मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

कोल्हापूर

पत्रांक ५२२

श्री.
१७२२

राजश्री येसाजीपंतआपा स्वामी गोसावी यांसी:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित शिदोजी जगथाप मुकाम कर. वीर सां दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखनास आज्ञा करावी. विशेष. आह्माकडील वर्तमान तरः मातुश्री बाईसाहेबांचा व कागलकरांचा बिघाड जाहला. पौष शुद्ध अष्टमीस आह्मांकडील फौज तयार होऊन कागलावर गेली होती. तों कागलकरहि जमावसुद्धां बाहेर पडले. मग त्यांची आमची दृष्टादृष्ट जाहले, परंतु कांहीं जुंझ जाहले नाहीं. च्यार घटका उभें राहून फिरून कागलास गेले. त्यांचा जमाव दोनसें स्वार व च्यारसें प्यादे असें आहे. वडिलांस कळावें, ह्मणोन लिहिलें आहे. दुसरें वर्तमान, तरी शुा ८ अष्टमीस कागलकरांनी बाईसाहेबांचा मामा ? गुरू मारून नेले. दोनसें गुरें व मेंढरें पांचसें असे नेलें. गांवातील माणसें जखमी पांचसात व ठार एक पडला. कागलकराकडीलही थोडे बहुत जाहले. आमचे प्यादे रुईस तीसपसतीस पाठऊन दिले आहेत. रुईची फार आवाई आहे. आपलें पत्र आल्यावर राजश्री भगवंतपंतासहि हटकिलें. त्यास, त्याणीं उत्तर दिलें की रा विसाजीपंतआपा आले म्हणजे काय तें सांगू. वडिलीं लिहिलें होतें कीं, फौजेंत खाऊन राहायाचें प्रयोजन नाहीं. त्यास, त्याणींहि थोडें बहुत पोटास दिलें. आपण सुप्याकडील शाहे लि। त्यास, तिकडील शाह मातबर असला तर, तसेंच लिहून पाठवणें, म्हणजे आह्मी निकाल काहाडून येऊं. नाहींतर, चार दिवस तह ह्मणोन जरूर राहूं. बहुतकरून आण्णा आले ह्मणजे तेहि निरोप देतील. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.

सेवेसीं बाळाजी गंगाधर सां नमस्कार, लि। प्रसिजे, वडिली आशीर्वाद पत्र पाठऊन परामर्ष केला पाहिजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries