[३७]                                                                           ।। श्री ।।                                                      १९ आगष्ट १७५४

 

राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांसिः-

अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जयाजी शिंदे दंडवत. सु॥ खमसखमसैन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तेथें श्रीक्षेत्रीचें व अंतर्वेदीप्रांतचें व मनसूरअल्लीखान याजकडील वर्तमान तपशिलें आषाढमासचें लिहिलें तें कळलें. त्या प्रांतें फौज आल्याविना सरकारचा अंमल बसत नसे. ह्मणून लि।. त्यास, सांप्रत आह्मास श्रीमंत राजश्री दादासाहेब यांणीं गुजराथची फौज दहाबारा हजार देऊन मारवाड प्रांतें रवाना९४ केलें. ते छ १६ सवालीं मेडत्यास आलों. राजे रामसिंग राठोड यांचे लोक यांसी येथून भेटत चालले. आजपर्यंत बारा पंधरा फौज राठोड जमा जाले. आणखी येतच आहेत. बिजेसिंग राठोड मेडत्यांतच दबोन राहिला असे. आह्मी बाहेर त्याजभोंवताले असो. त्याचे लोक नित्यानीं पळोन आपल्याकडे येत चालले आहेत. धर सुटला असे. सत्वरींच मारवाड प्रांतींचें काम विल्हेस लावून, बंदोबस्त करून, तुह्मांकडे अंतर्वेदींतून अविलंबेंच येतों. जे जे मवासी करीत आहेत त्यांचें पारपत्य यथायुक्त करून श्रीक्षेत्रास अंमल खुलासा करणें हे गोष्ट चित्तांत फारशी आहे. सत्वरीच येणें होईल. चिंता न करणें. जाणिजे. छ २९ माहे सवाल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.

शिक्का

मोर्तब सुद