पत्रांक १०९
श्री.
पौ छ ११ मोहरम
१६९६ चैत्र शुद्ध ८.
आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता चैत्र शुध ८ रविवार मुा नजीक ह्मसवड वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्रें शुध प्रतीपदेचीं पाठविलीं तीं आजच पावलीं. लिहिलें वर्तमान कळलें व सरकारचे पत्राची नकल पाठविली ती पावली. इकडील वर्तमान तरी: नबाबसुद्धां च्यारी फौजा मुा मारीं आज आल्या. नबाबाचा मुकाम मौजे दिघी, पा अडफली, येथें जाहला. त्यास, तो गांव मातबर. माने यांची पाटिलकी. तेथें. चौ फौजेच रखवालीस राऊत होते. त्यास, तो गांव मोंगलाचें फौजेने लुटला. नाश बहुत जाहला. मराठे व ब्राह्मण बाइकांची अब्रू घेतली. याजकरिता नागोजी यादव वगैरे सरदार मामाकडे गेले होते. त्यांनी सांगितलें कीं, देशांत हा प्रकार जाहलियावर पुढें गत काय, त्यास विचारें करोन सांगेन पुन्हां कोणे गांवीं उपद्रव ' न होय तें करावें. त्यावरून मामांनी, अविंधाकडील वकील मामांच्या लष्करांत ज्ञानराव होते त्यास बोलाऊन आणून, मनमानें तैशी भाषणें केलीं. त्यास लष्करांतून काढोन दिल्हे. हे गोष्ट उचित न केली ? त्यावरून नबाब अजुर्दा आहेत. आधीच त्यांचे यांचे चित्त मिळत नव्हतें. त्यांत दिवसें दिवस विक्षेप पडत जालिले. मामांनीं आज कूच करून पुढें गेले. राजश्री साबाजी बावा यास काल चिठी आली की, तुह्मीं मुकाम करणें. आज चिठी आली की " दोन प्रहरी उपरांत कूच करणे.'' त्यास, कुच कैसें होते ? नबाबानें आज कूच करून येथें यावें ऐसा करार होता. त्यास, कूच करून आले. आमचे पुढें तीन कोसावर आहेत. दर्याबाई फौजसुद्धां अविंधाचे डावे बाजूस कालपासून राहतात. मामानीं यास काल बोलाऊन नेलें होतें. त्यास, भाशन ममतापूर्वक नोकेनेंच केलें. समय आहे, हा समय तुह्मी पुढें असावें. यांनीं उत्तर केलें कीं, आम्हांस आज्ञा कराल त्याप्रमाणे करूं, आह्मी चुकणार नाहीं, परंतु फौजेस पोटास पाहिजे यामुळें गवगवा होतो, चाकरीचे दिवस आहेत, या दिवसांत आम्हीं चाकरी करून दाखऊं. तेव्हां मामांनी समाधान केलें कीं, फाल्गुनपैकीं सवालक्ष देतों, व या महिनेया पैकीं सवालक्ष देऊ. एकूण आडीचलक्ष दों महिनेयाचे होतात. त्यांत तुम्हांस पावलें तें वजा करून बाकी राहिलें तें दोन च्यार वेळ करून देतों, ऐसा करार केला आहे. आजपर्यंत एकलक्ष दाहापंधरा हजारपर्यंत पावले आहेत. बाकी एकलक्ष तीस चाळीस राहिले. ते एक वेळ देतील तरी त्याचा गवगवा महिना पंधरा दिवस राहतां निर्वेध होतो. तें होईल तेव्हां होऊ. सारांश, मामांचे भाषण रुक्ष, यामुळें पेंच पडतात. कामाचे दिवस. या दिवसांत राजश्री बापूंनी व राजश्री नानानी फौजेंत असावें. ते असलियाने सर्वांवर दाब बसोन, मुलुखाचा नाश न होतां, मसलत सिद्धीस निर्वेधपणे जाईल. उभयतां येत नाहीं तर विक्षेप वाढतील, ऐसें दिसतें. श्रीमंत राजश्री दादासाहेब यांजकडून सर्वांकडे अनुसंधानें येतात. त्यास, या दिवसांत कोणाची अजुर्दगी नसावी. याजकरितां उभयतांनी यावें. राजश्री हरीपंततात्या येथें आले होते. त्यांस सातारेयास मामांनीं रवाना केलें. ते गेले. ते जरी असते तरी उत्तमच होतें. कित्येक कळ संभाळिते. तेहि नाहींत. श्रीमंतांचा मुकाम कुरंडवाडावर आहे. यांस त्यांस पंचवीस कोसांची तफावत आहे. गांठ सत्वरच पडावी ऐसें आहे. बहुत काय लिहिणे ? लोभ किजे, हे आशिर्वाद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)