Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

परंतु शके १५७१ त प्रतापगड मुळी अस्तित्वांतच नव्हता हें लक्षात आणिलें असतां बखरकार ह्या ठिकाणी निव्वळ बरळत आहेत असें म्हणावें लागतें. तात्पर्य, बखरकारांच्या मजकुरांतील तपशील अस्सल पत्रांच्या किंवा जुन्या ग्रंथांतील उता-यांच्या रूपानें जेवढा दिला असेल तेवढाच खरा मानावा. बाकीचा तपशील खरा कां मानावा दाखवून देणें कठीण आहे.
(२) परीक्षणाकरितां घेतलेला दुसरा ऐतिहासिक प्रसंग चंद्रराव मो-याच्या पारिपत्यासंबंधीचा आहे. (अ) सभासदी बखरींत ह्यासंबंधीं मजकूर येणेंप्रमाणे आहे. (१) रघुनाथ बल्लाळ सबनीस याला चंद्ररावाकडे हेजिबीस पाठविलें. (२) त्यानें चंद्रराव व सूर्याजीराव मोरे यांस स्वतः मारिले (३) संभाजी कावजीनें चंद्ररावाचा भाऊ हणमंतराव मोरे यांस मारिलें.
(ब) सप्तप्रकरणात्मक चरित्रांत ह्यासंबंधीं मजकूर असा आहेः- (१) राघो बल्लाळ सबनीस यास चंद्ररावाकडे हेजिबीस पाठविलें. (२) त्याने चंद्रराव व त्याचा भाऊ सूर्यराव यांस मारिलें. (३) संभाजी कावजीनें मोरे यांचे कारभारी हनुमंतराव यास मारिलें. (४) चंद्ररावाचे लोक बाजीराव व कृष्णराव यांसा पुणें येथें निमजग्यांत नेऊन मारिलें. (५) चंद्ररावचे कबिले सोडून दिले.
(क) शिवदिग्विजयांत येणेंप्रमाणें मजकूर आहेः- (१) रघुनाथपंत चंद्ररावाचा भाऊ व त्याचा कारभारी जो हणमंतराव त्याजकडे हेजिबीस गेला (२) रघुनाथपंतानें हणमंतरावास मारिलें. (३) रघुनाथपंत शिवाजीस भेटण्यास पुरंधरास आला. (४) मग शिवाजीनें व रघुनाथपंतानें चंद्ररावावर स्वारी करून, लढाई देऊन मारिलें. (५) बाजीराव मोरे व कृष्णराव मोरे, चंद्ररावाचे लेक, यांस पुण्यात निमजग्यांत आणून ठेविलें.
(ड) ग्रांट डफचा मजकूर असा आहेः- (१) राघो बल्लाळ व संभाजी कावजी यांना चंद्ररावाकडे हेजिबीस पाठविलें. (२) राघो बल्लाळानें चंद्ररावास व संभाजी कावजीनें त्याच्या भावाला मारिलें. (३) जावळीच्या लढाईंत हिंमतराव मारला गेला व चंद्ररावाचे पुत्र कैद केले गेले.
(ई) चित्रगुप्ती बखरींत मजकूर येणेप्रमाणें आहेः-(१) रघुनाथराव सबनिसाला चंद्ररावाकडे हेजिबीस पाठविलें. (२) त्याने चंद्रराव व त्याचा भाऊ सुरेराव यांस ठार मारिलें. (३) चंद्ररावाचा भाऊ हणमंतराव चतुर्वेटांत होता त्याला संभाजीने शरीरसंबंधाचें मिष करून मारिलें.
(फ) प्रो. फारेस्ट यांनीं छापिलेल्या रायरी येथील बखरींत मजकूर असा आहेः- (१) चंद्रराव मो-याचा दिवाण हणमंतराव मोरे महाबळेश्वरीं होता. (२) त्याजकडे शरीरसंबंधाचें बोलणे करण्याकरितां शिवाजीनें रघुनाथ बल्लाळ सबनीस यास एकशे पंचवीस स्वार देऊन पाठविलें. (३) त्यानें हणमंतरावास ठार मारिलें. (४) नंतर तो शिवाजीकडे पुरंधरास आला. (५) शिवाजी निसणीच्या दारानें व रघुनाथ बल्लाळ रडतोंडीच्या घाटनें जावळीस आले. (६) तेथें लढाई होऊन चंद्रराव व त्याचे भाऊ बाजीराव व कृष्णराव व त्यांचे कबिले या सर्वास कैद केले.

येणेंप्रमाणें ह्या सहा बखरींतील कैफियतीं आहेत. जावळीची लढाई ज्यांनीं साक्षात् मारिली त्या शिवाजीची, राघो बल्लाळाची व संभाजी कावजीची प्रत्यक्ष जबानी मिळाली असती, तर ती पूर्ण प्रमाण म्हणून अवश्य मानावी लागली असती. चंद्रराव मो-यांकडील जबानी मिळाली असती, तर प्रतिपक्षाकडील म्हणणें काय आहे तें ऐकून घेतां आलें असतें. परंतु मुख्य वादी व प्रतिवादी ह्यांच्या अस्सल जबान्या म्हणजे अस्सल पत्रें, हकीकती वगैरे कांहीच उपलब्ध नसल्यामुळें केवळ बखरकारांच्या लिहिण्यावरून निकाल देण्याचा प्रसंग आला आहे. बखरकार झालेल्या प्रसंगांचें प्रत्यक्ष द्रष्टे नसून केवळ कर्णोपकर्णी व कदाचित् जुने दाखले वगैरे पाहून हकीकती सजविणारे लेखक आहेत. त्यांतल्या त्यांत मल्हार रामराव व शिवदिग्विजयाचा कर्ता ह्या दोघांनी काहीं जुने लेख पाहिले असावे असा संशय येतो.

शंकास्थान तिसरें.
शके १५८१ पर्यंत तपशिलाने ज्याविषयीं माहिती बखरींतून दिली आहे असे प्रसंग म्हटले म्हणजे (१) शिवाजीची व तुकारामरामदासांची भेट, (२) चंद्रराव मो-याचें पारिपत्य व (३) अफजुलखानाचा मोड, हे तीन होत. ह्या तीन प्रसंगांत जो तपशील दिलेला आहे तो कितपत विश्वसनीय आहे, व त्या तपशिलांपासून विशेष ऐतिहासिक माहिती काय मिळण्यासारखी आहे हें ह्या शंकास्थानांत पहावयाचें आहे.

