मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सुलतान माजूम पातशाहा औरंगझेबाचे जागी स्थापन झाल्यावर झुलफिकरखानास हैदराबादेकडे लढाईस पाठविलें. तेव्हां शाहूमहाराजांनी त्यास मदत केली. तेव्हा त्यानें पातशाहास सांगितलें कीं तुह्मी शाहूस अनुकूळ करून घेतल्यास तुमचें हित होईल. त्यावरून शाहूस दक्षिणेतील सरदेशमुखीची सनद देण्यास सिध्द झाला. परंतु तेव्हां ताराबाईचे वकीलांनीं तक्रार केल्यावरून, राज्याचा मालक वास्तविक कोण हे ठरेपर्यंत सनद देण्याचें तहकूब ठेविलें. सनदा ताराबाईचे पुत्र शिवाजी यांच्या नांवें तयार झाल्या होत्या. इकडे शाहूमहाराज दिल्लीहून येतांना त्यांणीं वऱ्हाड व खानदेशातील दोन सरदार वश केले व हैबतराव निंबाळकर व नेमाजी शिंदा वगैरे सरदार अनुकूळ करून एकंदर १५००० फौज जमवून साताऱ्यास येत असतां ताराबाईकडील धनाजी जाधवराव व प्रतिनिधि फौजसुध्दां शाहूमहाराजावर चालून आले. त्यांशी लढाई पुण्यानजीक कसबें खेड येथे होतानाना धनाजी जाधवराव शाहूमहाराजास मिळाला. प्रतिनिधि पळून गेले. पुढें त्यास कैद केले. शाहूमहाराज साताऱ्यास आले. गादीवर बसल्यावर परशराम त्रिंबक प्रतिनिधि यास कैद करून गदाधर प्रल्हाद प्रतिनिधी केला, व बहिरोपंत पिंगळे यास कायम पूर्वीप्रमाणें केले. सेनापती धनाजी जाधवराव पूर्वीचें यांजकडे असलेले प्रांताचे वसुलाचें काम सांगितलें. त्या कामावर धनाजीनें दोन कारकून ठेविले. एक अंबाजी त्र्यंबक पुरंधरे व बाळाजी विश्वनाथ; व त्यांची व महाराजांची भेट करविली. पुढे कांही दिवसांनी इ. स. १७१० साली धनाजी जाधवराव यांस पायावर जखम झाली होती त्यायोगें वारणातीरी वारले. त्यांजबरोबर बाळाजी विश्वनाथ होते. धनाजी जाधव विद्यमान अजारी असतांच त्यांचा सर्व कारभार बाळाजी विश्वनाथच चालवीत असत. ह्मणून महाराज यांचीहि प्रीति त्यांजवर बसली होती. धनाजीराव वारल्यावर बाळाजी विश्वनाथ यास सेनाकर्ते असा किताब महाराजांनी दिला. याजमुळे धनाजीराव यांचे पुत्र चंद्रसेन जाधव याणीं बाळाजी विश्वनाथाविषयी द्वेष करण्यास आरंभ केला. सेनाकर्ते हे पद बाळाजी विश्वनाथास इसन्ने अशर मया व अलफ छ १७ रजब रोजी मिळाले.  

३+  

३+१ 

३+२ 

३+३ 

३+४ 

३+५ 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries