मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु ॥ खमस अशरीन मया व अलफ, सन ११३४ फसली,
अवल साल छ ११ रमजान, २४ मे १७२४,
जेष्ठ शुध्द ९ शके १६४६.

निजामुन्मुलूक बाहेर गेल्यामुळें दिल्लीचे बादशाहास व त्याचे दरबाराचे लोकांस घातशंका उत्पन्न होऊन हैदराबादचा सुभेदार कंबरजखान यास लिहिलें की, तुह्मी फौज घेऊन निजामुन्मुलूख यास त्याचे स्थानी जाऊ देऊ नये. हें काम तुह्मी केल्यास साहा सुभा दक्षिणचा अधिकार मिळेल. असे पत्र लिहून व त्या अधिकाराची सनदही त्या पत्राबरोबर पाठविली. नंतर कंबरीजखानानें फौज तयार केली. तेव्हां निजामुन्मुलुकानें त्याशी तह करावयाची खटपट बहुतप्रकारें केली. परंतु शेवटास गेली नाहीं. लढाईच व्हावी असें ठरल्यावर निजामुन्मुलूक याणी पेशवे याशी साहाय्य करण्याकरितां बोलाविल्यावरून त्याचे कुमकेस पेशवे यांची स्वारी फौजेसुध्दा जाऊन मोहरम महिन्यांत छ २३ रोजी (२ अक्टोबर १७२४) साकरखेडले येथे मोठा युध्दप्रसंग होऊन कंबरजखान व त्याचे दोघे पुत्र ठार झाले. अमानतखान दिल्लीहून सुभा आला होता तो व त्याजकडील सरदार इभ्राइमखान व अबदुलखान व खाजे अमानतखान वगैरे मयत झाले. १७ हत्ती अमानतखानाकडील पाडाव झाले. निजामुन्मुलूखानें कंबरजखान याचें शीर कापून दिल्लीस पाठवून बादशहास पत्र लिहिलें की, स्वामीच्या दैवयोगानें आह्मी हा बंडवाला मारला. नंतर निजामुन्मुलूक हैदराबादेस गेला. तेथें कंबरीजखानाचा एक मुलगा ख्वाजा आदब किंवा आदप ह्मणून होता, त्याशीं सल्ला करून गोवळकोंडा व इतर किल्ले घेतले. हे वर्तान ऐकून दिल्लीचे बादशहानें निजामुन्मुलूक याजकडील प्रांत गुजराथ व माळव्याचा अधिकार दूर करून माळव्याचे अधिकारावर राजा गिरिधर यास नेमिलें. त्यानें येथील अंमल, फौज त्या ठिकाणी नव्हती, ह्मणून बसविला. परंतु गुजराथचे अधिकारावर सरबुलंदखान यास नेमिले. परंतु पूर्वी निजामुन्मुलूक याचा पुतण्या अंमदखान त्या ठिकाणी अधिकारावर होता. त्यानें शाहूकडील सरदार कंठाजी कदम बांडे त्या प्रांती होता, त्यास अंमदखानाने गुजराथचा चौथ कबूल करून आपले कुमकेस घेऊन अहमदाबादेजवळ सरबुलंदखान याचे लष्कराबरोबर लढून त्याचा पराजय केला. अहमदाबादेंत सरबुलंदखानानें आदम सजायतखान यास ठेविला होता, त्यासही ठार मारिले. सजायतखानाचा भाऊ सुरतेस फौजदार होता.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries