[२६५] ॥ श्री ॥ ४ नोव्हेंबर १७६०.
चिरंजीव राजश्री दिवाकर जोशी यासि प्रती कृष्ण जोशी आशीर्वाद उपरि येथील कुशल तागाईत आश्विन वद्य १३ बुधवारपर्यंत मु॥ फणीपत येथें सुखरूप असो. विशेष. वर्तमान तरी श्रीमंताहीं महाष्टमीस समधखान व कुतुबशहा मारून, दहा हजार सेना लुटून, कुंजपुरा घेऊन लुटिला. गढी खणून जमीनीबरोबर केली. लोक आभर जाहले. श्रीमंतास भूमिगत सात लक्ष रुपये सांपडले. तेथून कूच करून कुरुक्षेत्रास चालिले होते. इतकियांत अबदाली बागपतापाशीं यमुना पायाब उतरून सोनपथास आला. हें वर्तमान श्रीमंतीं ऐकताच माघारे फिरोन यवनाचे सन्मुख दरमजल फणिपथास आले. यवन येथून दोन कोसावरी राहिला आहे. नित्य थोडें थोडें युद्ध होत आहे. श्रीमंतांहीं चोहोंकडे तोफखाना पसरला आहे. यवनास थोर भय जाहलें आहे. पुढे येववत नाहीं. आमचे सैनिक यवनाचे समक्ष उभे राहून, नित्य शेंपन्नास यवन मारून उंट, घोडी आणितात. दोन हत्ती पेंढारी यांनीं काल आणिले. यवनाच्या सैन्यांत रसद३२१ बंद जाहली. पुढे ओळ वाचण्यासाठी येथे क्लीक करा. आणखी दोन चार दिवसांत यवन चालोन तोफावरी येईल तरी क्षणमात्र बडेल. न ये तर आमचे लोक जाऊन युद्ध करणार. वरकड सर्व प्रकारें करून शुभ चिन्हें होतात व स्वप्नें उत्तम श्रीमंतांस होतात. याजवरून सर्व सैन्यास उत्साह आहे, कीं अबदाली व नजीबखान व सुज्यातदौला आठा चौ दिवसांत क्षयास जातील ऐसें दिसतें. अबदाली शाहानशाहा ह्मणवीत होता. त्यानें युद्धें बहुत केलीं आहेत, परंतु तो दो कोसांवरी येऊन आठ दिवस बसोन कांहीं पराक्रम होत नाहीं. याजमुळें आमची फौज बहुत शेर आहे. अबदालीनें स्वदेशास जावें तरी मार्ग नाही; युद्ध करावें तरी परिणाम नाहीं; उगेंच बसावें तरी भक्षावयास नाहीं. याप्रमाणे विचारांत पडला आहे. मागाहून युद्ध जाहल्यावरी सविस्तर होईल तें लिहूं. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.