Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
३६. प्राधान्यानें संस्थांच्या शरीराच्या उत्पत्तीचें कारण तदघटक व्यक्तींच्या वासना होत. पोषण, संरक्षण, प्रजोत्पादन व प्रजाशिक्षण ह्या व्यक्तींच्या मुख्य वासना असतात व तत्सिध्यर्थ ते संघ करतात. शेतकी, व्यापार, गिरण्या, भौतिकशास्त्रें, ह्या सर्वांचा मुख्य हेतु शरीरपोषण आहे. कुटुंब, गोत्र, कुल ह्यांची स्थापना प्रजोत्पादनाच्या वासनेमुळें होते, हें प्रसिध्द आहे. तसेंच शरीरपोषणाचे धंदे अव्याहत चालावे म्हणून शिक्षणसंस्था उभाराव्या लागतात. यूरोपांतील अत्यंत सुधारलेल्या देशांतहि नव्याण्णव हिस्से शिक्षण हें शरीरपोषणाचें धंदे नीट येण्याकरितां दिलें जातें, असें सूक्ष्म अवलोकनानीं दिसून येतें. पोषण, उत्पादन व शिक्षण हीं अप्रतिबंध चालावीं एतदर्थ संरक्षणार्थ राज्यसंस्था व धर्मसंस्था निर्माण कराव्या लागतात. आंतील व बाहेरील दृश्य शत्रूंपासून राज्यसंस्थेनें रक्षण होतें; व गंधर्व, पिशाच्च वगैरे अदृश्य शक्तीपासून धर्मसंस्था रक्षण करते. दानव, असुर, मोंगल व हिंदु ह्यांच्यांत जे लौकिकधर्म आहेत, त्यांचा हेतु, गंधर्व, पिशाच्च, सैतानें, भूतें वगैरेंचा क्षोभ शमवून, अज्ञ व्यक्तिंच्या मनाचें कसेंतरी समाधान करण्याचा आहे. दानवादि अनार्यांतलें व हिंद्वादि आर्यांतले जे कोणी थोडे कट्टे वेदान्तमार्गी किंवा संशयवादी किंवा अज्ञेयवादी आहेत, त्यांना मात्र ह्या अदृश्य शक्तीचें भय वाटत नाहीं. परंतु, त्यांच्या ह्या कल्पनांचा उगम वासनांपेक्षां विचारांत फार असल्यामुळें व त्यांच्यांपैकीं बहुतेकांनीं तत्प्रसारार्थ मोठमोठ्या संस्थाहि यंत्रिल्या नसल्यामुळें त्यांचा विचार येथें करण्याची जरूर नाहीं. सारांश, आजपर्यंत मनुष्यजातीनें ज्या ज्या म्हणून संस्था निर्माण केल्या आहेत, त्यांपैकीं बहुतेकांचे मूळ मनुष्यमात्राच्या वासना आहेत. ह्या वासना संस्थायंत्रांच्याद्वारा फलद्रुप व्हावयाच्या असतात. तेव्हां ह्या यंत्रांकडेच बहुतेक वासनोपहत राष्ट्रांची एकाग्र दृष्टि असते. ती इतकी कीं, वासनांची फलद्रूपता प्रसंगीं एकीकडे राहून यंत्राच्या रचनेकडे व स्वामित्वाकडेच सर्व लक्ष दिलें जातें. युरोपांतील अलीकडील तीनशें वर्षांतल्या राष्ट्रांचा बहुतेक सर्व खटाटोप राज्ययंत्र व धर्मयंत्र यांची सुधारणा, सुरचना व स्वामित्व कोणत्या प्रकारें कोणीं करावें ह्यासंबंधीं झालेली आहे. इंग्लंडचें “राजा व पार्लमेंट” नावाचें जें मुख्य राज्ययंत्र आहे, त्याच्या रचनेच्या, सुधारणेच्या व स्वामित्वाबद्दलच्या झटापटीची जी हकीकत, तिलाच मुख्यत्वेंकरून इंग्लंडचा अं:तस्थ राजकीय इतिहास म्हणतात. यूरोपांतील इतर कित्येक राष्ट्रांनींहि आपापलीं राज्ययंत्रे इंग्लंडच्या धर्तीवर सुधारली आहेत आणि फ्रान्स तर ह्या कामी इंग्लंडच्याहि पुढें गेलेलें आहे. इंग्लंडच्या व यूरोपियन राष्ट्रांच्या मोठेपणाचें हें बीज जपानी लोकांनीं ओळखून, त्यांनीं आपलेहि राज्ययंत्र कांहीं वर्षांपूर्वी सुधारून घेतलें आणि यूरोपीयन राष्ट्रांच्या बरोबरीनें वागण्यास आरंभ केला. आशियांतील ज्या कोणा लोकांना स्वातंत्र्याची वासना उत्पन्न होईल, त्यांनीं तत्साधनार्थ, सोय असेल त्याप्रमाणें, गुप्त किंवा प्रगट रीतीनें, स्वातंत्र्यवासनेचा बळकट धागा अव्याहत चालविणारें एखादें राज्ययंत्रच उभारलें पाहिजे. सद्वासना किंवा असद्वासना फलद्रूप करण्यास यंत्र व यंत्रणा ह्यांच्या निर्माणाखेरीज दुसरा उपाय नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
बाकी फारशी दरबारी पत्रांतील मायन्यांत बंदा हा शब्द योजण्याची ज्या अर्थी फार पुरातनपासूनची चाल आहे, त्याअर्थी प्रस्तुत वाक्यांतील सेवक हा शब्द बंदा ह्या शब्दाचें भाषान्तर आहे, असेंच म्हणणें वाजवी दिसतें. ह्या वाक्यातील दियानतराऊ हा शब्द अर्धा फारशी व अर्धा मराठी आहे; बाकीचे शब्द शुद्ध संस्कृत आहेत. दुस-या वाक्यांतील मौजे, किल्ले, माहताजी, नूरखानास व रवान् हे शब्द फारशी आहेत आणि बाकीचे प्रायः सर्व शब्द व प्रयोग फारशी शब्दांचे व प्रयोगांचे तर्जुमे आहेत. एकटा ‘गाव’ हा शब्द तेवढा मराठी आहे. “मौजे उझार्डे किल्ले वंदन माहताजी गांव चालत असतां,” ह्या वाक्यांशाचा अर्थ येणेंप्रमाणेः- “ओझर्ड्याचें गाव किल्ले वंदन ह्या प्रांतांखालीं चालत असतां.” ह्या वाक्यांत, मौजे उझार्डे व केल्ले वंदन, ह्या दोन स्थलीं इजाफत म्हणजे षष्ठीची इ आहे व ती तशीच मराठींत ठेविली आहे. मौजे उझार्डे=मौजा इ उझार्डे व किल्ले वंदन=किल्ला इ वंदन; म्हणजे ओझर्ड्याचें गांव व वंदनचा किल्ला. शुद्ध मराठी लिहावयाचें म्हटले म्हणजे ओझर्ड्याचें गांव किंवा ओझर्डे गांव व वंदनचा किल्ला किंवा वंदन किल्ला असें लिहावयाला पाहिजे होतें. परंतु लेखकानें फारशीच पद्धत कायम ठेविली आहे व हीच पद्धत सध्यांच्याही दप्तरांत अशीच चालू आहे. माहताजी हा संयुक्त शब्द आहे. माह् म्हणजे प्रांत व ताज् म्हणजे चालणारा, धांवणारा. प्रांताखालीं चालणारा तो माहताज्. ह्याची एक संख्या दाखवावयाची असली म्हणजे ई प्रत्यय लावून माहताजी असें रूप करतात. तेव्हां माहताजी म्हणजे प्रांतांखालीं चालणारा एक. आतां मौजे उझार्डे किल्ले वंदन ह्या स्थलीं ही