प्रस्तावना
किल्ले फोंडो प्रांत तालुका घेऊन हुजूर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावें. ... ... कलम १.
स्वराज्य साधनाच्या ठायीं वकिलापाशीं मध्यें राहून तुरुक लोकांचें साधान करावें. ... ... ... ... कलम १.
प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणुकीबद्दल हुजूर अम्मल पैकीं पावतें करावें. ... ... ... ... ... कलम १.
प्रांतमजकुरची देशकत वतनें तुमचीं व बहादूर किताब अजरामत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणीं तुमच्या स्वाधीन केलीं आहेत. तेथें दास्तान करून जतन करावीं. तेथें हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे. ... ... ... कलम १.
शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७ एकूण पांच कलमें करार करून तहनामा दिला असे. मोर्तब.
हा तहनामा १६५९ च्या मार्चांत झाला आहे. ह्याचा उल्लेख ग्रांट डफ् नें १६५९ सालच्या हकीकतीखालीं केला आहे. ह्यांत स्वराज्यसाधनाचें कलम आहे. शिवाजीनें मुधोळच्या घोरपड्यांस पाठविलेलें एक विस्तीर्ण पत्र मजजवळ आहे. त्यांतही हाच हेतु दर्शित केला आहे.
(ब) स्वराज्य, गनीमाई, सरदेशमुखी व चौथाई ह्या मागण्या मोंगलाईंतून मागण्याचा शिवाजीनें परिपाठ ठेविला. ह्यांत स्वराज्यसाधनाचा बराच इतिहास गर्भित आहे. आपण मोंगलाच्या राज्यांतील प्रांताचे सरदेशमुख आहोंत, मोंगलाच्या अमलांतील प्रांत पूर्वी मराठ्यांच्या स्वराज्यांत मोडत होता व मोंगल लोक मराठ्यांना गनीम म्हणत त्या अर्थी गनीमाईचा पैसा त्यांच्यापासून चोपून घेऊन उणें अक्षर बोलल्याची आठवण जन्मोजन्म त्यांना व्हावी, इत्यादि अर्थ ह्या शब्दापासून ध्वनित होतात.