Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
समान अशरीन साल १४ सवालीं म्हणजे २५ मे १७२७ स सुरूं झालें व २४ सवाल म्हणजे २३ मे १७२८ स संपलें. अर्थात् ह्या सालांतील पहिलें कलम २९ न देतां ३९ दिलें पाहिजे; व मूळ रोजनिशींत तें तसेंच असेल ह्यांत संशय नाहीं. कारण २९ वें कलम इ. स. १७२७ च्या आक्टोबरांतील आहे व ३९ वें कलम १७२७ च्या जूनांतील आहे. महिन्यांच्या अनुक्रमानें पाहिलें म्हणजे मूळ रोजनिशींत छापील रोजनिशींतील २९ पासून ४० पर्यंतच्या कलमांचा अनुक्रम ३९, ३२, ४०, ३३, २९, ३०, ३१, ३४, ३५, ३६, ३७, ३८, असा असला पाहिजे. छापील रोजनिशींतींल १०७ पृष्ठापासून ११९ पृष्ठापर्यंतच्या सलास खमसैन सालांतील कलमेंहि अशींच उलट लागलेली आहेत. २४७ पासून २५९ पर्यंतचीं कलमें २२८ पासून २४६ पर्यंतच्या कलमांच्या अगोदर पाहिजेत. तेव्हां ज्या रोजनिशींत, तारखांचा अनुक्रम तर राहूं द्याच, परंतु महिन्यांचाहि अनुक्रम असा वाकडातिकडा झाला आहे ती रोजनिशी अस्सल कशी समजावयाची? मूळ रोजनिशी म्हटली म्हणजे तींत हा असला गवत्या गोंधळ कसा असूं शकेल? अर्थात् ज्या रोजनिशींवरून ही छापील रोजनिशी बनली गेली, ती अस्सल नसून जुन्या अस्सलावरून व इतर माहितीवरून बनविलेली संक्षिप्त नक्कल असावी, असा सशंय येतो. हा संशय दुस-या एका बाबींवरून दृढ होतो; ती बाब ही. अमात्यांची माहिती देतांना ७३ व्या पृष्ठाच्या प्रारंभीं हें वाक्य आहेः- “प्रतापसिंह महाराज यांचे खासगी दप्तरांत याद आहे त्यावरून दाखल केलें.” ह्या वाक्यावरून असें निष्पन्न होतें कीं, इ. स. १८४८ त सातारचें राज्य गेल्यावर प्रतापसिंहाचें खासगी दफ्तर इनाम कमिशनाच्या हातीं आलें व त्यावरून ही रोजनिशी- जिच्यावरून छापील रोजनिशी छापिली गेली- बनली गेली. अर्थात्, वर्तमान छापील रोजनिशी शाहूमहाराजांच्या मूळ अस्सल रोजनिशींतील वेचे घेऊन तयार केली असा जर कोणाचा विश्वास असेल, तर त्याला बिलकुल आधार नाहीं हें स्पष्ट होतें व वर घेतलेला संशय निश्चयाच्या पदवीला पोहोंचण्याच्या लायकीचा होतो. खरा प्रकार बहुशः असा असावा की १८४८ नंतर इनाम कमिशनच्या दफ्तरांतून पेशव्यांच्या राशियतीची एक रोजनिशी बनविण्याचा मुंबई सरकारचा हुकूम सुटला असावा व त्या हुकमाबरहुकूम ही पंचवीस हजार लेखी पानांची रोजनिशी तयार झाली असावी. अशी ह्या रोजनिशीसंबंधानें (..) हकीकत असावी, अथवा बहुशः आहे. ही रोजनिशी इनाम कमिशनच्या पुणे येथील दफ्तरांत तीस चाळीस वर्षे अज्ञात पडल्यावर तिच्याकडे काहीं मंडळींची दृष्टि गेली व तिचे पुनरुज्जीवन होण्याची वेळ आली. अशी जरी ह्या रोजनिशीची कथा असावी असें वाटतें, तथापि तींत बरीच अस्सल माहिती असावी अथवा आहे ह्यांत फारसा संशय नाहीं. तरी देखील, हा अस्सलपणा निर्भेळ आहे असें म्हणतां येत नाहीं. कारण, प्रतापसिंहाच्या खासगी दफ्तरांतील ब-याच सटरफटर यादी ह्या रोजनिशींत घुसडल्या आहेत. ह्या यादींतील पुष्कळ कलमें अस्सल कागदपत्रांच्या आधारानें तयार केलेलीं नाहींत, इतकेंच नव्हे, तर कित्येकांना श्रुतीखेरीज दुसरा आधार नाहीं. कित्येक कलमें ग्रांट डफच्या इतिहासावरून घेतलीं आहेत. उदाहरणार्थ, ७७ व्या पृष्ठावरील जयसिंग जाधवाचें कलम पहा. “जयसिंग जाधव कधीं नेमलें ती तारीख समजत नाहीं, परंतु सन १७०९ यांस सेनापति असें लिहिलें आहे" प्रतापसिंहाच्या यादींत इसवी सन यावा हें आधीं पहिले आश्चर्य! जयसिंग जाधव व धनाजी जाधव ह्या दोन भिन्न व्यति होत्या हें ह्या यादींत म्हटलें आहे हें दुसरे आश्चर्य! आणि हें कलम विश्वासार्ह आहे असें रा. वाडांस वाटलें हे तिसरें आश्चर्य! परंतु सर्वांत मोठे आश्चर्य हें कीं, शाहू राजाच्या रोजनिशींत अवांतर माहिती व तीहि चुकीची घालण्याची बुद्धि वाडांस व्हावी व आपण चूक करीत आहों हें ह्या विद्वानांस न कळावें! येणेंप्रमाणें अस्सल कागदपत्र जसेच्या तसेच न छापतां त्यांत अवांतर माहिती घालून विस्तार करण्याची बुद्धि संपादकांना झालीं, हें ह्या रोजनिशींतील पहिले व्यंग आहे. तसेंच ह्या रोजनिशींत संक्षेपाचेंहि व्यंग आहे. (१) मूळ शाहू राजाची अस्सल रोजनिशीं, (२) तीवरून तयार केलेली इनामकमिशनची रोजनिशी, (३) व तींतून वेंचून काढिलेली ही छापील रोजनिशी, अशी ही तीनदां पिळून काढलेली निःसत्त्व रोजनिशी आहे. ह्या रोजनिशींतहि संपादकांनीं खेळखंडोबा थोडाथोडका केलेला नाहीं. महिनेवार व तारीखवार तर कलमें लाविलीं नाहींतच. परंतु वेचे काढतांना आपण ते कोणत्या धोरणावर काढतों ह्याचाहि नियम राखिलेला नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
प्रस्तावना
१. इतिहासाचीं साधनें अव्वल व दुय्यम अशीं दोन प्रकारचीं असतात. स्थूल मानानें अस्सल लेख अव्वल प्रतीचे व त्याव्यतिरिक्त लेख दुय्यम प्रतीचे. अस्सल लेखांत पत्रें, यादी वगैंरेचा व तव्द्यतिरिक्तांत बखरी, टिपणें वगैरेंचा समावेश होतो. नीळकठराव कोर्तन्यांनीं नुसत्या बखरी छापिल्या. काव्येतिहाससंग्रहकारांनीं दोन्ही प्रकारचीं साधनें निरनिराळी छापिलीं, प्रभू लोकांच्या इतिहासाच्या साधनकारानीं दोन्ही साधनांचा अव्यवस्थित संग्रह केला. प्रो. फारेस्ट यानींहि तोच मार्ग स्वीकारिला आहे. ज्या ग्रंथांत शिवाजीची एक गबाळ बखर त्यांनीं प्रसिद्ध केली त्यांतच इतर अस्सल लेखांचाहि समावेश झालेला आहे; व प्रस्तावनेंत अस्सल लेखांपेक्षां सदर गबाळ बखरीला जास्त महत्त्व दिलेलें आहे. सदर बखरीची योग्यता काय हें न कळल्यामुळें हा प्रकार झाला हें उघड आहे. रा. पारसनिसांच्या भारतवर्षात अस्सल पत्रांपेक्षां बखरी व कैफियतीं ह्यांचाच भरणा जास्त आहे. पारसनिसांचा ब्रह्मेंद्राचा पत्रव्यवहार, व रा. खरे ह्यांचें पटवर्धनी दफ्तर ही मात्र निर्भेळ अस्सल लेखांचीं भांडारें आहेत. मी छापिलेलीं पहिलें, तिसरे, पांचवें व आठवें खंड हींहि ह्याच वर्गांत मोडतात. माझ्या दुस-या व चवथ्या खंडांत दोन्ही प्रकारांची कचित् भेसळ आहे.
