मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

तेथें उभयतांची लढाई होऊन, त्यांत जेर होऊन जयसिंगराव भाद्रपदमासी रेवदंडयास आले, व तेथून पुण्यास गेले. मानाजी आंग्रे यांस पेशवे यांजकडून आश्विन शुध्द १० स वस्त्रें जालीं. जयसिंगराव आंग्रे पुण्यास गेले सबब त्यांची मुलेंमाणसें सागरगडावर अटकेंत होती तीं राज्यांतून काढून बाहेर लावून दिली. ती माणसें व राव आंग्रे यांची बायको सकवारबाई नागोठणें येथें जाऊन सरखेल यांची गढी काबीज करून तेथें राहिलीं. त्यांवर मानाजी आंग्रे यांनी लष्कर पाठवून लढाई जाली. मानाजी आंग्रे लढाई हरले. मानाजीचे लोक मौजे वरवठणें येथें मोर्चे धरून राहिले. शके १७१८ ज्येष्ठमासीं नागोजी आंग्रे दिवाण याजवर जयसिंग आंग्रे यांनी छापा घालून, मानाजीचा मोर्चा मारून, दोन तोफा व कांही दारूगोळा घेऊन गेले. शके मजकुरीं आषाढमासी जयसिंगराव आंग्रे पुण्याहून नागोठण्याचे गढीत दाखल जाले. मुलामाणसांच्या भेटी जाल्या. मानाजी आंग्रे यांचे चार पांचशे लोक मौजे सावरखिंड तर्फ शिरगांव येथें होते. त्यांजवर जयसिंगराव यांनी छापा घालून लोक पिटाळून लाविले. मानाजीचे लोक पोयनाडास मुक्काम करून राहिले. कांही कुलाब्यास आले. जयसिंगराव आंग्रे नागोठण्याच्या गढींतून श्रावणमासीं निघून श्रीएकवीरा भवानी महाल चेऊल येथें लष्करसुध्दां राहिले. मानाजी लष्कर घेऊन चेंऊलास आले. लढाई जाली. तींत देवळाचे ओटीवरून माणसांचे रक्ताचे पूर वाहिले. त्यांत मानाजीचा पराभव जाला. राव आंग्रे यांचीं मुलेंबाळें नागोठण्याहून चेंऊलास आलीं. भाद्रपदमासीं जयसिंगरावानें कुलाब्यास जाऊन हिराकोट घेतला, आणि प्रांताची वसूलबाकी करूं लागले. राव आंग्रे यांनी चढाव करून सागरगड घेतला. सुभेदार, सरनौबत, हसबनीस, सर्व लोक येऊन आंग्रे यांस कोट मजकुरी भेटून नजराणा केला. दुसरे दिवशी खांदेरी येथे राव यांचे निशाण चढलें. मुलें माणसें होती तीं हिराकोटांत नेलीं. प्रांतांत स्वस्थता नव्हती. शके मजकुरीं मार्गशीर्षमासीं आनंदीबाई आंग्रीण ईस देवाज्ञा जाली. नंतर अजबा डबीर, दिवाण मानाजी आंग्रे, लष्कर घेऊन रेवदंडयास आले. तेथून दिवीपारंगी तर्फ उगटें या बंदरीं उतरून रात्रीं चेउलास श्री भगवती येथे राव आंग्रे यांचे लोकांवर छापा घातला. राव आंग्रे यांचे लोक हुशार असल्यामुळें डबीर यांचे लोक कोंडले गेले व मारले. बाकीचे पळून महाराजांचे राज्यांत गेले. राव यांनी बाहेरून फौज मदतीस आणिली. मानाजी आंग्रे यांचा बचाव होईना. आपली आई आनंदीबाई मृत्यु पावली, कोणाचा आश्रय नाहीं, असे पाहून जयसिंगराव आंग्रे यांशी मानाजी फाल्गुनमासी भेटले. सोरटी लोकांस रजा दिली. बाबूराव आंग्रे यांचे लोक मदतीस आणिले होते त्यांसहि रजा दिली. कांही रोजमुरा द्यावा तो राव आंग्रे यांनी दिला नाहीं. ह्मणून शिंदे सरकारच्या लोकांची व यांची लढाई जाली. त्यांत बाबूराव आंग्रे यांचा मोड जाला. ही खबर लष्कर ग्वालेर येथें समजली.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries