प्रस्तावना

(१) मागील जमा आहे त्यापैकीं सोडून देऊन जमा करितात. (२) शिबंदीप्यादाचा खर्च जास्त वाढविला पांच प्यादे होते तेथे पंचवीस ठेविले. (३) फौज मन मानेल तशी ठेवून खर्च बहुत करतात. (४) जेथे शिबंदी बहुत नलगे ते परगणे शिंद्याकडे देतात व बहुत शिबंदी लागती ते परगणे सरकारांत ठेवितात. (५) भेटी व नजराणे अंतस्ते घेतात. (६) महालांचा दाखला दाखवीत नाहींत. (७) ह्यांच्या दहशतीमुळे रयत किंवा जमीदार कोणी आम्हांस भेटत नाहीं. (८) कलमरुजुवात होत नाहीं. (९) कारभारी मान मानेल ते मिळवितात.

ह्या नऊ तक्रारी सदाशिवरावभाऊंनीं पाहून त्या गोविंदपंताचा पुणें येथील वकील बाबूराव नरसी यास दाखविल्या. बाबूरावानें तक्रारींचीहि याद जशीच्यातशीच गोविंदपंताकडे पाठविली. ती पाहून गोविंदपताचें धाबें दणाणून गेलें व तो येरंडे व कानिटकर यांची आपल्यास संभाळून घ्या म्हणून विनवणी करूं लागला. ह्यासंबंधानें लेखांक १३३ पासून लेखांक १५० पर्यंत व सुद्धां पत्रे वाचण्यासारखीं आहेत. त्यांत गोविंदपंत पैशाची अफरातफर करीत असे ह्याची शाबिती गोविदपंतानें आपली आपणच करून घेतलीं आहे. येरंडे हिशेब समजावून देण्याकरितां गोविंदपंताला आपल्याकडे बोलावीत असतां गोविंदपंत निरनिराळ्या सबबी काढून भेटायला येण्याचे कसे लांबणीवर टाकीत होता हेंहि ह्या पत्रांवरून व पत्रांखालीं दिलेल्या टिपांवरून कळून येईल. येरंडे दाने सालें बुंदेलखंडांत राहिले; परंतु, गोविंदपंताचे मंडळींनें त्यांना एक जमीदार अगर पाटील भेटूं दिला नाहीं (लेखांक १४२). मागील तीन सालांचा हिशोब त्यांस न दाखविता हिशोबाचे रुमालहि गोविंदपंत आपल्या बरोबर घेऊन गेला (लेखांक १५०) आणि संशय येऊन येरंडे जेव्हां गोविंदपंताचा जमादारखाना जप्त करूं लागले तेव्हां त्यांच्यावर रागवावयालाहि गोविंदपंतानें कमी केलें नाहीं (लेखांक १३४). गोविंदपंताच्या प्रांतात आपली काहींच दाद लागत नाहीं असें पाहून येरंडे पुण्यास जाऊ लागले तेव्हां गोविदपंत काहींसा नरम आला व नम्रतेच्या गोष्टी बोलूं लागला. “दरबारी नानाप्रकारें नालिशी, चुगली करितात” त्यानें आपलें नुकसान होतें असें त्यानें येरंडयांना कळविलें व त्याच पत्रीं रयतेकडे आपण कसर ठेवीत होतों हें कबूल केलें (लेखांक १३८). मोहिमेहून परत आलों म्हणजे तीन सालांचा हिशोब व रयतेकडील बाकी दाखवून देण्यास आपण तयार आहों म्हणून त्यानें येरंड्यांना लिहिलें; कारण, “दरबारचा रंग पाहिला, खावंद चौकशी करूं लागला, तेव्हां पैसेयाचा लोभ धरून मेळविली अब्रू गमविणें” योग्य नाहीं असें त्यास उमजून आलें. तेव्हा आपल्यास संभाळून घ्यावें म्हणून त्यानें येरंड्याची खुशामत करण्यास आरंभ केला.