२. अलीकडील तीस वर्षात छापिलेल्या ह्या दोन्हीं प्रकारच्या साधनांत एक विशेष आहे. तो हा कीं, तीं जशीं सांपडलीं तशींच छापिलीं जात असतात. त्यांत संक्षेप किंवा विस्तार करण्याची बुद्धि कोणालाहि झाली नाहीं. हीं बुद्धि जोपर्यंत झाली नाहीं तोपर्यंतच साधनाचें खरें स्वरूप कायम राहून, पुढें होणा-या इतिहासचिकित्सकांना मराठ्यांच्या इतिहासाचा निःशंक अभ्यास करतां येणार आहे.
३. ही साधनें लोकांपुढे मांडताना निरनिराळ्या गृहस्थांनीं निरनिराळे मार्ग स्वीकारलेले आहेत. कोणी ह्या साधनांना अर्थनिर्णायक टीपा देतात; कोणी लहानशी परिचायक प्रस्तावना लिहितात; व कोणी ह्यापैकीं काहीं एक न करितां नुसतीं उघडीं बोडकीं साधनेंच लोकांच्या सेवेस हजर करितात. कोणी ह्या तिघांच्याहि पुढें जाऊन ह्या साधनांपासून मिळणारी संगतवार हकीकत आपल्या पुस्तकाला जोडतात. कित्येक असेहि आहेत कीं जे वाटतील तीं निराधार विधानें ह्या हकीकतींत घुसडून देतात. सारांश, अव्यवस्थित रीतीनें मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचें प्रकाशन, मंडण व संकलन आजपर्यंत होत आलें आहे. खरे पाहिलें तर, ह्या साधनांचे प्रकाशन ब-याच निराळ्या प्रकारानें झाले पाहिजे. केवळ उघडीं बोडकी साधनें लोकांपुढे मांडणें यद्यपि प्रकाशकाला अनेक त-हांनीं सकृद्दर्शनीं निरुपद्रवी असतें, तत्रापि तें आस्थेनें अभ्यास करणा-या मंडळीस अनेक कारणांनीं बराच वेळ फसवणुकीचें होतें व वरवर वाचून अनुमानें काढणा-यांस तर कायमचें फसवतें. उदाहरणार्थ रा. वाड ह्यांनी तयार केलेल्या व रा. पारसनीस ह्यांनीं पर्वा छापिलेल्या शाहू महाराजांच्या रोजनिशींतील वेचे घ्या. ह्या पुस्तकाला सूचना, विनंति, उपोदघात किंवा प्रस्तावना ह्यांपैकीं कांहींच नसल्यामुळें, (१) मूळ रोजनिशीं किती व कोण्या कारकुनांनीं लिहिली, (२) मूळ रोजनिशीचा आकार अथ पासून इतिपर्यंत एक सारखा आहे किंवा लहान मोठा आहे, (३) मूळ रोजनिशी सुटी आहे किंवा बांधलेलीं आहे, (४) मूळ रोजनिशींतील कांहीं कागद गहाळ, फाटलेले अगर भिजलेले आहेत किंवा ती सबंद शाबूत आहे, (५) रोजनिशी मूळ आहे किंवा नक्कल आहे, वगैरे तपशील कळण्याला कांहींच मार्ग रहात नाहीं. हा खुलासा झाला असता, म्हणजे हीं रोजनिशी अव्वल महत्त्चाची आहे किंवा दुय्यम महत्त्वाची आहे हें ठरवितां आलें असतें. सदर रोजनिशी ज्या स्वरूपानें बाहेर आली आहे, त्यावरून ती अस्सल नसावी अशी शंका उत्पन्न होते. कां कीं, ह्या छापील रोजनिशींतील एकाच मुसलमानी वर्षांतील पुष्कळ कलमें अनुक्रमवार लागलेलीं नाहींत उदाहरणार्थ, १२ व्या पृष्ठापासून १५ व्या पृष्ठापर्यंत दिलेले समान अशरीन मया व अलफ हें साल घेतो. ह्या सालचीं २९ पासून ४० पर्यंत व सुद्धां १२ कलमें दिलेलीं आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
२५. वरील संक्षिप्त विवेचनावरून इतकें स्पष्ट आहे कीं, मानवसमाजाची हकीकत देतांना, संस्थांचें किंवा कृत्यांचे अधमोत्तमत्व ठरविण्याला स्थिरमान असूं शकत नाहीं. असूं शकतें, असें म्हणणें म्हणजे एका पूर्वग्रहांचाच आश्रय करणें आहे. आणि पूर्वग्रहाचा आश्रय करणें म्हणजे इतिहासाच्या सशास्त्र परिशीलनाला सर्वस्वी घातक आहे. बरें, वाईट; शुभ, अशुभ; वगैरे नीतिशास्त्रांतले जे अर्थ आहेत, ते गृहीत करून ऐतिहासिक प्रसंगांची, समाजांची व संस्थांची परीक्षा करणें, म्हणजे ठरीव नीतिशास्त्रांतल्या अर्थाच्या पलीकडे जाण्यांत मानवसमाजाला अटकाव करण्यासारखेंच आहे. तेव्हां इतिहासाचें परिशीलन करतांना, ह्या नैतिक पूर्वग्रहांना बिल्कुल रजा दिली पाहिजे. अशी रजा दिली म्हणजे स्वमतप्रदर्शन हे शब्द जगाच्या इतिहासांतून विसरून जावे लागतात, आणि History is the record of progress alone हें वाक्य निरर्थकतेच्या धुक्यांत विरून जातें. तात्पर्य, प्रगति झालेली आहे किंवा अधोगति झालेली आहे, हें पहाण्याचें काम नीतिशास्त्राचें आहे; इतिहासाचें नाही. शुभ, अशुभ; ब-या, वाईट; प्रगत, अधोगत अर्थाची जर इतिहास निवड करूं लागेल, तर त्याला नीतीतिहास असें नांव द्यावें लागेल. हानीची गोष्ट आहे कीं, असल्याच इतिहासांची बहुतेक सर्व भाषांत रेलचेल आहे.