एक इजाफत आहे. मौजा इ उझार्डे इ किल्ला इ वंदन=वंदन किल्ल्याचें ओझर्डे गांव वंदन=वंदन किल्ल्याखालील ओझर्डे गांव. अर्थात्, ‘मौजे उझार्डे किल्ले वंदन माहाताजी गांव चालत असतां=वंदन किल्ल्याखालील ओझर्डे गांव त्या प्रातांखालीं चालणारें एक गांव चालत असतां. येथें वाचकांच्या हें लक्षांत आलेंच असेल कीं, उपान्त्य चालत हा शब्द ह्या वाक्यांशांत फाजील आहे. खरें म्हटलें असतां, माहताजी ह्या शब्दाचा अर्थ प्रांताखालीं चालणारें एक असा असल्यामुळें, उपान्त्य चालत हा शब्द येथें नको होता. “मौजे उझार्डे किल्ले वंदन माहताजी गांव असतां” असा वाक्यांशा वस्तुतः पाहिजे होता. परंतु दियानतरावासारख्या सर्वश्रेष्ठ अधिका-यानें ज्या अर्थी चालत हा फाजील शब्द योजिला आहे, त्या अर्थी ह्या प्रयोगाची जास्त चिकित्सा करणें अवश्य आहे. “प्रांताखालीं किंवा प्रांतांत गांव चालणें,” हा प्रयोग शुद्ध फारशी आहे. प्रांतांत गांव चालणें, ह्या प्रयोगाचा अर्थ प्रांतांत गांव असणें, असा आहे. ग्रामो गडप्रदेशे अंतर्भवति असा प्रयोग संस्कृतांत होतो. ग्रामो गडप्रदेशे चलति किंवा चरति असा प्रयोग संस्कृतांत नाहीं. असणें ह्या अर्थी चर किंवा चाल् ह्या धातूची शक्ति संस्कृतांत नाहीं व जुन्या महाराष्ट्रांतहि नाहीं. आतां फारशींत असा प्रयोग होतो. देहे नूरखानरा रवान् शूदा, बूद, म्हणजे गांव नूरखानाकडे चालू झाला होता, असा प्रयोग फारशींत करतात. रफ्तन्, चालणे, ह्याचें रवान् चालत हें वर्तमानकालवाचक धातुसाधित रूप आहे. इंग्रजांच्या संसर्गानें सध्यां मराठी बोलण्यांत अशा त-हा पुष्कळ येऊ लागल्या आहेत. तो गार्ड ही लाईन वर्क करीत असतो, असा प्रयोग रेल्वेकडील लोक करतांना आढळतात. तो गार्ड ह्या रस्त्यावर काम करीत असतो, ह्या शुद्ध मराठी प्रयोगाच्या ऐवजीं वरील प्रयोग रेल्वेकडील नोकरलोक करतात. वर काम करणे ह्या अर्थी वर्क हे सकर्मक क्रियापद योजणें रास्त होईल. खरें पाहिलें तर हें वाक्य असे पाहिजेः- तो गार्ड ही लाईन वर्कतो. परंतु हा प्रयोग वेडाबागडा दिसतो अशी भावना असल्यामुळें, वर्क हे क्रियापद घालून शिवाय करणें ह्या मराठी क्रियापदाची जोड देतात. हाच प्रकार मुसलमानांच्या कारकीर्दीतहि चालू होता. माहताजी म्हणजे प्रांताखालीं चालणारें असा अर्थ असतां, आणखी चालत हें क्रियापद त्या वेळीं योजीत असत. ही एवढी दुस-या वाक्याची चिकित्सा झाली. आतां तिस-या वाक्याकडे वळूं. ह्या वाक्यांत दहा शब्दांपैकी सहा शब्द फारशी आहेत. आणि मालूम होणें व मोकर्रर करणें हीं संयुक्त क्रियापदें मालूम शूदन् व मोकर्रर कर्दन् ह्या फारशी संयुक्त क्रियापदांची शब्दशः भाषांतंरे आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
३४. कौलिकपद्धतीनें इंतिहासाचे येणेंप्रमाणें विभाग पडतात:--
समग्र ७ मानवेतिहास (कौलिक)
भारतवर्षांतील पूर्वप्रलयीन ऋषींच्या वंशाला आर्य; अरब, ज्यू, बाबिलोनियन, असुरियन, मिसर वगैरे नष्ट व ह्यात लोकांना असुर; Danes, Deutsche, English, वगैरे लोकांना दानव व दस्यु; आणि चिनी, मोगल, जपानी वगैरे लोकांना मोगल; अशा संज्ञा मी देतों. कित्येक आर्यांनीं द्रविड भाषा, कित्येक असुरांनीं मोगलभाषा, कित्येक मोगलांनीं असुरभाषा व कित्येक दानवांनीं आर्य व यवन भाषा स्वीकारलेल्या आहेत, तसेंच कित्येक आर्यांनी ख्रिस्ती व असुर धर्म, कित्येक असुरांनीं बौद्धधर्म, कित्येक दानवांनीं असुरधर्म अंगीकारिला आहे. परंतु प्रत्येक मनुष्यांत एका कोणत्यातरी कुळीचें प्राधान्य दिसून येतें यांत संशय नाहीं. एक आर्यकुल मात्र निर्भेळ व शुद्ध राहिलें आहे. आर्येतर लोकांचें कुळ मूळ कुळाच्या चिन्हप्राधान्यावरून ठरवावयाचें असतें. ह्या प्रकरणाचा सूक्ष्म विचार मानवकुलशास्त्रांत करणें प्रशस्त होय, येथें केवळ त्रोटक दिग्दर्शन केलें आहे.
३५. अखिल मनुष्यजातीचे कुल, उपकुल, राष्ट्र, लोक, वर्ग, व्यक्ति वगैरे विभाग केले म्हणजे त्या जातीच्या इतिहासाला व्यवस्थितपणा ऊर्फ पद्धतशीरपणा येतो, आणि मनुष्यजाति आपआपसांत एका प्रकारचा अव्यवस्थित गोंधळ घालीत आहे, असें जें आजपर्यंत वाटे तें जाऊन, कांहींतरी व्यवस्थित हालचाल चालली आहे, असा ग्रह उत्पन्न होतो. अखिल मनुष्यजातीच्या इतिहासाचें विशद दर्शन व्हावें, एतदर्थ ज्याप्रमाणें कौलिक पद्धतीचें अवलंबन करणें इष्ट आहे, त्याप्रमाणेंच राष्ट्र, लोक, वर्ग, व्यक्ति वगैरेंचाहि इतिहास विशद होण्याकरितां इतर पद्धतींचा आश्रय करावा लागतो. व्यक्तिचा इतिहास किंवा चरित्र द्यावयाचें म्हणजे त्याच्या कुलगोत्राचा छडा लाविल्यावर, ज्याप्रमाणें त्याच्या शरीरयंत्राच्या दुर्बलत्वाची किंवा सबलत्वाची हकीकत द्यावी लागते, त्याप्रमाणेंच वर्ग, लोक, राष्ट्र इत्यादींच्याहि इतिहासांत त्यांच्या शरीरयंत्राची माहिती द्यावी लागते. वर्ग, लोक, राष्ट्र यांच्या हालचालींचा जसजसा कमजास्त मगदूर असेल, तसतशा त्यांच्यांत राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षेणिक, वगैरे निरनिराळ्या संस्था उत्पन्न होतात. ह्या संस्थांचा इतिहास व्यवस्थित देतां येण्यास, ह्यांच्या शरीरयंत्राचें साद्यन्त वर्णन करणें जरूर असतें. अशाकरितां कीं, शरीरयंत्रांत जर यत्किंचित् व्यंग असले किंवा फरक झाला, तर ह्या संस्थांच्या द्वारा होणा-या कार्यांत व्यंगें व फरक दिसूं लागतात. समाज व संस्था ह्यांच्या शरीरयंत्राची हकीकत देण्याच्या पद्धतीला शरीरक पद्धति म्हणतात. उदाहरणार्थ, राष्ट्रांतील राज्यसंस्था घ्या राष्ट्रांतील व्यक्तीशीं, वर्गाशीं व लोकांशीं व राष्ट्राबाहेरील व्यक्तीशीं, वर्गांशी, लोकांशीं व राष्ट्रांशीं, संबंध ठेवण्यास जी राज्यसंस्था राष्ट्रांत किंवा लोकांत किंवा वर्गांत निर्माण झाली, तिचें शरीरयंत्र कोणत्या प्रकारचें आहे, हें पहाणें अगत्याचें आहे. कारण, मानवसमाजाच्या अस्तित्चाची व हालचालीची अटच अशी आहे कीं, कोणत्याहि कर्माला त्यानें प्रवृत्त व्हावयाचें म्हणजे त्याला अगोदर आपलें शरीर निर्माण केले पाहिजे. वासना, शरीर व कर्म अशी मानवसंस्थांच्या चरित्राची त्रिविध परंपराच आहे. प्रथम, कर्म करण्याची वासना उत्पन्न होते, नंतर कर्म ज्याच्या द्वारा करावयाचें, तें शरीरयंत्र निर्माण होतें, आणि शेवटीं कल्पिलेलें कर्म सिद्ध होण्याच्या मार्गाला लागतें. वासना-शरीर-कर्म ही त्रयी जशी भवचक्राच्या भ्रमणाला कारण आहे, तशी ती भवचक्राची लहानगीं रूपें जीं व्यक्ति, वर्ग, राष्ट्र, त्यांच्याहि भ्रमणाला कारण होते. ज्या वर्गाच्या किंवा लोकांच्या राज्यवासना अस्पष्ट, त्या वर्गाचें किंवा लोकांचे राज्यशरीर अथवा राज्ययंत्रहि अस्पष्टच असावयाचें. ज्यांच्या राज्यवासना स्पष्ट, प्रबळ व व्यवस्थित, त्यांचे राज्यशरीर अथवा राज्ययंत्रहि स्पष्ट, प्रबळ किंवा व्यवस्थित असतें. धर्मयंत्र, शिक्षणयंत्र, समाजयंत्र, वगैरे इतर शरीरांचाहि हाच प्रकार असतो. तदंतर्गत राज्य, धर्म, वगैरें संस्थांच्या शरीरावरून, वर्ग. लोक, राष्ट्र इत्यादींच्या वासना व कर्म असूं शकतात व असतात, ह्याचा निश्चय करतां येतो. सबब, वर्गादींच्या इतिहासाला ही शरीरक पद्धति अत्यंत उपयुक्त आहे. खेडेगांवांतील ग्रामसंस्थापासून तों राष्ट्रांतील राष्ट्रसंस्थापर्यंत राज्यशरीर, धर्मशरीर, इत्यादींचा व्याप असतो. ह्या प्रचंड व्यापांत शरीराचीं निरनिराळीं इंद्रियें परस्परांना पोषक किंवा मारक कसकशीं आहेत, हें पहाण्याला शरीरक पद्धतीनें मदत होते. एकाच राष्ट्रांतील एकेक संस्थेच्या शरीराचा उदय, वृद्धि व क्षय कालान्तरांत कसा झाला, हें वर्णन करण्याचें काम ह्या पद्धतीचें आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
पुढें वळणदार अक्षरचरणकांनीं ह्या वक्राला पुष्टी आणून त्याचें ढेर बनविलें, व ह्या ढेराला पेलण्यास वरती एक भली मोठी पोकळ गांठ तयार केली, आणि दोन्ही काने एकदम लिहिण्याची सफाई सुरू केलीं. येणेंप्रमाणें बनत बनत सध्यांचा अगडबंब सा बनला आहे. ह्या अगडबंब साचेंहि एक दुसरें रूपान्तर झाले आहे. गाठ काढून टाकून व काने पिरगाटून कांहीसा निठव्याप्रमाणें ळकारासारखा एक सा काढीत असतात. ह्या सत व ळत फरक इतकाच कीं, ळचे दोन्ही जुवे घट्ट बसलेले असतात व साचे अगदीं उघडे असतात; आणि ळची उभी रेघ सांत आडवी मारतात. हा दुपोटी सा मूळ देवनागरी सापासून फारच रूपान्तरित आहे. परंतु हे रूपान्तर एकाएकीं मात्र प्राप्त झालेलें नाहीं. ह्याला फार काळ व बरीच मेहनत पडलेली आहे. हें शेवटलें रूप बनवायला सहाशें वर्षांचा अवधी व अनेक कलमबहादरांची हातचलाखीं लागलेली आहे! हाच प्रकार इतर अक्षरांचा आहे. इ. स. १४१६ पासून १८५० पर्यंतच्या पंचवीस तीस मोडी पत्रांचे फोटोझिंको देतां आले असते, तर हें विवेचन जास्त स्पष्ट झालें असतें.
८. शिवाजीच्या पत्रांसंबंधानें दुसरी विचार करण्यासारखी बाब म्हटली म्हणजे भाषेसंबंधीची आहे. प्रस्तुत खंडांतील पहिला लेखांक विजापुरांतील सर्वश्रेष्ठ कारभारी जो दियानतराव त्यानें निळोपंत बहुतकर यांस पाठविलेला आहे. ह्या दियानतरावाचा उल्लेख काव्येतिहाससंग्रहान्तर्गत पत्रेंयादींतील ४३८ व्या लेखांकांत म्हणजे शहाजी महाराजांच्या कैफियतींत प्रारंभीच आला आहे. हा दियानतराव देशस्थ ब्राह्मण असून दियानतराव हा ह्याचा बहुशः किताब आहे. दियानत् ह्या फारशी शब्दाचा अर्थ धर्म. अर्थात् दियानतराव म्हणजे धर्मराव किंवा सार्थ धर्माजीराव. आतां धर्मराव किंवा धर्माजींराव ह्या शब्दाचा दियानतराव असा फारशींत तर्जुमा होतो, तेव्हां दियानतराव हा किताब आहे किंवा हुएन्संग संस्कृत विशेषनामाचे जसे अर्थावरून चिनी तर्जुमे कधीं कधीं करतो, त्याप्रमाणें मूळ मराठी नांवाचा हा फारशी तर्जुमा आहे, हें निश्चयात्मक सांगतां येत नाहीं. हा प्रकार कांहीं असो, इतकें मात्र स्पष्ट आहे कीं, त्या कालीं ब्राह्मणहि फारशीं नांवे स्वीकारण्यांत फुशारकी मानीत असत. सर्जेराव, बाजीराव, हैबतराव, जानराव, फिरंगोजीराव, शहाजीराव, सर्फोजीराव, दर्याजीराव, मलंगोजीराव, गुलबाई वगैरे फारशींतून आलेल्या मराठी नांवांप्रमाणें दियानतराव हेंहि मराठींत त्या कालीं रूढ झालेलें नांव होतें. हा खुलासा पत्र लिहिणा-याच्या नावांसंबंधानें झाला. आतां ह्या पत्रांतील शब्द व प्रयोग ह्यांच्याविषयींचा खुलासा करतों. ह्या लेखांकांत एकंदर ९१ शब्द आहेत, त्यांपैकीं बराबर ३० शब्द फारशी आहेत आणि एकंदर वाक्यप्रयोग फारशी प्रयोगांच्या धर्तीवर आहेत. ९१ शब्दांपैकीं अस्सल फारशी ३० गाळले असतां, बाकी जे ६१ शब्द