[१५१]                                        ।। श्री ।।                    ९ जानुआरी १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंतदाजी स्वामीचे सेवेसी:

पोष्य बाबूराव नरसिंह कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. सांप्रत पत्र येऊन परामृश होत नाहीं. तरी ऐसें नसावें. निरंतर पत्रीं सांभाळ करीत असलें पाहिजे. यानंतर देशीचें वर्तमान तरी मोगलाशीं बिघाड जाहला. श्रीमंत राजश्री भाऊसाहेब परळीनजीक२१७ गेले. मोगलास यांस चाळीस कोसांचें अंतर आहे. आजकरितां गांठ पडली असेल. श्रीमंतापाशीं पंचवीस हजार फौज आहे. आणखी वरचेवर फौजा जमा होत आहेत. मोगलापाशीं दहा हजार फौज आहे व दहा बारा हजार गाडदी आहेत. श्रीमंताचे पुण्यप्रतापें त्यांचें पारिपत्य उत्तम प्रकारें होईल. उभयपक्षीं मुकाबला जाहलियाचें वर्तमान आलेयानंतर सविस्तर मागाऊन पाठवितों. तुमचे बंधू चिटकोपंत येथें सुखरूप आहेत व राजश्री नारोपंत नाना पुण्यांत आहेत. वरकड वर्तमान उत्तम आहे. आपणाकडील वर्तमान लिहून पाठवावें. वारंवार आपणास पत्रें पाठविलीं. उत्तर येत नाहीं. तर ऐसें न करणें. पत्र पाठवीत जावें. राजश्री चिटकोपंत२१८ यजमानांचा निरोप घेऊन जाणार. कळावें. मिती पौष वद्य ७. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.