२६. सूक्ष्मतेनें पहातां, निर्मेळ इतिहास म्हणून ज्याला म्हणतां येईल, त्याचें काम फक्त झालेल्या प्रसंगांची विश्वसनीय हकीकत देण्याचें आहे. कालाचें पौर्वापर्य लावून व प्रसंगाचें कार्यकारणत्व सिद्ध करून, भूत गोष्टी अशा अशा सातत्यानें झाल्या, इतकें सांगितलें म्हणजे इतिहासाची कामगिरी आटोपली. भूत गोष्टींचें कथन करतांना, नीतिदृष्ट्या ज्यांना आपण दुर्गुण म्हणतों त्या क्रौर्य, कौटिल्य वगैरे गुणांच्या जोरावर लढवय्ये लोक अल्पकालीन साम्राज्यें उभारतांना सांपडोत किंवा ज्यांना आपण सुगुण म्हणतों त्या दया, क्षमा, शांति वगैरे गुणांच्या जोरावर साधुपुरुष सनातनधर्माचें अनंतकालीन राज्य स्थापितांना आढळोत, इतिहासाचें काम आवडनिवड किंवा स्तुतिनिंदा न करतां, झाली गोष्ट जशीची तशी नमूद करून ठेवण्याचें आहे, न जाणों, ज्यांना एके काळी दुर्गुण म्हणून लोक समजतात, त्यांनाच पुढेंमागें ते सुगुण म्हणून कशावरून समजणार नाहीत? आज जो साधु दिसला, तो कालान्तरानें भोंदू ठरलेला, लोकांनीं पाहिलेला आहे; आणि क्रौर्याला शौर्य व कौटिल्याला मुत्सद्देगिरी हीं नामांतरें मिळालेलीं आहेत! असें सांगतात कीं, पूर्वीच्या एका राज्यांत, वादीप्रतिवाद्यांच्या खटल्याची हकीकत---जशी घडली असेल तशी---नमूद करून, तिचा स्पष्ट, मुद्देसूद व विश्वसनीय सारांश देण्याचें काम एका कामगाराकडे असे, आणि तो सारांश पाहून नीति व धर्मशास्रांच्या आधारें, शिक्षा ठोठावण्याचें काम दुस-याच एका अधिका-याकडे सोंपविलेलें असे. तसाच कर्मविभाग इतिहासाचा व नीतिशास्त्राचा आहे इतिहास भूतवृत्ताचा विश्वसनीय सारांश देतो व नीतिशास्त्र त्याचें उत्तमाधमत्त्व ठरवितें. इतिहासाचें खरें रूप म्हणतात तें हेंच. पीनलकोड ज्या वर्तनाला आज गुन्ह्यांत काढतें, त्यालाच शंभर वर्षांनीं पुढें सदगुण समजतें. नि:पक्षपातानें काढिलेला सारांश मात्र, यावच्चंद्रदिवाकरौ अजरामर राहतो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
२४. येणेंप्रमाणें अनेक प्रकारचे पूर्वग्रह टाकून, समाजाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झाडून सर्व पूर्वग्रह टाकून देणें मनुष्यस्वभावाला तर निसर्गत:च अशक्य आहे. जो ज्या संस्कृतींत वाढला असतो त्या संस्कृतीनें त्याचें मन बनलें असतें, आणि अमुक विचार, विकार, किंवा संस्था इष्ट व अमुक अनिष्ट, हा भेद तो त्या बनावाच्या अनुरोधानें करीत असतो. एखादा नीग्रो ज्या दृष्टीनें जगाकडे पाहील, तीहून निराळ्या दृष्टीनें एखादा यूरोपीयन मनुष्य जगाच्या इतिहासाचा विचार करील, हें उघड आहे. हिंदूंचा व मुसुलमानांचा इतिहासाचा अंदाज भिन्न ठरेल, हेंहि स्पष्टच आहे. सारांश, प्रत्येक समाजाची, कालाची, व व्यक्तीची जगाच्या इतिहासाकडे पहाण्याची त-हा एकसारखी असूं शकत नाहीं, ह्या भिन्न दृष्टीचा परिणाम असा होतो कीं, एका काळीं व एका समाजाला जीं विधानें सिद्धान्तवत् भासतात, तींच दुस-या काळीं व दुस-या समाजाच्या अश्रद्धचे विषय होतात. ह्या विरोधाचें कारण असें आहे कीं, विकार व विचार यांनीं खळबळून जाणा-या व्यक्तींशीं व समाजांशीं मानवइतिहासाला कर्तव्य असतें. ज्या निर्विकार दृष्टीनें दगडाकडे किंवा वनस्पतीकडे मनुष्य पाहूं शकतो तिचा उपयोग मनुष्यसमाजावर करतां येत नाहीं. कारण, निर्विकार दृष्टीचा उपयोग करूं पहाणारी व्यति स्वत: विकारवश असते व ज्या समाजावर दृष्टीचा प्रयोग करावयाचा ते समाजहि विकारवश असतात. ज्यांतील दोन्हीं पदें चल आहेत असें हे समीकरण सोडविणें, अर्थातच फार दुर्घट आहे. स्वतःचे विकार अजिबात दाबून, समाजाच्या विकारांचें व विचारांचें वर्णन व परीक्षण ताटस्थ्यानें करणारा इतिहासकार कधीं जन्मेल तो जन्मो. असा इतिहास लिहिणारा कोणी सिद्ध झालाच तर त्याला लौकिकरीत्या पहिली अडचण अशी पडेल कीं, विकारांचे व विचारांचें अधमोत्तमत्व ठरवावयाला स्थिर मान कोणतें घ्यावें? उदाहरणार्थ, जगांतील प्राचीन व अर्वाचीन स्त्रीजातीचा इतिहास द्यावयाचा आहे, अशी कल्पना करा. एकाच नव-याला जन्मभर धरून रहाणा-या, दररोज नवा नवरा करणा-या, दुबळ्या नव-याला सोडणा-या, सबळ नवरा मेल्यावर दुसरा करणा-या, मुळींच नवरा न करणा-या, एकाच किंवा अनेक नव-यांशीं सपत्नीकत्वानें नांदणा-या, आणि अनेक नव-यांची एकच बायको होणा-या, अशा नाना प्रकारच्या स्त्रीयांच्या समाजांत नैतिक समाज कोणता व भ्रष्ट समाज कोणता, हें निश्चयानें ठरविणें दुरापास्त आहे. ब्राह्मणांत आजन्मैकपतित्वाची चाल आहे, इंग्रजांत पुनर्विवाहाची चाल आहे, मोर्मोन लोकांत अनेकपत्नीत्चाची चाल आहे, व मलबारांत इच्छापतित्वाची चाल आहे, आणि हे सर्व समाज सुधारलेले आहेत. तटस्थ्यवृत्तीनें ह्या चालींचें परीक्षण करूं जातां, अमुक चाल नैतिक व अमुक अनैतिक हें ठरविण्यास स्थिर मान कोणतें घ्यावयाचें? व्यक्तिस्वातंत्र्याचे कैवारी इच्छापतित्वाची चाल पसंत करतील, असें म्हणावें तर व्यक्तिस्वातंत्र्याचे कट्टे पुरस्कर्ते जे आधुनिक युरोपीयन लोक त्यांना ती बिलकुल आवडत नाहीं. आजन्मैकपतित्चाची चाल शास्त्रसिद्ध आहे, असें प्रख्यात पाझिटिव्हिस्ट ऑगस्ट कोंटे म्हणतो, तर ब्राह्मणांतील कांहीं सुधारकांना ती चाल मोडून इंग्रजांची पुनर्विवाहाची चालपत्करावीशी वाटते. इंग्रजांना एकाच वेळीं एकच बायको करणें सशास्त्र वाटतें, तर त्यांचेंच बंधू जे मोर्मोन लोक ते अनेकपत्नीत्वाचे कट्टे भक्त झालेले दिसतात. सारांश, अमुक एक चाल उत्तम, असें निश्चयानें विधान कण्याची कांहीं सोयच राहिली नाहीं. हाच अनिश्चय राज्यसंस्था, धर्मसंस्था, विद्यासंस्था वगैरे संबंधानें असाच कायम आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
(ड) दुसरे लग्न याच सालीं छ २९ जमादिलाखर (२५ मे १७५०) रोजी झाले. लक्ष्मण कृष्ण कोल्हटकर यांची बहीण. नांव पार्वतीबाई.
