[३७२] श्री. २९ आक्टोबर १७४८.
पै॥ कार्तिक व॥ ४ शनिवार
शके १६७० विभव.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. सांप्रत आपणाकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, ऐसें नसावें. सदैव नवल विशेष लिहीत असावें. येथील वर्तमान तरी :-
यवनाकडील किल्ला हुजूरची आज्ञा नसतां मावळयांनी गडगडा घेतला. त्यास, सांप्रत यवनापासून अंतर नसतां आपण स्थल घेणें उचित नाही, यास्तव माघारा घ्यावा ऐसा विचार केला असतां, मावळयांनी जीवधन घेतला. याजमुळें कलहचसा दिसोन आला. आमचे मनांत नसतां ईश्वरइच्छेनें या प्रकारें कलहावर गोष्ट पडली. असो. याउपरी नासरजंग विरुध्द न दाखवितां स्नेहाचें बोलणें बोलतील चालतील तर आह्मांस त्यांचे स्नेहापेक्षां कांही अधिक नाही. जर विचार न करितां, त्वरा करून, या रोखें कूच केले, तर लौकिक एक प्रकारचा होऊन काम इरेस पडणार. मग किल्ले दिल्हियानें आह्मांस लोक भिऊन दिल्हे असें ह्मणूं लागतील. असो. ईश्वरी इच्छा प्रमाण! तेथें आमचा उपाय काय ? उगेंच वर्तमान तुह्मांस कळावें ह्मणून लिहिलें असे. या दिवसांत तेथील फौजेचे व तोफखानियाचे वगैरे जें वर्तमान आढळेल तें त्वरेनें काशिदास अजुरा देऊन, अगत्य तहकीक करून सविस्तर लिहित असो. हे दिवस संधीचे आहेत. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. सर्व संकटें अंतर्बाह्य स्वामीचे कृपाप्रतापें दूर होतील. हे विनंति.