[ ११५ ] ।। श्री ।। ८ आक्टोबर १७५७.
पे॥ छ २३ मोहरम मंदवार प्रातःकाळ.
सेवेसी भगवंतराव यादव सा।। नमस्कार विज्ञापना ऐसीजे. आज छ २२ मोहरमचें वर्तमान तर आपण प्रातःकाळीं शोधार्थ गेलों होतों. मुरादखानानें वाजीअल्लीखानाशीं फार रत्ब केला आहे. दोन हजार स्वारांचा हुकूम ठेवावयाचा यांसी केला. आजी नाजुक जागा ठिकाणींचे ग्रहस्थाचे मुखें ऐकिले की मुरादखानास निजाममुदौलांही सेहजारी व साहेबनवबत करावें. हें वर्तमान ऐकिलें. विठोजी सुंदर यास शामजी टकलियांनी आपले घरीं भोजनास नेले होतें. तेथून सयदकाबीलखानाचे घरीं जाऊन वाडखोळ खलबत केलें. विठोजीपंताचे घरची लोकांची बोली कीं निजामुदौला सलाबतजंगास व बसालतजंगास ह्मणतात कीं आह्मी खिसारतेखालें आलों; तलबहि लोकांची देणें आहे. पंधरा लक्ष नगद दीजे आणि ब्राह्मणपुरी व अवरंगाबाद, वराड दरोबस्त दीजे. आज बाबासाहेब स्वार होऊन सैन्यांत शेरजंगाचे येथें गेले होते. खोजे रहमतुलाखान डेरियांत नव्हते. शहरांत जुमियाची निमाजमत यास आले होते. बाबासाहेब गांवांत त्याचे घरीं आले. खलिता त्यांस दिधला. आणखी विचाराची गोष्टी पुसिली कीं शेखअल्लीखान जुनेदी व रहिमतुल्लाखान यांहीं काय पेगाम केला. मुरादखानास निजामुदौलांनी निगादास्त फर्माविली, जागा जागा विचार होतात, हे काय गोष्ट ? ईतला दीजे कीं त्यासारखी पैरवी अमलांत येईल. राजांहीं श्रीमंतास नवाब बसालतजंगाचे कार्यावर तुमचे वास्तियाकरितां मुतवजे केलें आहे. तुह्मी गोष्ट स्पष्ट सांगावी कीं त्याच पलियावर आणिलें जाईल. त्यास याचे उत्तर हेंच दिल्हें कीं पैगाम जो शेखअल्लिखानाब॥ व रहिमतुलाखानाब॥ पाठविला तो जाहीरच असे. सारांश कांहीं मागत आहेत. कांही भावास भाऊ देतील. वरकड त्यांहीं काय करणें आहे ? श्रीमंतांशीं कांहीं त्याच्यानें बिघाडवत नाही. अगर भावासी बिघाडतील तर हिदायतमुदीखानानें कोणता जय पावला ? आह्मी तो महजूद आहों. याहीवर दरदेगय बात काय आहे न कळे. ऐशा गोष्टी तो मजबुतीच्या बाबासाहेबीं सांगितल्या. परंतु अंतरंगींचा साक्ष ईश्वर असे. वाजीदअल्लीखान व रहिमतुलाखान एकत्र जाले होते. परंतु काय भाषण जालें हें न कळे. बाह्यात्कारें तो बहुत खुषीनें बाबासाहेबहि बोलले. परंतु अंतरंगींची गोष्ट ईश्वर जाणें. दिसोन येतें की निजामुदौला याजपासून कांही घेतल्यावांचून उभा राहात नाहीं. विठोजीपंत व मुरादखान वाजीदअल्लीखानास बहुत विचार सांगत आहेत. शहरांत तमाम प्रगट जालें कीं मुलुख मागत आहेत. कळावें. खोजे रहिमतुलाखानाचे खलितियाचा जाब आलियावर बाबासाहेब रवाना करतील. लाला महारायास तो फार बरें वाटत नाहीं. ताप येतो. निजून राहिले आहेत. दरबारास जात नाहींत. हकिमजीचें पत्र त्यास दिल्हें. त्यांत पत्र खोजे राहिमतुलाखान बहादूर व फतहुदीअल्लीखानाचे होतें तें माहारायांनीं दिल्हें. खोजे रहमतुलाखानीं जाब लेहून महारायासी पाठविला. त्यास आपण जाब मागावयासी गेलों होतो. उत्तर दिल्हें कीं पाठविलें. तेथें हकीमजीपाशीं शोध घ्यावा. साहेबज्यादे आणि तुशलीमेब यांचें पत्र स्वामींहीं मुसस्तायेदखानास पाठविलें तें त्यास दिल्हें. जाब घेऊन पाठविला असे. तो जाब साहेबज्यादे हुल्याएकबलयास गुजराणावा. दुसरें पत्र स्वामीस पैठणचे चलहुचे तुमचेसाठीं व सकोपंताचे गुमास्तियाचे बिजहराबमोजीब गौर करणे याविशीं लिहिलें तें सकोपंताचा गुमास्ता सेवेसी प्रविष्ट करील. त्याजप्रमाणें गौर करावा. हे विज्ञापना.