Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

प्रस्तावना

Chap. VI, Ethnology and Cast, pp. 307-308
by H. S. Risley. Imperial Gazetteer of India, Vol. I

मराठ्यांना शाक ऊर्फ Scythians ठरविल्यावर रिस्ले पुढें म्हणतात –

The highest class of Marathas is supposed to consist of ninety-six families, who profess to be of Rajput descent and to represent the Kshattriyas of the traditional system. They wear the sacred thread, marry their daughters before puberty, and forbid widows to marry again. But their claim to kinship with the Rajputs is effectually refuted by the anthropometric data now published & c.

येणेंप्रमाणें, महाराष्ट्रांतील मराठे आर्य नाहींत, असा रिस्लेचा नवीन शोध आहे. महाराष्ट्रांतील ब्राह्मण आर्य नाहींत, असे बरळण्यापर्यंत अद्याप मजल पोहोंचली नाहीं. परंतु, तोहि प्रसंग पुढें मागें आल्याशिवाय रहाणार नाहीं. असो. सध्यां ब्राह्मणांशीं आपल्याला कर्तव्य नाहीं. फक्त मराठ्यांच्या वंशाचा विचार करावयाचा आहे. सर रिस्ले यांना आमचा असा सवाल आहे कीं, रजपूत Scythians नाहींत, हें ठरविण्याला जीं प्रमाणें त्यांनीं नमूद केलीं आहेत तींच प्रमाणे मराठे Scythians नाहींत, हें ठरविण्याला समर्पक आहेत. Scythians ऊर्फ शक काठेवाड, गुजराथ व जुन्नर ह्या स्थलीं केव्हां आले व किती दिवस राहिले, हे इतिहासप्रसिद्ध आहे. ते जुन्नरास राज्य करीत होते, त्या वेळीं व त्यांच्या पूर्वी महाराष्ट्रांतील समाज चातुर्वर्ण्यघटित होऊन पूर्ण सुयंत्र झाला होता. अशा समाजांत अहिंदु जे शक ते (हिंदु म्हणून) सामावले जाऊन, महाराष्ट्रांत ज्यांना क्षत्रिय म्हणतात, त्यांच्यांत प्रमुखत्वानें मोडले जावे, हें रजपुतस्थानांतल्याप्रमाणेंच महाराष्ट्रांतहि सर्वस्वी अशक्य आहे. तात्पर्य, महाराष्ट्रांतील मराठ्यांना शककुलोत्पन्न करून टाकण्यांत रिस्ले यांचे तर्कशास्त्र सपशेल तोंडघशी पडलें आहे.

९. अशा नाना प्रकारच्या विपरीत क्लृप्त्या इंग्रज व युरोपियन लेखकांनीं वेळोवेळीं प्रपादल्या आहेत. त्यांच्या मुळाशीं एक मनोविकृति असते. ती ही. इंग्रज, फ्रेंच, जर्मन, वगैरे पाश्चात्य समाजांत शरीरसंबंध वाटेल त्या धर्मबाह्य व लोकबाह्य समाजाशीं होत असल्यामुळें, त्या समाजांतील लोकांचें बीज व रक्त अत्यंत भेसळ झालेलें आहे. त्यामुळें होतें काय कीं, हिंदुस्थानांतील चातुर्वर्ण्यघटित समाजांतही आपल्यासारखीच रक्ताची व बीजाची खिचडी झाली असली पाहिजे, हे यद्वातद्वा सिद्ध करण्याचा मोह ह्या लोकांतील विद्वानांना साहजिक पडतो. परंतु त्यांनीं हें पक्के लक्ष्यांत ठेविलें पाहिजे कीं, हिंदुस्थानांतील जातिबद्ध लोक, शरीरसंबंध करण्याच्या कामांत बौद्धधर्म प्रचलित होण्याच्या पूर्वीपासून फार चिकित्सक आहेत. तेव्हां त्यांच्या वंशासंबंधानें बोलतांना फार जपून बोललें पाहिजे. यूरोपांतील उपमानें हिंदुस्थानाला लावण्यांत बिलकुल अर्थ नाहीं. शक, यवन, किरात, पल्हव, पुंड्र वगैरे अनार्य कुलांशीं आर्यांचा शरीरसंबंध होणें केवळ असंभाव्य आहे. उदाहरणार्थ, प्रस्तुतचा मुसुलमानांचा-अस्सल व बाट्ये-समाज घ्या. हा समाज आज कमींत कमी बाराशें वर्षे हिंदुस्थानांत वावरत आहे. परंतु, कोणी मुसुलमान शरीसंबंधानें किंवा धर्मांतरानें हिंदु झाला व तो क्षत्रियांत मोडूं लागला, असा एकहि दाखला नवसालासुद्धां मिळावयाचा नाहीं. तात्पर्य युरोपियनांचे एतद्विषयक प्रलाप निव्वळ बाष्कळ आहेत.