राहतात, त्यांतून दोन तीन शब्द खेरीजकरून बाकी सर्व शब्द फारशी शब्दांचे मराठी तर्जुमे आहेत. मायन्यांतील अखंडित- लक्ष्मीप्रसन्न व परोपकारमूर्ति हे शब्द दामदौलतहू व मुषफिकमेहेरबान् ह्मा शब्दांचे हुबेहुब तर्जुमे आहेत; आणि राजमान्य, राजश्री, गोसावी, यांसी हे चार शब्द शुद्ध मराठी आहेत. कोणत्याही फारशी मायन्यांतील शब्दांचें भाषान्तर नाहींत. आतां मायना सोडून देऊन खालील पत्राकडे वळूं. ह्या पत्रांत एकंदर दहा वाक्यें आहेत. पैकीं पहिल्या वाक्यांतील सेवक हा शब्द बंदा ह्या फारशी शब्दाचें भाषान्तर आहे. संस्कृत नाटकांत जीं कांहीं पांच चार पत्रें सांपडतात, त्यांतींल मायन्यांत सेवक हा शब्द कोठें आलेला आढळत नाहीं. हेमाद्रीच्या वेळच्या मराठींतील किंवा त्याच्या पूर्वीच्या महाराष्ट्रांतील पत्रव्यवहाराचा एकहि मासला उपलब्ध नसल्यामुळें म्हणजे मुसुलमानांचा प्रवेश महाराष्ट्रांत होण्याच्या पूर्वी मराठींत किंवा महाराष्ट्रांत पत्रांचे मायने कसे लिहीत असत तें नक्की सांगतां येत नसल्यामुळे, सेवक हा शब्द मायन्यांत योजण्याचा प्रघात जुन्या मराठीपासून किंवा तत्पूर्वीच्या महाराष्ट्रींपासून चालत आला किंवा नाहीं हें काहींच ठरवितां येत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
३२. कौलिक, कालानुक्रमिक व दैशिक ह्या तिन्ही पद्धतींचा इतिहासलेखनांत कमजास्त उपयोग करून घ्यावा लागतो. ऐतिहासिक प्रसंग म्हटला म्हणजे काल, देश व कुल ह्यां त्रयीचा उद्धार केल्यावांचून गत्यंतर नसतें. किंबहुना, काल, देश व कुल किंवा कुलांतील व्यक्ती, हे तीन ऐतिहासिक प्रसंगाचे घटक होत. अर्थात् ह्यांच्या अनुरोधानें इतिहास लिहिणें केवळ स्वाभाविक होय. ज्या घटकाला कांहीं कारणानें प्राधान्य दिलें जातें, त्याची पद्धत तेवढ्यापुर्ती विशेष ग्राह्य व सोयस्कर समजतात एवढेंच. त्यांतल्यात्यांत एका घटकाला विशेष प्राधान्य देतात. इतिहास कोणाचा ! असा प्रश्न केला असतां, कालाचा किंवा देशाचा अथवा दिशेचा, म्हणून कोणी उत्तर देत नाहीं. तर मनुष्याचा किंवा मानवसमाजाचा किंवा मानवकुलांचा, असें उत्तर देतात. याचें तात्पर्य असें कीं, इतिहासांत मुख्य पात्र मनुष्य आहे आणि काल व दिशा ह्यांचें त्याला बेमालुम आवरण मात्र आहे. History of the Primitive times, History of the Middle Ages, History of the Modern Times, History of the Eaet आणि History of West ह्या प्रयोगांत मुख्य नायकाचा नामनिर्देश केलेला नाहीं खरा; परंतु, तो प्रामुख्यानें लक्षित आहे, हें सांगावयाला नकोच. लक्षणेचा व आलंकारिक भाषेचा युरोपीयन लोक किती उपयोग करतात, त्याचे हे मासले आहेत. शास्त्र्यांच्या भुपक्यापुढें शास्त्र बिचारें लोपून गेलें ! काल व दिशा ह्यांच्या धबडग्याखालीं माणूस चिरडून गेलें व प्राचीन काळाचा व पूर्व दिशेचा किंवा पौर्वात्य देशांचा इतिहास, असे प्रयोग प्रचारांत आले. विवक्षित मानवकुलाखेरीज काळाला व दिशेला इतिहासांत कांहीं किंमत नाहीं, हें कोणींच लक्षांत घेईना! नाहींतर कालानुरोधानें इतिहास लिहावा किंवा देशानुरोधानें लिहावा, हा वाद उपस्थितच झाला नासता.
३३. एवंच, दिक्कालांच्या आवरणाखालीं मानवकुलांच्या हालचालींची जी विश्वसनीय हकीकत ती इतिहास होय. सकल मानवकुलांच्या सामग्रयानें जो इतिहास, त्याला मानवेतिहास म्हणतात; व एकाच कुलाचा, उपकुलाचा, राष्ट्रांचा. लोकांचा. वर्गाचा किंवा व्यक्तीचा जो इतिहास, त्याला व्यक्तिचरित्र, वर्गेतिहास, लोकेतिहास, राष्ट्रेतिहास, उपकुलेतिहास किंवा कुलेतिहास व्युत्क्रमानें म्हणतात. व्यक्ति, वर्ग, लोक, राष्ट्र, उपकुल व कुल यांच्या हालचाली दोन प्रकारच्या असतात:---अंत:स्थ म्हणजे खासगी व बहिःस्थ म्हणजे बाहेरल्या. व्यक्तीची जी घरगुती हालचाल ती त्याच्या खासगी चरित्रांत मोडते व लौकिक बहिःस्थ चरित्रांत समावते. वर्गाची केवळ वर्गांतल्या वर्गातली जी चळवळ ती वर्गाच्या अंत:स्थ इतिहासांत समाविष्ट होते व इतर वर्गांशी जी घसट, ती बहिःस्थ इतिहासांत अंतर्भवते. महाजन, सामान्यजन, ब्राह्मण, शूद्र, जैन, क्याथोलिक, प्रोटेस्टट हे जे व्यक्तिसंघ त्यांना वर्ग किंवा जाति म्हणतात. त्यांचा आपापल्या वर्गांतला अंतस्थ जो व्यवहार त्याचा अंतर्भाव अंतस्थ इतिहासांत होतो; व इतर वर्गांशी व्यवहार बहिःस्थ इतिहासांत मोडतो. History of the Aristocracy in England or the Democracy in France, or the Oligarchy in Venice हीं वर्गेतिहासाचीं उदाहरणें आहेत. ज्या कोटींत मनुष्यांचे अनेक वर्ग आहेत परंतु राज्ययंत्राभावामुळें जे राष्ट्रत्वाप्रत पावलेले नाहींत, त्या कोटीला लोक म्हणतात. शंभर वर्षांपूर्वी मराठ्यांचें राष्ट्र होतें, सध्यां स्वराज्ययंत्राभावामुळें त्यांची गणना केवळ लोककोटींत करणें भाग आहे. ग्रीस व इताली ह्यांची सध्यां राष्ट्रांत गणना आहे: पन्नास पाऊणशें वर्षांपूर्वी त्यांनी नामना लोककोटींत होत असे. ह्या लोककोटीलाहि अंत:स्थ व बहि:स्थ इतिहास असतो. लोककोटीच्या पोटसमाजांची जी चळवळ ती अंत:स्थ व जुलमानें राज्य करणा-या परकी राष्ट्रांशीं जी हमरातुमरी, ती बहिःस्थ इतिहासांत पडते. राष्ट्र, उपकुल व कुल ह्यांच्याहि इतिहासाची अशीच द्विविध परंपरा आहे. उदाहरणार्थ, इंग्लंड हें राष्ट्र, इंग्लंड+वसाहती हें उपकुल, आणि सर्व ख्रिश्चन राष्ट्रें, हें कुल समजण्यास कांहीं फारशी हरकत नाहीं. इंग्लंडचा अंतस्थ इतिहास त्या बेटांतल्या चळवळीपुरता असतो: आणि इंग्लंडचा इतर राष्ट्रांशीं, लोकांशीं, वर्गांशी व इंग्रजेतर व्यक्तीशीं जो व्यवहार तो त्याच्या बहिःस्थ इतिहासांत गणला जातो. ख्रिस्ती राष्ट्रांतला आपापल्यांतला जो व्यवहार तो त्यांचा अंत:स्थ व्यवहार व ख्रिस्तेतर राष्ट्रांशी व लोकांशी जो व्यवहार तो त्यांचा बहि स्थ व्यवहार मोजला जातो. ख्रिस्ती राष्ट्रांचे आपापल्यांतले अन्योन्यव्यवहाराचे कायदे निराळे व ख्रिस्तेतर राष्ट्रांशी व लोकांशी वागण्याचे कायदे निराळे, अशी व्यवस्था प्रसिद्ध आहे. अर्थात् एक ख्रिस्तीराष्ट्रकुल मिनतवारीनें ईषद् व्यवस्थित रूपाप्रत येत आहे हें उघड आहे. दानव, असुर, मोगल, आर्य, आफ्रिकन, अमेरिकन, व पालिनेशियन अशीं सात प्रमुख कुलें सध्यां पृथ्वीवर आहेत. पैकीं कांही दुर्बल व कांही सबल आहेत. त्यांचे अंत:स्थ व अन्योन्य जे व्यवहार ते समग्रमानवेतिहासांत मोडतात. सजातीय अशी तदितर कोटी नसल्यामुळें, अखिल मानवेतिहासाला बहिःस्थ बाजू असूं शकत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
ह्या प्रमाणांखेरीज फारशी मोडी अक्षरांवरून मराठी मोडी अक्षर घेतलें ह्याला दुसरें एक प्रमाण आहे. मराठी बाळबोध लिपींत प्रत्येक अक्षर निरनिराळें लिहितात, त्याप्रमाणें, फारशींत नस्ख म्हणून ठळठळीत अक्षर लिहिण्याची जी एक त-हा आहे ती नवशिक्यांनाहि समजण्यासारखी असते. परंतु ती देखील मराठी बाळबोध अक्षरांपेक्षा जास्त मोडलेली असते व तींत अनेक अक्षरें एकाच झटक्यासरशीं एकदम लिहिलीं जातात. तशांत उत्तम फारशी नस्ख अक्षर जातीचेंच मोडी वळणाचें असतें व त्याच्या मानानें शिकस्ता अक्षर तर अतीच मोडलेलें असून त्यांत नुक्त्यांचा बहुतेक लोप झालेला असतो. सारांश, फारशी अक्षरें लिहिण्याची पद्धत ज्यानें एकदां पाहिली त्याला देवनागरी बाळबोध अक्षरें एका झटक्यानें लिहिण्याची क्लृति सुचण्याचा संभव आहे. कागदावर लिहिण्याचा प्रघात पडल्याबरोबर मोडी लिहिण्याचाहि प्रघात महाराष्ट्रांत लवकरच पडला व हा प्रघात पाड-याचें प्रथम श्रेय जाधवांचा दफ्तरदार जो हेमाद्रि त्यास विद्वत्तेच्या व अधिकाराच्या वजनावर सहजासहजीं घेतां आलें. आतां, कागदावर लिहिण्याचा प्रघात महाराष्ट्रांत पडल्यापासून मोडी लिहिण्याची चाल ह्या देशांत सुरू झाली अशी जर वस्तुस्थिति आहे, तर हेमाद्रीनें मोडी लिहिण्याची चाल लंकेहून आणिली अशी जी कथा आहे तींत कितपत अर्थ आहे तें पाहिलें पाहिजे. देवगिरीच्या जाधवांचें साम्राज्य सर्व दक्षिणभर कन्याकुमारीपर्यंत होतें हें प्रसिद्ध आहे. साम्राज्यांतील दफ्तरें तपासण्यास कन्याकुमारी किंवा रामेश्वर ह्या दक्षिणेकडील प्रांतांत जाऊन व कदाचित् लंकेची यात्रा करून परत आल्यावर सर्व दप्तर मोडींत लिहिण्याचा वटहुकूम हेमाद्रीनें काढिला असावा असें दिसतें. लंकेहून परत येण्याला व हा नवा वटहुकूम काढण्याला एकच गांठ पडल्यामुळें, लंकेचा व मोडी अक्षराचा लोकांनीं विनोदानें संबंध जोडून दिला असेल असें वाटतें. बाकी लंकेतील त्यावेळच्या सिंहली भाषेचा व मोडीचा कांहीं संबंध होता ह्याला बिलकुल प्रमाण नाहीं. सिंहली भाषेंत मोडीचा प्रचार अद्यापहि नाहीं व पूर्वीहि नव्हता. अर्थात् मोडीचा प्रघात फारशी लिपी व फारशी कागद ह्या्च्या आगमनाने् पडला ह्या्त फारसा संशय नाहीं. तशांत मोडी म्हणजे देवनागरी लिपीहून भिन्न अशा तामीळ, तेलगु, कानडी किंवा सिंहली अक्षरमालिकेपासून घेतलेली आहे असाहि प्रकार नाहीं. मोडी अक्षर देवनागरी अक्षरें मोडून तयार केलेलें आहे, हें चारपांचशें वर्षांची जुनीं पत्रे व महजर पाहिले म्हणजे स्पष्ट दिसून येतें. मजजवळ इ. स. १४१६ पासून आतांपर्यंतचे अनेक जुने मोडी लेख आहेत. इ. स. १२५० पासून १४१६ पर्यंतचा मात्र एकहि मोडी लेख अद्यापयर्पंत उपलब्ध झाला नाहीं. १४१६ च्या पुढील कागदपत्रांवरील मोडी अक्षर देवनागरी अक्षराशीं ताडून पाहतां, देवनागरी बालबोध अक्षरें एका झटक्यासरशीं लिहिल्यानें मोडी अक्षर सिद्ध होतें हें नामी कळतें. प्रायः देवनागरी बाळबोध प्रत्येक अक्षर दोन तीनदां हात थांबविल्यावांचून लिहितांच येत नाहीं. उदाहरणार्थ, अ, इ, उ, क वगैरे पाहिजे तें अक्षर घ्या. अ ला चारदां, इ ला दोनदां, उ ला दोनदां, क ला तीनदां किंवा चारदां हात थांबवावा लागतो. हींच अक्षरे हात न थांबवितां लिहिलीं म्हणजे त्यांचीं मोडीं रूपें सिद्ध झालीं. आतां जसजशी मोडी पद्धति जास्त प्रचारांत आली व तिचा दरबारांत जास्त प्रवेश झाला, तसतसें मोडी अक्षर जास्त वळणदार, डौलदार, सफाईदार झालें, हें उघड आहे. ज्यांनीं मोडी अक्षराच्या ऐतिहासिक परंपरेकडे लक्ष्य दिलें नाहीं त्यांना मोडींतील कित्येक अक्षरें देवनागरी अक्षरांपासून निघाली हें विधान बराच विचार केल्यावांचून व माहिती मिळविल्यांवाचून खरेंहि वाटणार नाहीं इतका मूळ देवनागरी अक्षरांत व त्यांच्या डौलदार व भपकेदार मोडींत फरक झालेला आहे. उदाहरणार्थ, प्रस्तुतचें मोडी सा हें अक्षर घ्या. ह्याला वरची पोकळ गांठ व मधलें गरगरीत ढेर कोठून आलें हें वरवर पाहणा-याला सांगतां येणार नाहीं. परंतु इ. स. १४१६ पासून आतांपर्यंतच्या मोडी लेखांत सा ह्या अक्षराची मोडी परंपरा कशी होत आली आहे, हें पाहिलें म्हणजे सध्याचा हा पोकळ गांठीचा व ढेरपोट्या सा मूळ देवनागरी साचेंच रूपांतर किंवा वेषांतर आहे, हें ओळखतां येतें. प्रथम, सा मधील रचें खालचें शेपूट व र आणि त्याचा पहिला काना ह्यांजमधील आडवी रेघ एकदम लिहूं लागले. त्यामुळें, खालच्या शेपटाला व आडव्या रेघेला जोडणारी एक अर्धकंसाकार वक्र रेषा प्रथम नव्यानें उपयोगांत आली. इ. स. १४१६ पासून १५५० पर्यंतच्या लेखांत हा जोड नुसता साधा वक्र आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
