Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[८२]                                                                               श्री.                                                                            २३ जुलै १७९५.

विज्ञापना ऐसीजे. अलिजाप्रकरणीं मजकूर नवाबाचे आज्ञेप्रमाणें लिहिला आहे. नवाबानींही स्वामींचें नांवें खरिता दिल्हा हा पाठविला आहे. याचा जबाब माझे मतें असा लिहावा कीं, आपण पत्र फलाण्या मजकुराचें पाठविलें तें पावलें. गोविंदराव यांनीं आपले सांगितल्याप्रमाणें तपशीलवार लिहिलें तें सर्व कळलें. त्यास हा घरगुती मुकदमा आहे. केवळ जमीदारीचा नाहीं. त्यास भडकावूं नये, आणि लांबणीवरही टाकणें ठीक नाहीं. याची वृद्धी न होतां दाबून ठेवावें असें केलें पाहिजे. दोहीं दौलतींची बेहबूद तेंच इकडून करावयाचें. आपण खातरजमा ठेवावी. गोविंदराव कृष्ण यांस व आपणाकडील विश्वासू लायक मातबर असेल त्यास पत्रदर्शनीं लवकर रवाना करावें. गोविंदराव यांनीं अलि जाह याजकडे येते वेळेस जाऊन त्यास चार गोष्टी आमचे तर्फेनें मामूल करून सांगाव्या. यांतच बंदोबस्त होतो. कदाचित् न ऐकल्यास काय त्याचा खुलासा हें समजण्यांत येईल. उपरांत त्याची तदबीर करण्यास काय उशीर ? आपले आमचे विचारानें जी गोष्ट ठरेल त्याचे बंदोबस्तास विलंब लागावयाचा नाहीं. असें खातरजमेनें लिहावें. अथवा अलिजाहकडे जावें हें प्रस्तुत ठीक नाहीं असें मानस असलियास हुजूर गोविंदराव यांची व आपला विश्वासूक असेल त्याची रवानगी लवकर करावी. हे लिहावें. शेवटीं एक शब्द लिहिण्यांत यावा जे, गोविंदराव यास आपण रिकामे पाठविणार नाहीं, कराराप्रमाणें सरकारकामें करूनच लवकर त्यांचे येणें होईल, आणि रवानगीहि कार्यासुद्धां त्यांची आपण करितील हा भरंवसा आहे. नवाबांनी मला पुरवण्या लिहावयास सांगितल्या त्याची मालुमात जमा धरून उत्तर यावें ह्मणजे नवाबास वाचून दाखवावयासी येईल. यांतून माझे पत्रांत काय लिहावयाचें, नवाबाचे पत्रांत किती लिहावें, याचा विचार ठरून अधिक उणें जें सल्लाहात ठरेल त्याची आज्ञा यावी. माझे येण्याचें काय कारण असें स्वामी ह्मणतील. त्यास, नवाबाची वृत्ति प्रस्तुत बहुत नाजुक झाली आहे. नवाबाचे मनांतील हेतु काय आहे जे, या समयांत मला कोणी कशाचा उपद्रव लागूं देऊं नये. नवाबाचे मर्जीचें संरक्षण करून आपले डोईवर घ्यावें असें मनुष्य नाहीं. कोणाचा विश्वासहि नाहीं. नवाबास विश्वास नाहीं, तेव्हां नवाबाचाहि कोणास विश्वास येत नाहीं. धनी आणि चाकर यांतच विश्वास नाहीं तेथील प्रकार काय पुसावा ? त्यांत घरांतील फंद उभा राहिला. याजमुळें नवाबाचे बुद्धीस स्थिरता नाहीं.