(ई) यांसी मुलें झाली होती ती लहानपणीच वारली, प्रसिध्दीस आली नाहीत.
(फ) इहिदे सितैन मया व अलफ पौष मासी पानिपतचे लढाईत नाहीसें झाले.
(ग) बायको पार्वतीबाई छ १७ रमजान अर्बा समानीन मया व अलफ साली वारली
(१६ आगष्ट १७८३). तो पावेतों भाऊसाहेब यांची क्रिया झाली नव्हती. खमस समानीन मया व अलफ उत्तर कार्य झाले.
९. विश्वासराव बल्लाळ.
(अ) यांचा जन्म छ ३० जमादिलावल सल्ला अर्बैन (२२ जुलै १७४२) साली झाला.
(ब) मौंज छ ३० रबिलावल तिस्सा अर्बैन मया व अलफ सालीं झाली (९ मार्च १७४९).
(क) लग्न छ ६ जमादिलाखर खमसैन (२ मे १७५०) साली झालें. सदाशिव दीक्षित पटवर्धन यांची कन्या, नांव लक्ष्मीबाई.
(ड) गर्भाधान समान खमसैनांत झालें.
(ई) पानिपतचे लढाईत इहिदे सितैन पौष शु॥ ८ रोजीं (१४ जानेवारी १७६१) गोळी लागून ठार पडले.
(फ) बायको सल्लास सितैन मया व अलफ, छ ३० रजब (१४ फेब्रुवारी १७६३) रोजी वारली.
१०. माधवराव बल्लाळ.
(अ) यांचा जन्म माघ व॥ ११ सह १२ मंदवार, छ २५ मोहरम खमस अर्बैन मया व अलफ, शके १६६६ साली (१६ फेब्रुवारी १७४५) झाला. अकरा घटका दिवसास मकर राशी होती.
(ब) मौंज छ १० रबिलाखर इसने खमसैन मया व अलफ रोजी पुण्यास झाली. श्रीमंत नव्हते, सबब त्र्यंबकराव मामा पेठे यांणीं लाविली (१५ जानेवारी १७५२).
(क) लग्न अर्बा खमसैनांत छ १३ सफर मार्गशीर्ष शु॥ १४ रविवारीं झाले. शिवाजी बल्लाळ जोशी यांची कन्या. नाव रमाबाई. (९ डिसेंबर १७५३)
(ड) राज्याधिकार नानासाहेब वारल्यावर होऊन पेशवेपदाची वस्त्रे आषाढ शुध्द शके १६८३ (१७ जुलै १७६१) साताऱ्यास झाली.
(ई) शके १६९४ नंदननाम संवत्सरे व॥ ८ सोमवारी थेऊर मु॥ वारले. रमाबाई सती गेली (१८ नोव्हेंबर १७७२).
११. यशवंतराव बल्लाळ.
(अ) यांचा जन्म छ २९ साबान तिसा साली (१३ आगष्ट १७४८) झाला. लहानपणीच मृत्यू पावले.
१२. नारायणराव बल्लाळ :
(अ) यांचा जन्म छ १ जिलकाद सीत खमसैन श्रावण शु॥ रविवारी शके १६७७(१० आगष्ट १७५५) झाला. कन्या रास होती.
(ब) मौज छ ३ जिलकाद इसने सितैनात साहेब यांणी केली (२८ मे १७६२).
(क) लग्न शके १६८५ वैशाख शुा ९ छ ८ सवाल अर्बा सितैन मया व अलफ, हवेली सिंहगड येथें झालें. कृष्णाजी हरी साठे यांची कन्या. नांव गंगाबाई.
(ड) गर्भाधान छ १२ रबिलावल सबैन मया व अलफ सालीं झालें.
(ई) पेशवेपदाचा अधिकार माधवराव बल्लाळ वारल्यावर प्राप्त होऊन वस्त्रें छ १७ रमजान सबैनांत साता-यास आवशीस दोन घटका रात्रीस झाली.
(फ) शके १६९५ विजयनाम संवत्सरे भाद्रपद शुा १३ सोमवार तिसरे प्रहरीं दिवसास शनवार वाड्यांत सुमेरसिंग वगैरे मारेक-यांनीं ठार मारिलें.
(ग) या वेळीं गंगाबाई गरोदर होती. पुढें तिचे पोटीं शके १६९६ अधिक वैशाख शुा ७ रोजीं सवाई माधवराव यांचा जन्म झाला.
(हु) गंगाबाई समान सबैन मया व अलफ सालीं छ ६ जमादिलाखर रोजीं ताप येऊन वारली. सकेशा होती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
देव वर्णानें गोरे असून त्यांच्या मानानें हे दनु, रक्षस् वगैरे आचारहीन लोक घामट, मलिन व काळे होते. ऋक्संहितेंत असुरांचाहि उल्लेख आहे. हे असुर म्हणजे निनेवे येथें पुढें ज्यांनीं इ.स. पूर्वी १५०० वर्षांच्या सुमारास राज्य स्थापिलें तेच होत ह्यांचा पूर्वेतिहास अद्याप सांपडला नाहीं. परंतु, हे लोक युद्धप्रिय, कज्जेदलाल व रात्रीचे छापे घालणारे होते, असें जें ऋग्वेदांत म्हटलें आहे तें त्यांच्या पुढील इतिहासावरूनहि संस्थापित होतें. इर्य अथवा ऐर्याण लोक आर्यांच्या अगदी शेजारींच उत्तरध्रुवापाशीं असावें. त्याचें आणि आर्यांचेंहि पूर्वीपासून वितुष्ट होतें, तें इतकें कीं, देव म्हणजे दुष्ट व असुर म्हणजे सुष्ट, असें मानण्यापर्यंत ह्यांची पुढें पुढें मजल गेली होती. पूर्वप्रलयीन काली आर्यांच्या शेजाराला असणारे व आर्यसंस्कृतीचा जबरदस्त छाप बसलेले असे हे दनु, दस्यु, रक्षस्, यातु, अहि, नराशंस, ऐर्याण व असुर लोक असावे. देवांची भाषा यांनीं बरीच उंचललेली दिसते. परंतु जातीनें, आचारानें व धर्मानें हे सर्व लोंक देवांच्याहून निराळे दिसतात. अर्थात् आर्यकुळांत यांची गणना करणें सयुत्किक नाहीं. Deutsche, Russie, Juts, Angle, Norse ऐर्याण व Assur यांच्या ऐतिहासिक व्युत्पत्त्याहि त्या त्या भाषांत समाधानकारक दिलेल्या आढळत नाहींत. ऋग्वेदांतील दनु वगैरे शब्दांवरून त्या ब-याच समाधानकारक त-हेनें लागतात, असें दिसतें. सारांश, ह्या लोकांची अनार्यात गणना करणें जास्त प्रशस्त आहे.
२२. युरोपीयन इतिहासकारांना आणीक एक मोठी विलक्षण खोड आहे. ती ही कीं, पुरातन व उत्तम असें जें जें कांहीं आढळेल, त्यांशीं आपल्या समाजाचा कांहींतरी बादरायण संबंध लावण्याची ते हांव धरतात. ग्रीस देशाच्या इतिहासापलीकडे जोंपर्यंत त्यांची माहिती गेली नव्हती, तोंपर्यंत ट्रॉय शहराशीं आपला संबंध लावून, हेलन नामक स्त्रीचें आपण वंशज आहों, असें प्रतिपादन करण्यांत त्यांना फुशारकी वाटे. कांहीं काळपर्यंत यहुदी लोकांना ते आपले पूर्वज मानीत. आणि अलीकडे संस्कृत भाषेशीं परिचय झाल्यापासून ते आपली गणना आर्यकुळांत करूं लागले आहेत. आर्यकुळाला सोडून, आपली स्थापना स्वतंत्ररीतीनें करूं पहाण्याचीहि कित्येकांची थोडथोडी प्रवृत्ति होत चालल्याचीं चिन्हें अलीकडे दिसूं लागलीं आहेत. ह्या बादरायण पद्धतीचा परिणाम असा होतो कीं, दर दहा वर्षांनीं त्यांचे ऐतिहासिक सिद्धान्त बदलत असतात. सारांश सत्यापेक्षां, स्वजातिगौरवाकडे या लोकांचें लक्ष विशेष असतें. हा दोष कोणत्याहि देशांतील निर्लेप, इतिहासकारांनीं टाळला पाहिजे.
२३. ह्या चार दोषांहून निराळा असा एक दोष यूरोपीयन इतिहासकारांच्या लेखांतून दृष्टीस पडतो. भविष्यकालांत विशिष्ट प्रसंगांसंबंधानें काय होईल, याचें विशिष्ट भाकित करणें, इतिहासाच्या प्रांताबाहेरचें आहे; अशी प्रतिज्ञा करून, अधूनमधून तशीं भाकितें करण्याची आपली नैसर्गिक चटक ह्या लोकांना आवरतां येत नाहीं. यूरोपियन लोक सर्व पृथ्वी पादाक्रांत करणार, इतर समाज त्यांच्यापुढें नामशेष होणार, अशीं विशिष्ट विधानें यूरोपीयनांनी लिहिलेल्या कोणत्याहि समाजाच्या इतिहासांत हटकून सांपडतात. आतां, हें सांगावयाला नकोच कीं भविष्यकाळीं काय काय चमत्कार होतील, हें सांगू जाणें शुद्ध वेडेपण आहे. आपल्याला माहित नाहीत अशा प्रेरणा सध्यां इतक्या आहेत व पुढें इतक्या नव्या होण्याचा संभव आहे कीं, प्रस्तुतची कोणचीं हीं विशिष्ट भाकितें भविष्यकाळीं खरीं ठरण्यास फारच थोडी कूस राहते. तेव्हां, जगाचा इतिहास लिहूं जाणा-या इतिहासकारांनीं ह्या विशिष्ट भाकित करण्याच्या हांवेपासून अलग राहिल्याविना, निर्भेळ सत्य निष्पन्न होणें अत्यंत दुरापास्त आहे विशिष्ट भाकितें म्हणजे एकप्रकारचे आपल्याला संमत असे पूर्वग्रहच होत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
६. रघुनाथ बाजीराव.
(अ) यांचा जन्म शके १६५६ आनंदनाम संवत्सरे श्रावण शु॥ १३ स झाला. (१ आगष्ट १७३४).
(ब) यांची दोन लग्नें झालीं. पहिली बायको जानकीबाई, गोपाळराव बर्वे यांची कन्या. ही सीत खमसैनात छ १३ जिलकाद, श्रावण व॥ १ (२२ आगष्ट १७५५) रोजी बाळंत होऊन वारली. पुत्र झाला होता तोही लवकरच वारला असावा.
(क) दुसरे लग्न मार्गशीर्ष शु॥ १४ छ १३ रबिलावल सीत खमसैनांत गलगले मु॥ झालें. राघो महादेव ओक यांची कन्या; नांव आनंदीबाई (१७ डिसेंबर १७५६). रघुनाथ बाजीरावाची संतती दुसरे बायकोचे पोटीं झाली ती येणेंप्रमाणें
(१) मुलगी सीत सितैनांत जमादिलाखर महिन्यांत झाली. नांव गोदूबाई. पांडुरंग बाबूराव बारामतीकर यांस दिली. लग्न छ १४ जिलकाद सल्लास सबैन, शके १६९४ साली झाले. (७ जानेवारी १७७३).
(२) पुत्र भास्करराव छ २१ साबान, इसन्ने सितैनांत (१८ मार्च १७६२) झाला.
(३) बाजीराव रघुनाथ.
(४) चिमणाजी रघुनाथ.
(ड) यांस प्रथम औरस पुत्र झालेला लहानपणीच वारला. बाजीराव यांचे जन्माचे अगोदरच समान सितैन मया व अलफ, छ १ जिलकाद (२० मार्च १७६८) रोजी बऱ्हाणपूरकर भुसकुटे यांचे घराण्यातील अमृतराव यांस दत्तक घेतले होते. नंतर पुढें औरस पुत्र दोन झाले.
(ई) नारायणराव बल्लाळ पेशवे यास मारेकऱ्यांनी मारल्यावर राज्यकारभार दादासाहेब यांणीं चालविला. यांचे नावचा शिक्का रघुनाथ बाजीराव प्रधान ह्मणोन अर्बा सबैनांत
साबान महिन्यांत नवा केला होता.
(फ) अर्बा सबैनांत मया व अलफ, मार्गशीर्ष व॥ ३ रोजीं रघुनाथ बाजीराव आनंदवलीस वारले (११ डिसेंबर १७८३).
(ग) बायको आनंदीबाई अर्बा तिसैन फाल्गुन शु॥ ११ रोजीं आनंदवलीस वारली (२७ मार्च १७९४).
७. जनार्दन बाजीराव.
(अ) यांचा जन्म छ २९ सफर सीत सलासीन (१० जुलै १७३५) साली झाला. उष्टावण
छ १५ साबान रोजीं सदर्हू सालांत झालें.
(ब) लग्न अर्बा अर्बैन मया व अलफ वैशाख व॥ ५ रोजी झालें. (२० एप्रिल १७४४). रामाजी नाईक भिडे यांची कन्या. नांव सगुणाबाई.
(क) खमसैन मया व अलफ भाद्रपद व॥ ७ (२१ सप्टेंबर १७४९) रोजी सातारा येथे वारले.
(ड) बायको सगुणाबाई छ १७ जिलकाद अर्बा समानीन कार्तिक व॥ ४ गुरुवारी (१३ नोव्हेंबर १७८३) रोजी मौजे जलालपूर नाशिक येथे वारली.
८. सदाशिव चिमणाजी ऊर्फ भाऊसाहेब.
(अ) यांचा जन्म इहिदे सल्लासीन मया व अलफ साली झाला. पुत्र झाल्याची खबर स्वारीत छ ४ सफर रोजी कळली. नामकरण छ ११ सफरी (१४ आगष्ट १७३०) झाले. यावरून मोहरम अखेरीस (३ आगष्ट १७३०) जन्म झाला.
(ब) सीत सल्लासीन छ ९ सवाल (११ फेब्रुवारी १७३६) रोजी मुंज झाली. (एक) यांची लग्नें दोन झाली. पहिली बायको उमाबाई छ २४ रबिलाखर खमसैनांत वारली (२२ मार्च १७५०).
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
२०. युरोपीयन इतिहासकारांचा दुसरा एक अर्धवट ग्रह असा आहे कीं, कोणताहि मनुष्यसमाज अनंतकाल राहूं शकणार नाहीं. अलीकडील हजार वर्षातील पश्चात्प्रलयीन सर्व राष्ट्रें प्रत्येकीं फारतर हजार हजार दीड हजार वर्षे गोंधळ घालून अस्त पावलेलीं आहेत व कोणताहि समाज पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत शुद्ध टिकलेला आढळून येत नाहीं; तेव्हां, झाडून सर्व समाज भंगुर आहेत, असा ह्या इतिहासकारांचा समज आहे. परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ध्रुवसिद्धान्त जर साधार मानला---निराधार मानण्याला सबळ कारण दिसत नाहीं,---तर पृथ्वीच्या पाठीवर पूर्वप्रलयीन काला-पासून वर्तमानकालापर्यंत अव्याहत टिकलेले कांहीं मनुष्यसमाज आहेत,असें कबूल करावें लागतें. सामान्यत: प्रस्तुतचा भारतवर्षांतील आर्यसमाज व विशेषतः ब्राह्मणसमाज आज बारा पंधरा हजार वर्षे अव्याहत चालत आला आहे. तसेंच, जरदुष्ट्रप्रणांत धर्माचें अवलंबन करणारा इर्यसमाज पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत आधुनिक मुम्बापुरस्थ पारसीकांच्या रूपानें अंशमात्रेंकरून हयात आहे. भारतवर्षीय आर्यांच्या मानानें हा इर्य समाज अतिच क्षुद्र आहे; परंतु तो हयात आहे, ही बाब निर्विवाद आहे, ह्या दोन समाजांखेरीज, पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत ज्यांची अव्याहत परंपरा नाममात्रेंकरून स्थूल मानानें दाखवितां येईल, असे यूरोपांतीलहि कांहीं समाज आहेत. देवांचें शत्रु जे द्नु, दस्यु, रक्षस्, यातु, ओह, वगैरे अनार्य त्यांचेच वंशज Danes, Deutsch, Russie, Jutse, Angles वगैरे असावेत, अशी कल्पना धांवते. आतां ह्या यूरोपीयन अनार्य लोकांत बेटीव्यवहारानें बहुत संकर झालेला आहे. परंतु याचें मूळ पाहूं गेलें असतां, तें त्यांच्या वेदकालीन नांवांत सांपडण्यासारखें आहे, असें वाटतें भारतीय आर्यांच्या प्रमाणें हे पाश्चात्य समाज शुद्ध राहिले नाहींत, याचें कारण असें आहे कीं, त्यांच्यांत चातुर्वर्ण्याची बेमालुम पद्धत नव्हती व ते आचारहीन होते. सारांश, ज्याअर्थी भारतीय आर्याचा समाज पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत जशाचा तसाच शुद्ध राहिलेला असून कोट्यावधि व्यक्तींनीं भरलेला आहे, त्याअर्थी No people may hope to live eternally हा जो Helmolt चा सिद्धान्त (The World’s History) तो निराधार आहे, असें विधान करणें प्राप्त आहे. हेल्मोटचा सिद्धान्त अनार्य राष्ट्रांना लागू होतो परंतु चातुर्वर्ण्यानें व आचारानें राहाणा-या आर्यांना गतकालासंबंधानें तर तो बिलकुल लागू पडत नाहीं. भविष्यकालासंबंधानें निश्चयात्मक भाकित करण्याचा अधिकार पाश्चात्य किंवा पूर्वात्य इतिहासज्ञांपैकीं कोणालाच नाहीं.
२१. यूरोपीयन इतिहासकारांचा तिसरा एक ग्रह असा आहे कीं, Danes, Deutsche, Russie, juts, Angles, वगैरे यूरोपांतील प्राचीन व अर्वाचीन समाज आर्य आहेत. हा ग्रह प्रामुख्येंकरून भाषासाम्यावर बांधलेला आहे. परंतु, केवळ भाषेवरून जातिनिर्णय करणें फारच भ्रामक असतें. युद्धांत पराभव पावून अंकित झालें असतां, मनानें व समाजशक्तीनें दुर्बल असे रानटी लोक त्यांची भाषा स्वीकारतांना दृष्टीस पडलेले आहेत; इतकेंच नव्हे तर, विजयी रानटी लोक जिंकलेल्या संस्कृत लोकांची भाषा स्वीकारतांनाहि आढळून येतात. सारांश, भाषेवरून जातिसंबंध निश्चयानें ठरवितां येत नाहीं. ऋक्संहितेंतील उल्लेखावरून असें दिसतें कीं, दनु, दस्यु, रक्षस् व यातु हे देवांचे पूर्वप्रलयीन कालापासून शत्रु आहेत. पूर्वप्रलयीन कालीं मेरुपर्वतावर अथवा उत्तर ध्रुवावर नांदत असतां देवांच्या शेजाराला हे दनु वगैरे लोक होते. वारंवार घसट पडल्यामुळें देवांचे शब्द व भाषा ह्या रानटी दनु, दस्यु वगैरे लोकांनीं उचलली असावी. दस्यु वगैरे शब्द ऋक्संहितेंत हिंदुस्थानांतील भिल्ल, खोंड वगैर रानटी लोकांस आर्य लोक लावीत, असें यूरोपीयनांचें म्हणणें आहे, परंतु दनु, दस्यु, रक्षस् व यातु ह्या नांवाचे लोक केव्हांहि भारतवर्षांत होते असें म्हणतां येत नाहीं भिल्ल, कोळ, खोंड यांना दनु, दस्यु, रक्षस् हीं नांवे जर आठ हजार वर्षांपासून लाविलीं जातीं, तर तीं आतांहि त्यांच्या नांवांत बदल होऊन आढळून येतीं. परंतु, त्यांचा हिंदुस्थानांतील रानटी लोकांच्या भाषांत बिलकुल पत्ता लागत नाहीं. तेव्हां दनु, दस्यु रक्षस् हीं नावें यूरोपांतल्या आधुनिक राष्ट्रांच्या पूर्वप्रलयीन पूर्वजांचींच असावीं. हे चारी लोक पूर्वप्रलयीन कालीं उत्तरध्रुवाच्या आसपास आर्यांच्या म्हणजे देवांच्या शेजारीं रहात असावे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
१८. विषय, काल व स्थल ह्यांच्यासंबंधानें ज्या दोन चार क्लृप्त्या पाश्चात्य इतिहासकारांच्या लेखांतून आढळण्यांत येतात व ज्यांचा पोरकट व क्षुल्लक अनुवाद इकडील कित्येक परभृत व परदेशाभिमानी लेखक वारंवार करतात, त्यांची व्यवस्था लाविल्यावर, आतां मुख्य प्रश्न जो इतिहासाचें वास्तव रूप त्याच्याकडे वळूं. वर सांगितलेंच आहे कीं, वर्तमानक्षणाच्या पाठीमागील गतकाळीं पृथ्वीवरील नव्या व जुन्या दरोबस्त सर्व समाजांच्या सर्व त-हांच्या उलाढालींची जी साद्यन्त व विश्वसनीय हकीकत, ती इतिहास होय. असला साद्यन्त व विश्वसनीय इतिहास पृथ्वीवरील कोणत्याहि भाषेंत अद्यापपर्यंत लिहिला गेला नाहीं. समाजाच्या साद्यंत चरित्राचा, हर्डर, हेल्मोल्ट, क्लेअर, रिडपाथ, वगैरे लोकांनीं असला इतिहास लिहिण्याचा यत्न केला आहे. परंतु, ह्यांपैकीं प्रत्येकाचा इतिहास त्याच्या त्याच्या स्वदेशाभिमानाच्या रंगानें चितारला गेल्यामुळें, इतर देशांतील इतिहासज्ञांच्या पसंतीस सहजच उतरत नाहीं. जो तो आपापला देश त्रिभुवनाचा केंद्र समजून, तत्प्रवण सर्व देशांचीं चरित्रें होत आहेत, असें चित्र काढण्याचा, नि: पक्षपातीपणाची प्रतिज्ञा करूनहि, प्रयत्न करीत असतो. ह्या स्वदेशाभिमानाखेरीज, प्रत्येकाचें कांहीं ना कांहीं तरी वैयक्तिक खूळ असतेंच. कोणी केवळ भूगोलदृष्ट्या, कोणी केवळ काळदृष्ट्या, कोणी शास्त्रदृष्ट्या, कोणी निव्वळ व्यापारदृष्ट्या, व कोणी स्वदेशसंस्कृतिदृष्ट्या जगाच्या इतिहासाची अजमावणी करीत असतात. अशी नाना प्रकारचीं व्यंगें ह्या इतिहासकारांच्या ग्रंथांत दृष्टीस पडतात. असा प्रकार असल्यामुळें, समाजाच्या चरित्राचें खरें स्वरूप काय, त्याचें केंद्र कोठें आहे, तें प्रागतिक आहे, किंवा अधोगतिक आहे, किंवा स्तब्ध आहे, वगैरे प्रश्नांचा जसा समाधानकारक निकाल लागावा, तसा लागत नाहीं. तेव्हां, वैयक्तिक मतें एकीकडे सारून व स्वदेशाभिमानाचा दर्प बाजूला ठेवून, हें काम केलें, तरच शुद्ध व विमल तत्त्व हस्तगत होण्याचा संभव आहे. हेल्मोल्ट म्हणतो त्याप्रमाणें, निर्लेप व निरंजन होऊन, इतिहासाचा विचार करूं जाणें, दुर्घट आहे, ह्यांत संशय नाहीं. परंतु, निरहंकारबुद्धीनें ब्रह्मविचार करण्यांत लीन होणारे जे आर्य ऋषि, त्यांच्या पद्धतीचें अनुकरण केलें असतां, ही दु:साध्य वस्तु प्राप्य होण्याचा संभव जास्त आहे, असे वाटतें.
१९. निलेंप व निरहंकारपणानें इतिहासाचा विचार करावयाला लागणें, ही इतिहासाचें खरें स्वरूप जाणण्याच्या मार्गाला लागण्याची पहिली पायरी आहे. ह्या मार्गाला लागण्याची दुसरी पायरी सर्वप्रकारचे अर्धवट ग्रह सोडून देणें, ही होय. उदाहरणार्थ, युरोपीयन इतिहासकारांचा आजवर असा एक ग्रह आहे कीं, मनुष्यसमाज एके कालीं रानटी स्थितींत म्हणजे वन्यावस्थेंत होता, आणि त्या अवस्थेंतून तो आस्ते आस्ते संस्कृत होत चालला आहे परंतु, हा समज सर्वस्वीं निराधार आहे. सर्व मनुष्यसमाज कोणच्याहि एकाकाळी रानटी स्थितींत होता, असा इतिहासाला मुळीं काळच आढळून आलेला नाहीं दक्षिण अमेरिकेंतील पाटेगोनियन लोक वन्यावस्थेंत आहेत, तर ब्रिटिश लोक बरेच संस्कृत होत चालले आहेत; ब्रिटिश लोक वन्यावस्थेंत आहेत, तर रोमन व ग्रीक लोक कांहींसे संस्कृत होत चालले आहेत; रोमन व ग्रीक लोक वन्यावस्थेंत आहेत, तर मिसर, असुर व बबुल लोक सुधारत चालले आहेत; बबुल लोक वन्यावस्थेंत आहेत, तर सुमेर व चिनी लोक मोठमोठीं नगरे वसवीत आहेत; चिनी लोक वन्यावस्थेंत आहेत तर आर्य लोक सुधारणेच्या शिखराला पोहोंचले आहेत असा प्रकार आढळून येतो. आर्य लोकांच्या वेदांना आर्यांच्या पूर्वस्थितीविषयीं विचारावयाला जावें तर ते सांगतात. की, उत्तर धुवाकडे म्हणजे मेरुपर्वताकडे दहा हजार वर्षांपूर्वी बर्फाचा मोठा प्रळय होऊन देव नांवाच्या पूर्वप्रलयीन लोकांची संस्कृति सफा बुडून गेली व त्यांतून सुदैवानें किवा दुर्दैवानें सुटून जीं हजार पाचशें माणसें निसटलीं त्यांनी आम्हांला वांचविलें. सारांश, हिमप्रळयाच्या पूर्वीहि कांहीं मनुष्यसमाज सुसंस्कृत होतेच व त्या कालींहि पश्चिम यूरोपांत कांही वन्यावस्थ मनुष्यसमाज होतेच. एकंदरींत, एखांदा सुसंस्कृत मनुष्यसमाज पृथ्वीच्या पाठीवर कोठें तरी सदोदित आहे व दुसरा कोणतातरी समाज त्या समाजाचा धागा धरून संस्कृतावस्थेंत येत आहे, अशी स्थिति पूर्वप्रलयीन कालापासून दृष्टीस पडते. विमानांतून अंतरिक्षांत गमन करणारे व सूर्यचंद्रादि तारालोकांत प्रवास करणारे हे देव भौतिक व आत्मिक संस्कृतीच्या पराकोटीला गेलेले होते, अशीं ह्या लोकांचीं वर्णनें सांपडतात विमानांतून गमन करण्याची व चंद्रशुक्रांची भेट घेण्याची हांव धरणारे प्रस्तुत कालीं देखील कांहीं शास्त्रज्ञ आहेत. तेव्हां, अखिल मनुष्यसमाज एके काळीं रानटी अवस्थेंत होता व पुढें आस्ते आस्ते तो संस्कृत होत चालला, हा समज टाकून देणें भाग आहे; आणि इतिहासाला माहीत असणा-या ह्या दहा पंधरा हजार वर्षांत मनुष्यसमाज कोठें ना कोठें तरी सुसंस्कृत असलेला आढळतो व ह्या सुसंस्कृत समाजाच्या बरोबरीला येण्याचा प्रयत्न पृथ्वीवरील इतर रानटी समाज एका पाठीमागून एक करीत आहेत, असा सिद्धान्त ग्रहण करणें अपरिहार्य होतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
१६. हा प्रतिकोटिक्रम कित्येक लेखकांना मान्य आहे. परंतु त्यांच्या मतें, यूरोपीयन समाजाच्या एका अंगाचे म्हणजे बहिरंगाचेंच तेवढें हें वर्णन आहे. दुस-या अंगाचें म्हणजे अंतरंगाचें परीक्षण केलें असतां, प्रगतीचा जो बारीक धागा बिनतूट दिसून येतो, त्याच्याकडे लक्ष देण्यास हे लेखक विनंति करतात. ही विनंति कोणाहि सारासारविचारी मनुष्याला मान्य होईल. पण ती मान्य करतांना तो अशी प्रतिविनंति करील कीं, यूरोपीयन प्रगतीचा बारीक धागा शोधून काढावयास जसें अंतरंगाचें परीक्षण करणें जरूर आहे, तसेंच भारतीय व महाराष्ट्रीय प्रगतीचा बारीक धागा पहावयास अंतरंगाचीच परीक्षा केली पाहिजे. अंतरंगाची परीक्षा केली असतां त्यांना असें दिसून येईल कीं धर्म, नीति, सत्य व स्वास्थ्य, ह्यांच्याप्रीत्यर्थ भारतीय व महाराष्ट्रीय आर्यांचें आज आठ दहा हजार वर्षे प्रयत्न चालले आहेत आणि अधूनमधून होणारे दंगेधोपे व राज्यक्रांत्या हिंवाळ्यांतील अभ्राप्रमाणें क्षणमात्रावस्थायी आहेत. यूरोपांतील अनेक समाज परकीयांच्या अमलाखालीं होते व आहेत. परंतु, तेवढ्यावरून जगाच्या इतिहासांत केवळ अप्रागतिक म्हणून त्यांची गणना करण्याचें कोणी मनांत आणीत नाहीं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासाची व परंपरेनें भारतवर्षाच्या इतिहासाची गणना प्रागतिकांत होणें अत्यवश्यक आहे. हाच न्याय पूर्वेकडील इतर कित्येक समाजांच्या इतिहासांनाहि कमजास्त प्रमाणानें लागू आहे.
१७. तात्पर्य, पृथ्वीवरील सर्व समाजांची जानपछान अखिल मानवजातीच्या इतिहासाला असली पाहिजे. जीं राष्ट्रें आज स्वतंत्र आहेत, त्यांतील इतिहासकारांनीं हें पक्कें ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, आजमित्तीस जीं राष्ट्रें परतंत्र दिसतात, त्यांच्या चरित्रांत स्वतंत्र राष्ट्रांच्याहि चरित्रांत दिसून येणार नाहींत अशीं प्रगतीचीं प्रौढ रूपें विद्यमान असण्याचा बळकट संभव आहे. प्रगतीचीं असलीं प्रौढ रूपें पूर्वात्य राष्ट्रांत असलेलीं यूरोपीयन इतिहासकारांच्या प्रत्ययास अलीकडील शंभर वर्षात आलेली आहेत. शंभर दीडशें वर्षांपूर्वी सर्व भाषांचा उगम हिब्रू भाषेंत असावा व पश्चिम यूरोपांतील इंग्रजी, फ्रेंच वगैरे भाषा फारच प्रौढ दशेप्रत पावलेल्या आहेत, असा समज यूरोपांत प्रचलित होता. परंतु, संस्कृत भाषेशीं जसजसा यूरोपीयन इतिहासकारांचा जास्त जास्त परिचय होत गेला, तसतसा हिब्रू भाषेशीं आंग्ल, फ्रेंच वगैरे भाषांचा कांहीएक संबंध नाहीं, आपलें मूळ आर्यभाषेच्या जवळपास कोठेंतरी आहे व आपल्या भाषांपेक्षांहि प्रौढतर भाषा आहेत, असा त्यांचा ग्रह झाला. हा समज कितपत खराखोटा आहे, हा प्रश्न अलाहिदा; परंतु, मानवसमाजाच्या भाषाविषयक इतिहासांत यूरोपीयन लोकांची समजूत ही अशी फिरली हें निर्विवाद आहे. असाच फेरबदल राजकीय, धार्मिक व सामाजिक बाबतींतहि होण्याचा फार संभव आहे भारतवर्षीय आर्यांच्या व विशेषतः महाराष्ट्रीयांच्या राजकीय, धार्मिक व सामाजिक इतिहासाचें अध्ययन जसजसें वाढेल, तसतसें प्लेटोप्रमाणें आधुनिक यूरोपीयन लोकांच्या असेंहि प्रत्ययास येईल कीं, आपल्यांतल्यापेक्षां उत्कृष्ट समाजव्यवस्था व उत्कृष्ट राजकीय हेतू जगतांतील कांहीं देशांत विद्यमान आहेत.