मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

तथापि आमच्या देशांतील सुधारणेच्छु साधुसंत व युरोपांतील तत्कालीन प्राँटेस्टंट सुधारक यांच्यामध्यें एका गोष्टींत भेद दिसून येतो. वेदकालापासून अलीकडे पाहिलें तर आर्य लोकांचे देव ह्मणजे त्यांच्या अंगीं प्रीति, तेज, माधुर्य, प्रकाश इत्यादि गुण कल्पीत असत. वरुणरुद्रासारखे दरारा उत्पन्न करणारे व मन गांगरून सोडणारेही देव होते, नव्हते असें नाहीं. परंतु साधारणपणें ईश्वराच्या अंगच्या उत्तम गुणाचें ध्यान व चिंतन करण्याकडेच लोकांची प्रवृत्ति असे. शेमिटिक ( Shemitic ) लोकांची कल्पना मात्र निराळी. ईश्वर अतिशय दूर आहे. त्याचें रूप फार उग्र आहे. त्याचें वैभव पाहणें झाल्यास ते एकाएकीं दिसायचें नाहीं. दिसले तरी अंधुक दिसायचें. मनुष्यांनीं पाप केल्यास त्यांस कडक शिक्षा करणारा, शाबासकीपेक्षां शिक्षा देण्याकडेच त्याचा जास्त कल. एखादे वेळेस शाबासकी दिलीच तर भक्तास नेहमीं घाबरून सोडून थरथर कांपावयास लावणारा-अशी कल्पना सर्व शेमिटिक धर्माच्या मूलांत होतीच. परंतु ख्रिस्ती धर्मानें ही कल्पना बाजूस सारण्याचा प्रयत्न करून या मोठ्या खाडीस पूल बांधण्याचें थोडें तरी श्रेय घेतलें. त्या धर्माप्रमाणें ईश्वरानें मनुष्याच्या मांसमय देहांत प्रवेश करून जीसस स्राईस्टचें रूप घेतलें आणि सर्व मानव जातीच्या हिताकरितां आपण हाल सोसून त्यांच्या पापाचें प्रायश्चित्त आपणच घेतलें. ग्रीस, रोम किंवा हिंदुस्थानांतील आर्यधर्मास असला प्रकार करणें कधींच अवश्य वाटलें नाहीं. आमचा देव ह्मणने आह्मीं त्यास मायबाप, बंधुराय, जिवाचा सखा असें मानीत आहोंत. न्यायाधीश, शास्ता किंवा सत्ताधीश असें केव्हांही मानीत नाहीं. तो न्याय करीत नाहीं, किंवा त्याची सत्ता नाहीं ह्मणून नव्हे, तर न्याय देतांना, अधिकार गाजवितांना, शिक्षा देतांना त्याच्या ठिकाणी आईबापांचें प्रेम असतें. मुलानें अपराध करून त्यास पश्चात्ताप झाला तर आईबाप जसे त्यास पोटाशीं धरण्यास नेहमीं तत्पर असतात, तसा ईश्वर आहे ह्मणून, साधुसंतांच्या उपदेशांत व चरित्रांत दयाळु परमेश्वराचें हें स्वरूप जसें ठळक रीतीनें रेखिलें आहें, तितकें एककल्ली धर्मनिष्ठ ब्राह्मणांच्या कल्पनेवरून दिसत नाही. आपणास ईश्वर दिसतो, त्याचें बोलणें आह्मीं ऐकिलें, त्याच्याशी आपण बोललों, त्याची आपली नेहमीं भेट होतें, असें हे साधुसंत खात्रीपूर्वक सांगतात. ईश्वर कोणाशीं बोलला नाहीं असें ते केव्हां केव्हां त्याचें वर्णन करतात हे खरें; परंतु साधारणपणें पाहिलें तर आह्मांस जसें दृश्य वस्तूंच्या अस्तित्वाचें ज्ञान झालें ह्मणजे आनंद होतो तसें । ईश्वराच्या भेटीपासून त्यांना आनंद होई असें दिसे. योगी व वेदान्ती लोक, समाधी लावली ह्मणने ईश्वराशीं आपलें तादात्म्य होते असें ह्मणतात; परंतु नामदेव, तुकाराम, एकनाथ, ज्ञानदेव यांना ही ईश्वराची महत्प्रयासानें झालेली क्षणिक भेट पसंत न पडून ईश्वर आपणाजवळ सदासर्वदा असावा असें त्यांना वाटे व अशा दररोजच्या भेटींत त्यांना जो आनंद होई, ते आनंद योग्याच्या व वेदान्त्याच्या ब्रह्मानंदपापेक्षां जास्त आहे असें ते ह्मणत. या संतांनीं जे चमत्कार केले त्यावर आमचा विश्वास असो वा नसो; पण वरील बाबतींत त्यांनीं केलेल्या विधानांवर मात्र आम्हीं विश्वास ठेविला पाहिजे. ख्रिस्तधर्माच्या देशांत जीसस खाईस्टच्या जन्ममृत्यूबद्दल जितका प्रेमभाव व आनंद वाटत आहे, तितकाच किंबहुना जास्त आनंद व प्रेमभाव अंत:करणांत साक्षात् ईश्वराचें दररोज दर्शन झाल्यापासून होत आहे. हेंच, हेच आमच्या संतमंडळीचें वैभव काय तें हेंच, व सर्व उच्चनीच लोक, स्त्रिया व पुरुष, आजन्म शांति देणारी ही अमूल्य वस्तु आपल्याजवळ सांठवीत आहेत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries