मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ सल्लास अर्बैन मया व अल्लफ, सन ११५२ फसली,
अव्वल साल छ १ रबिलाखर, २५ मे १७४२,
ज्येष्ठ शुध्द ३ शके १६६४. 

छ ४ रबिलाखर (२८ मे १७४३) काशीबाई बाजीराव पेशवे याची बायको रामेश्वरयात्रा करून आली. छ ३० जमादिलावल (२२ जुलै १७४२) गोपिकाबाई, नानासाहेब याची स्त्री, प्रसूत होऊन मुलगा झाला, नांव विश्वासराव. पुत्र झाल्याची खबर नानासाहेब यांस स्वारीत कळली. बरसात खलास होताच माझे साह्यास यावें अशी विनंति अल्लीवर्दीखान याने बादशहास व पेशवे यांस पाठविली ह्मणजे पत्रें पाठविलीं. परंतु त्या अल्लीवर्दीखानानें ती कुमक येण्याचे अगोदर बरसातीतच आपले मुलुखातील आज्ञेत वागणारे शिपाई लोक जमा करून खटाव्यास भास्करपंतावर चालून जाण्याची तयारी केली. तेव्हा हुगळीची नदी व आजी नदीस पाणी फार असतां होडयांचे पूल बांधून पलीकडे जात असतां होडीचा पूल तुटून हजार पंधराशे माणसे वाहून गेली. तशीच निकड करून रात्रीसच एकाएकी भास्करपंताचे लष्करावर जाऊन अशी गर्दी केली की मराठे लोक लढाई न करितां पळून गेले. नंतर जाधवराव आल्याची खबर कळतांच पुन: मराठे लोक मिदीना परगण्यांत शिरले. परंतु अल्लीवर्दीखान पाठीशी लागला. तेव्हां ते युध्द न करितां आपले स्वस्थळास परत गेले. ते लोक ठिकाणी येण्याचे अगोदर रघोजी भोसला फौजेसहित कर्नाटकांतून वऱ्हाडास पोहोंचला होता. त्यावर भास्करपंताचे मदतीकरितां ज्या वाटेनें भास्करपंत बंगाल्यास गेला त्याच वाटेने जाऊ लागला. हें वर्तमान दिल्लीत बादशहास कळतांच अयोध्येचा नवाब सफदरजंग यास मराठे लोक आपले मर्यादेबाहेर जाऊं देऊ नयेत अशी आज्ञा केली. याशिवाय या कामास मदतीकरितां पेशवे अनुकूल होण्याकरितां त्यास लिहून पाठविलें की, अल्लीवर्दीखानाकडे अजिमबादच्या खंडाबद्दल पैसा येणें त्याबद्दल चौथाई तुह्मांस देऊ व माळवें प्रांताची सनदही देऊं असे पत्र पाठविलें. या आशेनें बाळाजी बाजीराव माळवे प्रांती होते त्यांनी हें पत्र पाहतांच माळवा सोडून मोरशदाबादेस येऊन पोहोंचलें. नंतर अल्लीवर्दीखानास आपल्यास बादशहानें दिलेले पैशाबद्दल तगादा लाविला. तेव्हां त्याने हिशेब करून पैसा देतों असें कबूल केलें. ही पेशवे याची कुमक आल्याची खबर रघोजी भोसले यास कळतांच तो डोंगरांत पळू लागला. त्याचे मागें अल्लीवर्दीखान लागला. परंतु या लोकांचे हाती भोसला लागणार नाही अशी अटकळ करून बाळाजी बाजीराव पेशवे यानी लष्करासह दुसऱ्या आडमार्गाने अल्लीवर्दीखानाचें लष्कर येण्यापूर्वीच रघोजी भोसल्याचा पाठलाग करून साबान महिन्यांत (अक्टोबर १७४२) पहिली लढाई कसबा जावळ येथे झाली. नंतर छ ३० साबान रोजी (१९ अक्टोबर १७४२) भंडाले परगणा खटाव येथें जी लढाई झाली, त्यांत त्या रघोजीचा अगदी मोड केला. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries