प्रस्तावना
रघुनाथरावाच्या (१) १७५०, (२) १७५१, (३) १७५२, (४) १७५३ व (५) १७५६ ह्या सालांतील गुजराथ व खानदेश ह्या प्रांतावरील मोहिमा ग्रांट् डफ् नें अजीबात गाळल्या आहेत. रघुनाथरावाची १७५३ ची अमदाबादेवरील मोहीम त्यानें १७५५ सालांत नेली आहे. १७५५ सालांत रघुनाथराव दिल्लीस होते हें त्याला माहीत नव्हतें; हें पुढील पत्रांतील टीपांत सविस्तर सिद्ध करून दाखविलें आहे (टीप १६१). रघुनाथरावाची १७५४ (जानेवारी-जून) तील रजपुतान्यांतील (६) स्वारीची (कुंभेरीचा वेढा इ.) व १७५४ (सप्टेंबर-डिसेंबर) तील रोहिलखंड, कुमाऊ, ह्या प्रदेशांवरील (७) मोहिमेची हकीकत त्यानें दिली नाहीं. रघुनाथरावाच्या १७५७ तील (८) दिल्लीवरील व १७५८ तील (९) लाहोरावरील मोहिमांचा त्यानें त्रोटक व तोहि बराच चुकीचा वृत्तांत दिला आहे. रघुनाथराव वस्तुतः १७५७ त माळव्यांत गेला असून तो १७५६ च्या शेवटीं गेला असें डफ् म्हणतो. रघुनाथराव १७५७ च्या जूनांत व सप्टेंबरांत दिल्लीस होता हें १५३ व्या टीपेंत स्पष्टपणें दाखवून दिलें आहे. अबदाली १७५५ त दिल्लीस आला, मथुरा वगैरे शहरें त्यानें त्याच सालीं घेतलीं, मग लवकरच काबुलाला तो परत गेला व १७५७ च्या सप्टेंबरांत तो दिल्लीस येऊन बसला, इत्यादि भ्रामक विधानें त्यानें केली आहेत. तींहि मीं १५३ व्या टिपेंत खोडून काढलीं आहेत. तसेंच १७५४ व १७५५ आणि १७५७ व १७५८ रजपुताना, माळवा, बुंदेलखंड, काशी, प्रयाग, अयोध्या, व अंतर्वेद इत्यादि प्रदेशांतील संस्थानिक, पाळेगार, मवासी इत्यदि मंडळीवरहि रघुनाथरावानें स्वा-या केल्या आहेत, त्यासंबंधीं माहिती ग्रांट् डफ् च्या ग्रंथांत नाहीं. जयाप्पाच्या (१०) नागोरच्या वेढ्यासंबंधी तर त्यानें फारच आश्चर्यकारक चुकी केली आहे. नागोरचा वेढा १७५५ त चालला होता व जयाप्पा तो वेढा चालला असतांना ज्येष्ठ वद्य ७ मीला म्हणजे ३० जून १७५५ ला मारला गेला अशी वास्तविक गोष्ट आहे. असें असून ग्रांट् डफ् ने जयाप्पाच्या मृत्युचें साल १७५९ धरलें आहे व मधील चार वर्षांत जयाप्पासारिख्या चळवळ्या शिपायानें केलें काय ह्याचा हिशेब अर्थांत् कांहींच दिला नाहीं. हीहि चूक मीं १६१ व्या टिपेंत जयाप्पाच्या मृत्यूच्या तारखेसुद्धां दाखवून दिली आहे. एकंदरींत रघुनाथराव दादांच्या बहुतेक सर्व स्वा-यासंबंधीं, ग्रांट् डफ् चे अज्ञान आश्चर्य करण्यासारखें आहे. जयाप्पाच्या मारवाडांतील मोहिमेसंबंधीं, त्याच्या मृत्यूसंबंधीं व त्याच्या मृत्यूनंतर दत्ताजीनें मारवाडांत केलेल्या खटपटीसंबंधीं ग्रांट् डफ् च्या ग्रंथांत एक अक्षरहि सांपडण्यासारिखें नाहीं. हें जयाप्पाच्या व रघुनाथरावाच्या मोहिमांविषयीं झालें.