मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

पत्र रामचंद्रपंत सुभेदार यांस                                                      लेखांक २१४.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ६.
अंताजी निराजी यांजकडे मार्डीस
पाठविले ते छ ५ सवाल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रामचंद्रपंत सुभेदार स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहीत असावें विशेष मौजे वरलेगांव पा मार्डी व मौजे बोरामणी पा सोलापूर या दो गांवचे सिवेचा धारा पेंडवळा सर्व असतां माजुल जागीरदाराचे कारकीर्दीत गांव बेचिराग सबब बोरामणकर वरलेगांवची जमीन दीड चावर पेंडवळ्याची हाद मोडून पेरू लागले सांप्रत आह्मांकडे मार्डी एथील जागीर आल्यानंतर गांवची वस्ती जाली गांवकरी यानी बोरामणकरास आपले जमिनीचा तगादा केला त्यास बोरामणकर यानी कजियाचे राण पोटांत घेऊन चालते राण वरलेगांवचे एथें नांगर धरून कजिया करूं लागले येविषई राजश्री अंताजी निराजी कमाविसदार यानी आपल्यास पत्र लिा वरलेगांवकर गांवकरी यासहि आपल्याकडे पों त्यावरून आपण वीरेश्वर हजारी यास शिवेची चौकसीकरितां पों त्यानी धारा पेंडवळा पाहून बोरामणकर यानी सेव रेटली ऐसे बोलून आपल्याकडे गेले असतां बोरामणकर आगळिक करून वरलेगांवचे राणांत नांगर धरितात यास्तव आपल्यास लिो असे त्यास गैरवाजबी बोरामणकर जमीन घेऊ ह्मणतात येविषई त्यास निक्षूण ताकीद होऊन पेशजीपासोन चालत आल्याप्रमाणें चालावें येविषीचा बंदोबस्त जरूर व्हावा वरलेगांवकराकडील बैल व माणसे बारामणकरानी धरून नेली आहेत ती सोडून देवावी व चालते राण यांचे हे पेरतील त्यास मुजाहीम न देण्याची ताकीद व्हावी व धान्याचे राण निर्णय होय तोपर्यंत उमयतांकडील अमानत असावें पुढे वाजबीचे निर्णयात जिकडील तिकडे चालेल मार्डी परगणा आह्माकडे तो आपलाच असें असतां है बोभाट येणे हे स्नेहाचे जागा अपूर्व वाटले आह्मीं प्रसंगी नसतां परगणेमारीचे उणे पडल्यास त्याची दुरुस्ती आपण करावी ते विस्मरण होऊ लागले याचे काय कारण हे समजले पाहिजे याजकरितां या पत्राचे उत्तर जरूर पाठवावें रा छ ५ सवाल बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries