मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सुरुसन्न अर्बा अर्बैन मया व अल्लफ, सन ११५३
फसली, अव्वल साल छ ११ रबिलाखर, २५
मे १७४३, ज्येष्ठ शुध्द १३ शके १६६५.

छ ३ जमादिलाखर (१४ जुलै १७४३) ब-हाणपूरकर सुभेदार नासरुद्दौला मयत झाला. छ १ रज्जब रोजीं (११ आगष्ट १७४३) नानासाहेब व भाऊसाहेब यांची स्वारी साता-यास गेली. बरोबर महादाजी अंबाजी पुरंधरे होते. छ २१ रज्जब (३१ आगष्ट १७४३) श्रीमंत मोरेश्वरास गेले. छ ४ साबान (३१ आगष्ट १७४४) खमस अर्बैन सालीं परत आले. नाना फडणीस यांचा जन्म झाला, आई रखमाबाई, चित्रा नक्षत्र, माघ वद्य १४, शुक्रवारी (११ फेब्रुवारी १७४३) वृध्दियोग, बवकरण, अकरा घटका रात्रीस. भाऊसाहेब गंगाथडीस जाऊन आले. भोसले व पेशवे यांचा तह महाराज यांचे विद्यमानें झाला. तो असा कीं, पेशवे आपला पूर्वीचा संपादित जो मोकासा व आपण मिळविलेली जहागिरी आणि पूर्वार्जित ज्या जहागिरी व कोंकण आणि माळवा यांचे अधिपत्य, याशिवाय अमदाबाद व आंग्रे अजमीर यांची खंडणी आणि पाटणा प्रांतांतील तीन तालुके व अर्काट परगण्यातील जमेपैकी वीस हजार रुपये याखेरीज रघोजीचे सत्तेतील कितीएक गांव हे सर्व पेशवे यांनी अनुभवावे, अशी राजानें सनद दिली व रघोजीस सनद दिली की, लखनौ व पाटणा व पैनबंगाला याचा वसूल खंडणी त्यानें घ्यावी व याखेरीज व-हाडपासून कटकपर्यंत खंडणी जमा करावयाचें काम रघोजी भोसले याने करावें. याप्रमाणें राजानें उभयतांस सनदा दिल्या. त्या वेळेस असें ठरलें की, दमाजी गायकवाड यानें माळव्यांतील खंड घेतल्याचा हिशेब पेशव्यांस दाखवून तो ऐवज त्यांचे हवाली करावा. असेंच दाभाडे याजकडेही राजाचे देणें होतें; परंतु त्यावेळेस ती चौकशी झाली नाही. मोमीनखान गुजराथचा सुभा मेला. त्या जागेवर अबदुल अजीमखान होता. त्यास गायकवाड याजकडील लोकांनी नाहीसे केले. पुढे फकीरउद्दौला सुभा झाला. यासाली बारामती महाल बाबूजी नाईक बारमातीकर यास शाहू महाराज यांनी दिला. इहिदे अशरीन मयातैन व अल्लफपर्यंत होता, पुढे जप्त झाला, बाजीराव याचे अमलांत. जनार्दनपंत यांचे लग्न वैशाख वद्य ५ रोजी (२० एप्रिल १७४४) झालें, रामाजी नाईक भिडे यांची कन्या, नांव सगुणाबाई. त्रिंगलवाडी किल्ला कर्णाजी शिंदे यांनी फत्ते केला हे वर्तमान आले. निजामउल्मुलूख याचे पुत्रानें बंड केलें ते मोडावयाकरितां दिल्लीहून निजाम औरंगाबादेस गेला. तेथें युध्द प्रसंग न पडतां पुत्र स्वाधीन करून घेतला. तेव्हां निजामानें विचार केला की, कृष्णेच्या दक्षिणेस मोंगलाईचे मुलुखी अव्यवस्था असून, शिवाय अर्काटचा नबाब सफदरअली यास त्याचा मेहुणा मोर्तीजाखान यानें मारलें. सबब यासमयीं आपलें आधिपत्य स्थापावयास ही संधि बरी आहे. ह्मणजे त्यानें हैदराबादेहून लष्कर जमा करून कर्नाटकांत चालला. तेथें कितीएक मुलूख घेऊन एक वर्षानंतर त्यानें मराठे लोक साता-यास फौज जमा करितात, ह्मणून त्यास शंका उत्पन्न होऊन तो माघारा फिरून हैदराबादेस चालला. तेसमयीं आपला हस्तक अनवरउद्दीन याजला कर्नाटकांतच घांटी ठेविला व आपला नातू हिदायत मोहीदीन उर्फ मुजफरजंग यास अदवानी परगणा देऊन त्यानें विजापुरास रहावें असें केलें; आणि हैदराबादेच्या वाटेने जात असतां आपल्यावर मराठ्यांची मसलत नाहीं असे समजून आपल्या राज्याचा बंदोबस्त करीत तेथेंच राहिला. तेव्हां निजाम दूर गेला असे पाहून मराठे यांचे मनांत आपला स्वार्थ साधावा असें आलें; परंतु रघोजी भोंसला यानें आपले सत्तेंतील बंगाल्यासंबंधी मुलूख गेला तो परत घेण्याचे योजिलें. यामुळें तो मराठ्यांचा बेत सिध्दीस गेला नाहीं. पेशवे यास दुसरी शंका उत्पन्न झाली कीं, आपण कबूल केल्याप्रमाणें रघोजी भोसले याचें निवारण झालें ह्मणजे बादशाहाचा दोष आपल्यावर येईल. याजकरितां दक्षिणेत कामें बहुत आहेत असे मिष करून उत्तरेकडे गेला नाहीं.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries