लेखांक ८७.
१७०१ फाल्गुन व।। ४ श्री. २४ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाबबाहदूर यांचें मनोगत सर्व प्रकारें श्रीमंतांसीं स्नेह करावा हेंच आहे. दोन जाबसाल कंपेश. येविशीं कल्पना न आणावी. मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें यावीं. यांचीं सर्व सरंजामी जाली. तिकडील पत्राची मात्र गुंता. मीर रजाआलीखां इंग्रजाचे तालुकियांत जाऊन हांगामा शुरु केला. नित्य बातनी येती. आपणांकडील पत्रें सत्वर यावीं ह्मणोन फार ता। लिहिलें. ऐसियास, श्रीमंतांसी दोस्ती करावी हें नवाबबहादूर यांचे दिलापासोन. याचप्रमाणें इकडून ही कीं, नवाबासीं स्नेह पक्का व्हावा. उभयपक्षीं आगत्यच जाणोन व इंग्रजास तंबी करावी यांत सर्व दौलतदार यांचें कल्याण आणि नफे ही बहुत होतील, ऐसें समजोन, नवाबबाहदर यांचे मर्जीनरूप मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें छ २१ माहे सफरीं रवाना केलीं, तें पोहचलीं असतील. आतां इकडील गुंता नाहीं. एक राजश्री माहादजी सिंदे यांचें निभावणीचें पत्र येणें, तें आलियानंतर रवाना होईल. मशारनिले गुजराथ प्रांतीं गेले. मुलूक जाळून मारून ताराज जाला; गांवच्या वस्त्या मोडल्या; यांजकरितां वाटेची घालमेल जाली. सरळ वाट चालत नाहीं. याजकरितां पत्र येण्यास दिवसगत लागली. लौकरच आल्यानंतर रवाना होईल. याउपरीं नवाबबहादूर यांणीं सरंजामसुद्धां इंग्रजावर जलद नमूद व्हावें. कुमशेलवाले आले. त्यांसीं साफ बोलून त्यांस घालवावें. ठेऊं नयेत. त्यांच्या हारामजाद्या व मकरे सर्व नवाबबहादूर यांचे ध्यानांत. इकडून ल्याहावें ऐसें नाहीं. तुह्मीं करारप्रमाणें कामें उगऊन सत्वर यावें. नबाबहादूर यांचे मनोदयानरूप इकडून सर्व घडलें. सरकारचीं अगत्याचीं कामें मिरजकर वगैरे पेशजीं लिहिल्याप्रा। उगऊन घ्यावीं. नवाबबहादूरही समजोन करून देतील. सारांष, आतां विलंब न लावितां इंग्रजास ताण बसवावा. दिवसगत न लागावी. त्यांचे मर्जीनरूप इकडून सर्व कामें उगवलीं. तुह्मांकडील पत्रें येण्याचा गुंता, आह्मांकडे कांहीं उसीर नाहीं, ऐसें उफराटें नवाबबहादुर तुह्मांस ह्मणत होते. ते कांहीं इकडे आतां राहिले नाहीं. याउपरीं दिवस घालऊं नयेत. *र॥ छ १७ रबिलावल. हे विनंति.