प्रस्तावना
"शाहूमहाराज यांचा जीवात्मा आहे तों बाह्यात्कारी त्यांचे सेवक, अंतर्यामीं स्वामींचे. शाहूमहाराज यांणी कैलासवास केल्यावर दोहीं राज्यांवर स्वामींची (सत्ता) आणि आम्हीं सेवक स्वामींचे" (काव्येतिहाससंग्रह, पत्रें, यादी वगैरे ४२८/४२९). ह्याप्रमाणें शाहूवर सूड उगविल्यानंतर, त्यानें रघोजीचा समाचार घेतला. १७४३ त रघोजीचा पराभव करून १७४४ त रघोजी साता-यास आला असतां शाहूकडून रघोजीला हिंदुस्थानांतील प्रांतांची वांटणी करून देवविली (भारतवर्ष, ४६/४७/४८/४९). रघोजीच्या गर्वाचा परिहार केल्यावर त्यानें बाबूजीनाईकावर दृष्टि फिरविली. नाईक, सोंधें बिदनूर, सावनूर वगैरे संस्थानिकांच्या प्रांतांत जाऊन चौथ सरदेशमुखी गोळा करीत असे. सावनूरच्या पठाणाला व इतर संस्थानिकांना आंतून फूस देऊन नाईकाचें सर्वस्वीं नुकसान करण्याचें बाळाजीनें आरंभिलें. (का. पत्रें, यादी वगैरे ६७/६८/७७/७८). बाळाजीनें शाहूला, रघोजीला व बाबूजी नाईकाला हा असा त्रास दिला. शिवाय, शाहूचें कर्ज फेडण्यास बाळाजी विलंब लावूं लागला. शाहूच्या राण्यांचींहि कर्जें फेडण्यास बाळाजी अळमटळम करी. तेव्हां शाहूला बाळाजीचा राग अर्थातच् आला व १७४७ त बाळाजीचा अधिकार काढून घेण्याचा त्यानें विचार केला. ह्या प्रसंगाला अनुलक्षून भारतवर्षांतील नंबर ४५ चें पत्र आहे.*
त्यावरून बाळाजीला निरोप देण्याचा शाहूचा विचार होता हें स्पष्ट होतें. शाहूला ह्यावेळीं बहुतेक वेड लागण्याचा समय येऊन तो पुढें दोन वर्षांनीं १७४९ साच्या डिसेंबराच्या १५ तारखेला मरण पावला. शाहूच्या मरणापूर्वी तीन महिने बाळाजी साता-यास येऊन बसला होता व महाराजांच्या मरणोत्तर गादीवर कोणास बसवावें ह्या खटपटींत निमग्न होता. सातारच्या गादीला त्यावेळीं हक्क सांगणारे दोन पुरुष होते. (१) पहिला हक्कदार, ताराबाईचा नातू रामराजा व (२) दुसरा, कोल्हापूरचा संभाजी राजा. पैकीं संभाजी राजाकडे बाळाजीचा १७४० पासून ओढा होता हें वर सांगितलेंच आहे. परंतु, तो शाहूमहाराजांना पसंत नव्हता. राजाराम महाराजांचा वडील पुत्र जो शिवाजी त्याचा मुलगा रामराजा हयात आहे असें शाहूला नुकतेंच कळलें होतें. तेव्हां त्याला दत्तक घेऊन राज्य चालवावें असें शाहूचें साग्रह व सशास्त्र म्हणणें पडलें. त्यावेळीं बाळाजीला शाहूनें एक चिठ्ठी लिहिली आहे ती खालीं देतों.
राजमान्य राजश्री बाळाजी प्रधान पंडित यांस
आज्ञाः-
तुम्ही फौज धरनें. आज्ञा केली त्याच्या दैवीं नाहीं. महाराजास दुखनें झालें. नाहीं*; बरें होत नाहीं. राज्यभार चालला पाहिजे. तरी पुढें वंश* बसवन. कोल्हापुरचें न करनें. चिटणिसास सर्व सांगितलें तसें करनें. वंस होईल त्याच्या आज्ञेंत चालनें. राजमंडळ चालवनें. चिटणीस स्वामीचे इसवासू. त्याच्या विचारें राज्य राखनें. वंस होईल तो तु (ह्मांस *अंतर) करनार नाहीं. सुदन असा.*