[ १११ ]                                          ।। श्री ।।                           ६ आक्टोबर १७५७.

पे॥ छ २१ मोहरम गुरुवार सूर्योदय.

सेवेसी भगवंतराव यादव स॥ नमस्कार विज्ञापना ऐसीजे:-
आज छ १९ मोहरमीं संध्याकाळीं पत्र बाबासाहेबाचे पत्रांत मलफुक करून पाठविलें तें पाऊन सविस्तर अवगत जालें. अस्सल पत्र रवाना केलियावर फतहुदीअल्लीखान बहादूर यांचे येथें गेलों होतों. वर्तमान ध्यानास आणिलें तों सर्व कुशल असें. नवाब निजामुदवलासी व बसालतजंगासी स्नेह फार जाला आहे. हायदरयारखान दिवाण याचे बागांत जियाफत मुकरर जाली आहे. माजदखान कोतवाल दिश्वड त्यांचे बागांत जाऊन चहुतरे वगैरे तयार करितात. आराईश मोठी करणार. आतशबाजीही तयार करविली आहे. तेथें सोडतील. शहानवाजखानाचे दारमदारांत निजामुदवला येत आहेत. इमराईमखा गाडदी व खंडागळे हे जाबसाल आणवीत आहेत. त्यांचेहि लेख यांजला येतात. कळावें ह्मणोन लिहिलें असे. बसालतजंग हवेलींत आले होते ते मागती डेरियास गेले. वराडप्रांतीचे बालाघाट व पायाघाटचे माहाल कुल निजामुदवला दरखास्त करितात. बसालतजंग पाईघाटचे कांहीं देतात. ऐसी रदबदल आहे. काबिलखानास बाळापूरचे काम देतात. पयसा मागत आहेत. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.