तुकारामबोवांच्या भेटीचा जो वृत्तांत समप्रकरणात्मक चरित्रांत दिला आहे त्यावरून असें दिसतें की, (१) बोवांच्या कथेला पुण्यास शिवाजी एकदां गेला होता व त्यावेळीं चाकणच्या दोन हजार पठाणांनीं शिवाजीला धरण्याचा प्रयत्न केला, व (२) रामदासस्वामींचे स्वप्नांत दर्शन झाल्यावर तुकोबाला शिवाजीनें पत्र पाठविलें व त्या पत्रांत तुकोबाने रामदासाला गुरू करा असा शिवाजीस उपदेश केला. रामदासानें शिवाजीस उपदेश शके १५७१ च्या वैशाख शु॥ १० स केला हें मागे सांगितलेंच आहे. तेव्हां तुकारामाला पत्र शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं कधीं तरी पाठविलें असलें पाहिजे. तुकाराम शके १५७१ च्या माघ व॥ ६ स वारले, त्या अर्थी तुकारामाला शिवाजीनें शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं कधीं तरी पत्र पाठविलें असेल हें संभवतें व बखरकार कांहीं संभवनीय च विश्वसनीय हकीकत सांगत आहे असा मनाचा ग्रह होतो. बखरकारानें तुकारामाचें उत्तरहि आपल्या बखरींत दिलें आहे. त्या उत्तरांतील मजकूर ऐतिहासिक संभवनीयतेच्या कसोटीला कितपत जुळतो तो पाहूं. बखरींत जें सबंध पत्र छापिलें आहे तें तुकारामाच्या गाथेंतून घेतलें आहे. त्या पत्रांत इतक्या गोष्टींचा उल्लेख केला आहेः-(१) शिवाजीला भूपति हें विशेषण दिलें आहे; (२) शिवाजीला छत्रपति म्हणून म्हटले आहे; (३) प्रतिनिधि, मुजुमदार, पेशवे, सुरनीस, चिटणीस, ढबीर, राजाज्ञा, सुमंत, सेनापती, पंडितराय, वैद्यराज, इतक्या अधिका-यांचीं सामान्यनामें उच्चारिलीं आहेत; व (४) भूषणकवीचा उल्लेख केला आहे. ह्या पत्रांत शिवाजीला भूपति हें विशेषण दिलें आहे तें रास्तच आहे. शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं शिवाजी छत्रपती ह्या नांवानें प्रसिद्ध होता किंवा कसें हे मात्र शोध करण्यासारखें आहे. शके १५७१ त रामदासानें शिवाजीस वांई मुक्कामी पाठविलेल्या पत्रांतहि छत्रपति हा शब्द आलेला आहे, (माडगावकरांनी छापिलेले स्वामीचे समग्र ग्रंथ, पृष्ठ ७७०); तेव्हां हीं जर पत्रें खरीं असतील, तर शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं शिवाजीला छत्रपति ही संज्ञा निदान साधुमंडळांत तरी लावू लागले होते एवढें म्हणणें भाग पडतें. छत्रपति ही संज्ञा त्या वेळीं शिवाजीला लावली जात होती ही गोष्ट एकदा मनांवर ठसवून घेतली म्हणजे प्रतिनिधि, राजाज्ञा वगैरे अधिकारी अथवा अष्टप्रधान शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं शिवाजीनें नेमिले होते, ह्या विधानाचा अंगीकार करावा लागतो. व शेवटीं शके १५७१ अगोदर भूषणकवि शिवाजीच्या पदरीं राहिला होता हीहि गोष्ट संभवनीय व विश्वसनीय मानावी लागते. ह्या तिन्ही गोष्टी विश्वसनीय मानल्या म्हणजे शके १५७१ त शिवाजीची शक्ति किती वाढली होती ह्याचा अंदाज होतो व विजापूरकरांसारख्या गचाळ व गैदी दरबारांतहि शिवाजीच्या परिपत्याची विवंचना त्या वेळीं सुरू झाली ती रास्त होती असें कबूल करावें लागतें. पुण्यास झालेल्या तुकारामाच्या कथेच्या वेळीं चाकणहून दोन हजार पठाणांच्या स्वारीचा काल अदमासानें बसवतां येण्यासारखा आहे. फिरंगोजी नरसाळ्यानें चाकणचें ठाणें शिवाजीच्या स्वाधीन करण्याच्या पूर्वी ही गोष्ट झाली असावी. रामदासाच्या व तुकारामाच्या पत्रांतून वर लिहिल्याप्रमाणें ऐतिहासिक माहिती सापडतें ही पत्रे देतांना बखरकारांनीं जी स्वतःची मखलाशी केली आहे ती मात्र वारंवार बहुत चुकीची असते. उदाहरणार्थ, चाफळास स्वामींचे दर्शन प्रथम झालें नाहीं तेव्हां शिवाजी प्रतापगडास निघून गेला म्हणून बखरकार निर्धास्तपणे सांगतात.

सातारा गझेटीयरांत शके १५७२ हें जें साल दिलें आहे तें बिलकुल चुकलें आहे. कां कीं हिजरी सन १०५९ शके १५७० च्या माघ शु॥ ३ पासून शके १५७१ च्या पौष शु॥ १ पर्यंतच होता. रणदुल्लाखानाच्या मृत्यूच्या मित्तीसंबंधानें डफनें हा असा घोटाळा करून ठेविला आहे. ग्रांट डफची इतर माहितीहि मोठ्याशा चवकशींने लिहिलेली असते असें नाहीं. उदाहरणार्थ, पुण्यास तुकोब्बाच्या कथेला शिवाजी शके १५८५ त हजर होता म्हणून डफ आपल्या इतिहासाच्या सहाव्या भागांत लिहितो, परंतु तुकाराम शके १५७१ त वारला हें प्रसिद्ध आहे. (शंकर पांडुरंगांनीं छापिलेली गाथा, प्रस्तावना, पृष्ठ ७५). मालवण उर्फ सिंधुदुर्ग शके १५८४ त बांधला म्हणून डफ म्हणतो. परंतु काव्येतिहाससंग्रहांतील ४२१ व्या महजरांत सिंधुदुर्ग सन खमस सितैनांत १४ जमादिलावलीं म्हणजे मार्गशीर्ष बहुल द्वितीयेस बांधावयास प्रारंभ केला म्हणून म्हटलें आहे. रामदासस्वामींना शिवाजीनें शके १५८३ त गुरू केलें म्हणून डफचें म्हणणे आहे (डफचा इतिहास भाग पांचवा). परंतु शके १५७१ तच शिवाजीची व समर्थांची गांठ पडली होती हें प्रसिद्ध आहे; शहाजी महाराज शके १५८६ च्या पौषांत वारले म्हणून डफनें लिहून ठेविले आहे, परंतु काव्येतिहाससंग्रहांतील ४१० व्या यादींत व मल्हाररामरावकृत सप्तप्रकरणात्मक चरित्रांत (पृ ८०) शहाजी शके १५८३ प्लवनाम संवत्सरे माघ शुद्ध ५ स म्हणजे १६६२ च्या १५ जानेवारीस वारला असें लिहिलें आहे. सारांश, डफनें जो शके १५६८ पासून शके १५८१ पर्यंतचा शिवाजीचा इतिहास लिहिला आहे, तो मोठ्या चवकसपणानें किंवा सूक्ष्म दृष्टीनें लिहिला आहे असें नाहीं. इतर बखरींहून कोठें कोठें विश्वसनीय माहिती त्यानें दिली आहे. परंतु इतर बखरींप्रमाणे कित्येक ठिकाणी तो चुकला आहे व कित्येक ठिकाणीं त्यानें माहिती इतर बखरींत असूनहि आपल्या बखरींत उतरून घेतली नाहीं. येणेंप्रमाणें सुमारें शके १५८१ पर्यंतची बखरींची व ग्रांट डफची व्यवस्था आहे. त्या दोहोंत बहुत दोष आहेत हें कोणीहि कबूल करील. दोष काढून टाकून नवीन साधार व सविस्तर रचना कशी करतां येईल हाच पुढील दहावीस वर्षांतील प्रश्न आहे.

