प्रस्तावना
परंतु, दत्ताजी बडाउंच्या (१० जानेवारी १७६०) लढाईंत पडून जनकोजी कोटपुतळीस पळून येईतोपर्यंत (१२ जानेवारी १७६०) मल्हाररावाने जयपूरप्रांत सोडिला नाहीं (लेखाक १५३). ह्या दहा पंधरा वर्षांच्या हालचालीवरून मल्हारराव होळकरांच्या मनाची स्थिति ताडता येते. १७५० पासून हळूहळू त्याचें मन शिंद्यांविषयी व पेशव्यांविषयी कलुषित होत चाललें होतें. १७६० त तर ह्या कलुषतेचा कळस होऊन होळकरांची मदत मिळाली नाही म्हणून दत्ताजीचा नाश झाला. “दोन्ही सरदार एकत्र असलियास उत्तम रीतीने पठाणाचें पारपत्य होईल,” म्हणून रघुनाथराव, सदाशिव चिमणाजी व बाळाजी बाजीराव वारंवार लिहीत (लेखांक १५२ वगैरे). असतां मल्हाररावानें त्याचा हुकूम अमलांत आणण्याचें होता होईल तितकें लांबणीवर टाकिलें (टीप २१५ पहा). सारांश, १७६० च्या प्रारंभीं शिद्यांविषयी व पेशव्यांविषयीं होळकरांच्या मनांत द्वैतभाव अत्युत्कट भरला होता, ह्यांत संशय नाहीं. ह्या द्वैतभावाला सातारचे छत्रपती मुळींच कारण झाले नाहींत. पेशव्यांची सत्ता वाढून आपली सत्ता संपुष्टांत येत आहे व शिंदे ह्या संपुष्टीकरणाला मदत करीत आहेत ह्या भीतीपासून मल्हाररावांच्या मनांत हा द्वैतभाव उत्पन्न झाला.
अंताजी माणकेश्वर हा लफंगा गृहस्थ १७५५ त हिंदुस्थानांत जाऊन (का पत्रे, यादी ४५१ वगैरे) दत्ताजी शिंद्यास नागोरास मिळाला. १७५६, १७५७ व १७५८ हीं तीन सालें तो दिल्लीस होता (लेखांक ५२, ५७, ६३ व का. पत्रें, यादी वगैरे ३३७, ३४१). तेथील बादशाही कारस्थानांत त्याचा बराच हात असे. बहुत मर्दपणा व काबीलपणा करून दाखवून, पेशव्यांकडून सरदारी मिळवावी ही त्याची मुख्य आकांक्षा होती. परंतु, अब्रूची दरकार टाकून पैशाची अफरातफर करण्याची संवय या गृहस्थाला असल्यामुळें पेशव्यांचीं ह्याच्यावर गैरमर्जी असे. ह्यानें १७५७ त अबदालीला चांगला हात दाखविला. परंतु अबिदालीची फौज भारी त्यामुळें ह्याचा फारसा उपाय चालला नाहीं. पेशव्यापाशीं अंताजीची पत मुळीच नव्हती.
बापूजी महादेव व दामोदर महादेव हे पेशव्यांच्या तर्फे दिल्लीप्रांतांत मामलतदार होते. ह्यांच्यावरहि पैशांच्या बाबतीत पेशव्यांची गैरमर्जी होती (लेखाक ६९). नारो शंकराचा भाऊ लक्ष्मण शंकर ह्याचीहि पत पेशव्यांजवळ फारशी नव्हती (लेखाक ५९).