प्रस्तावना
(क) महाराष्ट्रधर्मांत म्हणजे महाराष्ट्रसंस्थांत अष्टप्रधानघटित राज्यव्यवस्थेचाहि अंतर्भाव होतो. राष्ट्राच्या कल्पनेंत राष्ट्रभाषेचाहि समावेश होतो. शिवाजीराजे अवतीर्ण होईतोंपर्यंत दक्षिणेंतील मुसुलमानांच्या संसर्गाने जावली, शृंगारपूर, इत्यादि स्थलींच्या मराठ्या राजांच्या दरबारी व शिवाजी राजाच्या पराक्रमाला सुरुवात होऊन त्यांच्या अभिषेककालापर्यंत खुद्द शिवाजीच्या दरबारीं देखील निरुपायानें फारसी व मुसुलमानी भाषेंतील शब्दांचाच प्रचार उत्कटत्वेंकरून सर्वत्र चालत असे. ह्या परदेशीय प्रचारामुळें स्वराज्याची व स्वराष्ट्राची शुद्ध कल्पना मराठ्यांच्या मनांत गढूळ व अस्पष्ट अशी असण्याचा संभव होता. म्हणून शिवाजीनें फारशी शब्द टाकून त्यांच्या ऐवजीं संस्कृत व महाराष्ट्र शब्दांचा उपयोग करण्याचा परिपाठ घातला.
येणेप्रमाणें स्वराज्य साधून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा विचार शिवाजीच्या राजनीतींत प्रधान होता. संभाजीराजालाहि महाराष्ट्रधर्म पसरविण्याचा उपदेश समर्थांनी केला आहे. राजाराम व त्याच्या वेळचे मुत्सद्दी व सेनापति ह्यांनींहि हा स्वराज्यसाधनाचा कित्ता उत्तम गिरविला. पुढें शाहूमहाराज आले. त्यांनीं १७०७ पासून १७१४ पर्यंत जो प्रांत ताराबाईच्या हातून त्यांना मिळाला तेवढ्याची व्यवस्था करून नंतर १७१४ त बाळाजी विश्वनाथास स्वराज्यसाधन करण्याकरितां मतलबाची खालील याद करून दिली.
ह्या यादींतील मतलबाचें साधन करण्याकरितां बाळाजी विश्वनाथ १७१८ त हुसेन-अल्लीबरोबर दिल्लीस गेला. १७१९च्या फेब्रुवारींत व मार्चांत वर दिलेल्या यादींतील स्वराज्याच्या मतलबाच्या सनदा सय्यदबंधूंकडून त्यानें करून घेतल्या; त्या सनदा घेऊन तो साता-यास परत आला व थोड्याच दिवसांत म्हणजे १७१९ च्या आक्टोबरांत मरण पावला. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूचा सन १७२० अक्टोबर असावा असें ग्रांट् डफ् म्हणतो तें मला अनेक कारणांकरितां ग्राह्य दिसत नाहीं. पुढें १७२० च्या एप्रिलांत बाजीरावाला पेशवाई मिळाली. त्या वेळीं बाळाजी विश्वनाथाला दिलेली यादी शाहूनें बाजीराव बल्लाळाला दिली (भारतवर्षांतील पत्रें व यादी, ४०).* *