येथपर्यंत बखरींतील मजकुराच्या अनुक्रमासंबंधीं शंका काय काय येतात त्यांचें स्वरूप शके १५८१ पर्यंतच्या मजकुराच्या अनुक्रमाचें परीक्षण करून, दाखवून दिलें आहे. शंकांचें स्वरूप दाखवितांना कोठें कोठें अज्ञात इतिहासाची प्रसंगानें रचना करावी लागली, परंतु इतिहासाची रचना करण्याचा प्रस्तुत स्थळीं मुख्य हेतु नसून बखरींचा अनुक्रम विश्वसनीय नाहीं हें सिद्ध करण्याकडे विशेष लक्ष दिलें आहे. शंकांचीं सिद्धि व इतिहासाची रचना करतांना, बखरींतील शक व मित्या कोणत्या प्रमाणांनी पारखून घ्याव्यां हेंहि प्रसंगोपात्त सांगितलें आहे. तसेंच बखरींतींल अनुक्रम तपासतांना (१) ग्रांट डफच्या इतिहासांतील कित्येक सन बरोबर नाहींत, (२) त्याच्या इतिहासांतील मजकूर त्रोटक व तुटक आहे, (३) बखरींत दिलेल्या पुष्कळ मजकुराचा समावेश आपल्या इतिहासांत त्याला करून घेतां आला नाहीं, व (४) अस्सल पत्रांचा जितका बारीक तारतम्यानें उपयोग करून घ्यावा तितका करून घेण्याचें प्रयोजन त्याला दिसलें नाहीं, वगैरे गोष्टीचाहि उल्लेख झाला आहे. शिवाय अस्सल पत्रें, महजर व इतर पहिल्या प्रतीचे लेख मिळाल्यावांचून शिवाजी महाराजांच्या अद्भुत इतिहासाची रचना करतां यावयाची नाहीं, ह्या महावाक्याचाहि वारंवार उच्चार झाला आहे. हे सर्व विचार कालानुक्रमाच्या अनुषंगानें करावे लागले. खुद्द मजकुराच्या तपशिलासंबंधीं वरील दोन्ही शंकास्थानांत विशेष कांहीच लिहिलें नाहीं. तेव्हां ह्या तपशिलाचा विचार पुढील शंकास्थानांत करणें योग्य आहे.

शके १५७० त बाळाजी आवजीस चिटणीशी मिळाल्यानंतर शृंगारपूरच्या दळव्याचें पारिपत्य शिवाजींनें केलें व नंतर म्हणजे शके १५७१ त शहाजीला घोरपड्यानें धरलें असा मल्हार रामरावाचा अनुक्रम आहे. शके १५७१ त शहाजीला धरिलें म्हणून डफहि म्हणतो. आतां विजापुरच्या पातशहाच्या बखरींतींल हिजरी सन १०५७ जर खरा असेल तर मल्हार रामराव व ग्रांट डफ हे दोघेहि चुकीचे ठरतात. शृंगारपूरच्या दळव्यांचें पारिपत्य शिवाजीनें शके १५८३ त केलें म्हणून ग्रांट डफ लिहितो. शहाजीला धरल्यानंतर व औरंगजेब तक्तावर बसल्यानंतर निलकंठ हैबतरावाच्या मुलांच्या साहाय्याने शिवाजीनें पुरंधर किल्ला घेतला असा मल्हाररावाचा अनुक्रम आहें. तसेंच शके १५७८ त औरंगझेब तक्तावर बसल्याचा वृत्तांत दिल्यानंतर शके १५७७ त चंद्रराव मो-याला शिवाजीनें दस्त केलें व १५७१ त तुकारामाची व रामदासाची आणि शिवाजीची गांठ पडली, असा मल्हाररामरावाचा अनुक्रम आहे. तात्पर्य, मल्हाररामरावानें कालानुक्रमानें आपला मजकूर लिहिला नाहीं, असें पूर्णपणे सिद्ध होतें. अफजलखानीं प्रकरणाला प्रारंभ होईतोपर्यंत सभासदानें तर कालानुक्रमाचा केवळ चुथडा केला आहे. सुपें घेतल्यावर जुन्नर व अहमदनगर शिवाजीने मारिलें म्हणून तो बिनदिक्कत म्हणतो. नगर मारिल्यानंतर पुरंधर घेतला व नंतर कल्याण, भिवंडी मारिली असा सभासदी अनुक्रम आहे. सारांश, अफजलखानाच्या प्रकरणापर्यंत सभासद अगदीं टाकाऊ आहे. शिवदिग्विजय तर अफजलखानीं प्रकरणापर्यंत लक्ष देण्यासारखाहि नाहीं. सारांश, ह्या तिन्ही बखरी बहुतेक, कदाचित् येथून तेथून, कालानुक्रमाच्या संबंधानें अफजलखानी प्रकरणापर्यंत फारशा विश्वासपात्र नाहींत. मल्हार रामरावानें दोन चार ठिकाणीं जेथें जेथें शक दिले आहेत तेथें तेथें तेवढा मजकूर कदाचित् खरा धरल्यास चालेल. बखरींतील शकयुक्त मजकूर खरा धरून ह्या शंकास्थानांतील प्रारंभीची रचना मी केली आहे, व ती रचना खरी मानली म्हणजे ग्रांट डफ बहुतेक स्थलीं चुकला आहे असें दिसतें. तोरणा किल्ला घेतल्याचा जो ग्रांट डफनें सन दिला आहे, त्यासंबंधीं तर मला शंका आहेच; परंतु शके १५६८ पासून शके १५८१ पर्यंतचाहि इतिहास त्याने मुद्देसूद व कालानुक्रमानें दिला आहे असें म्हणवत नाहीं. शके १५६९ सालचा, शके १५७२ पासून शके १५७५ सालचा व शके १५७६ सालचा मजकूर ग्रांट डफनें बहुतेक कांहीच दिला नाहीं. शके १५७१ त शहाजीला धरलें. ह्याला आधार शहाजहानाचें शिवाजीला पाठविलेलें पत्र टिपेंत उल्लेखिलें आहे. ह्या पत्राची तारीख व महिना डफनें दिला नाहीं. त्यावरून शहाजीला शके १५७१ च्या प्रारंभी धरिले किंवा शेवटीं धरिलें तें स्पष्ट होत नाहीं. शके १५७१ त शिवाजीचें पत्र दिल्लीस जावयाचें व त्याचें उत्तर यावयाचें व एकंदर दोन चार पत्रें जाऊन राजकारण संपवायचें म्हटले म्हणजे शहाजीला शके १५७१ च्या अगोदर धरलें असलें पाहिजे. म्हणजे बहुशः विजापूरच्या पातशहांच्या बखरींत लिहिल्याप्रमाणें शहाजीला शके १५६९ च्या वैशाखांतच धरिलें असलें पाहिजे. जेथें अस्सल पत्राचा आधार डफ देतो तेथें तेथें साल व मजकूर कायम झालें हें खरें आहे. आतां शके १५६८ पासून शके १५७५ पर्यंत अस्सल पत्राचा आधार डफनें तीनदां दिला आहे. हे तिन्ही आधार शहाजीच्या सुटेकेसंबंधीचे आहेत. शके १५७१ त शहाजी अटकेंत होता हें ह्या पत्रावरून ठरतें. परंतु शहाजी शके १५७५ तच सुटला असें मात्र बाजी घोरपड्याच्या शहाजीच्या करारावरून खास म्हणतां येत नाहीं. करार जर शके १५७५ त झाला असेल तर शहाजी शके १५७४ त सुटला असावा अशी शंका आणितां येईल. शके १५६८ पासून शके १५७५ पर्यंतच्या मजकुराला डफनें टीपा दिल्या आहेत त्या सदां बरोबरच असतात असेंहि नाहीं. एका टिपेंत रणदुल्लाखान शके १५६५ त वारला म्हणून डफ लिहितो परंतु खानमजकूर बहुशः हिजरी सन १०५९ त मेला असावा (सातारा गझेटीयर पृ. ५४९). हिजरी सन दहाशें एकुणसाठ शके १५७० च्या माघ शु॥ ३ स सुरू झाला. तेव्हां शके १५७० च्या माघ शु।। ३ नंतर रणदुल्लाखान वारला हें उघड आहे. रणदुल्लाखानाच्या पाठीमागून अफजलखान वांई प्रांताचा सुभा झाला. अफजुलखानाचा एक हुकूमनामा सु॥ खमसैन १८ जमादिलाखरचा म्हणजे शके १५७१ च्या अधिक आषाढ व॥ ५ चा मजजवळ आहे. त्यावरून रणदुल्लाखान शके १५७० चा माघ व शके १५७१ चा अधिक आषाढ यांच्या दरम्यान कधीं तरी वारला हें स्पष्ट आहे.

(१) मजकुरांत नमूद केलेल्या गोष्टी कधींना कधीं तरी घडल्या हें खरें आहे. (२) परंतु ज्या अनुक्रमानें त्या नमूद केलेल्या आहेत त्याच अनुक्रमानें घडल्या किंवा कसें ह्यासंबंधी संशय आहे. (३) तसेंच मजकुरांत नमूद केलेल्या गोष्टींतील बारीक तपशील जसा दिला आहे तसाच असेल असेंहि खात्रीनें सांगवत नाहीं. पहिल्या कलमाचें समर्थन करण्यास विशेष पुरावा पाहिजे असें नाहीं. मजकुरांत नमूद केलेल्या गोष्टी शिवाजीच्या चरित्रांत घडल्या, हें मराठ्यांच्या सतराव्या शतकांतील इतिहास जाणणा-यांस माहीत आहे. दुस-या कलमाचें समर्थन करण्यास खालीला पुरावा देतां येतो. बाजी मोहित्याच्या हातचा सुपें महाल घेतल्यावर कांगोरी वगैरे किल्ले घेतले, मावळें सारीं घेतलीं व देशमुख ममतेंत घेतलें. नंतर थोड्याच दिवसांनी शके १५६८ त कोंकणांत उतरून रायगड किल्ला घेतला व कल्याणावर आबाजी सोनदेवाकडून स्वारी करविली. पुढें लवकरच पांडवगड, चंदनवंदन, नांदगिरी, सातारा, परळी, पन्हाळा वगैरे बावड्यापर्यंतचे सर्व किल्ले घेऊन शके १५७० त राजापूर लुटलें व बाळाजी आवजीस चिटणीशी सांगितली. बाळाजी आवजीस चिटणीशी शके १५७० त मिळाली हें बरेंच विश्वसनीय आहे. शके १५६८ त रायगड घेतला हेंहि तितकेंच विश्वसनीय आहे. रायगड घेतल्यावर कल्याणावर स्वारी करून मुलाणा अहमद ह्याचा खजिना लुटून त्याला विजापुरास पाठविलें. मुलाणा अहमद विजापुरास गेल्यावर नंतर शके १५६९ च्या वैशाखांत शहाजी धरला गेला असेल, हे खरें मानलें-खोटें तरी कां मानावें तें समजत नाहीं- तर मुलाणा अहमदाला लुटणें, रायगड घेणें, भवानी तरवार मिळविणें, कांगोरी वगैरे किल्ले घेणें हे पराक्रम शके १५६८।६९ त घडले असले पाहिजेत. हे जर पराक्रम शके १५६८।६९ त घडले असले असे गृहित धरलें, तर त्यांच्या पाठीमागें, सुपें पुरंदर, तोरणा, राजगड वगैरे स्थलें शिवाजीनें शके १५६८ च्या अगोदर घेतलीं असली पाहिजेत. ह्याच कारणाकरितां तोरणा शके १५६८ त घेतला असें जें ग्रांट डफ म्हणतो, त्यावर माझा विश्वास नाहीं. मुलाणा अहमदाला शके १५७० त शिवाजीनें लुटलें असें जें ग्रांट डफ म्हणतो तेंहि मला साधार वाटत नाहीं. कां कीं, शके १५६९ च्या वैशाखांत शहाजी धरला जाण्यास शके १५६९ च्या आधीं मुलाणा अहमद विजापुराला पोहोंचला पाहिजे. तसेंच रामदास स्वामीच्या चरित्रांत लिहिलेलें आहे कीं, स्वामींनीं चाफळास श्रीरघुपतीचें देऊळ शके १५७० त बांधलें व शिवाजीराजे शके १५७१ च्या वैशाख शुद्ध ४ स मंदवारी चाफळास स्वामीस भेटण्यास आले. राजांची व स्वामींची भेट वैशाख शुद्ध ९ स गुरुवारी झाली. शके १५७१ च्या वैशाख शुद्ध ४ स मंदवार व ९ स गुरुवार होता, त्याअर्थी वरील मित्या ख-या आहेत हें स्पष्ट आहे. सध्यां रामदासस्वामींची जी बखर महाराष्ट्रांत छापील अशी प्रसिद्ध आहे, ती हनुमंतस्वामींनीं शके १७१५ त समर्थाचे पुतणे रामचंद्र बाबा यांचे चिरंजीव गंगाधरस्वामी यांनी शके १६४० त सांगितलेल्या चरित्राच्या आधारें, लिहिलेली आहे. गंगाधरस्वामींनीं शके १६४० त सांगितलेल्या चरित्राची मूळ प्रत पहावयास सांपडेल तर इतिहासाचें फारच हित होईल. तिच्या आधारें १७१५ त लिहिलेली बखर जर खरी असेल तर तिच्यांतील मित्यांवर विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं. वर नमूद केलेल्या दोन्ही मित्या तीथ व वार यांसहित दिल्या असल्यामुळें व त्या जंत्रीवरून मोजून पाहतां ख-या असल्यामुळें स्वामींची व शिवाजीची भेट शुक्ल ९ स गुरुवारीं झाली हें विश्वसनीय दिसतें.ह्या भेटीस समर्थांनीं जो शिवाजीस इतिहासप्रसिद्ध उपदेश केला त्यांत ‘तुमचें देशीं वास्तव्य केलें।। परंतु वर्तमान नाहीं घेतलें’ ही वाक्यें आहेत. ह्यावरून सातारा, परळी व चाफळ हीं स्थळें शके १५७१ च्या व शके १५७० च्या आधीं शिवाजीच्या हातांत पडली असावीं असा अंदाज होतो. हा अंदाज जर खरा असेल तर शके १५७० त राजापुरावर कोंकणांत उतरून बाळाजी आवजीला चाकरीस ठेवणें, शके १५६९ त पांडवगड, सातारा, वगैरे किल्ले घेणें, शके १५६८ त कल्याणावर स्वारी करणें, हरिहरेश्वरास जाणें वगैरे कृत्यें त्या त्या शकांत झालीं असावी, व ग्रांट डफचा शके १५६८ पासून शके १५७२ पर्यंतचा मजकूर बराच चुकला असावा व त्याच्याप्रमाणें मल्हार रामरावाचाहि अनुक्रम चुकला असावा असें वाटतें.

त्याप्रमाणें तिकडे कर्नाटकांत शहाजीनेंहि नबाब मुस्तफाखाशीं भांडण सुरूं केलें होतें, अर्थात् शहाजीला कैद करणें विजापूरच्या मुत्सद्यांना भाग पडलें. शहाजीला शके १५७१ त कैद केलें, असे ग्रांट डफ म्हणतो त्याला त्यानें काहींच विशिष्ट आधार दिला नाहीं. तोरणा किल्ला घेतल्यावर सुप्याच्या संभाजी मोहित्यास शिवाजीनें फाल्गुनांत दस्त केलें, असें ज्याअर्थी सभासद म्हणतो त्याअर्थी शके १५६८ च्या फाल्गुनांत शिवाजीनें मोहित्याला दस्त केलें असावें व शके १५६८ च्या फाल्गुनाच्या आधीं तोरणा किल्ला शिवाजीनें घेतला असावा असें म्हणावें लागतें. निळकंठराव नाईकवाड्यांच्या पुत्राच्या सहाय्यानें दिवाळींत शिवाजीनें पुरंदर किल्ला घेतला असें ज्याअर्थी शिवदिग्विजयकार म्हणतो (पृष्ठ १२१) त्याअर्थी शके १५६८ च्या कार्तिकांत हें कृत्य झालें असावें असा अंदाज होतो. फिरंगोजी नरसाळ्याकडून चाकणहि शके १५६८ तच घेतलें असावें असें वाटतें. येथपर्यंत सालांचा धरमधोक्यानें कांहीं थोडाबहुत पत्ता लाविल्यासारखा भास होतो. ह्यापुढें शिवदिग्विजयांत, मल्हार खंडेराव चिटणीस यांच्या सप्तप्रकरणात्मक चरित्रांत व सभासदी बखरींत अफझलखानाच्या वधापर्यंत जो मजकूर दिला आहे त्याचा एकाचा मेळ दुस-याला बसत नाहीं. तसेंच ग्रांट डफनें कोणत्या आधारावर शके १५६९ पासून शके १५८१ पर्यंतच्या ऐतिहासिक मजकुराची व्यवस्थित मांडणी केली, तेंहि कळण्यास पूर्ण मार्ग नाहीं. सप्तप्रकरणात्मक चरित्रांत शके १५६८ पासून शके १५८१ पर्यंतच्या प्रसंगांचा सूक्ष्म अनुक्रम येणेंप्रमाणें आहे. बाजी मोहित्याकडून सुपें घेतल्यावर, (१) कांगोरी, तुंग, तिकोना, लोहगड, राजमाची, कुबारी, भोरप, धनगड, केळणा हे किल्ले घेतले; (२) बांदल देशमुखांचा रोहिडा किल्ला घेतला; (३) विजापुराहून आलेल्या पांचशें पठाणांस चाकरीस ठेविले; (४) सोडवळकर व कोडवेळकर यांच्या बोलावण्यावरून कोकणांतील तळाघोसाळा घेतला व बिरवाडीजवळ खाचीमेट किल्ला बांधिला; (५) गोवेळकर सावंतापासून भवानी तरवार मिळविली; (६) हरिहरेश्वरास जाण्यांत जंजि-याचें व राजापूरचें राजकारण पक्कें न दिसल्यामुळें माघारे फिरले; (७) बाळाजी आवजी कर्ज फिटल्यावांचून महाराजांचे पदरीं राहीना; (८) वर घाटी येतां दळवी मोडिले; (९) शके १५६८ त रायगड घेतला व लिंगाणा बांधिला; (१०) आबाजी सोनदेवानें कल्याण प्रांत घेतला; (११) मुलाणा हयातीची सून सोडून दिली; (१२) आबाजी सोनदेवाच्या हस्तें जंर्जिरे येथील राजकारण सांगितलेप्रमाणें न झालें म्हणून मोरो त्रिमळ पिंगळे यांस पेशवाई काढून दिली; (१३) बाळकृष्णपंतास मजमू, अनाजी दत्तोस सुरनिशी, गंगो मंगाजीस वाकनिशी, नेताजी पालकरास सरनोबती, राधो बल्लाळास सबनिशी, एसाजी कंकास पायेलोकांची सरनोबती वगैरे अधिकार दिले; (१४) चंदनवंदन, केळणा, पांडवगड, नांदगिरी, हे किल्ले घेऊन साता-यास आले; (१५) परळी, पन्हाळा, शिराळें, पावनगड, विशाळगड, बावडा, रांगणा घेतले; (१६) राजापूर लुटलें; (१७) जंजि-यांत ठाणें वसविलें; (१८) शके १५७० त बाळाजी आवजीस चिटणिसी सांगितली; (१९) शृंगारपूरच्या सुर्व्यास त्रस्त केलें; (२०) प्रभाकरभटाचे पुत्रांस उपाध्येपण सांगितलें; (२१) चेऊल लुटलें; (२२) बाजी शामराज शिवाजीस महाडास धरावयास आला; (२३) बाजी घोरपड्यानें शहाजीस धरिलें; (२४) दिल्लीस येण्याविषयीं पत्रें आलीं; (२५) औरंगझेब दिल्लीस जाऊन तक्तावर बसतो; (२६) माहूरच्या देशमुखिणीस रायबागीण किताब मिळाला; (२७) शहाजी महाराजास भिंतींत चिणून कोंडिले; (२८) रणदुल्लाखान, मुरारपंत व सर्ज्याखान यांच्या रदबदलीनें शहाजी सुटला; (२९) सुलतान शिकंदर वारला; (३०) मुरारपंताला मारिलें; (३१) शिवाजीनें क्लिल्ला कोसाणा तानाजी मालुसरे यांजकडून घेवविला; (३२) त्याचें प्रसिद्धगड नांव ठेविलें, (३३) नगर शहर मारिलें; (३४) निळी निळकंठापासून पुरंदर घेतला; (३५) जेजुरींत वाडा बांधिला; (३६) सुंदर स्त्रीस सास-याकडे पाठविलें; (३७) मोरो त्रिमळास नाशिक प्रांतीं पाठविलें; (३८) शके १५७७ त मो-यांस मारिलें; (३९) प्रतापगड बांधिला; (४०) बेदरावर स्वारी केली; (४१) जुन्नर मारिलें व चाकण घेतलें; (४२) शके १५७९ ज्येष्ठ शुद्ध १२ स संभाजी जन्मला; (४३) तुकारामाची भेट झाली; (४४) शके १५७१ त रामदास स्वामींची भेट झाली; (४५) अफजलखाप्रकरण. येणेंप्रमाणें सप्तप्रकरणात्मक चरित्रांतील मजकुराचा अनुक्रम आहे.

