नक्कल
[३७] श्री २१ अगस्ट १७५३
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री विष्णुपंत स्वामी गोसावी यांस. पे॥ बाळाजी बाजीराव प्रधान. नमस्कार. विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. श्रीपरमहंसबावा यांचा ऐवज श्रीमत् सौभाग्यादि संपन्न मातुश्री बाईसाहेब कैलासवासी वाडा दुसरा यांचे सरकरांत होता, रुपये १,००,००० एक लक्ष. तो ऐवज बाईसाहेब यांणीं राजश्री रघोजी भोसले यांस कर्ज दिल्हा. रघोजी भोसले यांचे खत परमहंसबावा यांचे नावें करून घेतलें. आणि आपले सरकारांत ठेविलें. त्या उपरी बाईसाहेब कैलासवासी जाहली. यावरी सन तीसांत कोरेगावचे मुक्कामी श्रीमत् महाराज राजश्री कैलासवासी स्वामी याचे सन्निध जगंनाथ चिमणाजी नि॥ परमहंसबाबा याणीं फिर्याद केली, बावाचा ऐवज मातुश्री बाईसाहेबांकडे त्याची विल्हे विष्णुपंतास आज्ञा करून करवावी. त्याजवरून श्री स्वामीनीं तुह्मांस बोलाऊन नेऊन वर्तमान पुशिलें. तुह्मी बजिन्नस रघोजी भोसले यांचे खत परमहंसबावाचें नावाचें होतें ते दाखविलें, आणि वर्तमान सांगितलें की, बाईसाहेबीं रघोजी भोसले यांस कर्ज दिल्हे, तेव्हां बाईसाहेबास विचारूनच दिल्हें, याची वाट बाईसाहेबच करणार आहेत. मजकडे कांही गुंता नाहीं. ह्मणोन विनंति केली. नंतर तुह्मास राजश्री स्वामींनी हातरोखा दिल्हा कीं, तुह्मांकडे कज्या याचा नाहीं. आणि रघोजी भोसले याजकडे पत्र पाठविलें, की ऐवज सरकाराचा पाठऊन देणें. त्याजवरी महाराज स्वामी कैलासवासी जाहाले. रघोजी भोसले याजकडून ऐवज यावा तो आला नाहीं. तेव्हां जगंनाथ चिमणाजी यांणी हें वर्तमान महाराज राजश्री राजारामसाहेब याजपाशीं पुन्हां सांगोन फिर्याद केली ते समयी तुह्मीं राजश्रीपाशी यथास्थित वर्तमान सांगोन निवेदन केलें. हा कज्जा आह्मांकडे नाही. सरकारांतून याचा निकाल जाहला पाहिजे. कैलासवासी स्वामीच्या स्थानीं साहेब आहेत. साहेबीं या गोष्टीचा निर्वाह करावा. तेव्हां ते गोष्टीचा फडशा जाहला नाहीं. या उपरी सन इसने खमसेनांत जगन्नाथ चिमणाजी याणीं पुणियाचे मुक्कामीं सरकारांत वर्तमान विदित केलें कीं, विष्णुपंताकडील गुंता उरकत नाहीं. तेंव्हा तुह्मांस बोलाऊन आणून वर्तमान विचारिलें, तुह्मीं कोरेगांवचे मुक्कामचे हातरोखे दाखविले, व परमहंस बावाचे नांवचें खत होतें तें दाखविलें. आणि सविस्तर हें वृत्त सांगितलें. त्याजवरून मनास आणितां येविश्शीचा कजिया तुह्मांकडे नाहीं. रघोजी भोसले याजकडील ऐवज येईल तेंव्हा त्यांणीं घ्यावा. याप्रणें जगंनाथ चिमणाजी यास आज्ञा केली. असें असतां सनसलासांत भालकीचे मुक्कामीं मोगलाचा तह रद्द जाहला. ते समयीं रघोजी भोसले याणीं निरोप घेतला. तेंव्हा परमहंसबावाचा ऐवज उगवावा हें जरूर जाणोन मशारनिल्हेस निरोप दिल्हा. त्यावर तुह्मीं त्यास मागलो जाऊन श्रमसकस करून खर्चवेच करून आज्ञेप्रणें मुद्दल ऐवजाचा निकाल करून घेऊन खतें फाडविलीं. ऐवज आणिला. त्याणीं जगन्नाथ चिमणाजी यास धावडशीहून बोलावून आणून आज्ञा केली कीं, लाख रुपयांस तुह्मांस आदेसूद जाहले असेल ते वजा करून बाकी ऐवज पे॥ खर्चवेच मजरा घेऊन परमहंसबावा याचा ऐवज घेणें आणि आपले फारीखत विष्णुपंतास लिहून देणें. त्याप्रमाणें हिशेब रुजूं करून बावाचा ऐवज तुह्मांकडून सरकारांत घेतला. आणि फारीकत जगंनाथ चिमणाजी जवळून तुह्मांस देविलें. या उपरी परमहंस बावा बाबत कांही याचा गुंता राहिला नाहीं. तुह्मांशीं व तुमचे पुत्रपौत्रीयांशीं संबंध नाहीं. तुह्मीं परमहंसबावाचे शिष्य तुह्मांशीं कजिया करावयास संबंध नाहीं. जाणिजे. छ २१ सवाल सु अर्बा खमसेन मया व आलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति. मोर्तब सूद.
मोर्तब आहे.