप्रती बाळकृष्ण दीक्षित अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें त्यांत, श्रीमंतांची भेट घेतली बहुत श्रीमंतांनी सन्मान केला, ह्मणून लिहिलें. तरी त्यांस उचितच आहे. विशेष. येथून हुंडया पाठविल्या त्या पावल्याचें उत्तर लिहिणें. जमा करून ठेवणें. विशेष. आह्मी श्री सोडून बाहेर दोन मास आहों. परंतु स्वोत्कर्षाचें वर्तमान आतां येऊं लागलें तेणेंकरून चित्त स्वस्थता झाली.* विशेष. येथें राजानें ह्या दिवसांत बहुत परामृष केला तेणेंकरून श्रींत बहुतांची अब्रू राहिली. आणि आमच्याविषयीं तों सर्वांस हेंच सांगितले जें माझी आणि बाळकृष्ण दीक्षितांची भिन्नता नाहीं, ज्यास मला उपद्रव करावयाचें सामर्थ्य असेल त्याणें यांस उपद्रव करावा. ऐसा अहंकार धरून उपद्रव होऊं दिला नाहीं. ब्राह्मणभोजन आदिकरून सर्वां गोष्टींचा आपण समाचार घेत असे. ऐशी विशेषेंकरून प्रीति केली. सर्वांस आपलेकडील मुत्सदि यांस सांगितलें जें, मी कैलासवासी नारायण दीक्षित यांचा लेक, मला त्यांचे व्रत चालवणें जरूर त्यांचे माणसाशीं कोणी मुजाहीम होई तरी नि:शंकाविना आज्ञेवांचून तोंड फोडा. ऐशी नित्य ताकीद करीत असे. आणि आमच्या शिवास आज्ञा केली जे, तुमचे दीक्षितांचे असतील व बैतल माल दीक्षितांसी सोडविला आहे, त्यांस कोणी धादा पाठविला तरी ज्याप्रमाणें दीक्षितांचे वेळी साहित्य लोकांचें होत असे त्याप्रमाणें करीत जाणें, तुझें ह्मटलें कोणी न आयके तरी मला सांगणें, मी त्यांचे पारपत्य करीन. ऐसें सांगितलें; आणि त्याजप्रमाणें दोन महिने चालविलें. कळावें. सर्वत्र वडिलांचे पुण्येंकरून निर्वाह होतो. आतां पुढेंही वडिलांचेच पुण्येंकरून चालेल. आतां आह्मी दो चौ दिवसांत श्रीस जाऊं. चिंता न करणें. राजाचेच जाग्यांत आहों. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.

[५१८]                                                                     श्री.                                                            १६ एप्रिल १७६१.

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी उध्दव वीरेश्वर सा नमस्कार विनंति येथील कुशल चैत्र शुध्द १२ गुरुवार पूर्वरात्र प्रहरपर्यंत यथास्थित जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. स्वामीनीं कृपा करून पत्र पाठविले तेथें मजकूर. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांचें संतोषाचें वर्तमान सांप्रत तुह्मांकडे आलें आहे तें सविस्तर लिहून पाठवणें ह्मणून. त्यास, आज तीन दिवस जाहाले. रामनवमीचेच दिवशीं रा मोहनजी नानाजी यांचे पत्र खानापुराहून आलें. तेथें त्यांणीं लिहिलें होतें, व देवगांवास गृहस्थ राहतात त्यांचे पुत्राचे माळव्यांतून पत्र सातवे साबानचें खानापुरास चैत्र शुध्द अष्टमीस आलें. त्याची नक्कल पाठविली होती. त्यांत लिहिलें होतें जे :- श्रीमंत राजश्री भाऊसाहेब रामशिंग राजासुध्दां पंचवीस हजार फौजेनिशी ग्वालेरीस आले. या प्रांतांतून श्रीमंत थोरले साहेबांनी राजश्री बापूजी नाईक वगैरे सरदार वीस हजार फौज रवाना केली. तेहि ग्वालेरीस गेली. श्रीमंतांची व त्यांची भेटी जाहाल्या असतील ऐसें त्यांनी लिहून पाठविलें. दुसरे तेच दिवशी उज्जनीहून जासूद येथीलच लष्करांत आले. गांवचे पागेस चाकर आहे. तो सव्विसावे साबानी उज्जनीहून निघाला. त्याणें सांगितलें कीं, मारवाडांतून राजश्री जनकोजी शिंदे यांचे पत्र आलें जें :- श्रीमंत भाऊसाहेब आह्मी सुखरूप आहों. त्यांजबरोबरच भाऊसाहेबांचें पत्र होतें. त्यास, दोनी जासूद जाट होते. मार्गीं गवासांचे गांवी चौकीवर सांपडले. त्यावेळेस भाऊसाहेबांचे पत्र हिरावून घेऊन, जाटाचा हात तोडून, निरोप दिल्हा. ते दोघेजण उज्जनीस श्रीमंत साहेब रामरायाचे हवेलींत होते. देशास जावयाची मसलत होतीं; परंतु जनकोजींचे पत्र व जासूद मध्यरात्रीस येऊन पावले. तेच वेळेस दोन सांडणीस्वार व चार जासूदजोडया श्रीमंत दादासाहेबांकडे रवाना करून, खासा कुच करून, पुढें सा कोसांवर जाऊन मुक्काम केला. मग उजाडल्यावर जासूद इकडे निघाला. जाट दोघेजण आले, त्यांसव दोन कडी सोन्याची बक्षीस दिलीं. याप्रमाणें जासुदानें जबानी वर्तमान सांगितलें. याप्रमाणें दोहींकडून वर्तमान आलें. त्यांचा एक भाव आला त्याजवरून आश्वासन वाटतें. आमचे जासूद लष्करांत गेल्यास आज पंधरा दिवस जाहाले. तेही आठ चार दिवसांत येतील. याप्रमाणें आढळलें वर्तमान तें लिहिलें आहे. लष्करांतून सरकारचें पत्र आल्याउपरही स्वामीस कळवूं. सेवेसीं निवेदन होय. आह्मांस कोणा मातबराचें लिहिलें आलें नाहीं. दोहींकडून वर्तमान आलें तें निवेदन केलें आहे. बहुत काय लिहिणें. लोभ कीजे. हे विनंति.

[५१७]                                                                     श्री.                                                            पे॥ ९ एप्रिल १७६१.

पे॥ चैत्र शुध्द ४ गुरुवारी,
हस्तें गणू. शके १६८३ वृषानाम.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. अबदालीचे व आपले फौजेचें युध्द तुंबळ जहालें; आपले सरदारांस जिकडे फावलें तिकडे गेले; इकडे नाना प्रकारें वर्तमानें येतात; तरी तथ्य वर्तमान ल्याहावें ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास युध्द मोठें जहालें. विश्वासराव अभिमन्यूप्रमाणें रणभेदून कैलासवासी जहाले. चिरंजीव भाऊ व जनकोजी शिंदे अलाजाटाच्या मुलखांत आहेत. दहा पांच बातम्या आल्या. शोधास माणसें कारकून गेले. लौकरच त्यांचे हातचें पत्र घेऊन येतील. राजश्री मल्हारजी होळकर वगैरे सरदार ग्वालेरीस आले. इभराईमखान त्यांस पाडाव जाले. जुंझ. सरदार व लोक मारले गेले. युध्दच आहे ! यश अपेश ईश्वराधीन ! असो ! चिंता काय ? पुढेंही जे तरतूद होणें ते होते. तुह्मी तिकडील लिहीत जावें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.