[४७२] श्री. १७ मार्च १७५६.
पौ चैत्र शुध्द १
शके १६७८ धातानाम.
चरणरज भगवंत भैरव सा नमस्कार विनंति. लष्करचें पत्र फाल्गुन शुध्द १२ चें आलें. तेथें राजकी वर्तमान कीं दोन महिने मोर्चे देऊन झाले. तह कांहीं न ठहरे. आणि नवाब आलियावर तह ठहरला तर यशाचे विभागी ते होतात. ऐसें जाणून श्रीमंतांनीं फाल्गुण शुध्द ११ शुक्रवारीं हल्ला केला. तेव्हां मुजफरखान वगैरे यांच्या तीन चक्क्या होत्या त्या जागा जाऊन त्या टेकडया तिन्ही हस्तगत केल्या. चारशें गाडदी ठार मारिले आणि तीन चारशे जखमी वगैरे धरून आणिले. तोफा आठ व जेजाला बंदुखा मोर्चावर जें साहित्य होतें तें कुल हस्तगत झालें. तेथें आपले मोर्चे कायम केले. त्यांनींही शर्त केली. आपणाकडील शेंसवाशें घोडें पडलें, व शेपन्नास माणूस ठार झालें, दोन तीनशें जखमी जालें. लढाई मोठी झाली. तेव्हां मोर्चे त्यांचे उठवून आपले कायम केले. याजउपरि त्यांसहि पराक्रम कळला. त्यास नवाबही जवळच आले. त्यास, हालीं तह लवकरच ठहरेल. आह्मीं श्रीमंतांचे समागमें होतों. सर्व कवतुक दृष्टीनें पाहिलें. कितीक वर्तमान भेटी नंतर कळेल. मऱ्हाटे माणूस गाडदी आपणाकडील फार जाया जालें. मातबर माणसापैकीं नागोराम भागवत यांस गोळी तोंडास लागली. परंतु जखम हलकी आहे. रा बळवंत गणपत, राजश्री बाबा फडणीस यांचे शालक, यांसी गोळी बरगडीस लागली, ते कापून काहाडली. परंतु ईश्वरें कृपा केली. चिंता नाहीं, रा रत्नाकरपंत वकील यांचे चिरंजीव माणीकराव यांस गोळा लागून ठार जाले. वरकड सर्व कुशल आहेत. हालीं फडच्या लवकर होईल, तेव्हां मागून सविस्तर वर्तमान लिहून पाठवूं. आमचे येणें श्रीमंतांचे समागमें होईल, अलीकडे होत नाहीं. हे विज्ञापना.