[२६३]                                      श्रीगजानन        ३ नोव्हेंबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंदपंत दाजी स्वामीचे सवेसि:

पोष्य नारो शंकर कृतानेक सा।। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ छ २४ माहे रबिलावल मु॥ दिल्ली जाणून स्वकीय कुशल वर्तमान लिहून संतोषवीत गेलें पाहिजे. विशेष. आपलें आमचें बंधुत्व जाणून श्रीमंत स्वामीपासून वरात आपणावर घेतली. ते वरात घेऊन राजश्री कृष्णाजीपंत आपल्याकडे पाठविले आहेत. पंतमजकुरास जाऊन दीड महिना झाला अद्याप ऐवज आला नाहीं. त्यास येथें युद्धप्रसंगाचा समय असतां आपण ऐवजास विंलब करावा हे गोष्ट इष्टत्वाहू दूर असे. आह्मांस येथें खर्चाची निकड विशेष आहे, ह्यणून बंधुत्व जाणून आह्मीं वरात घेतली असतां विलंब ऐवजास व्हावा हें अपूर्व आहे. आतां कृपा करून वायद्यावर दृष्ट न देऊन पंत मशारनिलेबरोबर ऐवज येथें पोहचे तो अर्थ आपण करतील. कदाचित् सावकारी नुकसान वाइद्याबद्दल बसेल तें देऊं. परंतु समयावर दृष्ट देऊन ऐवज आह्मांस अगत्य पोहचावले पाहिजे. + श्रीमंत स्वामीचें पत्र तुमचे नांवें आलें तें पाठविलें असे. अंतरवेदींत मोगलांचे मुलकांत तुमची फौज येऊन मोगलास पायबंद द्यावा ह्मणोन श्रीमंतांची मर्जी. वरचेवर तुह्मांकडे ताकीदपत्रें येत असतां अद्याप आपली फौज प्रांतास येत नाहीं. ऐसें नसावें. लौकर या समयीं येऊन पोहचावे हे उचित असे. वरातेचा ऐवज लाख रुपये स्वारीस मोगलाच्या प्रांतास येतां समागमें आणावा. अथवा झांसीकडे ऐवज पावे तें करावें. साडेसवीस हजार रुपये घाटमपूर वगैरे वरातांचे बलगोविंद याचे येथें पेशजी वरातापैकीं पावले न पावले. आह्मांस सावकार मजकुराची रसीद न आली. त्यास हें कैसें वर्तमान तें लिहावें व ऐवज पावला नसेल तर ताकीद करून सत्वर पावे तो अर्थ करावा. बहुत काय लिहिणें. हे विनंति.

पे॥ कार्तिक शुद्ध ७ शनवार, मु॥ इटावें.