Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

राजवाडेयांची विशिष्ट मनोवृत्ति 

इंग्रजांस लाथा मारुन घालवून देण्याची शक्ति आमच्यांत आल्याशिवाय आमचा तरणोपाय नाहीं असें ते म्हणत.' त्यांचें ध्येय हें अशा प्रकारचें आहे. या ध्येयार्थ त्यांनी सर्व आयुष्य खर्च केलें. रसायन शास्त्रांसारख्या शास्त्रांचा आपण अभ्यास केल्याविना इंग्रजांस देशाबाहेर घालविण्यास आपण समर्थ होणार नाही हें ते तरुणांस पुन: पुन्हा सांगत. रसायनशास्त्र, इतर भौतिकशास्त्रें यांत पारंगत व्हा. सर्व कला आपल्याशा करा, असें ते विद्यार्थ्यांस वारंवार बजावीत. याच कार्यासाठी त्यांनी रासायनिक मंडळ ही पुण्यास काढलें होतें परंतु लोकांस हौस व उत्कंठा लागली आहे कोठे ? एका प्रचंड प्रयोग शाळेंत अनेक विद्यार्थी निरनिराळे शोध लावीत आहेत व त्यांच्यावर आपण देखरेख करीत आहोंत; जगाच्या ज्ञानांत भर पडत आहे- अशा सुख-स्वप्नात त्यांचा आत्मा तरंगत असे. परंतु वस्तुस्थिती कशी होती ? रसायन शास्त्रांतील नैपुण्य मिळविण्याऐवजी त्यांस जुनी इतिहासाची दफ्तरे झाडण्याचें काम करावें लागलें. राजवाडे म्हणत 'मी जर श्रीमंत व लखपति असतों तर मोठा रसायनशास्त्रवेत्ता झालों असतों; परंतु भिकारी असल्यामुळें इतिहास संशोधनाचा व भाषा संशोधनाचा बिनभांडवली धंदा मला पत्करावा लागला.' मरावयाचे आधी कांही दिवस ते सृष्टिशास्त्र, रसायनशास्त्र यावरील ग्रंथ वाचूं लागले होते व आपण आतां मोठे रसायनशास्त्रवेत्ते होऊं असें ते म्हणत.

त्यांची बुध्दि सर्वंकषा असल्यामुळें ती कोणत्याही शास्त्रांत अंकुठित रीतीनें चाले. लोक निजले आहेत, घोरत आहेत असें पाहून तेच निरनिराळया शास्त्रांस चालना देत. इतिहास संशोधन, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, रसायनशास्त्र सर्वत्र त्यांची दृष्टि होती. हेतू हा कीं निरनिराळया लोकांपुढें निरनिराळीं कार्यक्षेत्रें मांडावी. त्यांची प्रतिभा दिव्य व ज्ञानचक्षू निर्मळ यामुळें एकाच विषयाची निरनिराळी अंगे आपल्या ओजस्वी निबंधांतून ते लोकास सांगत. सर्व शास्त्रांस त्यांनी गति दिली; चालना दिली. असा चतुरस्त्र महाघी पुरुष महाराष्ट्रांत झाला नाही.

त्यांनी स्वत: प्रचंड काम केलें. परंतु अद्याप किती तरी काम झालें पाहिजे असें ते म्हणत. पूर्ववैभव, प्राचीन पूर्वजांची थोर स्मृति लोकांच्या अंतरंगी जागृत करून त्यांस कार्यप्रवण करावयाचें होतें. आलस्य व किंकर्तव्यमूढता त्यांस घालवून द्यावयाची होती. राजवाडे लिहितात 'तात्त्वि हवेच्या संन्यासप्रवण व मांद्योत्पादक दाबाखाली चिरडून गेल्यामुळें प्रपंचाची म्हणजे इतिहासाची हेळसांड करण्याकडे लोकांचा जो आत्मघातकी कल आहे, तो घालविण्यासाठी इतिहासज्ञानप्रसाराची व तत्साधन प्रसिध्दिची आवश्यकता सध्यां विशेषच आहे असें माझें ठाम मत आहे. काल, देश, मूळ या त्रिविध दृष्टिनें भारतवर्षाच्या व महाराष्ट्राच्या नानाविध चरित्राचा अफाट विस्तार पाहतां, आजपर्यंत प्रसिध्द झालेली साधनें जलाशयांतून एखाद्या बेडकानें मोठया प्रयासानें आपल्या शूद्र ओंजळीत वाहून आणलेल्या बिंदूप्रमाणें आहेत. त्या बिंदूमात्राने संन्यास प्रवणतेची मलीन पटलें धुवून जाणार कशी ? हें मालिन्य साफ नाहीसें करावयाला जलाशयांतून शेंकडों मोठमोठे पाट फोडून संन्यास प्रवणतेवर सतत सोडून दिलें पाहिजेत.' राजवाडयांचा सर्वव्यापी अनिरुध्द खटाटोप लोकांस कार्यप्रवण करण्यासाठी होता. महाराष्ट्रांत जी एक कार्यनिरिच्छता उत्पन्न झालेली आहे तिचा निरास करण्यासाठी राजवाडे खपले व ती नाहीसी करण्यासाठीच टिळकांनी गीतारहस्य लिहिलें. साधु संतांच्या उपदेशानें महाराष्ट्र संन्यासप्रवण झाला; स्वाभिमान त्यानें सोडला असें कधी कधी राजवाडे म्हणत. तथापि संतांची खरी कामगिरी त्यांच्या डोळयांआड नव्हती.