पहिले. इकडे दक्षिणेंत जे मुसलमान आले, ते आपला देश फार दूरवर सोडून आल्यामुळें त्यांस हिंदूतच मिसळावें लागलें. दिल्लीस अफगान, गिलजी, तुर्क, युझवेग, मोंगल इत्यादि निरनिराळ्या जातींचे मुसलमान लोक उत्तरेकडून बरेच वर आल्याकारणानें मुसलमानी धर्म व चालीरीति यांस एकप्रकारचें कायमचें स्वरूप आलें. दक्षिणेंतील मुसलमानांत असे लोक न आल्यामुळें, मुसलमानी सुधारणा चोहोंकडे पसरली नाहीं.
दुसरें. दक्षिणेंत ब्राह्मणीराज्य स्थापन करणारा जो हसन, हा दिल्लीस राहणा-या गांगो नामक ब्राह्मणाचा गुलाम होता. हा गुलाम पुढे मोठा दैवशाली होईल असें याणें भविष्य वर्तविलें होतें. हसन याणें गांगोचे पूर्व उपकार स्मरून आपण सत्ताधीश झाल्यानंतर आपल्या राज्यास ब्राह्मणी राज्य असे नांव दिले स्वत : स, हसन गांगो ब्राह्मणी असें ह्मणवूं लागला. हिंदूंस उत्तरेंत असा मान कधींच मिळाला नाहीं. दक्षिणेंत मुसलमानांनी अशाप्रकारें या हिंदू ब्राह्मणास पूज्य मानल्यानें, हिंदूचा वरपगडा झाला व पुढें हसननें गांगोस दिल्लीहून आणवून त्याचे हातीं सर्व वसुलाचें काम दिल्यावर तर हिंदूंचें वर्चस्व फारच वाढले.
तिसरें. गांगोकडून ही वसुलाची व खजिन्याची व्यवस्था हळू हळू दक्षिणी ब्राह्मण व प्रभू यांच्या हाती आली. ।चवथे. हिंदुच्या हातीं ही हिशेबाची सत्ता आल्यानें, ब्राह्मणी राज्य नष्ट होऊन त्यांची पुढे विनापूर, वहाड, अहमदनगर, बेदर आणि गोवळकोंडा अशी पांच स्वतंत्र राज्यें झालीं, तरी गांवच्या हिशेबी जमाखर्चात फारशी अगर उरदू या परकीय भाषांचा प्रवेश आला नाहीं. हे हिशेब अवलीपासून अखेरपर्यंत देशी भाषेंतच होत गेले.
पांचवें. दुस-या एका तहेनेंही हिंदूंचा मुसलमानी राज्यावर पगडा बसला. १३४७ त मुसलमानांनी बंड करून महमद तघलक बादशहावर जी सरशी केली, ती तेलंगण व विजयानगर येथील हिंदू राज्यांच्या साहाय्यामुळेंच केली. तेलंगण राज्य ब्राह्मणी राज्यानें बुडविलें; पण विज यानगरची सत्ता पुढें दोन शतकांपर्यंत कायम राहून एकसारखी वाढत गेली. पांच मुसलमानी राज्यांनीं एक होऊन या राज्याचा १५६४ सालीं। तालिकोट येथें मोड केला. या हिंदू राज्याचा मुसलमानी राजांवर फारच जबर परिणाम घडला. हें राज्य एके वेळीं इतकें बलाढ्य होतें कीं, अहमदनगर व गोवळकोंडा हीं दोन्हीं राज्यें एक झालीं, तरी त्यास त्यानें दाद दिली नाहीं. लढाई संपल्यानंतर बिन हत्यारी लोकांची विनाकारण कत्तल करूं नये असा तह करण्यास या राष्ट्रानें एका मुसलमानी राजास भाग पाडलें. या तहाप्रमाणें सरासरी १०० वर्षेपर्यंत हिंदु व मुसलमान हे। दोन्ही राजे विनतक्रार वागत गेले.