[२०२] ।। श्री ।।
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः -
विनंति उपरि. तुह्मीं दोन पत्रें पाठविलीं तीं पावलीं. यांत मुख्यार्थ कीं मातबर फौजेनिशीं सत्वर यावें. सुज्यातदौला सर्व प्रकारें स्वामीच्या येणियामुळें येऊन सामील होतील. अबदालीकडे जात नाहीं. राजकारणहि राखून ठेविलें आहे. ह्मणोन विस्तारें लिहिलें तें सर्व कळलें. ऐशियास, खासास्वारी दरमजल बोडसियास आलीं. पुढें दरमजल तुह्मीं लिहिल्या रोखेंच येऊं. सरदारांसहि लिहिलें असे. त्यांचींहि पत्रें जशीं येतील त्यासारिखा रोख धरूं. त्यास सुज्याअतदौलाचें राजकारण फार करून दाखवावें. सरकारचें काम व यास मातबर इच्छेनरूप पदारूढ करवावें. याचा कितेक अर्थ तुह्मी बोलत होता तो प्रकार बनला नाहीं. परंतु हल्लीं मल्हारबांनींहि त्यास बहुताप्रकारें लिहिलें आहे. व यांशींहि स्नेहाचा फारच याचा राबिता आहे. या दिवसांत आमचेंहि येणें जाहलें. येणेंकडून कितीक उमदी कामें घडणें. हे दिवस रुबकार जाहाले. यास्तव तुह्मीं जे बोलत होता ते सुज्याअतदौला यास एकपक्षी करून घेऊन यावें. आणि तैमुरियाचे पातशाहीचा बंदोबस्त करावा. अबदालीस खूब तंबी करावी. मल्हारबाचा या गोष्टीविशीं संशय न आणावा. तेहि याच कामावर तयार आहेत. सुज्याअतदौलाविसीं काहीं दुसरा मजकूर नाहीं. आतां सुज्याअतदौलानें आपले तर्फेनें निदर्शनास आणून देऊन पुढें फार दिवस स्नेहाची मजबुदी चालोन येईल ते गोष्ट त्यांणीं करावी. त्यास, तुह्मीं हा सर्व अर्थ पहिल्या लिहिल्यावरून त्यास कळवून त्यास या कामावरी सिद्ध केलें असेल. कदाचित् मळमळीत प्रकार असेल तर जो तुह्माजवळ त्याचा पुर्ता वळखी असेल त्यास तेथें पाठवून त्यास भरंवसा पुरवून यावयाचे करीत तें करणें. अबदालीस तो साफच जाब द्यावा. मलकाजमानी सुज्याअतदौलाकडे गेली आहे ह्मणोन कळलें. ऐशास, अबदालीचे जबरदस्तीखालीं बाईकाचे भरंसियावरी जावें, त्याची जरब आपण सोसावी, हें कांहीं यास योग्य नाहीं. मागें जे जे त्यास भेटले त्यांची गत काय जाहाली ? हाल काय जाहले ? यास हर प्रें॥ न्यावें, तेथे नेऊन फसवावें, रोहिल्यानें पैका कबूल केला त्यास जागा नाहीं, लटकी आशा दाखवावी. फसवावें, त्याचे जबरदस्तीखालीं हे सांपडले ह्यणजे याजपासूनहि पैक्याची इच्छा करावी, न कबूल केलें तरी मग अबदालीचा प्रकार कळतच आहे. असे प्रकार घडतील. हेंहि त्यास आपले तर्फेनें हितोपदेश सांगावा. इकडे उपयोगी आहेतच ते दृढ करावे. हिंदुपत वगैरे यांस पत्रें गेलीं. तुह्मी लिहिणें. लौकर येत ते करणें. शाहाजादियाकडीलहि वर्तमान लिहिणें. सुजादौला त्याचा पैगाम तोडून आमचे पुर्ते होऊन सामील होतील तर त्याचे हातेंहि मातबर बंदोबस्ताचें काम घेऊं. निर्मालय जाले ते आमचे कामाचे काय ? हे चांगले असून काम न करतील, घरीं राहून दोहींकडे पाहतील तर त्यांसच पुढें पेंच. तर या समयीं आह्मांकडे यावें. तसेच फरकाबादवाले आणणे. हे विनंति.