मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ तिसा अशरीन मया व अलफ, सन ११३८ फसली
अवलसाल छ २५ सवाल. २४ मे १७२८,
वैशाख वद्य १२ शके १६५०.

छ १ रविलाखर रोजी (२४ आक्टोबर १७२८) श्रीमंत स्वारीस निघाले. बाजीरावसाहेब तुळजापुराकडे गेले व चिमाजी अप्पा हिंदुस्थानांत दयाबहादर याजवर गेले. माळवे प्रांती दिल्लीचे बादशहाकडून राजा गिरिधर होता, त्यास उदाजी पवार व चिमणाजी दामोदर यांनी युध्दांत ठार मारला होता. त्याचे जाग्यावर दिल्लीहून त्याचा आप्त दया बहादर ह्मणून आला. त्याजवर चिमाजी अप्पा, पिलाजी जाधव व मल्हारराव होळकरसुध्दां जाऊन लढाई केली व त्यास ठार मारिला. ही खबर छ १६ व छ २९ र॥वल (९ व २२ अक्टोबर १७२८) महिन्यांत पुण्यास आली. लढाई उज्जनीवर झाली. दया बहादर मयत झाल्यावर त्याचे जाग्यावर दिल्लीचे बादशहाकडून महंदशहा बंगष याची नेणूक झाली होती. त्याने हिंदुस्थानात येऊन बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याचे मुलखांत बहुत उपद्रव दिला. तो वयाने फार वृध्द होता. त्याच्यानें त्याचा पराभव होईना. सबब त्यानें बाजीरावसाहेब यास माझें साहाय्य करावें ह्मणून पत्र पाठविलें. त्यावरून एकदम बाजीरावसाहेब हिंदुस्थानात नर्मदा उतरून माळव्यांत आपले लष्कर होतें, तें आपले स्वाधीन करून घेऊन चिमाजी अप्पा व पिलाजी जाधवराव यांस परत पाठवून कोंकण प्रांतांतील बंदोबस्त करण्यास सांगून छ २३ साबान (१३ मार्च १७२९) रोजी छत्रसाल राजाची भेट मु॥ धामोरा नजीक मोहोळ येथे घेऊन बंगष याजवर निघाले. छ १० रमजान रोजी (३० मार्च १७२९) जेतपूर मुक्कामी बाजीरावसाहेब याची व बंगष याची लढाई होऊन त्यास छत्रसाल राजानें बुंदेलखंडातून पार घालवून दिले. या उपकाराबद्दल प्रथम त्या राजानें एक किल्ला व झांशीनजीक दोन अडीच लक्षांचा मुलूख दिला. पुढें त्या राजानें आपले मरणाचे वेळी आपल्यास दोन पुत्र आहेत, असा बाजीराव पेशवे तिसरा पुत्र समजून आपले राज्याचा तिसरा हिस्सा बाजीराव यास दिला. छ ४ सवाल (२२ एप्रिल १७२९) बऱ्हाणपुराहून साता-यास पत्रें आली की, श्रीमंतास पुत्र झाला. छ १६ सवाल (४ मे १७२९) दया बहादरावर स्वारी करून चिमाजी अप्पा परत निघून छ १० जिल्हेज रोजी (२६ जून १७२९) पुण्यास दाखल झाले. महमदखान बंगष याचा पराभव झाल्यावर याचाच कोणी कायमखान बंगष पुन्हा श्रीमंतावर लढण्यास आला. तेव्हा त्याशीही छ १० सवाल रोजी (४ मे १७२९) लढाई होऊन त्याचें लष्कर लुटलें. हत्ती घेतले. खाशास मोर्चे लाविले असतां शंभर स्वारानिशी पळून गेला. मु॥ जेतपूर, कान्होजी आंग्रे मयत झाले. याचे पुत्र : १ सेखोजी, १ संभाजी, नाटकशाळा ३ होत्या. त्या तिघींचे ३ पुत्र :- १ तुकोजी, १ येसाजी, १ मानाजी असे होते. सेखोजीस पदाची वस्त्रें मिळाली. श्रीधरस्वामी पैठणास वारले. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries