[२२१] ।। श्री ।। २८ जुलै १७६०.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं विनंतिपत्रे पाठविलीं तीं पावलीं. ठाण्यांचा बंदोबस्त ठीक करून लौकरीच हुजूर येऊन पोहोचतों ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, उत्तम आहे. बंदोबस्त करावयास दिरंग न लावणें. सत्वरीच सर्व बंदोबस्त ठीक करणें. वरकड सर्व पुरवणीपत्रीं लिहिलें आहे. त्यावरून कळेल. र॥ छ १४ जिल्हेज. हे विनंति.