Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

१८१६ व १८१७ सालांतील हकीकत.

शके १७३८ धातानाम संवत्सरे, सु॥सबाअशर मया तैन व अलफ, सन १२२६,
संवत् १८७३, राजशक १४३, इ.स. १८१६।१८१७

(१) धर्माजी प्रतापराव वणजारे याणें बिडाकडे बंड केलें. त्याचें पारपत्यास इंग्रजबहादूर याचे फौजेबरोबर सरकारची फौज बळवंतराव अठवले पाडणीकर यांजबरोबर देऊन पाठविली.

(२) श्रीमंतांची स्त्री कुसाबाई हरिपंत ढमढेरे यांची कन्या, गरोदर होती ती प्रसूत व्हावयास माहुलीस पाठविली. तेथें भाद्रपद वद्य ४, छ १७ सबालीं आवशीचें दहा घटका रात्रींस प्रसूत होऊन पुत्र झाला. त्यास उपजत दंत होते. तो मुलगा अकरावे दिवशीं, भाद्रपद वद्य १४, छ २७ सवाल, अस्तमानीं मृत्यू पावला. पुढें कार्तिक व॥ ७ छ २० मोहरम मध्यरात्रीस माहुलीचे मुक्कामी कुसाबाई मृत्यु पावली.

(३) त्रिंबकजी डेंगळा साष्टीस कैदेंत होता. तेथून भाद्रपद व॥ ६ स पळोन, वरघाटी येऊन, स्वार जमा करूं लागला. श्रीमंतास इंग्रजबहादूर याणीं कळवून श्रीमंतांचे मुलकांत आल्यास धरून आमचे हवालीं करावा असें सांगितलें. त्याजवरून श्रीमंतांनी मामलेदारांस त्रिंबकजी सापडेल तेथें धरून सरकारांत हवालीं करावा ह्मणोन सनदा पाठविल्या, तमाम मुलकांत जाहीरनामे रवाना केले. त्रिंबकजी शंभूमहादेवाचे डोंगरांत राहून स्वारांचा जमाव केला. इंग्रजांचे कैदेंत त्रिंबकजी पडला. तो सुटावयाचा नाहीं, असें असतां सुटला, तेव्हां हें ईश्वरी कृत्य, असें श्रीमंतांचे मनांत येऊन, त्याजकडे ऐवज पाठवून, त्याची आंतून पुरवणी श्रीमंत करूं लागले. ती बातमी इंग्रजी सरकारास लागत गेली; व त्रिंबकजीकडील कारकूनाकडे श्रीमंतांनी नातेपुतें महाल, शंभूमहादेवानजीक आहे, त्याची मामलत सांगितली, यामुळें भास्करपंत फडके यास जिवें मारिलें व आणखी हि माणसे मारिलीं; श्रीमंतांनीं आपले किल्ले पुरंधर व सिंहगड व त्रिंबक, रायगड, असे मोठमोठे किल्ले यांजवर लढाई सरंजामाची तयारी गल्ला वगैरे याची भरती करूं लागले व फौज हि जासती ठेवूं लागल्यामुळें; दिवसेंदिवस इंग्रजी सरकारचे मनांत किलाफ वाढूं लागला.

(४) श्रीमंत पुण्याहून फुलगावी रथात बसून जात होते. पांडुरंगपंत ढमढेरे यांची स्त्री श्रीमंतांजवळ त्यांत होती. फुलगांवचे नजीक श्रीमंतांचा रथ लवंडला. तेथें श्रीमंतांचे आंग दुखावलें. सबब, कांहीं दिवस स्वारी फुलगांवास राहिली होती तेथें भोसले यांची नजर येऊन पोंचली, घेतली, व मोर दिक्षित यांचे कन्येचें लग्न फुलगांवी केलें. त्रिंबकजी फुलगावास येऊन श्रीमंतास चोरून भेटूं लागला, व पेंढार ह्मणून स्वार त्रिंबकजीचे फुलगांवास आसपास फिरो लागले व त्रिंबकजी बराबर स्वार घेऊन, कोकणांत जाऊन परशराम, मुरूड वगैरे गांव पेंढारियाचे बहाण्यानें लुटून बहुत खराबी केली.

(५) आपटयास पेंढाऱ्यांवर इंग्रजी सरकारचे लोक व आबा पुरंधरे याचे स्वार गेले होते. तेथें पेंढाऱ्यांची बातमी येतांच इंग्रजी सरकारचे लोक जाऊन, छापा घालून, कांहीं पेंढारी धरिले. आणि ते माघारी जाग्यावर जावयाचे वेळेस पुरंधरे यांचे स्वार तयार होऊं लागले. याजवरून पेंढऱ्यांविशीं श्रीमंतांची नाखुषी नाही असे लोकांचे मनांत येऊ लागले.