[२२२] ।। श्री ।। २८ जुलै १७६०.
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
विनंति उपरिः अबदालीचे मतें आपले देशास जावें, लढाई एकंदर पाडूं नये. एक वाटा त्याची देशची फौज गेली; दोन वाटे राहिली आहे. सुज्यातदौले यांचे मतें आपले हातें व नजीबखान रोहिले यांचे हातें अबदालीकडील तह श्रीमंतांनीं करवावा, ह्मणजे आह्मी सर्व ठीक करून देऊं, त्यास देशास लावून देऊं. या अन्वयें त्याचीं पत्रें आपणास येतात. तरी सुज्यातदौले यांस पत्र थैली सरकारांतून पाठवावी. त्यांत आमचे लिहिण्यास हवाला घालून ल्याहावें. हें चित्तास आलें तरी करावें, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशियास, सध्यां सरदार व बळवंतराव गणपत दिल्लीस पाठविले आहेत. त्यांनीं शहर घेतलें, किल्लाहि सत्वर घेतील. आह्मी मजलदरमजल तेथें जातों. तें काम जालियानंतर येविशींचें लिहून पाठवूं. तुह्मीं तिकडील वर्तमान आणवून वरचेवर लिहून पाठवीत जाणें. अंतर्वेदींतून तुह्मांकडून उगळा असावा. र॥ छ १४ जिल्हेज. हे विनंति.