शंकास्थान दुसरें.
ज्या वेळीं शिवाजीनें तोरणा किल्ला घेतला, त्या वेळीं शहाजी कोठे होता व काय काय करीत होता किंवा करण्याच्या बेतांत होता हे शोध करण्यासारखें आहे. ह्या वेळी शहाजी विजापूरास होता असें मल्हार रामराव चिटणीस (पृष्ठ ३०) व शिवदिग्विजयाचा कर्ता (पृ ११६) म्हणतात. ह्याला प्रत्यंतर पुरावा “विजापूरच्या पातशहांची बखर” ह्या ग्रंथांत आहे. ह्या ग्रंथाचे कांहीं भाग भारतवर्ष मासिक पुस्तकांत छापले आहेत. त्यांत ह्या ग्रंथाचें भाषांतरकर्तृत्व भारतवर्षकार सातारा येथील प्रभू पारसनवीस यांस देतात. काव्येतिहाससंग्रहकारांच्या दप्तरांतील ह्याच ग्रंथाची एक प्रत मजजवळ आहे. तिच्या शेवटीं हा ग्रंथ शके १७४४ च्या श्रावण व॥ ४ स पांडुरंग वासुदेव मामलतदार, पेठ विजापूर, ह्यांनीं मूळ फारशीवरून भाषांतरित केला असे स्पष्ट लिहिलेलें आहे; त्याअर्थी भारतवर्षकारांचें लिहिणें साधार नसावें अशी शंका येते. ह्या फारशी बखरींत “हिजरी सन १०५७ साली मुस्तफाखा याणें सारे अमीर बराबर घेऊन फौजसुद्धां कर्नाटकाची स्वारी केली; तीन तुकड्या करून सा-याचें पुढें शहाजी राजे व असदखा होते,” असे म्हटलें आहे. काव्येतिहाससंग्रहांतील ४३८ व्या यादींत म्हणजे शहाजीच्या बखरींत “हिजरी सन १०५७ त मुस्तफाखान यास फौज देऊन कर्नाटकास रवाना केलें. पेशजी शहाजी महाराज व असदखान यांस रवाना केलें,” असें लिहिलें आहे. हिजरी सन १०५७ शके १५६८ च्या माघांत सुरू होतो, त्याअर्थी शहाजीस शके १५६८ च्या पावसाळ्यानंतर कर्नाटकांत पाठविलें असावें असें “पेशजी” ह्या शब्दावरून ठरतें. अर्थात् शके १५६८ च्या सप्टेंबरच्या अगोदर शहाजी विजापुरास असावा असें कबूल करणें भाग पडतें. शहाजी विजापुरास असतांना तोरणा किल्ला घेतल्याची कागाळी त्याजकडे आली, त्याअर्थी तोरणा किल्ला शके १५६७ च्या शेवटीं किंवा शके १५६८ च्या आरंभी शिवाजीनें घेतला असावा, हें जें ग्रांट डफ म्हणतो त्याला किंचित् बळकटी येते. पहिल्या शंकास्थानांत उल्लेखिलेल्या दादोजी कोंडदेवाचा महजर शके १५६८ च्या वैशाखांत लिहिला गेला त्याअर्थी तोरणा किल्ला घेण्याच्या वेळीं व शिवाजीची कागाळी शहाजीच्या कानी जाण्याच्या वेळीं दादोजी कोंडदेव जिवंत होता व तो शके १५६८ तच मेला असल्यास त्या वर्षाच्या शेवटीं मेला असावा असा तर्क करावा लागतो. शिवदिग्विजयांत (पृष्ठ ११९) दादोजी शके १५६२ विक्रमनामसंवत्सरीं वारला म्हणून म्हटलें आहे. परंतु शके १५६२ त विक्रम संवत्सर नव्हता व शके १५६८ त दादोजीनें एक महजर लिहिला त्याअर्थी ही मित्ती खोटी आहे. खरी मित्ती शके १५७२ विकृति नाम संवत्सर म्हणजे इ. स. १६५० असल्यास नकळे. शहाजी कर्नाटकाच्या स्वारीस गेल्यावर त्याचें व नबाब मुस्ताफाखा याचें वांकडें पडून युद्ध झालें. त्यांत शहाजीचा मोड होऊन बाजी घोरपडे यानें हिजरी १०५७ च्या १५ रजबी (विजापूरच्या पातशहांची बखर, प्रकरण सहावें) म्हणजे शके १५६९ च्या श्रावण व॥ २ स शहाजी महाराजाला धरून मुस्तफाखाच्या स्वाधीन केलें. शहाजीचा मित्र शिद्दी रेहान याचें व मुस्ताफाखा याचें वाकडें असल्यामुळें शहाजीचें व मुस्तफाखाचेंहि वांकडेंच होतें. शिवाजीनें तोरणा किल्ला घेतल्यावर लवकरच शहाजी कर्नाटकच्या स्वारीस निघून गेला. परंतु शिवाजीच्या बंडाला शहाजीची फूस, कदाचित् मदत, असावी, अशी जी शंका शहाजी विजापुरास असतांना आली ती शके १५६९ त तरी अगदीं सत्यप्राय भासूं लागली. कारण इकडे शिवाजीनें ज्याप्रमाणें राजरोस बंडाचा झेंडा उभारला होता.

ह्या पूर्वेतिहासाची रचना करण्यास (१) पुण्याखालील व जुन्नराखालील मावळांची कच्ची माहिती, (२) तेथें त्या वेळीं असणा-या देशमुखांचीं नांवें, (३) निरनिराळ्या देशमुखांचे परस्पर संबंध व शिवाजीशी व पातशहाशीं दळवणवळण, (४) शिवाजीनें नेमलेल्या अधिका-यांना मिळालेल्या सनदांचीं सालें, वगैरे बहिःप्रमाणें जर मला मिळालीं नसतीं तर 'येतांच बारा मावळें काबीज केलीं' ह्या सभासदी वाक्याची विस्तारानें फोड करतां खचित आली नसती. शेवटली तीन बहिःप्रमाणें त्या वेळच्या महजरांखेरीज इतरत्र मिळणें दुरापास्त आहे. अधिका-यांना मिळालेल्या सनदांच्या सालांखेरीज, एक दोन मित्या वगळल्या असतां, बखरींतील बाकीच्या बहुतेक मित्या फारशी विश्वसनीय नाहींत. ह्या वगळलेल्या मित्यांत शिवाजीच्या पहिल्या लग्राची मित्ती समाहृत करण्यासारखी आहे असें मला वाटतें. कां की त्या मित्तीस शक दिला असून शिवाय महिना व तीथ ही दिली आहे. बखरकार, महिना, दिवस, तीथ वगैरे बारीक माहिती जेव्हां देतात तेव्हां तीं ते प्रायः जुन्या टिपणांतून देतात, व हीं जुनीं टिपणें बरींच विश्वसनीय असतात. बारीक तीथ, वार वग़ैरे माहिती देतांना बखरकार कधीं चुकत नाहींत, असें मात्र समजण्यांत अर्थ नाहीं. शिवाजीच्या जन्मतिथीसंबंधीं बखरकारांनीं काय काय गफलती करून ठेविल्या आहेत त्यांची फोड मागें मीं केली आहे त्यावरून वरील विधानाची सत्यता दिसून येईल. सारांश शके १५६० पासून तोरणा किल्ला घेईतोंपर्यंतचा इतिहास रचतांना केवळ बखरकारांच्या लिहिण्यावर भिस्त ठेवून काम भागण्यासारखें नाहीं. बहिःप्रमाणांचा पाठिंबा ह्या वेळच्या इतिहासरचनेस अतिशय हवा. ह्या शंकास्थानांत शके १५६० पासून तोरणा घेईतोंपर्यंतच्या इतिहासाचें ठोकळ स्वरूप कसें असेल ह्याचा ओबडधोबड नकाशा मी काढिला आहे. ह्या इतिहासांतील प्रत्येक प्रसंगाची मित्ती देतां आली नाहीं हें तर स्पष्टच आहे. परंतु प्रसंगांची जी विस्तृत म्हणून माहिती दिली आहे, ती निःसंशय अत्यंत कोती आहे. तोरणा किल्ला घेईतोंपर्यंत विजापूरच्या दरबाराकडून, मावळांतील देशमुखांकडून, व शिवाजीच्या जवळच्या माणसांकडून शिवाजीला काय काय त्रास पोहोंचला असेल ह्याची कल्पना वाचकांस करतां येण्यासारखी आहे. ह्या त्रासाचा यत्किंचितहि उल्लेख करतां येण्यास बखरींतून आधार मिळाला नाहीं. व बाकी ह्या त्रासाचें खरें स्वरूप कळल्यावांचून त्या त्या वेळच्या इतिहासाची व शिवाजीवर आलेल्या प्रसंगांचीं व्यवस्थित कल्पना होणार नाहीं. येणेंप्रमाणें शिवाजीच्या चरित्रांचा बखरकारांनी वर्णिलेला पूर्वेतिहास शंकांनीं पदोपदीं घेरला आहे, हें उघड आहे. तोरणा किल्ला घेण्याच्या नंतरचा इतिहासहि असाच शंकाग्रस्त आहे हें पुढील शंकास्थानावरूनच स्पष्ट होईल.

सु॥ अशरीन मया व अलफ, सन ११२९ फसली, अव्वल
साल छ १७ रजब, २६ मे १७१९,
ज्येष्ठ शुध्द २ शके १६४१


बाळाजी विश्वनाथ सासवड मुक्कामी शके १६४२ शार्वरी संवत्सर चैत्र शुध्द ६ शनवारी, छ ५ जमादिलाखर, अशरीन मया व अलफ सालीं वारले (२ एप्रिल १७२०). बाळाजी कारभाराचे श्रमानें सन १७२२ साली मयत झाला असें ग्रांट डफने बखरीत लिहिले आहे, परंतु ती चूक१३ १३+ आहे. 

या१४ सालीं दुस-या हकीकती किरकोळ झाल्या त्या :-

औरंगाबादेहून साता-यास येण्याकरितां निघाले ते छ २८ रजब रोजी मुक्काम जयसिंगपुरा, औरंगाबादेनजीक होता (५ जून १७१९). छ १८ साबान रोजी (२५ जून १७१९) सासवडास दाखल झाले व छ २७ साबानीं (४ जुलै १७१९) साता-यास भेट घेतली. छ १९ जिलकाद (२२ सप्टेंबर १७१९) रामचंद्र महादेव चासकर याणीं प्रांत कल्याणचा मुलूख हस्तगत केल्याचें पत्र आलें. छ २ जिल्हेज (५ अक्टोबर १७१९) नारायणरावजी व जानोजी ढमढेरे यांनी पाबळचें ठाणें घेतलें. छ २३ मोहरम रोजी (५ नोव्हेंबर १७१९) स्वार झाले. छ १९ जमादिलावल (१९ मार्च १७२०) रोजी लग्न झालें. छ २० जमादिलावल रोजी कोल्हापुरावर लढाई झाली. (२० मार्च १७२०). बेहे येथें स्वारी करून, परत येऊन नंतर स्वामिदर्शन घेऊन सासवडास आले. छ २० जमादिलाखर (१७ एप्रिल १७२०). रोजी बाजीराव बल्लाळ यांस पेशवेपदाची वस्त्रे झाली, मसूर मुकामी, शके १६४२ शार्वरी संवत्सर. नारायणदेव चिंचवडकर शांत जाहाले, भाद्रपद शुध्द ७ (३० आगष्ट १७२०) महालाकडून दमाजी थोरात यांस सोडण्याविषयी आग्रह१५ १५+ १५++पडल्यावरून राजाज्ञेने पुरंदरावरून सोडून दिल्हा.

शिवदिग्विजयांत राजगड अगोदर बांधला म्हणून म्हटलें आहे. मल्हार रामराव तोरणा प्रथम घेतला असें लिहितो. शके १५६० त मावळांतील देशमुखांस दस्त करण्याची कल्पना जेव्हां प्रथम निघाली तेव्हां व पुढें एखादा तरी किल्ला हातांत असावा असें त्या वेळच्या मुत्सद्यांना साहजिक वाटलें असावें. देशमुखांना दस्त करीत असतांना मुरवाडच्या डोंगरांतील दुरजादेवीच्या पर्वतावर किल्ला बांधण्याचा उपक्रम चार पांच वर्षे चालला असावा असें दिसतें. कां कीं कोणताहि किल्ला वर्ष सहा महिन्यांत नवीन असा बांधून निघणें दुरापास्त आहे. नवीन किल्ला तयार करण्यास चार पांच वर्षे निदान लागावीं असा अदमास दिसतो. तेव्हां तोरणा किल्ला घेण्याच्या सुमारास राजगडचा किल्ला संपूर्ण होत आला असावा व राजगड संपूर्ण होतांना तोरणा स्वाधीन करून घेण्याची आवश्यकता भासली असावी असें वाटतें. मावळांतील दस्त केलेल्या व दस्त करूं घातलेल्या देशमुखांना दहशत पडण्याकरितां एखादा किल्ला हातांत असणें जरूर होतें. जर प्रथम तोरणा किल्ला शिवाजीच्या हस्तगत झाला असता, तर राजगड नवीन बांधित बसण्याच्या खटपटींत पडून शिवाजीनें मेहनतीचा व पैशाचा व्यर्थ व्यय केला नसतां. प्रांताचें संरक्षण करण्याकरितां एखादा किल्ला असावा अशी जेव्हां प्रथम कल्पना निघाली तेव्हां आसपासच्या किल्लेदारांना वश करण्याचा प्रयत्न झाला असावा. तो प्रयत्न सफल होत नाहीं असें पाहून नवीन किल्ला बांधण्याची खटपट करावी लागली. राजगड बांधलेला पाहून तोरण्याची दुरधिगम्यता नष्ट झाली व तो किल्ला शिवाजीच्या हातांत पडला. येणेंप्रमाणे राजगड बांधण्याचें व तोरणा घेण्याचें काम परस्परावलंबी होतें. व बखरनविसांच्या साध्या भोळ्या लिहिण्याप्रमाणें सोपें नव्हतें हें उघड आहे. राजगड बांधण्यास व तोरणा घेण्यास शिवाजीला एक विशिष्ट कारण होतें ते हे कीं राजगडच्या व तोरण्याच्या दक्षणेस रोहिड खो-यांत बांदल देशमुख रहात असत. त्यांना अद्याप शिवाजीनें दस्त केलें नव्हतें किंवा बांधूनहि घेतलें नव्हतें. बांदलांसारख्यांना दस्त करण्यास एखादा किल्लाच हातांत असणें जरूर होतें व ही जरूरी भागवण्याकरितां राजगड बांधला व तोरणा काबीज केला. येणेंप्रमाणें पुण्याखालील बारा मावळें काबीज करतांना हे दोन किल्ले शिवाजीनें आपल्या ताब्यांत आणिले. किल्ले व महाल असा संगीन प्रदेश शिवाजीला प्राप्त झाला; महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ भक्कम रोविली गेली; व राज्याचीं सर्व अंगें म्हणजे विशिष्ट देश, विशिष्ट प्रजा व विशिष्ट राजा-सिद्ध झालीं. हा प्रकार केव्हां व कोणत्या वर्षी झाला, हें समजण्यास विश्वसनीय आधार नाहीं, हें सांगितलेंच आहे. व तोरणा घेईपर्यंत शिवाजीच्या चरित्राचा सामान्य इतिहास हा असा असावा असें दिसतें. शके १५६८ पर्यंतचें व तदनंतर कांही वर्षांचें शिवाजीचें चरित्र नीट समजत नाहीं असे उद्गार ग्रांट डफनें आपल्या इतिहासाच्या तिस-या भागाच्या शेवटीं काढिले आहेत. त्याचे प्रारण “बारा मावळें पुण्याखालीं व बारा मावळें जुनराखालीं” ह्या पोवाड्यांतील वाक्याची यथास्थित फोड त्याला करतां आलीं नाहीं हें आहे. शके १५६८ पर्यंतचा इतिहास लिहितांना ग्रांट डफने बखरींखेरीज इतर कोणताहि विश्वसनीय आधार घेतला नाहीं. शके १५६० पासून शके १५६८ पर्यंतचा बखरींतील मजकूर बहुत तुटपुंजा, धरसोडीचा व अपुर्ता असा आहे. त्याच्यापासून अविश्वसनीय अशी मित्तीवार माहिती फारशी मिळण्याचा संभव नाहीं. बहिःप्रमाणांचे जर सहाय्य मिळालें तरच बखरींतील मजकुराचें कालानुक्रमाने वर्गीकरण करण्याची सोय होणार आहे, व बखरींतील लहानमोठ्या वाक्यांचा अर्थ विस्तारानें ध्यानांत येणार आहे. ही गोष्ट, शके १५६० पासून तोरणा घेईतोपर्यंतचा शिवाजीचा जो थोडासा पूर्वेतिहास मीं रचिला आहे, त्यावरून ध्यानांत येणार आहे.