तेव्हां नवाबांनीं आजमखान व मुनसी यांजकडे हात दाखविला की, यांचे बोलण्यावर तुह्मांस बोलाविलें. तेव्हां त्रिवर्ग तोंड पाहूं लागले. मजकडून पैगाम नाहीं, ऐसें या प्रश्नांत भाव दाखवून पुढें समेट करून चालविलें. नवाबास ह्मटलें कीं, माझी परवर्ष आपणांस मंजूर आहे कीं नाहीं ? जो जाबसाल खरड्यावर झाला, त्याची खातरजमा आपले सांगितल्यावरून मी तेथें केली, त्याची निभावणी हजरतीस मंजूर असावी, तेव्हां थोडेसें रोषयुक्त होऊन बोलिले कीं, कृष्णराव दौलतखाह त्यांचे तुह्मी पुत्र, तेव्हां तसेंच तुह्मी दौलतखाह. कृष्णराव होते तेवेळेसही श्रीमंतांशीं आह्माशीं लढाया झाल्या, औरंगाबादेस आह्मीं निघून गेलों, त्यासमयीं श्रीमंतांनीं आपलेकडून आमची मुदारात करून दहा लक्षांची जहागीर दिली. आतांचे प्रसंगीं तुह्मीं त्याचे तिप्पट आह्माकडून देवविली, ही दौलतखाही कीं काय? तेव्हां नवाबास ह्मटलें, हजरत बलिले हें मीं ऐकिलें, परंतु माझा अर्ज समजून घ्यावा, मग आज्ञा करावी, माझें बोलणें समजावयाचें नसत्यास उपाय नाहीं. बोला ह्मणून सांगितलें. तेव्हां प्रारंभ प्रथम पासून केला कीं, श्रीमंतांचे अथवा मदारुलमहाम यांचे मनांत गामलती आणि सफाईवेगळ दुसरा खियाल नवता, खलष ज्यांनीं आणला त्यास काढावे इतकेंच बोलणें, परंतु हजरतीस जे सलाह देत होते. त्यांजपुढें आमचें बोलणें रुचीस न पडलें. उभय दौलतींत जो प्रकार न घडावयाचा तो होऊं लागला, चाल चालणें आणि बोलणें मनस्वी झालें, कोंकणचा तालुका हजरत निवडूं लागले, याजपेक्षां अधिक गोष्ठी झाल्या, इतक्याही श्रीमंतांचे कानावर गेल्या, त्यासही पुढें दोस्तीची उमेद किमपि राहिली नाहीं, प्राप्त प्रसंगाचा निर्वाह करणें प्राप्त, ईश्वरें त्याची गालबता केली तेव्हां हजरतीचे बोलण्याप्रमाणें मुकाबला केला असता तर आयास नव्हता, परंतु त्यांनीं आपलें खानदानावर दृष्टि देऊन तसें केलें नाहीं, जाबसालाचें बोलणें घातलें, तेंच बोलणें मी हजरतीशीं बोललों, त्याजपेक्षा अधिक आपले पदरचे बोलिलों नाहीं, याविषयीं मनांत हजरतीचे कोणी संदेह घातला, असेल याची निवृत्ति कशी होईल, याची एक तोड आहे. श्रीमंत व मदारुलमहा यांशीं हजरतीच्या भेटी होतीलच, तेवेळेस त्याची समक्ष रुजू करून देईन, त्यास प्रथम श्रींमतांनीं आज्ञा केली, त्याप्रमाणें आपणासी बोलिलों, त्याजवर हजरतीनीं शेवट निश्चयाच्या फर्दा करून दिल्या, त्या घेऊन गेलों, त्यांस दाखविल्या, भोसले, शिंदे आदिकरून सर्व सरदारांच्या मर्जींस येईना, त्यासमयीं श्रीमंतांस व मदारुलमहाम यांस परस्परें दौलतीचे हुकूम सांगून विनंति जशी करावयाची ती करून बजिदी केली. श्रीमंतांचें मोठें खानदान मदारुलमहाम पूर्वींपासून माहित, बमुरुवंत हजरतीची भीड त्यास गालब, याजकरितां त्यानीं दौलतखाहीचे मार्गें त्या फर्दाच कबूल केल्या. प्रथम बोलणें सरदारांचे आग्रहानें काय होतें तें सर्व राहून कसें ठरलें, पैका तेथेंच घ्यावा ऐसा आग्रह होता, हजरतीचे सांगण्यावर मी खातरजमा तिकडील केली, तेव्हां आपले कुच झालें, इतकी कस्त केली, त्याची शाबासकी मिळावी तें सर्व राहून इतराजी दृष्टीस पडती हें काय?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries