मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

नंतर बादशहानें निजामास लिहिलें कीं, तूं लौकर दिल्लीस यावें; नाहीतर मुसलमानी राज्य बुडेल. असें लिहिल्यावरून निजाम दिल्लीस आला. पुढें त्याचें मन वश होण्याकरितां त्याचा पुत्र ग्याजुद्दीन यास माळवा व गुजराथ प्रांताचा अधिकार देऊन सर्व मांडलीक यांणीं याचे हाताखालीं वागावें, असें ठरविलें. या वेळेस निजामाजवळ फौज चौतीस हजार जमली होती. शिवाय तोफखानाही फार होता. बाजीराव पेशवे यांणींही फौज ऐंशी हजार जमवून तयार केली होती. बाजीराव यांणीं अमर्याद मागणें केलें, याजकरितां यांशीं लढावें असा दिल्लीदरबारांत संकेत ठरला. हें वर्तमान बाजीरावसाहेब यांणीं ऐकून आपलेबरोबरचें जड सामान छत्रसाल राजापाशी ठेऊन सडे स्वारीनिशीं यमुनेचे कांठीं उतरला. व त्यास मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे छ १३ रमजान रोजीं (४ डिसेंबर १७३६) वेत्रवती पे॥ भलेसें या मुक्कामीं येऊन भेटले. नंतर छ २८ सवाल (१८ फेब्रुवारी १७३७) आठरे पे॥ चंदावर येथें लढाई झाली. त्यांत मोंगलाचा पराभव होऊन बाजीराव याचा जय झाला. पेशवे यांजकडील इंद्राजी कदम सरदार लढाईत पडला. मग बाजीरावसाहेब परत ग्वालेरीकडे येण्यास निघाले. तेव्हां खानडौरान यानें बाजीरावसाहेब यांस सांगून पाठविल्यावरून माळवा प्रांताचा अधिकार व तेरा लाख रुपये स्वारीखर्च घेण्याचें ठरवून सल्ला केला. नंतर बाजीरावसाहेब कोंकण प्रांती आंग्रे याचे साहाय्याकरितां गेला. तो प्रकार असा कीं, मानाजी आंग्रे याणीं पूर्वी कुलाबा घेण्याविषयीं फिरंगी लोकांचें साहाय्य मागितलें होते त्याप्रमाणें ते येऊन मानाजीस कुलाबा प्राप्त झाला. परंतु तेव्हां जें कांहीं त्यास देऊं केलें होतें, तें दिलें नसल्यामुळें फिरंगी लोकांनीं संभाजीस अनुकूल करून कुलाबा घ्यावयास आले. तेव्हां बाजीराव यांणीं याचें साहाय्य करून आलेले फिरंगी वगैरे फौज हाकून लाविली. तेव्हां मानाजी आंग्रे यांणीं सात हजार रुपये रोख व तीन हजारांचें बिलोरी वगैरे सामान देत जावें, असें ठरविलें. नंतर परत आले. छ १९ र॥वल समान [६ जुलै १७३७] सलासीन. छ १३ रमजान रोजीं [४ जानेवारी १७३७] चिमाजी अप्पा निघून जेजुरी सुप्यापर्यंत जाऊन पुढें आळेगांव तर्फ पाठस येथें गेले. मांडवगणपर्यंत जाऊन छ ६ जिल्काद रोजीं [२६ फेब्रुवारी १७३७] पुण्यास आले. कोंकण प्रांतीं फिरंगी लोकांकडे साष्टी प्रांत होता. तो घेण्याची मसलत ठरवून चिमाजी अप्पा छ १ जिल्हेज [२२ चैत्र १७३७] ह्मणजे अखेर साली चैत्र मासीं निघून कोंकणात गेले. बरोबर राणोजी शिंदे व मल्हारराव होळकर व चिमणाजी माणकर यास घेऊन गेले. व्यंकटराव नारायण घोरपडे इचलकरंजीकर यासही फौज देऊन गोव्याकडे पाठविलें होते. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries