प्रस्तावना

गोविंद बल्लाळ खेर ह्याला बाजीरावानें १७३३ त बुंदेलखंडाचा सुभेदार केलें म्हणून कोठें कोठें लिहिलेलें आढळतें. ती निव्वळ गप्प आहे. गोविंद बल्लाळ १७३९-४० त लहानसा कमावीसदार म्हणून बुंदेलखंडांत कदाचित् आला असावा. त्यावेळीं बुंदेलखंडांतील मुख्य अधिकार नारो शंकराचा भाऊ लक्ष्मण शंकर याजकडे होता. काव्येतिहाससंग्रहांतल्या पत्रे, यादींतींल नंबर ११ च्या पत्रांत बुंदेलखंडासंबंधानें गोविंद बल्लाळाचा मुळींच उल्लेख केला नसून लक्ष्मण शंकराचें नाव प्रमुखपणें उल्लेखिलें आहे. हें पत्र १७४० च्या २९ सप्टेंबराला लिहिले आहे. गोविंदपंत १७४६ व १७४७ तहि फारसा महत्चास चढला नसून सामान्य कमाविसदारच होता. हें पत्रें, यादींतील ६२, ६९, ७४, ९५, ९९ ह्या पत्रांवरून उघड होतें. हीं पत्रे १७४६/१७४७ त लिहिलेलीं आहेत (ह्या पत्रांच्या तारखा प्रस्तावनेच्या शेवटी दिल्या आहेत). बुंदेलखंडांतील जैतपूर, कालिजर, अजेगड वगैरे स्थलें ज्याअर्थी शिंदे, होळकर १७४६/१७४७ त घेत होते त्याअर्थी गोविंद बल्लाळाचें महात्म्य बुंदेलखंडांत त्यावेळी फारसें वाढलें नव्हतें हें स्पष्ट आहे. गोविंद बल्लाळ त्यावेळीं साधा कमाविसदार नसून जर लढवय्या शिपाई असतां तर बुंदेलखंडातील लढायासंबंधानें त्याचें नाव वर उलेख केलेल्या पत्रांतून अवश्य येतें. १७४६/१७४७ पर्यंत सबंद बुंदेलखंड मराठ्यांच्या हातांत आलें नव्हतें. ह्या सालीं जैतपुरची लढाई होऊन कालिंजर वगैरे ठिकाणें मराठ्याच्या ताब्यांत आलीं व पुढें लवकरच सरदारांच्या व पेशव्यांच्या वांटण्या झाल्या आणि पेशव्यांच्या वांटणीची व सरदारांच्या वांटणीची कमावीस गोविंदपंताला मिळाली. तेव्हांपासून गोविंदपंताच्या हातीं सर्व बुंदेलखंडाचा अंमल येऊन त्याचा अधिकारी बराच वाढला व तो कांहीं म्हणण्यासारखी फौजहि ठेवूं लागला गोविंदपंताच्या कैफियतीच्या प्रारंभी व सागरच्या कैफियतीच्या शेवटीं दिलेले संवत् खरे आहेत हें वरील संदर्भावरून ध्यानांत येईल. संवत्, १७९६ म्हणजे १७३९/४० पर्यंत बुंदेले हिस्सा बिनतक्रार देत गेले. तोपर्यंत लक्ष्मण शकंराकडे बुंदेलखंडाची कमावीस होती. पुढे बुंदेले हिस्सा देण्यास तक्रार करूं लागले तेव्हां संवत् १७९८ त म्हणजे १७४१, १७४२ त गोविंदपताच्या हवालीं बुंदेलखंडाची कमावीस पेशव्यांनीं केली. पुढे जैतपूरची लढाई झाल्यावर संवत् १८०२ त म्हणजे १७४६ त बुंदेलखंडाची बुंदेल्यांनीं कायमची वांटणी करून दिली व संवत् १८०३ त म्हणजे १७४७ त गोविंदपंताची बुंदेलखंडातील मातबर मामलतीची कारकीर्द सुरूं झाली. ह्यावेळेपासून म्हणजे १७४७ पासून गोविंदपंताच्या भरभराटीस प्रारंभ झाला. १७३३ त गोविंदपंत बुंदेलखंडांत आले हें अनेक ग्रंथांवरून सिद्ध आहे, म्हणून रा पारसनीस म्हणतात तो त्यांचा केवळ गैरसमज आहे.