मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ४९९

श्रीगजानन
१७२२ श्रावण शुद्ध १३

पुा। वडिलांचे सेवेसी शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना. राजश्री यशवंतराव होळकर यांचे लष्करांत रा। बाळाजी भाईजी व सदाशिव भाईजी व रामचंद्रजी लोहारेकर बोरनारे जवळ आहे. तेथील ग्रहस्थ हे होळकराचे बहुत स्नेही आहेत. पेशजीं मल्हारराव यांचा कारभार रामचंद्रभाईजी करीत असत. पुढें मल्हारराव यांची गर्दी जाहल्यावर उभयतां सदाशीवपंत व रामचंद्र यांस कासीराव यांणीं कैद केलें. ते दोन वर्षें कैदेंत वाफगांवचे किल्यावर होते. पुढें बाळाजी भाईजी लोहो-याहून येऊन, कांहीं जिवामाफक दरबार खर्च काशीराव यांचे लष्करांत व हुजूर याप्रों करून, उभयतां बंधु मोकळे केले आणि घरीं लोहो-यास गेले. त्याजकडे आमचा ऐवज साडेबारासें येणें आहे. त्यांचा आमचा स्नेह बहुत. जातेसमईं दोन तीन वेळां आह्मांकडे भेटावयासीं आले होते. घरीं जाऊन, दोन तीन महिने राहून, पुढें येशवंतराव होळकर यांचे लष्करांत जावयाचा मंछबा मारनिलेचा होता. त्यास, ते घरीं जाऊन एक वर्ष जाहलें. कोठें आहेत याचा ठिकाण नाहीं. त्याचा व होळकर यांचा स्नेह येथील केवळ+++होता. त्यास या तिघांचा शोध तेथें बारकाईनें लावावा. तिघांतून एक तेथें असल्यास, आम्हांस लिहोन पाठवावें. आमचें पत्र व तुह्मी आमचें भाऊ असें कळलें असतां प्राण देऊन, तुमचे माहालांचा समस्त बंदोबस्त करितील, आणि आमचा पैसाही त्याजकडे आहे. तरी याचा शोध अगत्य लावावा. येथें असतां येशवंतराव व ते बंधू याप्रों घरोबा होता. याजकरितां लिहिलें आहे. शोध लागल्यास जलद लिहून पाठवावें. म्हणजे तुम्हांविशीं वगैरे एक पत्र पाठऊं. म्हणजे ते सर्व बंदोबस्त करितील. हा भरंवसा जाणोन, वडिलांस लिहिलें आहे. वरकड सविस्तर यजमान यांणीं तुम्हांस लिहिलें आहे. त्याजवरून कळेल. आपला जीव जे गोष्टीनें सुटून देशीं येणें होई, असा विचार असेल तो करावा. सविस्तर ल्याहावें. हे विज्ञापना. छ १२ रोवल, श्रावण शुद्ध १३ शके १७२२ सन इहिदे मयातैन व अल्लफ.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries