प्रस्तावना

१७४९ पर्यंत ही साता-यास प्रतिबंधांत होती. पुढें हिचा नातू जो रामराजा त्याला गादी मिळावी असें शाहूनें ठरविलें. तेव्हां हिचें महत्त्व वाढून आपल्या नित्याच्या स्वभावाप्रमाणें हिनें बाळाजीशीं प्रतिस्पर्धां मांडली; दादोबा प्रतिनिधि व यमाजी शिवदेव ह्यांचें खूळ माजविलें; बाबुजी नाईकांस भर दिली; सलाबतजंगाचा दिवाण जो रामदासपंत त्याच्याशीं राजकारण केलें; बाळाजीची पेशवाई रामदासपंताचे भावास देण्याचा बेत केला; महादोबा पुरंद-याला देखील फितविलें (का. पत्रें, यादी वगैरे-३५९); व त्याच्या करवीं रामचंद्रबाबा शेणवई व सदाशिव चिमणाजी ह्यांचें व बाळाजीचें वाकडें आणिलें; दमाजीला साता-यास बोलाविलें; उमाबाई दाभाडिणीस चढी लाविलें; खुद्द शिंदेहोळकरांच्याहि बुद्धीचा भेद करून पाहिला व रघोजीला मोंगलाकडे जाण्यास भर दिली. हा खेळ एकसारखा १७५० पासून १७५३ पर्यंत चालला होता व तो चालत असतां रामराजा ताराबाईंच्या मुठींत राहून बाळाजीच्या धडपडीकडे उदासीनपणें पहात होता. रामराजा उदासीन राहिला तो कांहीं मतलब साधावा अशा हेतूनें राहिला असा अर्थ नव्हे. तर, त्याच्या नैसर्गिक कर्तृत्वहीनतेमुळें त्याला हें औदासिन्य पत्करावें लागलें. रामराजा खुळा आहे अशी इतर लोकांप्रमाणें बाळाजीची खात्री झाली होतीं. त्याच्याविषयी कोणाच्याच मनांत आदरबुद्धि नव्हती. गयाळ म्हणून ताराबाई त्याचा द्वेष करी. कर्तृत्वहीन म्हणून सरदारांचें त्याच्या ठिकाणीं प्रेम नसे आणि प्रतिस्पर्धा म्हणून कोल्हापुरकर त्याचा मत्सर करी. एवंच रामराजा कोणालाच हवा असें वाटत नव्हतें. शाहूराजाची इच्छा म्हणून बाळाजीनें रामराजाला पानगांवाहून आणिला व गादीवर बसविला. त्याला कांहीं तरी राजकारण करून काढून टाकावें अशी बाळाजीची इच्छा होती असें जरी खास म्हणतां येत नाहीं तत्रापि त्याचें महत्त्व होईल तितकें कमी करण्याच्या इच्छेनें बाळाजीनें त्याचा शिक्का तीन वर्षें चालूं केला नाहीं. ह्या ग्रंथांतील १७५० तील ३० जानेवारीच्या (लेखांक २६) पत्रावर, काव्येतिहाससंग्रहांतील १७५१ च्या २९ सप्टेंबरच्या (३३४ पत्रें, यादी वगैरे) पत्रावर, १७५२ च्या १२ एप्रिलच्या (पत्रें, यादी वगैरे ३७४) पत्रावर १७५२ च्या १५ आक्टोबरच्या (पत्रें, यादी वगैरे ३९५) पत्रावर शिक्का शाहूराजाचाच आहे. ह्यावरून रामराजाला शाहूराजाच्या इच्छेबरहुकूम बाळाजीनें यद्यपि मान्य केलें होतें, तत्रापि त्याचा शिका चालविण्यांत तीन वर्षें तो धरसोड करीत होता असें दिसतें. अर्थांत् दुसरा राजा करावयाचा म्हणजे संभाजीला साता-यास आणावयाचा त्याचा बेत होता असें अनुमान करण्यास प्रवृति होते. नाहींतर शाहूच्या मृत्यूनंतर तीन वर्षें शाहूचा शिक्का चालविण्याच्या कामीं धरसोड करण्यांत बाळाजीचा कांहींच मतलब नव्हता असें होईल.