मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५१४

पो पौष शुद्ध १४ सोमवार जाबसूद.
श्री.
१७२२ पौष शुद्ध १४

श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेशी:-

विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना. येथील क्षेम ता पौष शुद्ध १४ पावेतों आपले कृपेंकरून सर्व यथास्थित असों. विशेष. आपण मसाल्याकरितां जिनस आणविली. त्यास, एथें काहाराकडून + ++ सोय पडेना, ह्मणोन दोन रुपयांची विकत वजन १८ आठरा शेर घेऊन पाठविले आहेत. पावतील. सरकारचे हुजरे व पत्रें गावडे यांणीं तिरस्तळीपासून खंड घेतला तो माघारे देण्याविपई आले होते. तों मा पेशजीं पत्रीं आपणास लिहिलाच होता, त्यावर टोंकेवर व प्रवरासंगमकर यांणीं विचार केला कीं, पांच पांच ब्राह्मण पाठवावे. ह्यावरून जयरामवंत वगैरे टोंकेकर ४ व प्रवरासंगमकर नत्थोबा चांडाळ वगैरे ६ व आपले येथून चिरंजीव गणोबा व मल्हारपंत कुळकर्णी पाटविले होते. त्यास गोंधवणी मुक्कामीं गावडे याचीं भेट जाली. तिहीं क्षेत्राचे यादी लिहून घेतल्या. उपरांत ब्राहाणास मनस्वी शिव्या देऊन उत्तर केलें कीं, तुह्मी देवाचे डागिने कां मोडले, त्यास ते डागिने द्या, तेव्हा तुमची सुटका होईल. हुजरे मुडदार ! यांच्यानें कांहीं एक जरबेची गोष्ट बोलवेना ! असो ! मग जैरामपंतांनीं करार केला कीं, इतकी पट्टी केली तैसी आतांही गांवांत जाऊन पट्टी करून देवाचे डागिने करून देऊ. गावडे यांचें ह्मणणें कीं, श्रीमंतास लिहून पाठवा कीं, आह्मी दागिने करून देतों, याप्रमाणें लिहून द्या. मग जैरामपंतांनीं करार केला कीं, येथें लिहिलें कशास पाहिजे, आह्मी टोकियाहूनच लिहून पाठऊं. ऐसें करार केला. तेव्हां सुटका झाली. मग रुपयाचा जाबसाल कळतच आहे ! उगेच कांहीं विशेष राहिले होते, ते आणीकही दाहा बारा रु। खर्च जाला आणि खराब जाले. याप्रमाणें जालें. मल्हारपंतास हिशेब घेऊन पौष वद्य १ प्रतिपदेस पाठऊन देतों. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. आज्ञा येईल तर एक दिवस आह्मीही येऊ. देव दर्शनही होईल व आपलीही भेट होईल व एक दिवस राहून मागती येऊं. हे विनंती. शेवेसी विनंती सेवक मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां नमस्कार. हिशेब घेऊन प्रतिपदेस येतो. हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries