मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ इसन्ने अर्बैन मया व अलफ, सन ११५१ अव्वल
साल छ २० रविलावल, २५ जून १७४१, ज्येष्ठ
वद्य ६ शके १६६३.

छ १२ रविलावल (१७ मे १७४१) भाऊसाहेब व नानासाहेब साता-यास जाण्याकरितां निघून साता-यास जाऊन छ २१ रजबीं (२१ सप्टेंबर १७४१) पुण्यास परत आले. छ २० सव्वाल रोजीं (१८ डिसेंबर १७४१) भाऊसाहेबासुध्दां हिंदुस्थानचे स्वारीस निघाले ते छ १६ जिलकाद (१३ जानेवारी १७४२) देवठाण्यापैकी पाटोदे येथेपर्यंत जाऊन त्या मुक्कामाहून भाऊसाहेब परत पुण्यास आले, नानासाहेब पुढें हिंदुस्थानात गेले, ते दोन वर्षे तिकडे राहून अर्बा अर्बैनांत माळव्याची सनद घेऊन छ १९ जमादिलाखरास (२९ आगष्ट १७४३) परत आले. सव्वाल महिन्यांत (डिसेंबर १७४१) नासरुद्दोला ब-हाणपूरचा यांची भेट झाली होती. छ ३० जिल्हेज (२५ फेब्रुवारी १७४२) दादासाहेब यांचे लग्न झालें, गणेशभट कर्वे याची कन्या. जिवाजी खंडेराव चिटणीस पौष वद्य ७ रोजी (२ जानेवारी १७४२) वारले. यास बंधू बापू, गोविंदराव व बहिरराव असे होते व पुत्र रामराव व देवराव व जिवाजी असे असून, रामराव सात वर्षांचे परंतु चिटणीशी त्यास सांगितली. बापूजी खंडेराव यास सरदारी सांगितली. हिंदुस्थानांत पेशवे गेल्यावर अलहाबादेस स्वारी करावी असा पेशवे यांचा बेत होता. परंतु भोसले यांचे मनांत पूर्वेकडे बंगाल प्रांताचा लाभ आपल्यासच मिळावा, तिकडे पेशवे याचा प्रवेश होऊं नये. अशी तजवीज करण्यास भोसले यांनी दमाजी गायकवाड व बाबूराव बारामतीकर यांस माळवे प्रांतांत पाठवून त्यास लुटावयास सांगितलें. तेव्हां पेशवे यांनीं अलहाबादेकडे जाण्याचें टाकून माळव्याकडे बंदोबस्ताकरितां गेले. इकडे भास्करपंत बंगाल्याकडे जात असतां बहारपरगणा येथें त्यांनीं स्वारी घातली. त्यावेळेस अल्लीवर्दीखान याच्या पुतण्याचा पुत्र कटाप्रांतीं बंडे करीत होता. त्यास तें बंड मोडण्याकरितां अल्लीवर्दीखान बहाराहून जाऊन बंड मोडून तो मुरशिदाबादेकडे जात असतां, मराठे बहारांत शिरले अशी बातमी आल्यावरून त्याचे पारिपत्याकरितां आला. तेसमयीं मराठी लष्कर सुमारें बारा हजार होतें. परंतु आवई पन्नास हजारांची झाली. अल्लीवर्दीखान ह्याजपाशींही तीन साडेतीन हजार स्वार व चार हजार पायदळ होतें. परंतु त्याच्या लष्कराभोवतीं मराठ्यांनी वेढा घालून त्याचें सामान लुटलें, त्यामुळें त्याचे कित्येक लोक पळाले, व काही मारले गेले. बाकी राहिलेले लोक अजमासें तीन हजार होते. तेव्हा अल्लीवर्दीखानानें मरावें किंवा मारावें असा निश्चय करून युध्द करीत खटावापर्यंत आला. त्या युध्दांत अल्लीवर्दीखान याचे लष्करांत मीरहबीब होता. तो पहिले दिवशींच मराठे यांनी धरिला. नंतर त्यानें मराठयांचा पक्ष स्वीकारून भास्करपंताचा तो परम विश्वासू झाला. यानें तो मुरशिदाबादेस आपला भाऊ कैदेंत होता त्यास सोडवून त्या शहरी राहणार जगतशेट सावकार याचें घर लुटून पंचवीस लक्ष रुपये घेऊन भास्करपंतास मिळाला. त्यास द्रव्याचा लोभ दाखवून बंगाल्यांत ठेवून घेतले. तेव्हां त्याचे मसलतीप्रमाणें भास्करपंत माघारा फिरून हुगळी शहर हस्तगत केलें व खटावापासून मिदिनापूरपर्यंत बहुतेक मुलूख त्याचे हाती लागला. त्यावेळेस हुगळीचे नदीस पाणी फार असल्यामुळें पुढें जाऊन मुरशिदाबाद घेणें राहिलें. दिल्लीहून बादशाहाकडील कारभारी बंगाल्याची खंडणी मागावयास आला. ते अल्लीवर्दीखानानें त्यास उत्तर केले कीं, मराठ्याचे उपद्रवामुळें मला यावेळेस अनुकूल नाहीं, तरी स्वामीनीं माझे साहाय्यास लष्कर पाठवून माझें रक्षण करावें. असें त्याशीं बोलून व-हाडप्रांती भोसल्याचा मुलूख लुटण्यास पेशवे यास सूचना केली. हें वर्तान बरसात सुरू होण्याचे अगोदरपर्यंत झालें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries