Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

प्रस्तावना 

२०. (१) दिलीहून आल्यानंतर बाळाजी विश्वनाथ सासवडास कांही महिने स्वस्थ बसला व नंतर वारला असें ग्रांटडफ म्हणतो. ( Duff, Chap. 13, P.209 ). परंतु तिस-या खंडांतील लेखांक ४५३ वरून व ह्या शकावलीच्या ३८ व्या पृष्ठावरून बेहे येथें स्वारी करून आल्यावर तो वारला हें स्पष्ट आहे. (२) खंडेराव दाभाडे १७२१ च्या सुमारास वारला म्हणून डफ म्हणतो ( Duff, chap, 13, P. 209 ) परंतु ह्या शकावलीच्या ६० व्या पृष्ठावर त्र्यंबकराव दाभाडे यास सेनापतिपदाचीं वस्त्रें १७३० च्या जानेवारीस झाली असें लिहिलें आहे. १७२१ च्या सुमारास खंडेराव दाभाडे वारला असता तर त्याच सुमारास त्र्यंबकराव दाभाड्यास वस्त्रें मिळालीं पाहिजे होतीं. शिवाय १७३० पर्यंतच्या स्वा-यांत खंडेराव दाभाड्याचें नांव वारंवार येतें. ग्रांटडफनें खंडेरावाची समाप्ति १७२१ त केल्यामुळें, १७३० पर्यंतच्या त्याच्या सर्व हालचाली त्यास गाळाव्या लागल्या. १७२६ तील श्रीरंगपट्टणावरील स्वारींत व १७२७ तील निजामावरील स्वारींत खंडेराव होता. (३) १७२० च्या एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंत बाजीराव कोठें होता ह्याचा पत्ता ग्रांटडफला नव्हता (Duff, chap. 13, P. 209 ); त्याचा उलगडा प्रस्तुत प्रस्तावनेंत मीं केला आहे. (४) १७२० तील बारामतीवरील लढाई व १७२१ तील पुरंदर व जुन्नर येथील लढाया, डफला माहीत नव्हत्या. (५) १७२१ तील बाजीरावाची विजापुकडील स्वारी डफच्या पुस्तकांत नाहीं. विजापुराकडे दंगा झाला होता म्हणून तो लिहितो (Duff, 210 ). परंतु बाजीरावाच्या स्वारीमुळें ही गडबड झाली होती हें त्यास माहीत नव्हतें. (६) निजामाच्या सरदारांची १७२२ तील अर्कांटावरील स्वारी डफच्या पुस्तकांत नाही. (७) १७२२ तील ऐवजखानचा पराभव, १३२३ तील अनुपशिंगाची भेट व बाधेलखंडांतील बाजीरावाची स्वारी डफला माहीत नव्हती. (८) १७२३ तील मल्हारराव होळकराच्या बुंदेलखंडांतील स्वारीचा पत्ता डफला नव्हता. (९) हैदराबादेंतील कंबरजखानावरील फतेशिंग भोसल्याच्या स्वारीचा वृत्तांत डफच्या ग्रंथांत नाहीं. (१०) १७२६ च्या श्रीरंगपट्टणच्या स्वारीचा वृत्तांत डफ बहुतेक मुळींच देत नाहीं, तो ह्या शकावलींत बराच दिला आहे. (११) १७२६ च्या नोव्हेंबरच्या, १७२८ तील पालखेडच्या लढाईपर्यंतच्या उलाढालीची हकीकत डफ देत नाहीं, तिचा ह्या प्रस्तावनेंत निर्देश केला आहे. (१२) चिमाजीअप्पा १७२८ च्या नोव्हेंबरांत गुजराथेंत गेला म्हणून डफ म्हणतो. परंतु तसा प्रकार नसून त्यावेळीं चिमाजी दयाबहादरावर माळव्यांत गेला होता. (१३) अहमदखान बंगष व कायमखा बंगष यांचा पराभव बाजीरावानें १७२९ मेंत केला. ग्रांट डफनें बंगषांचा पराभव १७३३ त करविला आहे (Duff, 227 ). १७२८ पासून १७३४ पर्यंतचा डफचा सर्व वृत्तांत येथूनतेथून चुकला आहे. (१४) छत्रसालाची पहिली भेट १७२९ त झाली असून ती ग्रांट डफनें १७३३ त घातली आहे. (१५) १७३० तील चिमाजी अप्पाच्या पायागडच्या स्वारीचा पत्ता डफला बिलकुल नव्हता. (१६) १७३१तील मांडोगडची चिमाजीची स्वारी डफला माहीत नव्हती. (१७) १७३२ त बाजीराव कोंकणांत गेला होता ह्या गोष्टीचा उल्लेख डफ करीत नाहीं. (१८) १७३३ च्या एप्रिलांत बाजीरावानें छत्रसालाची दुस-यांदा भेट घेतली. हीच पहिली भेट असें ग्रांट डफ समजतो. ह्याच भेटींत छत्रसालानें बाजीरावाला तृतीयांश राज्य व मस्तानी दिली असावी. मस्तानीला पहिला पुत्र केव्हां झाला ह्याची मिति कळली असतां, छत्रसालानेंच मस्तानीला बाजीरावाला दिली ह्याचा निश्चय होईल. (१९) कान्होजी आंग्रे १७२८ च्या सुमारास वारला म्हणून डफ म्हणतो (Duff, 230 ) परंतु कान्होजी १७२९ च्या जुलैंत वारला हें निश्चित आहे (खंड ३, लेखांक ३२७ व ३२८) (२०) शेखोजी आंग्राला ग्रांट डफ सखाजी म्हणतो व तो कान्होजीनंतर लवकरच वारला म्हणून लिहितो. परंतु शेखोजी १७३३ च्या सप्टंबरांत वारला (शकावली पृ. ६९). (२१) १७३४ जानेवारीपासून जुलैपर्यंत बाजीरावाने खानडौरावर हिंदुस्थानांत स्वारी केली. ही स्वारी ग्रांटडफनें १७३६ सालांत घातली आहे. (२२) १७३४ च्या नोव्हेंबरापासून १७३५ च्या जुलैपर्यंत पिलाजी जाधवानें कमरुद्दीन वजिरावर स्वारी केली. ह्या स्वारीचा पत्ताच ग्रांटडफला नव्हता. (२३) १७३५ च्या फेब्रूवारीत बाजीराव कोंकणांत गोवळकोटच्या स्वारीस गेला होता. १७३२ पासून १७३५ पर्यंत तीन वर्षे जंजि-यावर मोहीम चालली होती. तींत बाजीराव दोनदां गेला व तींतून परत आला. ह्याचा नीट उलगडा डफला करतां आला नाहीं. हा उलगडा नीट न करता आल्यामुळें १७३४ तील खानडौरावरील स्वारी १७३६ त न्यावी लागली व १७३६ तील स्वारी अजीबात गाळावी लागली. (२४) १७३५ नोव्हेंबरापासून १७३६ जुलैपर्यंत बाजीरावानें अजमीर-पुष्करावर स्वारी केली. ही स्वारी डफनें गाळली आहे. (२५) १७३६ च्या नोव्हेंबरापासून १७३८ जुलैपर्यंत बाजीरावानें भेलशावर स्वारी केली. हिचा वृत्तांत डफनें दिला नाहीं. (२६) फत्तेसिंग भोसल्यानेंहि १७१७ पासून १७४२ पर्यंत निजामावर, चंद्रसेन जाधवावर, कोल्हापूरकरांवर, कर्नाटकांत व कोकणांत एकसारख्या २५ वर्षे स्वा-या केलेल्या आहेत. त्यांचाहि निर्देश, डफने फारसा व सालवार कोठें केला नाहीं. (२७) दमाजी व पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम बांडे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, कान्होजी भोसले व रघोजी भोसले यांच्याहि १७४० पर्यंतच्या स्वा-यांचा सालवार निर्देश डफनें केला नाहीं. (२८) कान्होजी आंग्रयाच्या समुद्रावरील युध्दांचाही १७०७ पासून १७२९पर्यंतचा ईतिहास डफनें बहुतेक बिलकुल दिला नाहिं.