[ ११८ ] ।। श्री ।। ९ आक्टोबर १७५७.
पे॥ छ २४ मोहरम रविवार प्रात:काळ पाच घटिका दिवस.
आज्ञाधारक कचेश्वर त्रिंबक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ता॥ छ २४ मोहरम शनवार कुशल. यानंतर कृपावलोकनेंकरून छ २२ रोजीचें आज्ञापत्र सादर जालें तें छ २४ रोजीं एका प्रहरा पावलें. शिरसा वंद्य करून भूषण जालें. राजश्री विठोपंत आज्ञेप्रमाणें छ २३ रोजी शहरास पावले. नवाब दरगाहकुलीखान याची भेटी घेतली. छ मजकुरीं गाडदी याच्या लोकांनी कोण्हास इतला न कळता सातारियास जाऊन पंचवीस मनुष्य घोडे हरपले हा बहाणा करून धुंद केली. दीक्षित स्वामीचे गुमास्तियास घेऊन लष्करांत रात्रीस आले. निजामअल्लीस तेचसमयीं अर्ज जाला. त्यांनीं इम्रराईमखान गाडदी यास ताकीद केली तो मुलकीर झाला कीं इतला नाहीं, त्यावरून माणसास ताकीद केली. वराडच्या गृहस्थाचा मनोदय आहे कीं शिबंदीचे ऐवजामध्यें वडील बंधूपासोन तालुका शहराचा घ्यावा. परस्परे जाबसाल खलबत वाजदअल्लीखान व विठोपंत वगैरे ब-या बाबत आहेत. निश्चय मुकरर जाला नाहीं. दौलताबादकराचाहि जाबसाल एका दोघा गृहस्थाचे विद्यमानें जाबसाल सुरूं आहे. पव्क जालिया लिहिला जाईल. खान अलम व आजेचंद रोजे खबरेहून शहरास दाखल जाले. मुलाजमत होणार. सातशें स्वार समागमें आहेत. सुलतानजी व जानोजी वगैरेची मुलाजमत निजामअल्लीची जाली. येक दोन खलबती जाल्या. इम्ररामखान गाडदी व खंडागळे यांची मुलाजमत निजामअल्लीचे मारफातीनें जाली. हें वर्तमान पूर्वी रा॥ कृष्णाजीपंताचे पत्रीं लिहिलें होतें. विनंति करून श्रुत जालें असेल. श्रीमंतजीच्या थैल्या बसालतजंग व खोजे न्यायतुलाचे नावें आल्या. त्या राजश्री विठ्ठलपंताच्या हस्तें गुजरल्या उत्तर दिधलें कीं जाब उदयिक देऊ बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.