३०. कालाच्या विशिष्ट भागांत समानकालीन समाजांच्या पृथ्वीच्या पाठीवर काय उलाढाली चालल्या आहेत, तें पहाण्यास कालानुक्रमिक पद्धतीचा चांगला उपयोग होतो. पृथ्वीच्या विशिष्ट भागांत एक किंवा अनेक समाजांचे एकदम किंवा अनुक्रमानें काय उद्योग चालले आहेत, तें दैशिक पद्धतीनें कळतें. आणि सर्व पृथ्वीभर सर्व गतकालीं मानवसमाजाच्या सर्व कुळींनीं काय काय कृत्यें केलीं, तें समजणें कौलिक पद्धतीनें सुलभ होतें. अर्थात् अखिल मानवसमाजाचा इतिहास लिहिण्यास ही कौलिक पद्धतीच उत्तम ठरते. ह्या पद्धतीनें इतिहास लिहावयाचा म्हणजे मानवसमाजाच्या मुख्य कुलांच्या व उपकुलांच्या उलाढालींची अथपासून आतांपर्यंत विश्वसनीय हकीकत द्यावयाची. मानवसमाजाचीं बहुतेक सर्व उपकुलें ऐतिहासिक ऊर्फ पश्चात्प्रलयीन कालांत उद्भवलीं असून, स्थलोस्थलीं कांहीं काल स्थिर होऊन बरेंच सामर्थ्य आल्यावर, पृथ्वीवरील इतर भागांत पसरत आहेत. अमुक देश अमक्या उपकुलाचा आहे, असें विधान हजार पांचशें वर्षापुरतेंच तेवढें खरें असतें. पुढें पहावें, तर दुसरेंच उपकुल त्या देशांत वास्तव्य करून नांदत आहे, असें आढळून येतें. ही हालचाल अद्याप चाललीच आहे; व पृथ्वीवरील ज्या देशांत इंग्लिश, फ्रेंच, वगैरे लोक सध्यां नांदतांना आपण पहात आहों, त्यांत हजार पांचशें वर्षांनंतर दुसरींच कोणी उपकुलें नांदतांना दृष्टीस पडल्यास तत्कालीन इतिहासकारांस आश्चर्य वाटण्याचे फारसें कारण नाहीं. ह्या नियमाला अपवादक असें एक मात्र कुल आज आठ दहा हजार वर्षे एकाच स्थलाला चिकटून राहिलेलें दिसत आहे. तें भारतवर्षांतील आर्यकुल होय; हें कुल इतर उपकुलांप्रमाणें पश्चात्प्रलयीन नसून, पूर्वप्रलयीन कालापासून संस्कृत झालेलें आढळतें. ह्या थोर कुलानें मानवसमाजांतील इतर सर्व उपकुलांची बाल्यावस्थेपासूनचीं सर्व स्थित्यंतरें पाहिली आहेत; त्यांची प्रत्येकाची अनुक्रमानें दाट ओळख करून घेतली आहे; त्यांपैकीं अनेकांना दुर्बल किंवा नष्ट झालेलें देखिलें आहे; आणि इतकेंहि करून, म्लेच्छसंकर होऊं न देतां, शुद्ध वंशाचें बरेंच रक्षण केलें आहे. आर्यकुलाचें हें अलौकिक चरित्र अनार्यांच्या जसें मत्सरास तसेंच कौतुकासहि कारण झालेलें आहे.
३१. कौलिक पद्धतीचें ग्रहण केल्याविना अखिलमानवसमाजाच्या शाखांच्या व उपशाखांच्या जाळ्याची गुंतागुंत यथास्थित उलगडत नाहीं, ही तळहातींच्या आवळ्याप्रमाणें स्पष्ट गोष्ट आहे. अखिल मानवसमाज सोडून एकेकट्या उपशाखांचा किंवा उपकुलांचा इतिहाच तर जात्याच कौलिक असतो. इंग्रजांचा इतिहास म्हणजे इंग्रज उपकुलाचा इतिहास व मराठ्यांचा इतिहास म्हणजे मराठा उपकुलाचा इतिहास मुळांतच कौलिक असल्यामुळें, एकेकट्या कुलाचा इतिहास लिहितांना कौलिक पद्धति घ्यावी किंवा न घ्यावी हा वादच रहात नाहीं. कुलाची शहानिशा झालेलीच असते व झाली नसल्यास, झाली आहे असें समजून चालावें लागतें. इंग्रज आर्य असोत वा अनार्य असोत, त्यांचे राष्ट्रीय चरित्र त्यांच्यापुरतें सदा खरेंच असतें. राष्ट्रीय चरित्र गातांना आपण कोणत्या कुलाचा पवाडा रचित आहो अशी विवक्षा आली, अर्थात् मानवसमाजाच्या कोणत्या कुलाचा उत्कर्ष होत आहे असा प्रश्र आला, म्हणजे दृष्टींत फरक होऊं लागतो व आर्यानार्यत्वानें मानवेतिहासाचें सत्यासत्यत्व भासमान होऊं लागतें. अशा प्रसंगी केवळ राष्ट्रीय इतिहास सोडून सार्वकौलिक इतिहासाच्या प्रांतांत आपण प्रवेश करीत आहों, हें उघड आहे. तेव्हां एकेकट्या कुलाचा व तें कूल ज्या देशाला ज्या काळीं आपला म्हणत असतें त्या तत्कालविशिष्ट देशाचा इतिहास रचतांना कौलिक पद्धतीचा स्वीकार झालेलाच असतो, अर्थात् तिच्या ग्राह्याग्राह्यत्वाची फारशी आवश्यकता रहात नाहीं. बिलकुल आवश्यकता रहात नाहीं असें मात्र समजण्यांत हांशील नाहीं. कारण एकेकटें उपकुल जरी झालें तरी त्याला इतर उपकुलांचा स्पर्श अगदी होत नाहीं, असें आजपर्यत झालें नाहीं. सध्यांच्या इंग्लिश उपकुलाचा इतिहास घ्या. पूर्वप्रलयीनकुल, केल्टकुल, ब्रिटिशकुल, डानिशकुल, साक्सनकुल, व नार्मन फ्रेंचकुल, या सर्वांच्या झगड्यानें सध्यांचे इंग्लिश उपकुल बनलें आहे व तें वेल्श, स्कॉच व आयरिश उपकुलांना खाऊन व जिरवून टाकण्याचा हल्लीं प्रयत्न करीत आहे. ह्याचा अर्थ असा कीं, इंग्लिश उपकुलाचा अथवा प्राधान्यानें इंग्लंडचा इतिहास देतांना उपरिनिर्दिष्ट कुलांचाहि इतिहास देणें भाग पडतें. फार काय सांगावें, ब्रिटिश बेटांचा अंतस्थ इतिहास म्हणजे ब-याच अंशानें ह्या सर्व उपकुलांच्या भांडाभांडीचा इतिहास आहे. पृथ्वीवरील इतर राष्ट्रांशी इंग्लंड्चा जो संबंध येतो तेवढ्यापुरतें मात्र ह्या परस्पर भांडणा-या उपकुलसंघाला इंग्लंड अथवा इंग्लिश उपकुल अशी संज्ञा सोईखातर देतात. सारांश, एकेकटें राष्ट्र म्हणून ज्याला आपण नांव देतों, त्याचा इतिहास लिहितांनाहि कौलिक पद्धतीला सोडून देतां येत नाहीं. जोंपर्यंत पृथ्वीतलावर कुलभेद आहे, तोपर्यंत कौलिक पद्धतीनें इतिहास लिहिणें अपरिहार्य आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
एका जातीचीं शंभर वर्षे इराणच्या, तर पन्नास वर्षे स्पेनच्या व पाऊणशें वर्षे पंजाबच्या इतिहासांत द्यावीं लागतात, आणि सुसंगत हकीकतीचें सामग्र्य म्हणून ज्याला म्हणतात, तें नष्ट होतें. अमुक देश, अमुक लोकांचा, असें कायमचें ठरल्यावर दैशिक पद्धतीचा उपयोग चांगला होतो. परंतु, पंधरा हजार वर्षांचा मानवेतिहास लिहिण्याला ही पद्धति बरीच निरुपयोगी होते. कालानुक्रमिक व दैशिक ह्या दोन्ही पद्धति गोंधळाच्या व निरुपयोगी होतात, ह्याचें कारण उघड आहे. इतिहास निव्वळ कालाचाहि लिहावयाचा नसतो किंवा देशाचाहि लिहावयाचा नसतो. इतिहास लोकांचा म्हणजे मानवसमाजाचा लिहावयाचा असतो. आतां हें खरें आहे कीं, मानवसमाज देशकालावछिन्न असतो. तत्रापि, इतिहासाचा मुख्य कटाक्ष मनुष्यसमाजावर असतो, हें कांहीं विसरतां येत नाहीं. तेव्हां मनुष्यसमाजाच्या धोरणानेंच इतिहास लिहिला असतां, तो सुबोध, सुसंगत, व स्पष्ट होईल, हें उघड आहे. आतां, पूर्वप्रंलयीन कालापासून असें आढळून आलें आहे कीं, मनुष्यसमाजांत निरनिराळीं कुलें आहेत, व निरनिराळ्या कुलांच्या चाली, रीति, भाषा, धर्म, हेतु व नीति कमीजास्त मानानें भिन्न आहेत. हीं निरनिराळीं कुलें अंत: प्रवृत्तीनें किंवा कुलान्तरांच्या स्पर्शानें वाढली कशीं, सुसंस्कृत झालीं कशीं, मेलीं कशीं, जगलीं कशीं, स्तब्ध राहिलीं कशीं, आणि मिश्र किंवा शुद्ध बनलीं कशीं, हें पहावयाचें म्हणजे ह्या कुलांचा इतिहास अथपासून आतांपर्यंत दिला पाहिजे. ह्यालाच मराठींत कौलिक व यूरोपीयन भाषात Ethnographic पद्धति म्हणतात. यूरोपीयन भाषांत केवळ कौलिक पद्धतीवर लिहिलेला असा एकहि इतिहास नाहीं. कारण उघड आहे कुलशास्त्र व कौलिकपद्धति युरोपांत उद्भवून फार वर्षे झालीं नाहींत. तेव्हां कौलिक पद्धतीनें लिहिलेला इतिहास इतक्यांतच निर्माण होणार कोठून? कौलिक पद्धतीनें आपण मानवसमाजाचा इतिहास लिहीत आहों, असें हेल्मोल्ट आपल्या इतिहासाच्या दुस-या तिस-या खंडाच्या प्रस्तावनांत म्हणतो. परंतु त्याचा मूळसंकल्प दैशिक पद्धतीनें लिहिण्याचा होता, हें त्याच्या ग्रंथांतील व्यवस्थेवरूनच दिसत आहे. भारतवर्षांतील आर्यांचा इतिहास दुस-या खंडांत देऊन, तिस-या खंडांत इराणांतील आर्यांचा, व पांचव्या खंडांत यूरोपीयन आर्यांचा त्यानें समावेश केला आहे. म्हणजे आर्यकुळीचा कौलिक पद्धतीनें एके ठिकाणीं इतिहास देण्याचें सोडून, दैशिक पद्धतीनें निरनिराळ्या देशांचा इतिहास पूर्व दिशेनें प्रारंभ करून पश्चिम दिशेला समाप्ति करण्याच्या इराद्यानें, तो देतो हें उघड आहे. येणेंप्रमाणें कौलिकपद्धति तो घेत नाहींच; परंतु जी घेत आहे म्हणून म्हणतो, तीहि बरोबर आहे, असें म्हणतां येत नाहीं. कारण, ध्रुवसिद्धान्तानें मानवसमाजाची जी नवीन कुलव्यवस्था करणें अपरिहार्य होणार आहे, तींत सध्यां ज्यांना यूरोपीयन आर्य म्हणतात, त्यांपैकीं बरेच समाज अनार्य ठरण्याचा संभव आहे. Ethnographic म्हणजे कौलिकपद्धतीनें महाराष्ट्रांतील कोणा गृहस्थाला मानवेतिहास लिहिण्याची इच्छा झाली तर, आर्यकुल कोणतें व अनार्य कुलें कोणतीं, तें पाहून, मग त्यानें आपल्या कामाला लागावें, अशी सध्यां स्थिति आहे. मानवकुलांचें प्रस्तुतचें यूरोपीयन वर्गीकरण मागें पडण्याचा संभव फार दिसतो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
२८. अखिल मानवसमाजाच्या इतिहासाचें वास्तवरूप कोणतें ह्या प्रश्नाचा उलगडा करतां करतां जग, विश्व, World, Universe, वगैरे शब्द योजावे लागले आहेत. परंतु, ज्या अर्थाच्या विवक्षेनें हे शब्द योजिले, त्याची उपलब्धि व्हावी तशी ह्या शब्दांपासून होत नाहीं. History of the World किंवा History of the Universe ह्या वाक्यांतील World व Universe ह्या शब्दांचा अर्थ”अखिल मानवसमाज” असाच केवळ नाहीं. World या इंग्रजी शब्दाचा अर्थ आपण रहातों ती पृथ्वी किंवा संपूर्ण ब्रह्मांड असाहि आहे. Universe ह्या शब्दाचाहि असाच व्यापक अर्थ आहे. History of the World किंवा Universe लिहूं पहाणा-यांच्या मनांत पृथ्वीचा किंवा ब्रह्मांडाचा इतिहास लिहिण्याचा काहीं विचार नसतो; फक्त पृथ्वीवरील मनुष्यजातीचाच तेवढा इतिहास लिहिण्याचा आशय असतो. World म्हणजे मनुष्यकोटी असाहि एक अर्थ होतो; परंतु त्याच्याबरोबरच ब्रह्मांडाचीहि कल्पना मनांत उद्भवते. मराठींतील जग व विश्व, हेहि शब्द असेच भ्रामक आहेत. तेव्हां असले हे भ्रामक शब्द काढून टाकून, “जगाचा किंवा विश्वाचा इतिहास,” असे बडे बडे शब्द न योजतां “मानवेतिहास” असे सार्थ शब्द योजणें प्रशस्त दिसतें. ह्या योजनेनें पुष्कळ निरर्थक संदेह नाहींसे होतील. व इष्ट अर्थाला योग्य शब्द वापरल्यासारखें होईल. परंतु, बाब विशेष महत्त्वाची आहे, असें नाहीं.
२९. मानवेतिहासाचें वास्तव रूप निवडल्यावर तो लिहिण्याची सशास्त्र पद्धति कोणती, तें पहाणें ओघासच येतें. कारण, वेडावांकडा कां इतिहास होईना, तो कोणत्या तरी पद्धतीनें लिहिला पाहिजे, मग ग्रंथकर्त्याच्या मनांत पद्धतीचा स्फोट झाला असो किंवा नसो. अगदी गचाळ मानवेतिहास सोडून दिले व मान्य तेवढेच जमेस धरले, तर असें दिसून येतें कीं, व्यवस्थितपणें मानवेतिहास लिहिण्याच्या यूरोपियन लोकांच्या तीन पद्धति आहेत:- (१) कालानुक्रमिक पद्धति; (२) दैशिक पद्धति; व (३) कौलिक पद्धति. ऐतिहासिक कालाच्या प्रारंभापासून दरवर्षी किंवा दर शंभर वर्षात पृथ्वीवर काय काय वृत्तें घडलीं, त्यांची कालानुक्रमानें हकीकत देण्याची जी पद्धति तिला कालानुक्रमिक पद्धति म्हणतात. तोडून घेतलेल्या वर्षी किंवा वर्षसंख्येंत मानवसमाजाच्या निरनिराळ्या जातींनीं निरनिराळ्या देशांत काय उद्योग केला, तें कालानुक्रमानें सांगण्याचा ह्या पद्धतीचा हेतु असतो. परंतु घेतलेल्या वर्षसंख्येंत कित्येक जाती लोपून गेलेल्या असतात, कित्येक जातींचे उद्योग व उलाढाली अर्धवट संपलेल्या असतात व कित्येकांनीं देशान्तरें केलेलीं असतात. त्यामुळें होतें काय कीं, कित्येक जातींचे वृत्तांत मध्येंच कोठेंतरीं संपतात. कित्येकांचे मध्येंच सोडून द्यावे लागतात व कित्येकांचे धागे पुन: पुढल्या वर्षसंख्येंत धरणें प्राप्त होतें. वारंवार असेंहि होतें कीं, एका काळीं मानवसमाजाचीं चळवळ मूळचीच फार थोडी असल्यामुळें किंवा तिची माहितीच थोडी असल्यामुळें, लिहावयाला मुळींच हकीकत नसते; किंवा असलीच तर अतिच थोडी असते. उलट कधीं कधीं असाहि प्रसंग येतो कीं, शेंकडो जातींच्या एकाच काळीं हालचाली सुरू होतात व त्यांच्या हकीकतीची व्यवस्था लावतां लावतां पुरेपुरेसें होतें. कालानुक्रमिक पद्धतींत हा असा गोंधळ माजत असल्याकारणानें मानवेतिहासलेखनाला ती फारशी प्रशस्त नाहीं दैशिकपद्धतींत देखील असेच दोष आहेत. वस्तुत: पहातां देश म्हणून देशांना असा इतिहास मुळींच नसतो. पृथ्वीच्या पाठीवरील निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या जातींनीं शेंकडों वर्षे कायमची वस्ती केल्यावर तत्तज्जातिविशिष्ट देशांचा म्हणजे त्या देशांतील लोकांचा इतिहास लिहिण्याची शक्यता उत्पन्न होते. प्रलयाच्या अलीकडील प्राचीन काळीं अमुक देश अमक्याचा अशी व्यवस्था नसल्यामुळें किंवा माहीत नसल्यामुळें कधीं कधीं अनेक प्रांत सोडून देणें भाग पडतें व अर्वाचीन काळाच्या जसजसें जवळ येत जावें, तसतशी प्रत्येक देशाची माहिती फुगत जाते. शिवाय, एकाच देशांत एकापाठीमागून एक अशा अनेक लोकांचीं राज्यें होत जात असल्यामुळें, दैशिक पद्धतीनें हकीकतीचा धागा सुसंगत रहात नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
२७. जगाच्या इतिहासाचें खरें रूप कसें असावें, तें वरील विवेचनावरून स्पष्ट झालें आहे. (१) वर्तमान क्षणापर्यंतचा सर्व भूतकाल हा त्याचा काल; (२) पृथ्वीवरील सर्व देश त्याचें स्थल; (३) आणि नष्ट व विद्यमान सर्व मानवसमाज त्याचे विषय समजले पाहिजेत. तसेंच, (४) स्वतःच्या किंवा समाजाच्या किंवा दिशेच्या किंवा स्वकीय कालाच्या अभिमानाला पडून, कोणत्याहि प्रकारच्या पूर्वग्रहांना थारा देतां उपयोगी नाहीं. शिवाय, नीति, धर्म वगैरे शास्त्रांतील चलग्रहांच्या अनुरोधानें शुभाशुभ किंवा इष्टनिष्ट मतांचें अधिष्ठान मनांत कल्पून हकीकतीवर अभिप्राय देण्याच्या किंवा हकीकत इष्टनिष्ट भासविण्याच्या खोट्या भरीस पडतां कामा नये. (५) निर्मत्सर, तटस्थ, निरहंकर व निर्लेप वृतीनें झाली असेल ती हकीकत प्रामाणिकपणानें दिली पाहिजे. असल्या हकीकतीला खरा व विश्वसनीय इतिहास म्हणतात. जगाचा असा इतिहास यूरोपीयन इतिहासकारांच्या हातून अद्याप लिहिला गेला नाहीं. चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी इंग्लंडांत राइट नांवाच्या मनुष्यानें Universa History म्हणून एक जगाचा इतिहास लिहिला. त्यांत Sacted, Prophane, Ancient, Modern वगैरे इतिहासाचे भेद सांगून, स्थलोस्थलीं पूर्वग्रहात्मक असतील नसतील तितके सर्व दोष केलेले आहेत. चाळीस वर्षांपूर्वी इंग्लंडांत इतिहासाची अशी रानटी स्थिति होती. तींतून सुटण्याचा कांहीं जर्मन इतिहासकार अलीकडे प्रयत्न करीत आहेत. अगर्दी अलीकडला असा जगाचा इतिहास हेल्मोल्ट नामक जर्मन गृहस्थाचा होय. याच्या इतिहासांत व राईटच्या इतिहासांत यद्यपि जमीनअस्मानाचें अंतर आहे, तत्रापि, तोहि पूर्वग्रहाच्या दोषांपासून अगदीं अलिप्त नाहीं. शिवाय, इतिहासलेखनप्रारंभीं त्याला व त्यांच्या साहाय्यकर्त्यांना टिळकांचा ध्रुवसिद्धान्त माहीत नसल्यामुळें त्याचाहि इतिहास सध्यांच जुनाट झाल्यासारखा आहे. टिळकांच्या ध्रुवासिद्धान्तानें इतिहासांत फारच मोठी क्रांति झालेली आहे. (१) मानवसमाजाचा ऐतिहासिक काल प्रलयाच्या मागें गेला. त्यामुळें रोम, ग्रीस, इजिप्त, बाबिलोन, असुरिया, सुमेर, इलम, वगैरे देशांचे इतिहास केवळ अर्वाचीन भासूं लागलें. (२) पूर्वप्रलयीनकालीं कांहीं मानवसमाज सुसंस्कृत होते, असें म्हणणें प्राप्त झालें. त्यामुळें, मनुष्यांची मूळची वन्यावस्था होती, वगैरे पूर्वग्रह -जे यूरोपीयन इतिहासकार सत्य मानीत-खोटे ठरले. (३) यूरोपांतील रशियन, दस्य, देन, नॉर्स, वगैरे समाज मूळ कोठून आले असावे, हा जो संशय होता तो फिटण्याच्या मार्गाला लागला. पूर्वप्रलयीनकालीं यूरोपांतील हे समाज आर्यांच्या मेरु पर्वताभोंवतालील प्रांतांत रहात असून, ह्याचें व आर्यांचें म्हणजे देवांचें वितुष्ट असे, असा सिद्धात करण्याकडे मनाची प्रवृति होते. (४) हिमप्रलयाच्या वेळीं आर्यांप्रमाणें ह्याहि अनार्य समाजांतील कांही लोक पश्चिमेकडे निसटून गेले. (५) पूर्वप्रलयीनकालीं भूमीची रचना सध्यांच्याहून निराळी असावी. कदाचित् पुराणांत वर्णील्याप्रमाणें भूमि सप्तद्वीपात्मक असावी. (६) अमेरिकन, इंडियन,फिजियन व ऑस्ट्रेलेशियन लोक प्रलयामुळें तुटून एकीकडे पडले. अशी नाना प्रकारची दुरुस्तीं इतिहासाच्या कल्पनांत ध्रुवसिद्धान्ताच्या प्रणयनानें अवश्य होणार आहे. इतर शास्त्रांत काय काय दुरुस्त्या कराव्या लागतील तें सांगण्याचें हें स्थल नसल्यामुळें, त्यांचा प्रपंच येथें करीत नाहीं.